Thursday, 7 December 2017

माझा तू... (कविता)

जिव्हारी रूतलेला 
हवाहवासा काटा तू...
काळजात भरलेला
शब्दांचा साठा तू...

दुःखात उन्मळलेला 
भावनांचा ओढा तू...
नकळत ओघळलेला 
प्राजक्ताचा सडा तू...

माझ्यातच रमलेल्या 
श्वासांचा गाभा तू...
निराशेच्या तळाशी
जगण्याचा वादा तू...

आठवांच्या काळोखात
चकाकणारा पारा तू...
डोळ्यांतून पाझरलेला
आनंदाचा झरा तू...

आवेगात चाललेला 
हृदयाचा ठोका तू...
गहिवरल्या मनाला
श्रावणातला झोका तू...

माझ्यातच रुतलेला
कसं सांगू राजा तू...
कळत नाही अजूनही
तुझी मी कि माझा तू...
@boli


Wednesday, 6 December 2017

चक्रव्युह... (कथा)


चक्रव्युह...!


          मनासारखं आयुष्य जगायला मिळणं यासारखं सुख नाही. तुम्हाला जे जे हवं असतं, अगदी तसंच्या तसं सगळं मिळत असेल; तर तुम्ही नशीबवान आहात, यात काही शंकाच नाही. अगदी सरळधोपट नॅशनल हायवेला गाडी लागावी... थेट टॉप गियर... ब्रेकवरच्या पायाला काहीच काम नाही... दोन्ही हात स्टेअरिंगवर घेऊन वाजणार्‍या गाण्यासोबत हाताने ठेका धरावा... अगदी माझंही आयुष्य तसंच चाललं होतं. चांगल्या सुखवस्तू घरात जन्म झालेला. लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नांदत होत्या. त्यात तीन बहिणीच्या पाठीवर झालेला एकुलता एक मुलगा... लाड कोडकौतुक किती असावं? पुढे शाळेत जायला लागल्यावर वर्गात पहिला नंबर कधी सोडला नाही. मराठी शाळा... हायस्कूल गाजवून झाल्यावर कॉलेजमध्येही नावाचा डंका वाजत होता. दिसायला दिलीपकुमारसारखा दिसतो, अशी कौतुकानं सगळी म्हणायची. पोरीसुद्धा मनातून झुरत असतील. पण असल्या गोष्टी करायला वेळ होता कोणाकडे? एकंदरीत नियतीनेही हेवा करावा, असे जीवन वाट्याला आले होते.
          लहानपणी गोष्टींची पुस्तकं आणि कॉलेजात कथाकादंबर्‍या वाचल्या असतील तेवढ्याच. बाकी खरी आवड वेगळीच होती. विज्ञान आणि अध्यात्म अशा दोन टोकाचे विषय वाचत राहिलो. विवेकानंदाप्रमाणे आपणही आजन्म संन्यासी बनून जगावे किंवा बाबा आमटेसारखे निःस्पृह, एवढीच कामना होती. गौतम बुद्धाची ओळख झाल्यावर एक ना एक दिवस आपणही सिद्धार्थसारखे घर सोडून जाणार, असे विचार डोक्यात घोळत असायचे. बाकी शाळेपासून काही मित्र होते, त्यापलीकडे जग माहीतच नव्हते. पण शेखर आयुष्यात आला आणि फुगलेल्या फुग्याला टाचणी लावायचे काम त्याने केले. मी उत्तर ध्रुव होतो; तर तो दक्षिण ध्रुव. मला वाटले होते, मी राम असेल; तर शेखर लक्ष्मण असेल. पण काळाची वाट उलगडत गेली; तशा आमच्या भूमिका बदलत गेल्या. मी राम नाही बलराम झालो आणि शेखर...
          मैं अमीर था... वह गरीब. मी वर्गात पहिला; तर तो बाकीच्या स्पर्धा कार्यक्रम गाजवून सोडत होता. मी पॅसिव्ह होतो; तर तो ॲक्टीव्ह होता. मी वाचत होतो; तो लिहित होता. मी अभ्यास करत होतो; तो नाटकातून स्टेजवर भूमिका जगत होता. मी स्मित होतो; तो खळखळून हसणारा धबधबा होता. लोकांच्या नजरेत आम्ही शहाणे असलो; तरी तो वेडा आहे, हे आम्हा दोघांनाही माहीत होते. मी झुळूक होतो; तो वादळी होता. मी हायवेला होतो; तर तो डोंगरदर्‍या पालथ्या घालत होता. मी पाऊस पाहायचो; तो पाऊस जगायचा. मी टाय बांधून असायचो; तो शर्टच्या बाह्या मागे सारून मानेवर कॉलर उडवायचा. पण एक होते, साला! रक्ताच्या नात्यात करणार नाहीत, इतके भरभरून प्रेम करायचा. तिखट होते, पण शुद्ध होते. अगोदरच सुरुवातीला मी सांगितले, त्याप्रमाणे मनासारखं आयुष्य जगायला मिळणं यासारखं सुख नाही. तुम्हाला जे जे हवं असतं, अगदी तसंच्या तसं सगळं मिळत नव्हे तर घडून येत असेल; तर तुम्ही नशीबवान आहात, यात काही शंकाच नाही. अगदी घाटात गाडी लागावी आणि एका हाताने गियर व दुसऱ्या हाताने स्टेअरिंग पकडून पाय ए बी सी... अॅक्सिलेटर... ब्रेक... क्लच करत थेट टॉप गियरमध्ये गाडी सणकून वर काढावी... उजव्या हाताने स्टेअरिंग घेऊन वाजणार्‍या गाण्यासोबत डाव्या हाताने सणसणीत शीळ घालावी... असली फिलॉसॉफी त्याच्यासाठीच.
          शेखर आयुष्यात आला आणि सगळ्या व्याख्याच बदलून गेल्या. एकेक जुने मित्र गळून गेले. कधी नव्हे तो मी कॉलेजच्या कट्ट्यावर बसू लागलो. पाऊस सुरू झाला की, घराबाहेर पडून पावसात भिजू लागलो. रात्रीच्या अंधारात स्मशानाच्या पलीकडे जाऊन वाहत्या नदीच्या पात्रातल्या मधल्या खडकावर चांदण्यात निवांत पसरू लागलो. हा शहाणा खडकातले खेकडे पकडून तिथेच भाजायचा. माझ्याच गाडीवरून मलाच मागे बसवून गावभर फिरवून आणायचा. पावसात भिजल्यावर गरमागरम भजीसोबत हिरव्या मिरच्या व गरम चहा फुरका मारून प्यायला लागलो. हा नाकातून सिगारेटचा धूर काढायचा; तेंव्हा कँसरविषयी बौद्धिके घेऊन 'हे तुझे काम नाही रे, झेंडू!' म्हणून खळखळून हसायचा.
     "तुला नाही का कँसर होणार?" असे विचारल्यावर
     "सकाळ संध्याकाळ तासभर अंगातून घाम निघेस्तोवर व्यायाम करतोय रे! काय बिशाद हाय साल्याची. उपाशी मरेल तुझा तो कँसर माझ्याकडे आला तर." म्हणून माझ्याच पाठीवर दणका ठेवून द्यायचा. इकडे पोरी माझ्यासाठी झुरत असतीलही... हा माझ्याच गाडीवरून पोरी फिरवून आणायचा. 'गाडीचा अपमान नको रे व्हायला... तिलाही बरं वाटत असेल पोरगी बसल्यावर. काय काटा फायरिंग मारते. माहितीय!' असली याची बौद्धिके ऐकावी लागायची वरून.
          एकूण त्याच्यासोबत राहून मी बिघडत चाललो होतो आणि माझ्यासोबत राहून तो सुधारतोय, असे त्याला वाटत होते. कॉलेजची दोन वर्षे मजेत काढल्यानंतर त्याला साक्षात्कार झाला आणि तिसऱ्या वर्षाला असताना आम्ही दोघेही पुण्याला आलो. पुढील तीन वर्षांत कधी नव्हे ते सिरियस होऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करत राहिलो. फळही तसेच मिळाले अर्थात. कडक सॅल्यूट ठोकून तो पी.एस.आय.च्या ट्रेनिंगला गेला आणि मीही टाय बांधून प्रशासकीय अधिकारी झालो.  कुठल्या पोरीला लिहिली नसतील; अशी दर्दभरी लव्हलेटर ट्रेनिंगच्या काळात आम्ही एकमेकांना लिहित होतो. नोकरीवर हजर झाल्यानंतर वर्षभरातच घरच्यांनी माझ्यासाठी स्थळं पाहायला सुरुवात केली. अर्थातच दोनतीन ठिकाणी कांदेपोहे खाऊन झाल्यावर याने फायनल अॉर्डर काढली.
     "साल्या! तुझ्यासाठी हीच मुलगी चांगलीय. मरेपर्यंत तुला सोडणार नाही. माझी काळजी मिटली."
     "आता तुझं काय? तुलाही हंटरवाली शोधायला हवी."
     "पागल आहेस का तू? विकत दूध मिळत असताना दारात म्हैस कशाला कोण बांधेल? चारदोन प्रेमभंग... पाचसहा अफेअर केल्याशिवाय मी कसला लग्न करतोय...?"

          हे असं होतं. मी काही सांगायचं म्हटलं की, विषय शेखरपाशीच येऊन थांबतो. प्रत्येकवेळी असंच होतं. खरं म्हणजे मनापासून मला तो आवडत असला किंवा त्याच्याशिवाय माझी कुठलीही गोष्ट पूर्ण होऊ शकत नसली... तरीही कधीतरी मनातून मग त्याच्याविषयी जेलसी वाटणार नाही का? मी जरा कुठे बाहेर कामासाठी निघालो की, घरचे म्हणायचे, 'शेखरला घेऊन जा बरोबर.' बाहेर कुठे एकटा दिसलो की, ओळखीचे विचारणार, 'आज एकटेच? जोडीदार कुठे सोडला?' त्याचे एकेक किस्से असे भन्नाट असायचे की, आपण त्याजागी का नव्हतो, असे वाटत राहायचे. बर्‍याचवेळा आम्ही दोघेही असलो तरी शेवटी तोच भाव खाऊन जायचा. पण एक गुण त्याच्याकडे नक्कीच होता. तो माझ्यासोबत गुंतला असेल तेवढा. बाकी गडी कशातच अडकून राहिला नाही. प्रत्येकवेळी बेधडकपणे आत घुसूनही सहीसलामत बाहेर पडण्याची त्याच्याकडे कला होती. महाभारतात असता; तर चक्रव्युहसुद्धा सहज भेदले असते त्याने.
          आम्हांला मानसशास्त्र शिकवायला एक मॅडम होत्या. पण शेवटपर्यंत त्यांचे मानसशास्त्र आमच्या डोक्यात काही शिरले नाही. एका संथ गतीने त्या बोलत राहायच्या. पहिल्या चार ओळी सोडल्यास कुणालाही त्यांचे बोलणे कळलं असेल, तर शप्पथ! हा गडी मात्र खिडकीत बसून हातातल्या घड्याळाच्या काचेने उन्हाचे कवडसे छतावर पाडायचा. त्याचा निवांत खेळ चाललेला असे. कधीतरी मग मॅडमच्या ते लक्षात यायचे.
     "कोण आहे रे तो?" असे विचारले की, एकदम निरागस चेहरा करून तो इतरांकडे पाहत राहायचा. वरून पुन्हा तोच इतरांना रागवायचा. "ज्यांना लक्ष द्यायचे नसेल; त्यांनी निघा बाहेर. अजिबात डिस्टर्ब करू नका. स्वारी मॅडम, तुम्ही शिकवा. आता कोणी आगाऊपणा करणार नाही."
          या मॅडम जेंव्हा रिटायर झाल्या; तेंव्हा विद्यार्थी मनोगतात कोणी बोलेल कि नाही, शंकाच होती. पण हा गडी अचानक उठून पुढे गेला आणि चांगली पंधरा मिनिटे बोलला. बोलणे जनरलच होते. म्हणजे कोणत्याही निरोप समारंभात खपले असते. पण हा असा इमोशनल होऊन बोलत होता की, सर्वांनाच वाटावे, हे फक्त आणि फक्त मॅडमसाठीच आहे. कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही त्याला कँटिनमध्ये गाठलाच. त्याचे स्पष्टीकरण मात्र जबरदस्त होते. "अरे, सर्वात जास्त त्रास तर मीच त्यांना दिलाय. यापुढे त्रास देण्यासाठी त्या नसतील. जर एकही विद्यार्थी बोलला नसता, तर शेवटपर्यंत ही रुखरुख त्यांच्या मनाला टोचत राहिली असती. प्रवास कसाही असू दे... शेवट चांगला व्हायला हवा. तसेही त्यांचे फार उपकार आहेत माझ्यावर. वर्षभरात अनेकवेळा दांडी मारली. पण त्यांचा तास कधी चुकवला नाही. एकतरी विद्यार्थी मनापासून ऐकतोय, याचे त्यांना समाधान मिळत असेल आणि मागे बसून आपली लाईन क्लेअर झालेली असायची. जाताना तरी त्या समाधानाने जातील आणि माझ्या डोक्यावरून त्यांचे कर्जही उतरेल."
          खरं म्हणजे शेखर असा आगाऊ होता; पण आपली मर्यादा त्याने कधीच ओलांडली नाही. एकदा भूगोलाचे सर कशावरून तरी भडकले होते. कोणीतरी मध्येच हसले. नेहमीप्रमाणे संशय शेखरवर गेला. त्याने परोपरीने सांगूनही सरांनी त्याला वर्गाबाहेर जाण्यास सांगितले. शब्दाने शब्द वाढत गेला.
'तू पास होऊन दाखव,' म्हणून सरांनी चॅलेंज केले. 'नुसतं पास नाही; तर तुमच्या विषयात वर्गात पहिला येऊन दाखवतो,' असे म्हणून तो बाहेर पडला. त्याच्या पाठोपाठ दहाबारा विद्यार्थी बाहेर पडले. त्यात मुलीही होत्या, हे विशेष. यथावकाश वर्ष संपले. मी बोर्डाच्या यादीत झळकलो. पण माझे यश शेखरने झाकोळून टाकले. भूगोलात त्याने मला मागे टाकले होते आणि कॉलेजात पहिला येण्याचा पण पूर्ण केला होता. डिपार्टमेंटला जाऊन सरांना निकाल दाखवून वर त्यांचे आभार मानूनही तो आला. माझ्या बोर्डात येण्याचे जेवढे कौतुक झाले; तेवढेच कायम कट्ट्यावर बसणारा एक विद्यार्थी विषयात पहिला आला म्हणून शेखरचेही झाले.
          आयुष्यातल्या प्रत्येक पहिल्या गोष्टीचं माणसाला अप्रुप असतं. पण शेखरने हा आनंद मला सहजासहजी मिळू दिला नाही. संपूर्ण कॉलेज संपेपर्यंत मी प्रेमात पडलो नाही. पडलो नाही म्हणण्यापेक्षा त्याने पडू दिले नाही. एक मुलगी आवडली होती. हा तिच्यावरून मला चिडवायला लागला. तिला तर थेट वहिनी म्हणून हाक मारायचा. ती नुसतं हसायची. पण माझे काही धाडस झाले नाही बोलण्याचे. या पठ्ठ्याने तिच्या मैत्रिणीलाच अडवले. तीपण तशी पुढचीच होती. सरळ सांगितले, "त्यांचा प्रॉब्लेम ते पाहून घेतील. तू तुझे बोल."
हाही म्हणाला, "तुझ्याशी बोलायला निमित्त पाहिजे म्हणून त्यांचा विषय काढला. विचारायचं तर तुलाच होतं." आमची कहाणी काही पुढे गेली नाही. पण त्याची कहाणी सुरू झाली. तेंव्हापासून त्या दोघीही आमच्या ग्रुपमध्ये मिसळायला लागल्या. आमची मैत्री झाली. पण पुढे काही वाढवण्याचे धाडस मलाच झाले नाही. पाहता पाहता दोन वर्षे गेली. तिचे लग्न ठरले. माझ्या मनला किती पीळ पडला असेल? तरीसुद्धा हा बहाद्दर मला तिच्या लग्नाला घेऊन गेला. वर सगळ्या मित्रांच्या वतीने भलेमोठे गिफ्ट देऊन मला तिच्याशेजारी उभे करून फोटोसुद्धा काढले. निर्लज्जपणा किती करावा? सगळे मित्र दणकून जेवले. घरचे कार्य समजून मलाही माझ्या घशाखाली घास उतरत नव्हता तरीही आग्रह करून खाऊ घातले. याचे किस्से ऐकून मी चरफडत राहिलो आणि हा मात्र माझ्या जखमेवर मीठ चोळत राहिला..."हे बघ झेंडू, दिल अपनी जगह और बिल अपनी जगह. एवढी लाईन क्लियर होती. तू थोडे धाडस केले असते; तर ही वेळ आली असती का? मुळात हा प्रेमभंग वगैरे काही नाही. आणि समजा... समजा तुला तसे वाटत असेलच; तर दोन कश मार. धुरासोबत दुःख हलके होईल. यापुढे तू फक्त अभ्यास कर. ये तेरे बस की बात नही!"

          एकंदरीत पहिले प्रेम... पहिला प्रेमभंग... आणि पहिली सिगारेट... पण पहिलेपणाचे सुख काही मला मिळू दिले नाही. ग्रॅज्युशनची तीन वर्षे संपेपर्यंत बाकीचे उद्योग सांभाळून आमचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालूच होता. त्यातच गुंतवून घेतल्यामुळे ते दुःख फारसे जाणवले नाही. पुढील दोनच वर्षांत मी पोस्ट काढली. त्यानंतर वर्षभरात शेखरही सुटला. नाशिकला ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर त्याला पोस्टींग मिळाली ती थेट यवतमाळच. त्यामानाने माझी ड्युटी चांगली होती. एकतर शहरात सगळ्या सुविधा होत्या. सिस्टीममध्ये रुळायला मलाही फार वेळ लागला नाही. कितीही 'नाही' 'नको' म्हटलं; तरी वरकमाई मिळत होती. प्रापंचिक जीवनातली नव्याची नवलाई मला मानवली होती. आमच्या गाठीभेटी हळूहळू कमी होत गेल्या. शेखरही फार बदलत चालला होता. भेटल्यावर तो असं काही बोलायचा की, हा तोच शेखर आहे का? असा प्रश्न पडायचा.
"झेंडू, अरे, त्या दुर्गम भागात आहे म्हणून मी वैतागलेलो नाही. वरकमाईचा प्रश्नच नाही. वाईट वाटते ते एवढ्यासाठी की, ज्या लोकांच्या विरोधात आम्ही उभे राहतो, ते या सिस्टीमचे बळी असतात. त्यात स्वार्थासाठी त्यांना भडकवले जाते, ते वेगळेच. अरे, ज्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजाही पूर्ण होऊ शकत नाही; त्यांना अत्याधुनिक शस्त्रे आणि लढाईचे ट्रेनिंग मिळतेय. ते लोक आम्हांलाच त्यांचा शत्रू समजतात; कारण त्यांच्या दृष्टीने आम्हीच सिस्टीम आहोत. मध्यंतरी मी हेमलकशाला जाऊन आलो. असंच काहीतरी या लोकांसाठी आपणही चांगलं करावं, असं वाटतं. पण सिस्टीममध्ये राहून मर्यादा आहेत. वर पुन्हा ज्यांच्यासाठी करायचं; त्यांना आमच्यावर विश्वास नाही.
          या संघर्षात नेहमी कुणाचा ना कुणाचा बळी जातो. फक्त कधी तो या बाजूचा असतो; तर कधी त्या बाजूचा. पण हे बळी जाणे कुणाच्या हिताचे आहे? हे कधीच थांबणार नाही का? असा एखादा पूल उभारला गेला पाहिजे; ज्यामुळे दोन्ही बाजू जोडल्या जातील. पण इथे मोठा मासा लहान माशाला गिळतोय. सत्तेचे गुलाम होऊन आम्ही मात्र आमची कातडी वाचवण्यासाठी धडपडतोय. रावणाला दहा डोकी होती असे म्हणतात. आज प्रत्येकाला एक डोके हवे आहे...
स्वतःसाठी विचार करायला नव्हे; तर कुठल्याही गोष्टींचे खापर फोडता यावे म्हणून...!!!
दहा डोक्याचा रावण परवडला. त्याला निदान दहाच डोकी होती. या सिस्टीममध्ये लाखो करोडो डोकी आहेत."
          शेखर सांगतोय त्यात चुकीचे काय आहे? संघर्ष तर आमच्या इथेही आहे. त्यात एक डोके माझेही आहे. खोटं सांगत नाही. महिन्याला येणारा पगार खात्यावर जमा होतोय. काढायची गरजच पडत नाही. तरीही सगळा खर्च आरामात चाललाय. गृहलक्ष्मी आनंदात आहे. वैभवलक्ष्मीची कृपा आहे. विशेष म्हणजे दोन्ही फुगत चालल्या आहेत. हवे ते मिळतेय. राजेशाही थाट आहे नुसता. सरकारी गाडी दिमतीला असतानाही दहा लाखाची कार घेतलीय. राहायला सरकारी निवासस्थान असले; तरी दोन ठिकाणी फ्लॅट आहेत. सगळी कामे करायला नोकर आहेत. शॉपिंग हॉटेलिंग नेहमीचंच आहे. आता सरकारी अधिकारी म्हटलं की, चार मोठ्या लोकांत उठबस असते. सुरुवात कधी झाली आठवतही नाही. पण आता रात्र नशेतच जाते. सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण आवर्जून घरीच घेतो अजूनही. सुट्टी दिवशी मुलांसाठी वेळ देतो. सिस्टीम मला कळलीय. पण शेखरला कळत नाहीये. कळून घ्यायची त्याची मानसिकता नाही. अजूनही लग्न केलेले नाही. बरेच आहे. पूर्वी तुपाशी होता, आता उपाशी आहे. छे! उपाशी कसला राहतोय. जंगल मे मंगल करत असेल, स्साला! आतापर्यंत बर्‍याच नाठाळ घोड्यांना लगाम लावलाय त्याने. आता जंगली घोड्यांवर मज्जा चालली असेल. उगाचच का पुळका येतोय त्यांचा.
           शेवटी जे व्हायचे तेच झाले. कुठल्या तरी पुढाऱ्यावर हात उचलला त्याने. बातमीत अंगावर धावून गेला, एवढंच लिहिलंय. पण मला खात्री आहे, चारदोन तरी वाजवल्या असतील त्याने. फोन केला बातमीमागची बातमी ऐकण्यासाठी. कुठल्याशा जंगली पोरीला धरले होते म्हणे त्याने. अरे बाबा, हत्ती चालतो, तेंव्हा पायाखाली किडामुंगी यायचीच. तुला चिडायला एवढं काय झालं? बरं तू कशाला कायदा हातात घेतला? तसा पुढारी लोकलच आहे. पण सत्ताधारी पक्षाचा आहे. त्यामुळेच मिडियानेही लावून धरलेय. निलंबन झाले. प्रथेप्रमाणे चौकशी समिती नेमली. किती झाले तरी माझा मित्र आहे. सहजासहजी तो चक्रव्युहात अडकणार नाही. पण मित्र म्हणून मलाही हालचाल करावीच लागली. चारदोन ठिकाणी फोन फिरवले. फिल्डिंग लावली. आणि त्याला घेऊन थेट मंत्रालय गाठले. साहेबांनी थोडे आढेवेढे घेतले. मग पी.ए. ला वशिला लावून रात्री एकटाच त्यांच्या बंगल्यावर गेलो. इंपोर्टेड स्कॉच गिफ्ट म्हणून नेली होती. चार पेग झाले तेंव्हा त्यांनी शब्द दिला. म्हणले, 'सध्या वातावरण तापलेले आहे. थोडे दिवस जाऊ दे. तोपर्यंत रजेवर पाठवतो सक्तीच्या. तुम्ही तयारी ठेवा. बदलूनच आणू इकडे. फक्त काम जरासं जड हाये, याची जाणीव राहू द्या. कसं?'
             याला सिस्टीम म्हणतात. पाण्यात राहून माशांशी वैर करा. पण मगरींशी दोस्ती पाहिजे. प्रत्येकाला पोट आहे. फक्त समोरच्या माणसाची भूक ओळखता आली पाहिजे. कुणाला पोटाची असते, तर कुणाला पोटाखालची. कॉलेजात तो हिरो होता. आज मी हिरो आणि तो झिरो ठरला. तेंव्हा मुठीची भाषा करायचा. खरी हुशारी तर ही आहे की, मूठ दाबता आली पाहिजे. साहेबांची मूठ दाबली असली; तरी विरोधी पक्षातल्या तिथल्या लोकल पुढाऱ्यांना सांगून काही गोष्टी उकरून काढल्यावर शेवटी वर्षभराने केस मागे घेतली गेली. शेखर निर्दोष सुटला. कामावर रुजू झाला. एवढंच नाहीतर ट्रान्सफरही केली.

          शेखरची बदली झाली ती थेट सोलापूरला. तो सोलापूरला गेला. एकूण शेखरची गाडी रुळावर आल्यामुळे मी खूश होतो. पण त्याचा मूळचा स्वभाव मी बदलू शकत नव्हतो. सोलापूरसारख्या ठिकाणी तो त्याचा स्वभाव त्याच्या फायद्याचाच ठरला. एकतर महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रची सिमारेषा असल्यामुळे सोलापूर तिन्ही लोकांनी गजबजलेले. पूर्वीचा ऐतिहासिक वारसा असला तरी जातीय रंग होताच. पण हा गडी बुलेटवरून कमरेला पिस्तूल अडकवून बिनधास्तपणे फिरायचा. जरा गोंधळ दिसला की, हातात काठी घेऊन सगळ्यांच्या पुढे घुसायचा. लवकरच त्याने गुन्हेगारी क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला. लोकल पुढाऱ्यांना हाताशी धरून कामात येणारे अडथळे दूर केले. मीही बदली होऊन लातूरला आलो. आमच्या भेटीगाठी होऊ लागल्या. एकूण सगळे व्यवस्थित सुरू झाले. थोड्याच दिवसांत त्याला प्रमोशन मिळाले पुण्यात. आमच्या आयुष्याला या पुण्यातूनच आकार आला होता. मागच्या अनुभवाने शहाणा झालेल्या शेखरने पुण्यात आल्यावर आपला वट बसवला. पुण्यातही रुळायला त्याला फार वेळ लागला नाही.  
          सगळे व्यवस्थित चाललेय, असे वाटत असले तरी मी मात्र पिण्याच्या आहारी गेलो होतो. नशेत असताना मला माझ्यात पण काही कमी नाही, हे कळायला लागले. उगीचच शेखर मला झेंडू म्हणतो. मी झेंडू नाही. त्याच्यासारखे बिनधास्त मीही जगू शकतो. तो जे काही करू शकतो, ते तर मलाही अवघड नाही. म्हणून मग मीही नशेत असलो की, शेखरसारखे आयुष्य जगण्यासाठी अट्टहास करू लागलो. असतील नसतील तेवढ्या सगळ्या गोष्टी करायच्याच, हा चंगच बांधला होता. अर्थात रात्रीची नशा संपली की, सगळा फुगा फुटून जायचा. दिवसा मी माझ्या भूमिकेत आलेलो असायचो. शेखर मला खूप समजावून सांगायचा. "दोस्ता, हवं तसं जग. पण प्रत्येकाला एक मर्यादा असते, हे विसरू नकोस. आयुष्यातील आनंद घ्यायला हवाच. पण तो घोड्यावर बसून. घोडा उरावर घेऊन नाही. तू जे काही करतोस किंवा करणार आहेस, ते तुझ्या मनापासून कर. नशेच्या आहारी जाऊन नाही. सध्या तू जे काही करतोस; ते तू करतोय, असे तुला वाटते. पण ते तू नाही, तुझ्या पोटातील दारू करतेय, हे तुझ्या लक्षात येत नाही किंवा ते समजून घेण्याची तुझी तयारी नाही."
"तुझी फिलॉसॉफी तुझ्याकडेच ठेव. मला नाही कुणाची पर्वा." शेखरची वाक्ये मी शेखरच्याच तोंडावर फेकत होतो. मला कुणाचीच काय शेखरचीही पर्वा राहिलेली नव्हती. मी माझी तर सोडा पण घरच्याचीही पर्वा करायचे सोडून दिले होते. मला फक्त हवे तसे जगण्यासाठी निमित्त हवे होते. ज्या गोष्टी केल्याने इज्जत जाते म्हणतात, त्या गोष्टी करण्यात वेगळीच शान असते, हे मला कळले होते. इज्जत तो अबतक बहूत थी... अब बेइज्जत होकर मी सगळ्यांवर अगदी स्वतःवरही सूड उगवत होतो. खूप आयुष्य वाया घालवले आतापर्यंत. आता नाही. मला हे सुख टोचायला लागले होते. ज्याची कल्पनाही केली नव्हती, अशा गोष्टी करून बसलेला शेखर मला शहाणपण शिकवतोय. काय त्याचे वाईट झाले, ते माझे होणार आहे.
          काही कामानिमित्त मी पुण्यात आलो होतो. मीसुद्धा चक्रव्युह भेदू शकतो. मी स्वतः तयार करेन आणि भेदून दाखवेन. अशा नशेतच आणि डोक्यात छर्र ठेवून मी निघालो. आजपर्यंत राहिलेली एक गोष्ट मला हवी होती. सुख आणि समाधान. गेल्या कित्येक दिवसांत मला ती मिळाली नव्हती. एकटा पडलो होतो मी. ज्यांच्यासाठी मी एवढे कमावलेय, त्यांना त्याची किंमतच नाही. माणसापेक्षा वस्तूचे मोल यांना अधिक आहे. विशेषतः बायको. कपडेलत्ते दागिने हवे... दिले. घर हवे... दिले... महागडे फर्निचर हवे... दिले. मागा काय हवे ते... देतो. देण्याची ताकद आहे. पण मला काय मिळाले? शेजारी झोपलो तरी तिला वास येतो, म्हणून तोंड फिरवून झोपते. जवळ जायचे म्हटलं की, दारू पिल्यावरच तुम्हाला हे धंदे सुचतात, म्हणून झिडकारून टाकते. चल जाऊ दे. तुझ्यात तरी काय राहिलंय आता. मैद्याचं पोतं झालीस तू. कातडी बघ. दोन लेकरं झाली तर लोंबायला लागलीय. मला सुख हवंय. आनंद हवाय. मलाही प्रेम करायचंय. अरेच्चा! शेखरच्या नादात माझं ते राहूनच गेलं. आता नाही. आता मी पूर्ण करेन माझ्या सगळ्या इच्छा. गाडी पार्क करून लटपटणार्‍या पावलांनी मी जिन्याचा कठडा धरून वर चढू लागलो. तोंडातली सिगारेट फेकून दिली. या सिगारेटमुळे मला दम लागतोय कि माझंही वजन वाढलंय अलीकडे? छे! अजूनही आपली रग टिकून आहे. असले छपन्न जिने चढू शकतो मी.
          "आओ शाब! बैठो. अरे छोरे, कहाँ मर गया लौंडा? चल शाब को पकडकर सोपे पे बिठा... बोलो शाब, क्या खिदमद करू आपकी? आप सिर्फ उंगली दिखाओ... आज की रात रंगीन बना दूँगी...!"
           तोंडाला भयानक मेकअप चोपडलेल्या पोरी फिदीफिदी हसत होत्या. छ्या! असल्या नको. असली पाहिजेल. काय म्हणायचा शेखर? फिगर पाह्यजे... जिगर पागल करणारी. मी उठून आत गेलो. एकेक चेहरा बघत पुढे पुढे चाललो. तेवढ्यात माझे लक्ष गेले. म्हणून एक पाऊल मागे येऊन पुन्हा पाहिले. गॅलरीत ती पाठमोरी उभी होती. पिंजऱ्यातल्या पोपटाशी बोलत.
      "आँटी, यईच्य होना अपनेको..." खिशातून पाचशेच्या दोनचार नोटा आँटीच्या हातात दिल्या.
      "ये हिना, चल सँभाल अपने मजनू को... शाब, आडवान्स तो मिल गया... पुरी रात बैठना है तो अलगसे देना अपनी खुशीसे..." हसत आँटी निघून गेली आणि हिनाच्या खांद्यावर हात टाकून मी तिच्या खोलीत गेलो. कितीतरी वेळ मी पित होतो आणि माझ्या नजरेत आपल्या घार्‍या डोळ्यांनी पाहत ती पेग भरत होती. तिच्या शरीराची ऊब पांघरूण मी झोपी केंव्हा गेलो, ते मलाही कळले नाही. जाग आली तेंव्हा सकाळचे फटफटीत ऊन पडले होते.

          आता मला कोणाचीही गरज राहिली नव्हती. मी स्वतंत्र होतो. मला माझे अस्तित्व होते. माझ्या गरजा मला कळलेल्या होत्या... आणि त्या पूर्ण कशा करायच्या हेही मला कळलेले होते. आजपर्यंत मी उगीचच प्रत्येक गोष्टीचा बाऊ करत जगत होतो. आजपर्यंत मी माझे आयुष्य फुकाच घालवले होते. आता मला माझ्या जगण्याची वाट सापडली होती. माझ्या भूतकाळात जे काही होते, ते सारे निरर्थक होते. माझ्या भविष्यकाळात स्वर्ग निर्माण करण्याची ताकद माझ्याकडेच होती. माझ्यासाठी फक्त माझा वर्तमानकाळ महत्त्वाचा होता. तो मला पुरेपूर उपभोगायचा होता. या जगात जर खरे सत्य काय असेल; तर तो फक्त उपभोग...
          मला राग आला होता माझ्या घरच्यांचा. घरात एवढी लक्ष्मी नांदत होती. पण त्यांना त्याचा उपभोग घेता आला नाही. अध्यात्माच्या नावाखाली स्वतःची फसवणूक करून घेत राहिले. मलाही कधी मोकळेपणानं जगू दिले नाही. कायम मला बांधून ठेवले. एवढं करून कसला मोक्ष आणि कसली स्वर्गप्राप्ती होणार होती यांना? अरे स्वर्गाचे सुख तर इथेच आहे. मला राग आला होता माझ्यावर लादलेल्या संस्कारांचा... खरे जीवन तर मला आता कुठे कळायला लागले होते. मला राग आला होता शेखरचा. स्वतः कायम सुख उपभोगत राहिला. मला मात्र झेंडू म्हणून हिनवत राहिला. पण त्याला जे जे सुख आजपर्यंत मिळाले, ते ते मी यापुढे ओरबाडून घेईन. आता माझ्या मनात आग पेटलेली होती. या आगीची भूक पूर्ण करण्यासाठी मला ती कायम पेटती ठेवायला लागेल. त्यासाठी मग लागेल ती आहुती त्यात टाकत राहीन. पहिली आहुती मी दिली होती. माझ्यावर असणाऱ्या सर्व दृश्य आणि अदृश्य बंधनांना झुगारून मी पहिली आहुती त्यांचीच दिली होती. मला आता माझ्या सुखापासून कोणीही परावृत्त करू शकत नाही.
          यानंतर वरचेवर माझी पुण्याला कामे निघू लागली. पण एकदाही मी शेखरला भेटलो नाही. त्याला माझ्या येण्याजाण्याची कल्पनाही येऊ दिली नाही. अर्थात तशी गरजही नव्हती. मला हवे ते सर्व सुख मला मिळत होते. इतके दिवस या सुखापासून दूर राहिल्याचा मला पश्चात्ताप होत होता. म्हणूनच मला राहून गेलेल्या सर्व सुखाची पुरेपूर कसर काढायची होती. माझ्या बदनामीची मला कसलीही पर्वा नव्हाती. तसेही मला ओळखणारे होतेच कोण? माझ्या वारंवार येण्याजाण्यामुळे मी आता नेहमीचे गिऱ्हाईक झालो होतो. आता हिनाला भेटण्यासाठी त्या बदनाम पायऱ्या चढण्याची गरज उरलेली नव्हती. आँटीला तिची बिदागी मिळण्याशी मतलब होता. मी पुण्यात असलो की, मी ज्या हॉटेलमध्ये थांबायचो, तिथे हिनाच मला भेटायला यायची. दोन दोन दिवस रात्र आम्ही एकत्र असूनही मन काही भरत नव्हते. जेवढे सुख तिने मला दिले असेल, तेवढे सुख मला कदाचित कुठे मिळाले असेल. मदिरा आणि मदिराक्षी यापुढे स्वर्गसुद्धा झक मारत असेल. एकदोनवेळा हिनाच्या इच्छेखातर लोणावळा माथेरानही फिरून आलो. गोव्याला जायला निघालो, तेंव्हा दोन दिवस महाबळेश्वरमध्ये घालवून तिथूनच परत आलो. मग शेखरला हे सगळे सांगायची गरजच काय?
           सुखाच्या सागरात असा आकंठ बुडालेला असताना माझ्या सुखाला कोणाची तरी नजर लागली असावी. मला अलीकडे छातीत आणि पोटात दुखू लागले होते. मध्यंतरी एकदोनवेळा कावीळही झाली होती. हॉस्पिटलमध्ये गेलो की, तेवढ्यापुरतेच बरे वाटायचे. पण यावेळी आजारी पडलो; तेंव्हा चांगले पंधरा दिवस अंथरूणावर पडून होतो. बायको असायची जवळ. पण मला ती जवळ नसेल, तेवढे बरे वाटायचे. शेखरही येऊन भेटून गेला. पण यावेळी त्याला भेटूनही मला म्हणावा असा आनंद झाला नाही. उलट हा अजून काय शहाणपण शिकवतोय, याचीच काळजी लागली होती. तरी जाताना म्हणालाच, "जरा लवकर बरा हो रे! तुला जरा वेगळ्या पद्धतीने समजावून सांगावे लागेल, असे दिसतेय."
साल्याचा अजून दांडगावा काही जात नाही. कोणीही मला समजून घेऊ शकत नाही. ना माझे आईबाप समजू शकले... ना माझी बायको... हा शेखर समजून घेईल असे वाटायचे... पण हिना सोडली तर मला कोणीही समजून घेऊ शकत नाही. तिच्या मांडीवर डोके ठेवून दिवसभर पडून राहिलो तरी वेळेचे भान राहत नाही. तिच्या केसांचा नुसता सुगंधही माझ्या भोवतालच्या सर्व परिस्थितीचा विसर पडायला भाग पाडतो. तिच्या लांबसडक बोटांनी तिने नुसता स्पर्श केला तरी मी विरघळून जातो. एकदा का बरा झालो की, हिनाला भेटायलाच हवे होते. पण डॉक्टर काही सोडायला तयार नव्हते.
          कामावर हजर झाल्यानंतर सर्व काही सुरळीत व्हायला महिना गेला. त्यानंतर इकडची सगळी व्यवस्था लावून मी पुण्याला गेलो. अर्थातच मी फोन करताच हिना मला भेटायला हॉटेलवर आली. 
तासाभरानंतर काय गडबड झाली कोणास ठाऊक! पण हॉटेलमध्ये धावपळ गोंधळ सुरू झाला. दार वाजले म्हणून मी दार उघडायला गेलो खरा! पण दारात शेखरला पाहून मी चक्रावलोच. मी काही बोलायच्या आतच मला आत ढकलून शेखरने बाहेरून दार बंद केले. हिना तर बाथरुममध्ये जाऊन लपली होती. खूपवेळ बाहेरचा कालवा ऐकू येत राहिला. मलाही काही सुचत नव्हते. काहीतरी गडबड झाली होती, एवढे नक्कीच! खूप वेळाने सर्व शांत झाल्यावर दार उघडल्याचा आवाज आला. तो शेखरच होता. मी काही बोलायच्या अगोदरच त्याच्या राठ हाताची थप्पड माझ्या गालावर बसली होती. दिवसाही डोळ्यांसमोर काजवे चमकले.

          
          त्या दिवसानंतर मी शेखरला भेटायचे टाळले ते टाळलेच. तोच कधीतरी येऊन जाई. मी चक्रव्युहात घुसलो खरा. पण ते भेदण्याचे मला जमले नाही. डॉक्टरांच्या सांगण्यावरून मी दारू सोडली. सोडली म्हणण्यापेक्षा सोडावी लागली. तब्बल तीन महिने व्यसन मुक्ती केंद्रात काढावे लागले. हिनाशी संपर्क करायचा प्रयत्न केल्यावर हिनाने पुणे सोडल्याचे आँटीकडून कळले. यातही शेखरचाच हात असावा, असा माझा दाट संशय आहे. पण अलीकडे मला शेखरची जास्त भीती वाटते. माझ्या लीव्हरपेक्षाही...!!!


(समाप्त)

- श्री नंदकिशोर गायकवाड.

Monday, 2 October 2017

लागीर... (कविता)


बाहेरवसा... बाई झालाय कसा...
नाजूक जिवाला पडलाय फासा...
फडफड पापणी, काळीज धडधड
कोळ्याच्या जाळ्यात गावलाय मासा...

लागीर झालंय जिवाला माझ्या...
डोळ्यांत दाटलं चांदणं राजा...
वाजतोय पावा भूलली राधा...
सावळ्या सख्याची झालीय बाधा...

कदंब वृक्षाच्या खाली...
यमुनेच्या डोहावरती...
कन्हैयाची वाजे मुरली...
दुपार चांदण्याची झाली...
लागीर लागीर झालं जी...
पुरतं लागीर झालं जी...

अनामिका... (कथा)

#अनामिका...

          दोन तास झाले... गाडी तिच्या गतीने धावत होती. खिडकीतून येणाऱ्या थंड वार्‍यासोबत काही वेळापूर्वी होऊन गेलेल्या पावसाचा ओलसरपणा अजूनही जाणवत होता. राहून राहून तिचा विचारही तसाच काही केल्या त्याच्या डोक्यातून जायला तयार नव्हता.  आपल्या हातून जे काही घडले ते चूक होते का बरोबर? याचा विचारही त्यांच्या मनाला शिवला नव्हता. पण जे काही घडले; ते त्या वेळी... कुठंतरी आतून दोघांनाही ओढ होती हे खरं असलं तरी असं काही घडेल... असं त्या क्षणापर्यंत तरी दोघांनाही वाटले नव्हते. इतर कोणाला काय वाटेल, हा विषयच नव्हता. हा विषय फक्त दोघांपुरताच होता. पण खरंच हा विषय त्या दोघांपुरताच होता का? छे! यामध्ये तर अनेक धागे आहेत गुंफलेले. हा गुंता हलक्या हाताने सुटणारा नाही.
          तो घरातून बाहेर पडला तेंव्हा कुठे साडेआठ वाजले होते. टूरवर जाण्यासाठी म्हणून तो घरातून बाहेर पडला होता. दुसऱ्या दिवशी त्याची एक महत्त्वाची मिटींग होती. पण त्याची गाडी तर पहाटे चार वाजता होती. त्या गाडीने जाऊनही मिटींगच्या आधी चांगला तास दोन तास आधीच तो पोहचला असता. तसा बराच वेळ होता त्याच्याकडे. त्यामुळे तो गाडीच्या तासभर अगोदर जरी घरातून निघाला असता तरी चालण्यासारखे होते. पण रिझर्वेशन केलेले नसल्यामुळे अगोदरच मिळेल त्या गाडीने निघायचे असा विचार करून तो बाहेर पडला होता. अर्थात हे फक्त कारण होते. मुळातच पहाटे लवकर उठून जायचे एकतर त्याच्या नेहमीच जिवावर यायचे. त्यापेक्षा प्रवासात गाडीमध्ये झोप काढून लवकर पोहचायचे. लेट नाईट पोहचला तरी लॉजिंग करून निवांत झोप काढता येते. सकाळी आरामात फ्रेश होऊन मिटींगला पोहचता येते, असा सोईस्कर विचार करूनच तो बाहेर पडला होता. बरं खर्च अॉफिसकडून मिळतो. मग दगदग करा कशाला? स्टेशनला जाण्यासाठी तो टॅक्सीत असतानाच तिचा फोन आला. बस्! तेवढेच निमित्त त्याला पुरले आणि मग ड्रायव्हरला त्याने गाडी वळवायला सांगितली. टॅक्सी थांबली ती थेट तिच्या अपार्टमेंटच्या दारातच.
          डोअरबेलच्या बटनावर ठेवलेले बोट तिने दार उघडेपर्यंत त्याने काढलेच नाही. तिला एकदम सरप्राईज देण्याचा त्याचा विचार होता. पण त्याचं असं अचानक येणं तिला आश्चर्य वाटण्यासारखं असलं तरी तिच्यासाठी अनपेक्षित नक्कीच नसावं. दार ढकलून तो आत गेला; तरी तिच्या चेहऱ्यावर तसे काही दिसले नाही.
     "तुझी मिटींग उद्या आहे ना?"
     "बरं मग...? मला काय बाहेरूनच कटवायचा विचार आहे का तुझा?"
     "तू सरळ बोलणार आहेस का कधीतरी? बरं तू चहाकॉफी काही घेणार आहेस कि जेवणार आहेस? जेवणार असशील तर तू फ्रेश होईपर्यंत पटकन गरमागरम पोळ्या लाटते. पाच मिनिटांत पोळी मिळेल ताटात. तुझ्या आवडीची वांग्याची भाजी आहे."
     "तू जेवलेली नसणारच. जा तयार हो. आज आपण मस्तपैकी बाहेर जाऊया. कँडल लाईट डिनरचा मूड आहे माझा."
     "काही नको. अशीही लाईट गेलेली आहेच. इथेच टेबलवर मेणबत्ती लाव हवी तर आणखी एक. अशा पावसात बाहेर जाण्याची माझी बिलकुल इच्छा नाही."
          त्याच्या उत्तराची वाटही न पाहता ती किचनकडे वळली. तो बाथरूमकडे. यावेळी तो बॅग घेऊन बाहेर पडलाय म्हणजे तो जेवलेला नसणार अजून, हे तिला माहीत होते. तशी ती त्याला चांगली ओळखून होती.
     "तुझी उद्या मिटींग आहे ना?" त्याला जेवण वाढतच तिने पुन्हा विचारले.
     "तूही बस ना!" तिच्या प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी तो म्हणाला. त्याने सांगण्याची गरजही नव्हती. तिने स्वतःलाही वाढून घेतलेले होतेच. जेवण होईपर्यंत दोघे काही बोललेच नाहीत. खाताना मात्र तिचे लक्ष पूर्णपणे त्याच्याकडेच होते. इतरवेळी कायम बदमाशी करणारा हा जेवताना मात्र फारच इनोसन्ट वाटतो. प्रत्येक घास चाखतमाखत असा काही जेवतो की, आपले जेवण सोडून त्याच्याकडेच पाहत राहावे. त्याचे उरकले, तसे तिनेही हात आखडता घेतला. तसेही तिचे पोट भरले होते. प्रत्येकवेळी जेवणानेच पोट भरते, असे थोडीच असते.
     "तुझं होऊ दे सावकाश." हात धुताना तो इतकंच बोलला.
     "नाही. झालंय माझंही. अॉफिसहून आल्यावर खाल्लं होतं थोडंसं."
     "तू एक नंबरची बावळट आहेस. खात जा जरा तरी. एकदा आरशात बघ व्यवस्थित स्वतःला. मी सांगायला नकोय, पण काय मात्रं करून घेतलंस स्वतःचं ते कळेल तुलाच."
           तो उठून हॉलमध्ये गेला आणि ती शांतपणे सगळं आवरू लागली.
      "मी आलोय म्हणून तू एवढा तरी स्वयंपाक केलास. गरम करून वाढली असली तरी भाजी सकाळची होती, हे कळण्याइतपत अक्कल आहे मला." ती हॉलमध्ये आल्यावर तो बोलला. "फक्त जॅमबरोबर एकच चपाती खाल्लीस तू."
         आपण ज्याला इनोसन्ट समजत होतो, तो जेवताना आपल्यावर लक्ष ठेवून होता तर...
     "एखाद्याच्या ताटावर असं लक्ष द्यायचं असतं का? वाईट सवय आहे ही. पोटात दुखेल अशानं माझ्या."
     "तू अक्कल शिकवू नकोस मला. काही पोटात वगैरे दुखणार नाही तुझ्या. मी पोटभर जेवलोय. तसंही माझं लक्ष तुझ्यावर होतं, तुझ्या ताटावर नाही."
     "पहाटे गाडी होती ना तुझी?" विषय बदलत तिने विचारले.
     "मी आता निघावं... असं सुचवायचंय का तुला?"
      "नाही रे बाबा! मी सहजच विचारलं. तू बसू शकतोस पाहिजे तेवढा वेळ. नाहीतरी मी झोपत नाही एवढ्या लवकर."
     "माहितीय मला. तुझा वाटस्अपचा लास्ट सीन बाराच्या पुढेच असतो. म्हणूनच सांगितलं मघाशी. जरा स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दे थोडंसं. तुझ्यासाठी नाही, निदान नेहासाठी. बरं कधी जाणार आहेस तिला भेटायला? त्यापेक्षा तू आईलाच का आणत नाहीस इकडे? नेहा जवळ राहील तुझ्या त्यामुळे." कायम तुटकपणाने बोलणारा हा किती विचार करतोय आपला? या विचाराने तिला थोडे बरे वाटले.
     "तू आराम कर आता. तीनचा अलार्म लावतेय. उरकून गेलास तरी आरामात गाडी मिळेल. चालत गेलास तरी दहापंधरा मिनिटांत स्टेशनला पोचशील. मी आले असते सोडायला. पण तसंही तुझ्या वाढायला लागलेल्या पोटासाठी थोडंसं चालणं पाहिजेच."
      "बरं! पण हे माझ्या प्रश्नाचे उत्तर आहे का?"
      "अरे बाबा! दर विकेंडला जाते मी आणि आईला इकडे आणून तिकडे बाबांचे कशाला हाल करू? दीपकचं एकदा का लग्न झालं की मग आई होईल मोकळी?"
      "हं.. तू काय ठरवलंय पुढं?"
      "पाहू. चल गुड नाईट." असं म्हणून ती उठलीही.
      "गुड नाईट काय?" त्याने आपला हात पुढे केला. "मला बरंच काही बोलायचं असतं आणि तू अशी पळत असतेस. ये बस अशी. झोपशील नंतर. निवांत बोलता येईल म्हणून आलोय मी इकडे." खरं म्हणजे तिचा हात हातात घेतला; पण तो सोडावासा वाटेना. तिनेच तो सोडवून घेतला.
     "कॉफी चालेल?" अशा पावसाळी वातावरणात मेणबत्तीच्या उजेडात काहीच न बोलता एकमेकांकडे नुसतेच पाहत कॉफी पिण्यात काही वेगळीच खुमारी असते... कॉफीची चव ठुमरीसारखी खुलत जाते.
     "माझ्या प्रश्नाचं तू अजूनही उत्तर दिलेले नाही."
     "जाऊ दे ना तो विषय. मला नाही बोलायचं त्या विषयावर."
     "प्रश्नांपासून दूर पळण्याने प्रश्न सुटणार आहेत का? तसं असेल तर सोडून देऊ आपण हा विषय. पण तरीही मला वाटतं. तू अजूनही परत एकदा विचार करावास. तुझ्यासाठी नाही... निदान नेहासाठी. म्हणजे 'आई' म्हणून तू कुठे कमी पडतेस, असं नाही म्हणायचं मला. पण लक्षात घे. या वयात तिला तुझ्याइतकीच तिच्या बाबांचीही गरज आहे."
     "हेच नको असते मला. तू असं इमोशनली ब्लॅकमेलिंग करतोस आणि मग मी हिप्नोटाईज झाल्यासारखी त्यावर विचार करायला लागते. पण याबाबतीत मात्र मी ठाम आहे. तुझ्यासारखी फिलॉसॉफी मला जमत नाही. तरीही ऐक. आपल्या बुद्धीला पटो अथवा न पटो... काही गोष्टी आपल्याला स्वीकाराव्याच लागतात. तसेच हेही समज. डिव्होर्स त्याला हवा होता, मला नाही. तुला हेही माहीत आहे की, तसंही मला त्याच्यासोबत आयुष्य काढणं अवघड झाले होते. आणि हो! तू म्हणतोस अगदी तसंच मीही नेहासाठीच सगळं काही सहन करत होते. तू सांगितल्याप्रमाणे मी कितीतरी गोष्टीत अॅडजस्टमेंट करत होतेच ना! तुझ्यातले दहा टक्के जरी त्याच्याकडे समजूतदारपणा असताना तरीही मी एवढ्या टोकाचा निर्णय घेतला नसता. तेंव्हा हा विषय माझ्यासाठी इथेच संपलाय."
     "ओके. आय अॅग्री... मग आता पुढे काय करायचं ठरवलंस तू? का तोही विषय संपला?"
     "डोंट वरी... तुला माझी काळजी वाटते, हे माहितीय मला. माझ्या संसाराचं जे व्हायचं, ते झालंय; पण आयुष्यभर तुझ्यावर ओझं नाही बनणार मी. कॉफी संपली की, रिकामा कप बाजूला ठेवायचा असतो. तो असाच हातात धरून बसल्यामुळे पुन्हा भरत नाही." एवढं बोलून ती हसायला लागली. तेंव्हा त्याच्या लक्षात आले की, खरंच कॉफी संपली होती आणि कितीतरी वेळ तो नुसताच कप हातात धरून बसला होता. तिनेही हा विषय कपासारखा हळूच बाजूला केला.
          तिचे लग्न होऊन आज सात वर्षे होऊन गेली होती. चार वर्षाची एक गोंडस चिमुरडीही आहे. इतर संसारात असते, तशी किरकोळ कुरबुर सोडली; तर जगाच्या दृष्टीने अगदी दृष्ट लागण्यासारखा संसार चालला होता. तशातच ध्यानीमनी नसतानाही अचानक त्यांची भेट झाली. म्हणजे तोपर्यंत ते पूर्णपणे अनोळखी होते असेही नाही. त्याच्या सेक्शनमध्ये तिच्या एकदोन मैत्रिणी होत्या... तर तिच्या सेक्शनमध्येही अधूनमधून त्याचे येणेजाणे असायचे. जातायेता कधीकधी लिफ्टमध्ये नजरभेट व्हायची. त्यातच तिच्या मैत्रिणींसोबत हा बर्‍याचवेळा दिसे. एकदोनवेळा तिने तिच्या एका मैत्रिणीला त्याच्या बाईकवरही पाहिले होते. मैत्रीणही बर्‍याचदा त्याच्याबद्दल सांगायची. दोघांमध्ये असू शकेल काही. शौकिन मिजाज वाटतो एकूण. असेच तिचे मत बनले होते. पण लवकरच तिच्या लक्षात आले की, त्याच्या बोलक्या स्वभावामुळे आणि कायम सोडावॉटरच्या बाटलीप्रमाणे ओसंडून वाहणाऱ्या हसण्यामुळे तो सर्वांशीच तशाच खुल्या दिलाने राहतो. एका कामाच्या निमित्ताने दोघांची प्रत्यक्ष भेट झाली. तीच पहिली भेट. ती कायम आपल्याच कोषात राहणारी असल्यामुळे या भेटीचे तिला काही विशेष वाटले नाही. पण लक्षात मात्र राहिला हा. इतरांशी कायम हँसीमजाक करणारा असूनही तिच्यासोबत तो किती अदबीने बोलत होता.
           त्यानंतर त्यांची भेट होत राहिली आणि ओळखही वाढत गेली. पण त्याने कधीही मर्यादा ओलांडली नाही आणि त्याच्या वागण्यात तिलाही काही खोट जाणवली नाही. आपल्या मुलाच्या वाढदिवसाची त्याने संपूर्ण अॉफिसला पार्टी दिली; तेंव्हा तीही मैत्रिणीसोबत त्याच्या घरी पहिल्यांदाच गेली होती. त्याने अगत्याने तिची घरच्यांसोबत ओळख करून दिली. आणखी एक गोष्ट तिला लक्षात आली. म्हणजे तिला हसूच आले. तो चक्क त्याच्या बायकोला 'अहो-जाहो' करत होता. बायकोला काय म्हणत होता तर... मॅनेजर. वरून साहेबांदेखत सांगतो कसा!
     "आपसे डर नही लगता साहब, लेकिन इस मॅनेजरसे डरना पडता है... आप नाराज हो जाओगे, तो खाली नौकरी खतरे में हैं... अगर ये रुठ गए तो, जानपर बनती है..." पण त्याच्या वागण्यातून तर तसे कुठेही जाणवत नव्हते. उलट मेड फॉर इच अदर अशीच जोडी होती. ती तशी चारचौघीत उठून दिसणारी असली, तरी त्याची बायको तिच्यापेक्षाही सुंदर होती. पार्टी संपेपर्यंत तिला थांबणे शक्य नव्हते. म्हणून ती लवकरच निघाली. तो तिला टॅक्सीत बसवून द्यायला स्वतः आला होता. खरंतर तो तिला एकटीने पाठवायला तयार नव्हता. 'मॅनेजरने सांगितलंय, पार्सल घरपोच करा म्हणून.' पण तिने त्याला 'मी जाईन व्यवस्थित. तुम्ही जा. सगळे खोळंबले असतील.' म्हणून परत पाठवले. तिथून पुढे मात्र एक झाले. नकळत सुरू झाली एक तुलना. जगाच्या नजरेत सुखात चाललेला आपला संसार वरून वाटतो तितका सुखाचा नाही, याची जाणीव तिला होऊ लागली. वरवरचे एकेक पापुद्रे निघू लागले.
           जयेश म्हणजे तिचा नवरा. पुरुष असूनही भलताच सुंदर. अर्थात त्याचं स्वतःचंही तसंच मत होतं. 'अरे लग्नापूर्वी पोरी कायम आपल्यावर फिदा असायच्या. एहसान मानो! मी तुला पसंत केली.' हे पालुपद तो कायम तिला ऐकवायचा. आतापर्यंत तिला हे कौतुकाचं वाटायचं. पण आता यात त्याचा इगो लपलाय... हे तिला जाणवू लागलं. हळूहळू मग बर्‍याच गोष्टी तिच्या लक्षात येऊ लागल्या. आपल्या मोबाईलचा पासवर्ड त्याला माहीत आहे. पण त्याच्या मोबाईलला आपण कधीही हात लावू शकत नाही. आपण स्वतः कमवत असूनही आपले डेबीटकार्ड त्याच्याकडेच आहे. आपल्याला हवे असतील; तेंव्हा आणि तितके तो आपल्याला पैसे देतो. पण त्याच्या खर्चाची आपल्याला कुठलीही कल्पना नसते. त्याला मित्र आहेत. आपल्याला मैत्रिणी. पण त्याच्या मैत्रिणी आपण चालवून घेत असलो, तरी आपला एखादा मित्र त्याला चालेल का? आपला फोन वेटींगला आला तरी खोदून खोदून विचारतो. सहज घेतल्यासारखा करून आपले वाटस्अप, कॉललॉग पाहत असतो. आपण प्रत्येकवेळी त्याला विचारून सांगून प्रत्येक काम करतो... पण तो मात्र प्रत्येकवेळी आपल्याला गृहीत धरून चालतो. अर्थात प्रत्येक संसारात असेच असते, अशी स्वतःची समजूत घालत राहिले तरी काही प्रश्न नव्याने उभे राहिले होते. प्रश्न नवे नव्हते. नव्याने लक्षात आले होते एवढंच. लग्नापूर्वी तासन् तास गप्पा मारूनही कंटाळा येत नव्हता. आता बोलण्यासारखं आमच्यामध्ये काही राहिलंय का? एकमेकांना इम्प्रेस करण्यासाठी पूर्वी किती आटापिटा केला. आता या बावळटपणातला चार्म कुठेतरी उरलाय का? ज्या एका निसटत्या स्पर्शानेही अंगावर रोमांच उभे राहत; त्याच शरीरांना एकमेकांची गरज किती उरावी? भूक लागली की, ओरबाडून खाण्याइतकीच? एकमेकांना समजून घेण्यासाठी राहू द्या; स्वतःलाच काय हवंय, हे जाणून घेण्यासाठी तरी आपण वेळ देतोय का?
          घरांत मुल आले, तेंव्हा ती मुलात गुंतून गेली. घरातले करता करता आपण फारच अजागळ झालो होतो. हे कळेपर्यंत नवरा विशिष्ट अंतरावर पोहचला होता. आता मुल मोठे झाल्यावर वेळ मिळू लागला; तर तिला नवरा दुरावल्यासारखा वाटतोय. जोडीदाराला पूर्वीसारखे आपले आकर्षण वाटत नाही. तोही बहुधा कुठेतरी बाहेर गुंतला आहे, अशी शंकाही आहे. त्यामुळेच आला जवळ तरी फक्त मोकळे होण्यापुरतेच. ही उदासिनता वाढवण्यात मग नकळतपणे दोघेही हातभार लावत राहिले आणि नात्यातील अंतर वाढतच गेले.
          आपल्या जोडीदाराने आपल्यासाठी ताजमहाल बांधावा, ही अपेक्षा नसते. पण अगदी लहानसहान गोष्टींतही पाखरांसारखे कायम पिसारा फुलवून भोवती रूंजी घालावी. ही स्वाभाविक भावना आहे. जीव गुदमरून टाकणारी मिठी हवीच आहे... पण येताजाता होणारा दिलासा देणारा स्पर्श कायम हवा असतो. दैनंदिन व्यवहारात जसे गृहीत धरले जाते; तसेच आपल्यावाचून त्याचेही काही अडते, ही भावनाही सुखावणारी असते. आपल्या जोडीदारालाही काही भावना आहेत... त्याचीही काहीएक भूक आहे... आपलीच तेवढी भूक भागवण्यापलीकडेही त्याचे आपल्या जीवनात स्थान आहे. ही जाणीव हवी असते. आणि नेमके हेच घडत नसावे त्यांच्यामध्ये. दुर्दैव म्हणा हवे तर! पण जसजसा काळ उलगडत जातो; तसतशी नात्याचीही सवय होऊन जाते... आणि सवय मग ती कशाचीही असो. वाईटच! आपण सवयीने समोरच्याला गृहीत धरायला लागतो... अपेक्षांचे ओझे सुरू होते. नात्यामधली ओढ संपली की, ओढाताण सुरू होते.
             नात्यांमधली ही ओढाताण एकदा का सुरू झाली की, जी नाती कधीकाळी तुमची जगण्याची प्रेरणा होती; तीच नाती पायातील बंधने होतात. बरं नात्याचीही सवय झाल्यामुळे सहजासहजी तोडताही येत नाहीत. नात्यामधला चार्म संपला की, हीच नाती चर्मरोगाप्रमाणे खाजवत राहतात. आणि शिक्षा हीच की, उघडपणे खाजवताही येत नाहीत. त्यामुळेच जगाच्या दृष्टीने दृष्ट लागण्यासारखा संसार चाललेला असतो आणि तो समज तसाच टिकून राहावा, यासाठी आपण त्याची किंमत मोजत राहतो. 
         दिवसेंदिवस जयेशचे वागणे विचित्र होत चालले होते. एकीकडे तिने नोकरी करावी, चार पैसे कमवून आणावे, असे त्याला वाटत असले तरीही पुरुषत्व गाजवण्याची एकही संधी सोडायला तो तयार नव्हता. आवाज चढवून बोलण्याने त्याचे समाधान होत नसावे; म्हणून कि काय... हात उचलण्यापर्यंत त्याची मजल गेली होती. अलीकडे तर तो कमालीचा संशयी बनला होता. त्याच्या दृष्टीने आपण बायकोच्या सगळ्या गरजा भागवतोय. तिला काय कमी आहे? शेवटी प्रत्येक गोष्ट तो गृहीत धरून चाललेला होता. पण शारीरिक... भौतिक गरजांच्या पलीकडेही काही जग असते, हेच तो विसरलेला होता. अधूनमधून त्याच्यातील 'नर' जागा होई. आपल्याला हवे असलेले सुख देण्याघेण्यापेक्षा ओरबाडून खाण्यात त्याला आसुरी आनंद मिळत होता. मादीला तिच्याभोवती रुंजी घालत हळुवारपणे फुलवायचे असते. भूक तर प्रत्येकालाच असते. पण कोणतीही गोष्ट चवीने खाणे, हीसुद्धा एक कला असते. असली फिलॉसॉफी त्याला मानवणारी नव्हती. हे असे केवळ जन्माने पुरुष असण्यात कसले आलेय पुरुषत्व? कितीतरी वेळा गॅलरीत उभे राहून फोनवर तो बोलत असताना पलीकडं कुणीतरी मुलगी किंवा स्त्रीच असते, एव्हाना हे तिच्या लक्षात आले होते. पण तिने दुर्लक्ष केले होते. सोसायटीतील काही ठरावीक बायकांशी त्याचे अघळपघळ बोलणे... पैसे दिले की कामवाल्या बाईकडूनही हवं ते मिळवता येऊ शकते, ही त्याची चीप मेंटॅलिटी हळूहळू तिच्या लक्षात आली होती. तरीही ती दुर्लक्ष करत राहिली. आपल्याला अनेक मैत्रिणी आहेत हे सांगताना दिसणारा त्याचा पुरुषी अहंकार बायकोचा एखादा मित्र सहन करणे शक्य नव्हते. येथेच त्यांच्यामध्ये पहिली ठिणगी पडली. त्याने तिच्याकडे घटस्फोटाची मागणी केली. पण तिची प्रतिक्रिया अतिशय थंड होती.
     "ठीक आहे. मिळेल."
           त्याला वाटलं होतं... ती रडेल... पडेल... जोरात भांडेल... त्याच्या हातापाया पडेल... असं करू नको, म्हणून विनवणी करेल. पण असं काहीच झालं नाही. तिने वेगळे व्हायचे ठरवले. त्याच्यासोबत लादलेला संसार आता तिलाही नको झाला होता. खरं तर तिच्या मनातून काहीतरी प्रचंड उलथापालथ चाललेली होती; तरीही ती शांत होती. हे सगळं एवढ्यावरच थांबलं असतं; तर ठीक होतं. पण एकीकडे तिच्या संसारात दुरावा वाढत चालला होता; तर दुसरीकडे या दोघांमधील जवळीक वाढत चाललेली होती... संसारातील दुरावा वाढल्यामुळे यांची जवळीक वाढली होती कि यांची जवळीक वाढल्याने संसारात दुरावा वाढला होता... नेमके कशामुळे काय घडत होते? हे सांगणं अवघड आहे. पण दोन्हीही एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या. हळूहळू ती त्याच्यामध्ये गुंतत चालली होती. त्याचं हलकंफुलकं बोलणंही तिच्या अंगावर रोमांच फुलवू लागले. नवर्‍याच्या हुकमी स्पर्शापेक्षा त्याचा चोरटा स्पर्श अधिक आश्वासक वाटू लागला. त्याला आवडते म्हणून हातावर काढलेल्या मेहंदीच्या नक्षीपेक्षा मेहंदीचा गंध जास्त बेधुंद करतो, हे त्याचे तत्त्वज्ञान तिच्यासाठी नवीनच होते. हॉटेलमध्ये गेल्यावर "काय घेऊया?" या प्रश्नातून आपल्याला गृहीत धरले जातेय, यापेक्षा आपल्या अपेक्षा समजून घेऊन अधिकार स्वातंत्र्य जपले जातेय, हे तिच्यासाठी कदाचित जास्त सुखावणारे होते. त्याला भेटताना कित्येक वर्षांनतर तिचे काळीज पुन्हा पुन्हा चोरटेपणाने धडधडले; तेंव्हा आपण अजूनही जिवंत आहोत, याची तिला नव्याने जाणीव झाली. समागमाच्या रात्रींपेक्षा काही वेळासाठी त्याचे तिच्या मांडीवर डोके ठेवून पहुडणे जास्त आश्वासक वाटले. म्हणूनच मग 'माझ्या संसारात मी सुखी नाही' हे सांगायलाही स्वतःच्याच जोडीदारापेक्षा तिला तो जवळचा वाटला. तिने असा टोकाचा निर्णय घेऊ नये, म्हणून तो तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता. शेवटी त्याला त्याचाही संसार होता. त्याहीपेक्षा या दोघांमधल्या हळव्या नात्याला व्यभिचाराचा शिक्का बसू नये, असेही त्याला वाटत होते.
          पाऊस चालूच होता. अधूनमधून विजाही चमकत होत्या. पण आभाळ आता बरेचसे मोकळे झाल्यासारखे वाटत होते. वातावरणातील तणाव खूपच कमी झाला होता. तिच्या मांडीवर डोके ठेवून तो सोफ्यावर शांत पडला होता. तर त्याच्या डोक्यावरून हात फिरवताना आपण काय काय हरवून बसलोय, ही तिची वेदना होती. परमेश्वराने जयेशसोबत जन्माची गाठ मारण्यापेक्षा याच्यासोबत आपले आयुष्य का जोडले नाही, याचाच ती विचार करत होती. तसेही जयेश चुकीचा वागला. पण आपण याक्षणी काय करतोय? हीसुद्धा प्रतारणाच नाही का? असेलही. प्रतारणा करायला त्याच्याशी आता नाते कुठे राहिलेय? जोपर्यंत होते तोपर्यंत आपण प्रामाणिक राहिलोच ना! आता यापुढे कोणाला काही वाटो... कुठल्याही स्पष्टीकरणासाठी जगायचे नाही. आपली वाट आहे... आपण हवे तसे चालायचे. इतर कोणासाठी नाही, स्वतःसाठी... नेहासाठी जगायचे.
          नात्यांमध्ये नेहमीच ओढ असायला हवी. मग एवढासाही दुरावा नकोसा होतो. 'जवळ ये' म्हणून सांगायला लागत नाही. अंतरे गळून पडतात. जसजशी ओढ वाढत जाईल; तसतसे श्वासाइतके अंतरही जास्त वाटायला लागते. बोललेले शब्द दुरून आल्यासारखे वाटतात. स्पर्शच जास्त जवळचे वाटू लागतात. शंभर शब्दांनी जे साधत नाही; ते एका साध्या स्पर्शानेही जमून जाते. कदाचित म्हणूनच की काय! आईच्या कुशीत असेल अथवा प्रिय व्यक्तीच्या मिठीत असेल; जगात सर्वांत जास्त सुरक्षितता तिथेच जाणवते. ओढ जितकी जास्त; दुरावा तितकाच कमी होऊ लागतो. शरीराचेही द्वैत नकोसे होते. दोन शरीरांना एक व्हावेसे वाटते. तुम्हाला ही शारिरिक कामना वाटेलही कदाचित. पण इथे केवळ शरीरांचे मिलन नसते. तिथे एकात्मतेची भावना असते. शरीर तर फक्त माध्यम उरते. ओढ तर दोन आत्म्यांना असते... एक होण्याची. आत्म्याची आत्म्याशी असो वा परमात्म्याशी... ओढ ही असायलाच हवी.
          आधीच पावसाळी वातावरण... त्यात मेणबत्तीचा तांबूसपिवळा उजेड खोलीभर पसरालेला होता. भिंतीवरच्या सावल्या स्तब्ध झाल्या असल्या तरी मनातील सावल्या फेर धरून नाचत होत्या. मोबाईलमधील एफेमवर रात्र रंगत जाणारी गाणी तुमच्या मनातल्या अंधाराला अधिक लोभसवाणं करून टाकतात. एकेक सूर... एकेक शब्द काळजात घर करत जातो. बालसुब्रमण्यमच्या आवाजातील 'आ के तेरी बाहों में... हर शाम लगे सिंधुरी... मेरे मनको महकाए तेरे मन की कस्तूरी...' या गाण्यातील तर शब्द न् शब्द घायाळ करत चालले होते. त्याच्या स्पर्शाने ती विरघळत चालली होती. तिचे मोकळे सोडलेले केस त्याच्या चेहऱ्यावर पसरले होते. त्या केसांच्या गंधाने तो धुंद होऊ लागला होता. नकळतपणे त्याचा उजवा हात तिच्या मानेवर गेला आणि हाताची ओढ मानेला जाणवू लागली.
          मुळात आपण कोणाच्या तरी इतके जवळ का जातो??? तसे तर आपण अगदी 'कोणा'च्याही जवळ जातच नाही. जिथे ओढ वाटते; तिथेच आपण समर्पण करतो.... स्वतः होऊन स्वतःला विसरतो. कारण त्या नात्यांमध्ये आपलेपणाची ऊब असते. या उबार्‍याच्याच तर आपण शोधात असतो. अशी हक्काची जागा मिळाली की, आपण विसावतो. आपल्याही नकळत आपल्यालाच विसरतो. आपण ज्याच्यावर हक्क दाखवतो; गंमत म्हणजे त्या सात-बाराला आपले नाव कधीच लावता येत नाही. हे माहीत असूनही हा 'हळवा कोपरा' आपण प्राणापलीकडे जपतो.
          "महकी हवायें उड़ता आँचल,
           लट घुंघराले काले बादल,
           प्रेम सुधा नैनों से बरसे,
          पी लेने को जीवन तरसे
     बाहों में कस लेने दे, प्रीत का चुंबन देने दे
     इन अधरों से छलक न जाए यौवन रस अंगूरी..."
           जयेशच्या मिठीतल्या जबरदस्तीने वैतागलेली ती आता मात्र कापरासारखी हवेत विरघळत चालली होती. शरीर हवेवर पिसासारखे अलगद तरंगत चालले होते. ओठ मिटलेले होते. डोळे अर्धवट मिटले होते. भावनांना मात्र पंख फुटले होते. सारं आभाळ मिटीत भरून घेऊन आपल्या लांबसडक बोटांत त्याची दणकट बोटे केंव्हा गुंफली गेली ते तिलाही कळले नाही.

          हा तिच्या एकटीचाच प्रश्न होता की थोड्याफार प्रमाणात...? खिडकीतून बाहेर पाहिले; तर गाडीच्या शेजारून धावणारे रूळही असेच समांतर धावत होते. एकत्र चालूनही एकमेकांना कधीच न मिळणारे. आताही त्याच्या आसपास अनेकजण आहेत. आपण सगळे सहप्रवासी असलो; तरी एकमेकांना कायम अपरिचित. एखादेदुसरे स्माईल... चारदोन वाक्यांची देवाणघेवाण... यापलीकडे आपल्यात काय नाते आहे? संसारातही यापलीकडे काय वेगळे घडतेय? प्रत्येक गोष्टीत आपण कायम एकमेकांना गृहीत धरून चाललोय. तिने त्या क्षणार्धात आपले सर्वस्व उधळून दिले... कोणतीही अपेक्षा न ठेवता. अलार्म वाजला तेंव्हा ती स्वतःहून बाजूला झाली. दोन धागे गुंतत जातात. गाठी बसत जातात. पण तिने सरगाठ आपल्या हातात ठेवली होती. तो गुंता कसा सोडवावा, याचा विचार करत होता आणि तिने एका क्षणात गुंता सोडवला होता. दार बंद करून घेताना तिने स्वतः होऊन मिठी मारली.
     "तू जा आता. गाडी आहे तुझी. ती सोडून चालणार नाही तुला. आणि हो फार विचार करू नकोस. जे घडलं यात तुझा काही दोष नाही. तुझे माझ्यावर फार मोठे कर्ज आहे. फक्त यापुढे वसुलीसाठी स्वतः होऊन कधीही येऊ नकोस. आपले नाते वाहत्या पाण्यासारखेच राहू दे. साचून राहिले तर सडून जाईल."
           गाडी स्टेशनवर थांबली. आभाळ स्वच्छ होते. झक्कास ऊन पडले होते. त्यालाही त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते. या सर्व तिच्या लाईफ पार्टनरकडूनच अपेक्षा होत्या. फक्त तिथे पूर्ण न झाल्यामुळे त्याच्या रूपाने तिला पर्याय सापडला होता. त्यामुळेच संसारात कितीही असमाधानी असली; तरी तिला संसार सुटणार नव्हता. आणि तिचा नवरा...? त्याला काय हवे असते, ते तिला कळले असावे. फक्त तिच्या संसारात तो तिसरा कोन झाला होता. आणि तिचा नवरा कुठे तरी भलत्याच त्रिकोणात अडकला होता. त्याच्याही संसाराचा त्रिकोण होऊन चालणार नव्हते. तिलाच काय? पण त्यालाही तो सुटून उपयोगाचे नव्हते. उलट मित्र म्हणून तो टिकवून ठेवण्यासाठी हलक्या हातानेच हा गुंता सोडवावा लागणार होता. अशा नाजूक वळणार तिला दूर करण्याने प्रश्न सुटणार नव्हता. तो नसेल; तर ती रिकामी जागा कोणी दुसराच भरणार नाही कशावरून???
           "ऐक सखे...! मी मित्र तरी आहे... तो शिकारी असला तर...??? ही व्यथा फक्त तुझीच नाही... माझीही आहे.... माझ्या बायकोची आहे आणि तशीच तुझ्या नवर्‍याचीही आहे. तुम्हा बायकांनाच काय पुरुषांनाही आपल्यावर उत्कटतेने प्रेम करणारे कोणीतरी हवेच असते. म्हणूनच कदाचित हातात चॉकलेट असूनही बिस्किटाचा मोह सुटत नाही. हे नाते म्हणजे एक दिव्य आहे... तेही साधेसुधे नाही... अगदीच अग्निदिव्य आहे. नाते जोडणे एकवेळ सोपे आहे; परंतु शेवटपर्यंत पतीपत्नीपेक्षा प्रियकर-प्रेयसी बनून सांभाळणे फार खडतर आहे. मी 'शेवटपर्यंत' म्हणालो, नाही का?
हं! हं!! हं!!!
शेवट!!!!
माय डियर! मुळातच 'शेवट येणे' हा तर या नात्याचा आणि आपलाही पराभवच आहे."

-- श्री नंदकिशोर गायकवाड.

#मुसाफिर

सरफरोशी की तमन्ना...

      "सरफ़रोशी की तमन्ना...!!!
(स्वातंत्र्याचा ध्यास घेऊन बलिदान करायला निघालेल्या शहिदांचे मनोगत मांडणारे हे गीत आजही मला तितक्याच तडफेने साद घालत असते. त्याच गीताचा आशय असणारा हा स्वैर अनुवाद नाही; परंतु प्रेरणा तीच आहे.)

विद्रोहाची पेटली ठिणगी, आज काळजात आहे...।
पहायचा तो जोर किती, शत्रूच्या मनगटात आहे...।।धृ।।

विश्वास ज्यांच्या मदतीचा ते, हात बांधून उभे आहेत...।
नव्हती आशा कधीही केली, ते सारे पाठीशी आहेत...।।
परीक्षा तर ही खर्‍या-खोट्यांची, आज जो साथ आहे...।
पहायचा तो जोर किती, शत्रूच्या मनगटात आहे...।।१।।

घात करण्या शत्रू टपला, मोका तो शोधून आहे...।
छातीवर तो वार झेलण्या, श्वास मी रोखून आहे...।।
मरणाची भीती कुणाला, शीर तर हातात आहे....।
पहायचा तो जोर किती, शत्रूच्या मनगटात आहे...।।२।।

आतापासून काय सांगू, हे गरजणार्‍या नभा...।
शत्रूचे ते रक्त चाटण्या, आतुर झाल्या या जिभा...।।
विस्तवाचे वाण सतीचे, आज बांधले पदरात आहे...।
पहायचा तो जोर किती, शत्रूच्या मनगटात आहे...।।३।।

अन्यायाच्या वादळाने, ठिणगी ही विझणार नाही...।
स्वाभिमानी रक्त आमुचे, मान ही झुकणार नाही...।।
पेटला वणवा क्रांतिचा, दहशत जंगलात आहे...।
पहायचा तो जोर किती, शत्रूच्या मनगटात आहे...।।४।।

विद्रोहाची पेटली ठिणगी, आज काळजात आहे...।
पहायचा तो जोर किती, शत्रूच्या मनगटात आहे...।।
                               -- श्री नंदकिशोर गायकवाड.

Saturday, 19 August 2017

चॅटींग... (कविता)


चॅटींग... 


हरवलेली एक कविता, आज आॅनलाईन भेटली...!
दोन शब्द बोलतानाही, थोडीसी धाकधूक वाटली...!

कव्हरपेज बदलले तरी, डीपी मात्र तोच आहे...!
गोजिरवाण्या नव्या घरात, छान अशी पोज आहे...!

हाय! हॅलो! हाऊ आर यू? केविलवाणे हसली होती...!
आशय सारा जुनाच होता, अक्षरे थोडी पुसली होती...!

डोळे भरून पहायचे होते, नजर मात्र झुकलेली...!
डायरीच्या पापण्यांमधून, दोन फुले सुकलेली..!

घशामधील आवंढा गिळत, कोकचा घोट घेतला...!
खूप काही बोलायचे होते, म्हणून थोडा पॉज घेतला...!

नेहमी शब्द गोठत, आज कीबोर्डवर बोटे रूतली...!
सुचलेच नाही काय बोलू, फक्त एक स्माईली टाकली...!

-- नंदकिशोर.

#काही_पाने...!

ती सध्या काय करते... (कविता)

#ती_सध्या_काय_करते?

पहिल्या प्रेमाचा दुसरा पार्ट...

ती सध्या तिच्या संसारात सुखी आहे...

होय!!!
ती सध्या तिच्या संसारात एकदम सुखी आहे...

सकाळ संध्याकाळ ती स्वयंपाक करते...
नवरोबाचा टिफीन भरून देऊन त्याला बाय करते...
मुलाबाळांचे उरकून त्यांना शाळेत नेऊन सोडते...
घरातील कामे उरकून उरलेल्या वेळात टि.व्ही.वरच्या सासबहूच्या सिरियल पाहते...
ती सध्या तिच्या संसारात एकदम सुखी आहे...

इन्स्टॉलमेंटवर घेतलेल्या फ्लॅटचे व कारचे हप्ते फेडते
व उरलेल्या पैशातून...
अधूनमधून शॉपिंग करते... हॉटेलिंग करते...
नवरोबाला सुटी मिळाली की,
महिना दोन महिन्यातून आऊटींगलासुद्धा जाते...
आणि मग...
तिकडचे चारदोन फोटो फेसबुकला अपलोड करते...
ती सध्या तिच्या संसारात एकदम सुखी आहे...

माझ्या सिगारेटला विरोध करणारी ती
नवरा फक्त अॉफिसमधल्या लोकांबरोबरच मोठ्या हॉटेलात बसून भारीतली ड्रिंक करतो.
याचे गोडवे गाते...
कधीकाळी माझ्यापेक्षा तब्बल पाच हजार रुपयांनी जास्त असलेल्या आणि आज माझ्यापेक्षा फक्त पंचवीस हजारांनी कमी असलेल्या पगारात नेटाने घर चालवते. मधल्या वेळात कुठे पार्टटाईम जॉब मिळेल का? याचा शोध घेते...
ती सध्या तिच्या संसारात एकदम सुखी आहे...

प्रेमाने पोट भरत नाही.
यावर तिचा आजही गाढ विश्वास आहे...
संसारात ऊनसावली चालायचीच.
कधीतरी भारी दिवस येतील,
यावर तिची श्रद्धा आहे...
पण कातरवेळ झाली की,
तुळशीपुढे दिवा लावताना...
भूतकाळातल्या सावल्यांनी ती कासावीस होते...
बाकी ती तिच्या संसारात एकदम सुखी आहे...

पूर्वीप्रमाणे ती गझल ऐकत नाही...
नाटक पाहत नाही...
अंधार चावट असतो म्हणून
ती सिनेमालाही जात नाही...
पाणीपुरी भंपक असते म्हणून
ती तिकडे ढुंकूनही पाहत नाही...
मंदिरात गेल्यावर ती थोडावेळ पायरीवरही बसत नाही...
चांदणं कधीकधी तापतेही म्हणून
माझी आठवण येईल असे ती काहीही करत नाही...
कारण ती सध्या तिच्या संसारात एकदम सुखी आहे...

तिला माझ्या कवितेत स्वतःला शोधण्याची
अजिबात गरज नाही...
मिठीतल्या श्वासात धुके दाटण्याची तर
आवश्यकताही वाटत नाही...
मला आवडायचा म्हणून
आजही ती मोगरा माळत नाही...
मेंहदीला कुठे प्रेमाचा रंग असतो का?
म्हणून मेंहदीही लावत नाही...
मोकळ्या केसांच्या गंधाने
नवरा बेधुंद होईल यापेक्षा
माझी आठवण सलत राहील,
म्हणून ती ओले केसही मोकळे सोडत नाही...
तरीही ती सध्या तिच्या संसारात एकदम सुखी आहे...

जाऊ द्या ना बाळासाहेब...
सोनू... पिलू... या शब्दांत काही चार्म आहे का?
ती तिच्या संसारात एकदम सुखी आहे...
मग आपणच झुरण्यात
काही राम आहे का?
तुमचा माऊथ अॉर्गन तिला आवडायचा म्हणून
अजून किती दिवस वाजवणार?
हरवून गेलेले सूर
अजूनही किती दिवस आळवणार?
तुमच्या पिल्लाचे डोळे तिच्यासारखेच आहेत...
पण त्या डोळ्यांतले जग फक्त तुमचे आहे...
ती तिच्या संसारात सुखी आहे...
तुम्ही तुमच्या संसारात सुखी आहात...
फक्त अर्धी रात्र सरूनही पापण्या नाहीच मिटल्या....
तर एक दिलासा हा असेल की,
अशाच कित्येक रात्री तिनेही जागवल्या असतील...

ती सध्या काय करते?
ती सध्या तिच्या संसारात सुखी आहे...
बस्!!! फिट्टमफाट!!!

- नंदकिशोर.
(5 जानेवारी 2017)
#काही_पाने...

आशा... (कविता)

#आशा...


"ध्येयवेड्यांना साद घालणारी
उत्तुंग शिखरं
अजून आहेत तिथेच...
स्वप्नांकडे घेऊन जाणाऱ्या
पाऊलवाटाही तशाच आहेत...

अजूनही
मायेची पखरण करणारी झाडं
उभीच आहेत रस्त्याच्या दुतर्फा...
तहानल्या जीवाला संजीवनी
देणारे झरे अजूनही वाहताहेत...

सूर्य अजूनही रेंगाळलाय
आकाशात
काळोखाला थोपवून धरत...
काळजातली वादळे शमवून
वाराही हळवा झालाय...

अजूनही निशाण हातातच आहे.

पण...

पण माझी पावलं मात्र थकली आहेत...
माझ्यावरती रूसली आहेत...!!!

किनाऱ्यावरचा दीपस्तंभ
अजूनही
निरोपासाठी हात हलवतोय...
नांगराने सोडलाय
वाळूचा सहवास...

फडफडणार्‍या शिडांनी
वादळ भरून घेतलंय
छातीभरून...
लाटाही गाताहेत
पुरुषार्थ चेतवणारी समरगीते...

वाट पाहताहेत वल्ही
मजबूत मनगटाच्या
घट्ट पकडीची...
खुणावताहेत दाही दिशा
कोलंबसाच्या वारसाला...

पण...

पण माझे हात मात्र थकले आहेत...
माझ्यावरती रूसले आहेत...!!!

.... तरीही,
तरीही मी मात्र थकलो नाही
आणि
नाहीत थकल्या माझ्या आशाही...

अजूनही वाटतेय,
कधीतरी हातपाय साथ देतील...
या सर्वांना मात देतील...!!!"

-- नंदकिशोर.
#काही_पाने...

Friday, 11 August 2017

माये... (कविता)


मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

माये...!

माये तू एकट्या पडलेल्या वाटंनं
कित्येक उन्हाळे डोईवर घेऊन
चालत राह्यलीस नेटानं...
डोळ्यातलं पावसाळं पापण्याआड लपवून
झुंजत राह्यलीस परपंच्याच्या वावटळीशी...
शेतातलं तण भांगलताना
तुज्या तळहातावरच्या रेघोट्या बी पुसून गेल्या...
एकटीनं सगळी उस्तावार लावताना कपाळावरल्या घामासंगं
नशीबाचं भोगही पुसत राह्यलीस...
एकेक काडी जमवून घरटं बांधणार्‍या सुगरणीसारकं
एकेक दगड रचत राह्यलीस पोराच्या जिंदगानीचा...
अक्षराची ओळख नसताना बी
पोराच्या हातात पाटी पेन्शील देऊन
स्वतःच सटवीच्या हातानं
त्याचं नशीब लिहीत राह्यलीस...
काजाळलेल्या चिमणीच्या उजेडात मिसळायचा
तुझ्या पेटलेल्या चुलीचा तांबूस पिवळा जाळ...
मी काहीबाही वाचीत आसताना
तुझा कान माझ्याकडंच आसायचा...
पोथ्या पुराणाच्या भक्तीभावानं
तू ते ऐकत राह्यलीस...
एकेक काटकी चुलीत सारताना
खरकट्या हातानं डोळं पुसत राह्यलीस...
कधी तरी माजं पोर मोठं हुईल...
चार बुकं शिकून मास्तर हुईल...
माज्या डोईवरल्या उन्हाळ्यात
त्याची सावली ईल या आशेने
सपान पाहात राह्यलीस...
नवरा आसूनबी रंडक्यामुंडक्या बाईपरमान नांदण्याचं चांदनं झालं...
पन ईस्तव पदरात बांधून नेटानं हुबी राह्यलीस...
सुरकतलेला हात
नातवंडाच्या पाठीवरनं फिरवीत
'तुमचा बाप बी लई ड्यांबीस हुता' आसं सांगताना तुजा पदर डोळ्याला जातो माये...
पन त्या ड्यांबीस पोराचा बाप कसा होता
याचा चकार शबूदही
तुज्या तोंडातनं निगत न्हाई...
काळजातलं ऊन काळजातच गाडून
तू लडत राह्यलीस पावलाखालच्या काट्याकुट्यांशी...

-- श्री नंदकिशोर गायकवाड.

दुरावा... (कथा)

दुरावा...!


          "आपण एका श्वासाइतके जवळ असतानाही तुला एकटं एकटं वाटत असेल; तर तो माझा पराभव आहे."

"एकटेपणा असं नाही. पण एक पोकळी जाणवतेय."

          "कसली पोकळी...?"

"तेच तर कळत नाही. मला काय हवंय? काय नकोय? एवढ्या साध्या साध्या प्रश्नांची उत्तरं पण सापडत नाहीत. डोकं सुन्न झालंय. घुसमट होतेय मनाची."

          "घुसमट मनाची असते. मेंदूने विचार करून व्यवहार चालतात. नाती नाही. म्हणून मग मेंदूने नाही मनाने विचार कर. त्यालाच विचार. बाबारे! तुला नक्की काय हवंय? तुझ्या प्रश्नांची उत्तरे सापडतीलही कदाचित."

"कसलीच उत्तरं नाहीत माझ्याकडे. खूप विचार येतात डोक्यात. बोलता नाहीत येत कोणाला? बोलण्यासाठी कोणीच नसतं."

           "मग काय उपयोग आमच्या असण्याचा?"

"तू असतोस ना! जाणवतं मला ते."

          "तुला बोलायला कुणीही नसते; तर मग एवढे दिवस... एवढे महिने... एवढी वर्षे तासन् तास माझ्याशी काय बोललीस?"

"पूर्वी कसं मी तुला एवढ्या तेवढ्याही गोष्टी सांगायचे. पण आता वेळ नाही मिळत तुला पूर्वीसारखा. आता तू नसतोस, असं नाही. पण तुझा presenceही मला खूप महत्त्वाचा वाटतो."

           "बोलायला तर मी तेंव्हाही होतो... आताही आहे. मी तिथेच आहे; जिथे तू मला सोडून आलीस. आणि... आता तू जिथे आहेस; मी कुठेच नसतो तिथे. Online तर मी नेहमीच असतो. फक्त तुझ्या नेटवर्कमध्ये नसतो. Some congestions."

"याचा अर्थ तू माझ्यापासून लांब गेला आहेस, असं नाही म्हणत मी."
           "पर उतने पास भी नही है! लक्षात घे... I am your present, may be future; but not past."

"पण माझी वाट ही एकटीचीच आहे. तुझी मात्र फरपट होतेय माझ्यामुळे. तू नको मनाला लावून घेऊस."

            "मी नेहमीच तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येकवेळी कुंपण आडवे आले."

"मला काहीच कळत नाहीय. खूप भरकटत चाललेय मी."

            "बाई गं! विनाकारण काहीच होत नाही. कुठेतरी काहीतरी कारण असतेच. प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे असतेच."
"मला नाही कळत असलं काही."

            "काय?"

"काही नाही. सोडून दे तो विषय. काय अजून?"

            "अजून तर बरंच काही आहे. अजून किती पळणार आहेस? तुझ्या पळण्याने विषय संपणार नाहीच."

"मला माझंच काय चाललंय ते कळत नाही. तुझं बोलणं तर त्याहून नाही."

             "माझं बोलणं नाही कळू दे. तुझं तूच शोधायचा प्रयत्न कर. शब्द नाही कळले तर नजरेत नजर मिसळून बघ. नजर चोरणार असशील तर डोळे मिटून घे. आत शोध. सापडेल."

"काही नको."

             "निगाहें निगाहों से मिलाकर तो देखो...
              एक बार रिश्ता बनाकर तो देखो...
              हसरतें दिल मे दबानेसे क्या हासील होगा...
              अपने होंठ हिलाकर तो देखो...
              खामोशी से कब होती है खामोशियाँ पुरी...
              दिल की बात बताकर तो देखो...
              जो है दिल मे उसे करा दो बयाँ...
              खुद को एकबार जताकर तो देखो...
              आसमाँ सिमट जाएगा तुम्हारी आगोश मे...
              चाहत की बाहें फैलाकर तो देखो...!"

"बस्! झाली तुझी फिलॉसॉफी!"

             "जेंव्हा मी मनातलं सांगतो; तेंव्हा तुला ती फिलॉसॉफी वाटते. हेच ते कुंपण आहे... मला अडवणारे."

"तू तुझंच खरं करणार. मला थोडीच बोलून देणार आहेस."

             "बोलणं काय नुसत्या शब्दांनीच होते. माय डियर, बोलायला शब्द नसतात; तेंव्हा नजर बोलते. डोळे मिटले की स्पर्श बोलतात. कुणाच्या खांद्यावर डोके ठेवून काहीवेळ नुसते बसले तरी खूप बोलल्याचा फिल येतो. कधी अनुभवलंस तू हे."

"तुझा आवाज कळतो मला. जाणवतो.. ऐकू येतो मला... पण काय करू? मला 'ओ' देता येत नाही त्या आवाजाला."

            "तो आवाज खूप लांब आहे. इथं माझ्या छातीवरती डोकं ठेवून ऐक. बघ प्रयत्न करून."

"आता मात्र मला तुझ्या आवाजात आगाऊपणा जाणवतोय."

            "म्हणूनच अजूनही आपण तेवढेच दूर आहोत. जेवढे पूर्वी होतो. तुम्हा बायकांचा एक गोड गैरसमज आहे. सगळे पुरुष इथून तिथून सारखेच. मादी जवळ आली की, लागले पिसारा फुलवायला. यांना फक्त तुमचं शरीर हवं असतं. पण तुमच्या हे कधी लक्षात येते का? की तो पिसारा नाही, त्या मादीला फुलवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हो! मला कबूल आहे. भाषा काय फक्त मनाचीच असते? शरीराला काय भाषा नसते? ही ओढ काय फक्त शरीराचीच असते? दोन काठ एकत्र चालू शकतात. पण मला समांतर चालायला जमत नाही. मी पाण्यासारखा आहे... वाहणारा. दोन नद्या एकत्र आल्या कि पाणी मिसळणारच. ते वेगळे कसे राहील. दोन शरीरं एकत्र आल्यावर ती वेगळी कशी राहतील. ती आपापली स्वतंत्र अस्तित्व नाकारणारच."

"मी अजूनही तुझ्यात मिसळले नाही, असे का वाटते तुला?"

             "कारण! अजूनही तुला माझे अस्तित्व तुझ्यापासून वेगळे वाटतेय. होय! तुझ्या माझ्यामध्ये अजूनही एक न दिसणारे कुंपण आहे. जेंव्हा आपली दोन शरीरं एकमेकांत मिसळतील; तेंव्हा ती दोन राहून चालणार नाहीत. त्यांना एक होण्याची ओढ वाटली पाहिजे. मनाला एकत्र आणण्याचे साधन म्हणून त्यांच्याकडे पहा. अमूर्त भावनांना मूर्त अनुभव मिळाला की, त्या आणखीन दृढ होतील. तुझा एकटेपणा माझ्यात विरघळून जाऊ दे. आपल्या मनातली पोकळी त्या उत्कटतेने भरून जाऊ दे. हवेत उडणार्‍या साबणी फेसाच्या फुग्याप्रमाणे शरीराचा जडपणा सोडून दे. विश्वाच्या या अनंत पोकळीत मन पिसासारखे विहरू दे. दोन शरीरंच नाही, तर सारे विश्वच तुझ्यात एकरूप झालेले तुला दिसेल."

- नंदकिशोर गायकवाड.
#मुसाफिर

प्रपोज... (कथा)

प्रपोज...!


"Hiii"
"Helloo..."
"कसे आहात?"
"छान!"
"काय करताय?"
"काहीच नाही. निवांत."
"मग! काही विशेष??"
"दुपारी तुमचा फोन आला होता. आता मेसेज आला. हेच विशेष..."
"का हो! कंटाळा आला ना?"
"कोणाचा?"
"नाही म्हणजे बोअर झालात ना?"
"बोअर? ते का म्हणून?"
"माझ्याशी बोलून."
"असे का वाटले?"
"तुम्ही offline झालात मध्येच. म्हणून तसं वाटलं."
"नाही. तसं काही नाही. मी प्रवासात आहे. त्यामुळे नेटवर्क गेले असेल."
"Okkk. Happy journy!!!"
"धन्यवाद...!"
"चला बाय."
"बरं... बाय..."
"आता कोण कंटाळले? बघा म्हणाले होते ना तुम्ही कंटाळलात म्हणून."
"नाही हो! तुम्ही बाय म्हणालात, म्हणून मीही बाय म्हणालो. मग कोण कंटाळले?"
"नाही नाही. मी कंटाळून नाही बाय केला. थोडीशी कामात आहे. घाईत होते म्हणून बाय केला."
"शाब्बास!"
"का? काय झालं?"
"बायका लई हुशार!!! त्यात तुम्ही तर फारच उशीर आहात!"
"लहानपणापासूनच..."
"अरे व्वा! कॉलर ताठ!!!"
"मग.. असायलाच हवी. पण असं का म्हणताय?"
"स्वतःला काही काम निघाले की, समोरच्याला कंटाळा आला का म्हणून विचारायचे. म्हणजे संवाद संपवण्याचे पातक तुमच्या माथी यायला नको. आपण गडबडीत असूनही मेसेज करायचा. वरून समोरच्याला काही अंदाज येऊ न देता. सगळे स्वतःच्या मनासारखे हवे, पण पुढच्याकडून वदवून घेणार."
"हा! हा! हा!"
"बरं ठीक आहे. चालू द्या तुमचे काम. माझं काय! मी प्रवासात आहे. अजूनही दोनेकतास निवांत आहे. बोलू परत कधी!"
"काही विशेष सांगणार आहात का?"
"मी काय सांगणार?"
"नाही. काही विशेष असेल, तर सांगा."
"कामात आहात ना! बोलू नंतर."
"नाही नाही. सांगा आता. झाले काम माझे."
"म्हटलं ना बायका लबाड असतात."
"सांगा हो आता. उगीच उत्सुकता ताणू नका."
"उद्या सांगतो. बाय."
"काही नको. आता माझ्या सहनशीलतेचा अंत पाहू नका."
"बरं ठीकाय. विशेष काही नाही. एक गंमत सांगतो."
"सांगा काय सांगायचं ते पटकन."
"ऐका तर...
  ये उन दिनो की बात है...
  जब सर पर बाल हुआ करते थे...!"
"ओहो! आता तर सांगूनच टाका सगळी कहाणी."
"एक लडकी थी दिवानी सी..."
"एक लडके पर वो मरती थी... हे माहितीय मला. पुढे..."
"चोरी चोरी चुपके चुपके गलियों से गुजरती थी..."
"कुछ कहना था शायद उसको...
जाने किससे डरती थी...! हेसुद्धा माहितीय. पुढे...!!!"
"हो हो...! जरा सबुरीनं घ्या. किती घाई?"
"मोहब्बते पाहिलाय मी. त्याचं काय? सर पर बाल आणि मोहब्बतेचा डायलॉग याचा काय संबंध? बरं पुढे सांगा."
"एक नही, पुरे तीन साल मन ही मन मे मोहब्बत करती थी..."
"फिर क्या हुआ?"
"बातें हुई... मुलाकातें हुई..."
"और फिर...?"
"फिर क्या? एक दिन उसने पुछा..."
"क्या?"
"ये मोहब्बत क्या होती है? ये मुहब्बत कैसे होती है..."
"तो उसे क्या जबाब मिला?"
"उसने कहा... जो तुम करती हो! वही तो मोहब्बत है...!!!"
"मैं...?"
"अरे आप नही.. मैं उस लडकी की बात कर रहा हूँ... आपके मन मे क्या है? ये मैं कैसे बता सकता हूँ?"
"अच्छा अच्छा!!! वह लडकी भी मन ही मन खुश हुई होगी!"
"हां! शायद आपकी तरह! फिर लडके ने पुछा, क्या तुम भी मुझे चाहती हो?"
"अं......"
"सांगा ना..!"
"उस लडकीने क्या कहा?"
"तुम ही बताओ..."
"धत्! मला काय माहीत..!"
"म्हटलं ना बायका लबाड असतात. सांगा ना! तुम्हीच सांगा. काय उत्तर दिले असेल तिने?"
"लाजली असेल. उत्तर द्यायला शब्दही सुचले नसतील तिला. पण ते जाऊ द्या. तिने काय उत्तर दिले?"
"वह बोली..."
"क्या??"
"साल्या, तीन वर्षापासून वाट बघतेय, तू प्रपोज केंव्हा करतोस याची."
"ओह!!!"
"तात्पर्य काय? बायका स्वतःच्या मनातलं ओठावर येऊ देत नाहीत. तीन वर्षे वाट पाहण्यात घालवली. त्यापेक्षा स्वतःच त्याला मनमोकळेपणाने सांगितले असते तर काही बिघडले असते का?"
"तुम्हीच म्हटलं ना बायका लबाड असतात म्हणून. पण खरं सांगू का? आम्हाला हे तुमच्या तोंडून ऐकायचं असतं. म्हणून तर प्रत्येकवेळी एवढं बोलूनही आम्ही विचारत असतो, अजून काही? आणि तुम्ही खुशाल 'नाही' म्हणून सांगता."
"असू द्या तीन वर्षांनी का होईना... प्रपोज तर केले. बाय दि वे! मी आता दारात उभा आहे. दार उघडून आत घ्याल का?
"अगं बाई! काय हे!"
"सरप्राईज!!! Happy Marriage Anniversary!!!"

-- श्री नंदकिशोर गायकवाड.
#मुसाफिर

Thursday, 10 August 2017

समांतर... (कथा)

समांतर...!


          अखेर मौन असह्य झाल्यावर तो पुन्हा कुजबूजला.
     "सांगा ना!"
          आता त्याला काय उत्तर द्यावे, हेच तिला सुचेना. आपल्याकडून त्याला काहीतरी उत्तर हवंय आणि त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाल्याशिवाय त्याच्या मनाचे समाधान काही होणार नाही. हेही तिला ठाऊक होते. एवढा मोठा झाला असला तरी मनाने तो तेवढाच लहान आहे. म्हणून तर तो हट्टी आहे.
     "काय सांगणार? सांगण्यासारखं आता काही उरलंय का?"
     "असं का म्हणता? मी काही चुकीचे बोललो का? तसं असेल तर आय एक्स्ट्रीमली स्वारी! पण मला विचाराल; तर मी काही चुकीचं बोलतोय, असं किमान मला तरी वाटत नाही."
     "तुम्ही चुकीचे आहात, असं कुठं म्हणाले मी. पण तरीही तुम्ही भलताच हट्ट करताय, असं मात्र मला मनापासून वाटतंय. सोडून द्या तो हट्ट! आणि तसेही तुम्ही माझ्यापेक्षा लहानच आहात. बालहट्ट समजू शकते मी. आणि हो! आता तुम्ही माझं नाही ऐकलं; तर तुमचा कान पकडणं मला जड जाणार नाही. कळलं का?"
बळेच हसत तिने वातावरणातला ताण थोडा कमी करायचा प्रयत्न केला.
     "हो ठीक आहे. मला मान्य आहे. तेवढा अधिकार तर तुम्हाला नक्कीच आहे. पण फक्त एवढ्यापुरतेच कान पकडून विषय संपणार आहे का? मी 'असाच' आहे, हे तुम्हालाही चांगले माहितीय. म्हणून तर आयुष्यभर तो अधिकार तुमच्याकडेच राहावा, हीच माझी इच्छा आहे."
     "काय हा भलताच वेडेपणा! आता मी काय सांगतेय ते ऐकून घ्या. परवा आलेलं स्थळ चांगलंय. ती मुलगी मलाही आवडलीय. तुमची दोघांची जोडी छान शोभून दिसेल. तसाही आईंना मी शब्द दिलाय. तुम्हाला समजावून सांगून आणि नाही ऐकलं; तर तुमचा कान पकडून का होईना; पण तुमचा होकार मिळवायची जबाबदारी माझ्यावरच आहे. अर्थात त्यात माझाही स्वार्थ आहेच म्हणा! तुम्ही लग्नाला तयार झालात तर कुरवली म्हणून मनपसंत साडी मिळेल मलाही."
          आतापर्यंत टिकवून ठेवलेला त्याचा संयम आता मात्र ढासळत चालला होता. अरे! काय तडफड होतेय माझ्या जिवाची आणि हिला गंमत सुचतेय म्हणजे काय!
     "मी आवडत नाही का तुम्हाला? तसं असेल तर स्पष्ट सांगा. तुमचा नकार असला तरी मला चालेल. पण त्याचे कारणही मला कळावे, एवढी साधी अपेक्षाही मी ठेवू शकत नाही का?"
      "आता कसे समजावून सांगू तुम्हाला? मला तर काहीच समजेनासे झालेय."
      "नाही ना जमत. मग द्या सोडून. मी तुम्हाला अगदी मनापासून सांगतो. तुम्ही हवी ती शपथ घ्यायला सांगा मला. एक अक्षरही खोटे बोलत नाही. जेंव्हा तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं ना; तेंव्हाच... अगदी तेंव्हाच मी तुमच्या प्रेमात पडलो होतो. गेली दोन वर्षे जसजसे आपण जवळ आलो ना! तसतसा मी तुमच्यामध्ये गुंतत गेलो. तुमच्याशिवाय मी आता दुसरा कुठला विचारही करू शकत नाही. प्लिज! समजून घ्या मला." तो काहीसा स्वप्नात हरवल्याप्रमाणे बोलत होता.
                        * * * * *
          कुणा एकावाचून आपले आयुष्य अपूर्ण राहावे, तर कुणामुळे ते पूर्ण व्हावे, हे शेवटी ज्याचे त्याचे प्राक्तनच ठरवत असते.
          साधारणपणे मार्चएंड झाला तरी पंधरा एप्रिलपर्यंत अॉफिसमध्ये कामाचा ढिगारा लागलेला असतो. कितीही मान मोडून काम करा. मान वर करायलाही फुरसत नसते. गेल्या चार दिवसांत कामातून फुरसत मिळालेली होती. आता काही दिवस निवांत वेळ काढायला मिळणार होता. या महिनाखेरीस दोनचार दिवस मित्रांसोबत कुठेतरी कोकणात काढायचे प्लॅनिंग होते. राहत असलेल्या ठिकाणापासून अॉफिस फारसे दूर नव्हते. वीसेक मिनिटे चालावे लागणार होते. आज काही घाईही नव्हती. त्यामुळे चौकातल्या ओळखीच्या गॅरेजवाल्याकडे बाईक सर्व्हिसिंगला देऊन चालतच अॉफिसला निघालो. दररोजच ज्या रस्त्याने जातो, तो रस्ता आज नव्यानेच पाहत होतो. रस्त्याच्या बाजूने असलेले गुलमोहर फुललेले होते. लालबुंद फुलांच्या गेंदानी झाडे तर भरून गेलेली होतीच. पण गळून गेलेल्या पाकळ्यांनी रस्ताही लाल झाला होता. आज रस्त्यावर वाहतूकही तुरळक होती. शाळेला निघालेली काही मुले आणि पायी जाणारा एखाददुसरा सोडला तर फुटपाथ मोकळाच होता. रस्त्याच्या कडेला खेळणार्‍या कुत्र्याच्या पिलांना पाहून थोडावेळ थांबावेसे वाटले. मस्त दिलीपकुमारप्रमाणे सुहाना सफर और ये मौसम हसीन... असं काहीतरी गुणगुणावसं वाटत होतं. रोजच्या धावपळीत आपण किती मोठ्या सुखाला मुकतो, याची आज प्रकर्षाने जाणीव होत होती.
          एक कॉर्नर पास केला आणि पुढे काही अंतरावर चाललेल्या एका व्यक्तीने लक्ष वेधले. लक्ष वेधावं असं काय बरं होतं? इतर चारचौघांसारखीच तर आकृती होती. त्यातही पाठमोरी. माणसासारखा माणूस. त्यात काय विशेष? पण लक्ष वेधलं जावं असं काहीतरी नक्कीच होतं. मी चालण्याचा थोडा वेग वाढवून दोघांमधले अंतर कमी केले. मग पुरेसे अंतर ठेवून चालणाऱ्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहत चालत राहिलो. साधारणपणे पिवळसर म्हणता येईल असा सलवार कमीज. साडेपाच फुटापर्यंत तरी उंची असावी. त्या उंचीला साजेसे शरीर. पण माझे लक्ष आवर्जून खेचून घेतले होते ते केसांनी. पाठीवरून अगदी कमरेच्याही खाली येणारी लांबलचक वेणी नागिणीप्रमाणे दिसत होती. त्यात ती व्यक्ती एवढी शांतपणे चालत होती की, त्या चालण्यातही एक डौल होता. गजगामिनी...! बस् दुसरा शब्दच नाही. एखादा सुंदर चेहरा पाहून या वयात वेड लागणे म्हणजे चलता है! पण ज्या व्यक्तीचा चेहरा काळा आहे कि गोरा, तेही माहीत नाही, तरीही त्या व्यक्तीने लक्ष वेधून घेणे म्हणजे कौतुकच. एखाद्या सुंदर सुगंधी फुलाजवळ भुंग्याने गुणगुणत राहावे, तसे मन तिथेच रुंजी घालू लागले.
           अॉफिसचा शेवटचा कॉर्नर ओलांडूनही मी पुढे पुढेच चालत राहिलो. शेवटी चौकात सिग्नलला तिने रस्ता क्रॉस केला आणि मग मोठ्या नाइलाजाने मी परत फिरलो. मन अतृप्त राहिले. फक्त एकदाच तिचा चेहरा पाहायला मिळाला पाहिजे होता. दिवसभर अॉफिसच्या कामातूनही ते लांब केस काही केल्या मनातून जायला तयार नव्हते. तरी चौधरी म्हणाला ही, 'क्यों भई, बडे खोये खोये से लगते हो!'
'चौधरी, कभी किसी चलते हुए हाथी या शेर को पिछे से देखा है? बस् और एक बार देखने की तमन्ना है!' सायंकाळी घरी परत जाताना ती व्यक्ती परत दिसावी, या वेड्या आशेने अॉफिस सुटताच मी ओढीने निघालो. अॉफिसमधला अप्पा भोसले मला गाडीवरून घरी सोडतो म्हणाला. पण त्यालाही काहीतरी कारण सांगून मी सटकलो. सायंकाळी वर्दळ असूनही घरी पोहचेपर्यंत माझी नजर फक्त तिचाच शोध घेत होती. कितीतरी वेळा मी थांबून मागे वळूनही पाहिले. नाहीतर आपण उगीचच पुढे शोध घेत राहायचो आणि ते परब्रह्म आपल्या पाठीशी असायचे. तुम्हाला थोडे हसू येईल. कदाचित तुम्ही मला पागलही म्हणाल. पण एक दिवस नाही दोन दिवस नाही, पुढचा पूर्ण आठवडा मी अॉफिसला पायी चालतच येत जात राहिलो. पहिले दोन दिवस इच्छापूर्ती झाली नाही. पण तिसरा दिवस मात्र भाग्याचा ठरला. मग मात्र हे नित्याचेच झाले. साधारण दोनेक दिवसाच्या फरकाने पुन्हा दर्शन झाले. एवढे तर नक्की झाले की, ही गाडी डेली अपडाऊन करते.
          आठवडाभरानंतर मात्र पुन्हा बाईकने येणेजाणे सुरू झाले. पण आताशी तो एक छंदच झाला होता. जिथे गाडी ओव्हरटेक व्हायची, तिथे स्पीडाब्रेकर नसतानाही वेग हळूवार व्हायचा. तरीही काळजात धक्का बसायचाच.
     "वो किसी रेल सी गुजरती है...
      मैं किसी पुल सा थरथराता हूँ...!!!"

          नेहमीच्या पाहण्यातील असतील तर वाटेवरचे मैलाचे दगडही ओळखीचे होतात. इथे तर आम्ही हाडामांसाची जिवंत माणसं होतो. नुसते डोळे बंद केले; तरी ती जशीच्या तशी नजरेसमोर उभी राहायची. तिचे ते शांत संयत एकेक पाऊल टाकत चालणे आणि विशेषतः तिच्या लांब केसांनी मला मोहिनी घातली होती. तरीही तिचा चेहरा पाहण्याची मला विशेष उत्सुकता होती. एवढ्या आकर्षक व्यक्तिमत्वाची स्वामिनी दिसायला कशी असेल बरे? खरं म्हणजे अशा खेळात बर्‍याच वेळा भ्रमनिरास होण्याचीच शक्यता जास्त असते. परमेश्वर सगळ्यांना परिपूर्ण बनवत नाही. सुगंधी फुलांना रंग द्यायला विसरतो; तर सगळीच रंगीबेरंगी फुले सुगंधी कशी असतील? पण हा योगच काही और होता. ती खूप म्हणजे खूपच सुंदर होती... पाहणाराच्या काळजाचे पाणी पाणी होईल... असली अतिशयोक्ती नाही करणार. पण ती खरंच सुंदर होती. शेवटी सौंदर्य पाहणाऱ्या दृष्टीवर अवलंबून असते. प्रत्येकाच्या सौंदर्याच्या परिकल्पना भिन्न असतात. पण सर्वसाधारणपणे सरळ लांब नाक... किंचित उभट चेहरा... छान टपोरे डोळे... पुरेपूर उंची... तेवढेच सुडौल शरीर... अगदी अल्लड यौवना नसली तरी गद्धेपंचवीसमधले वय... अजून काय हवे?अगदी फार नसली तरीही कुणीही आवर्जून वळून पाहावे, इतकी सुंदर तर ती नक्कीच होती. मुळात तिच्या सौंदर्याने घायाळ होणारा मी नव्हतो. या बाह्यरेषेच्या पलीकडे मला भूरळ पाडणारे असे काहीतरी नक्कीच होते. चेहऱ्यावर कमालीचे शांत सोज्वळ भाव... आणि कुठेतरी जगाच्या या सगळ्या धावपळीपासून जाणवणारा तटस्थपणा सहज दिसून यायचा. ही सहजासहजी आलेली परिपक्वता नव्हती.
          प्रत्येकवेळी माझ्या मनातील भावना अधिकच गडद होत चालल्या होत्या. बर्‍याचदा येताजाता दिसल्यामुळे नजरा आता ओळखीच्या झाल्या होत्या. पण बोलणे तर दूरच साधे ओळखीचे स्माईल करण्याचेही धाडस मला होत नव्हते. ती नक्की काय करते हे तर माहीत नव्हते. कॉलेज करत असेल का? शक्यता कमीच. का कुठे एखादा जॉब करत असेल? तिथेच तर घोडे पेंड खात होते. एवढे तर नक्की होते की, ती राहायला माझ्याच परिसरात कुठेतरी होती... आणि तिचे दररोजचे जाण्यायेण्याचे ठिकाणही माझ्या अॉफिसपासून पुढे कुठेतरी होते. अर्थात तेही फार दूर नसावे. कारण दरवेळी ती चालत जातानाच दिसे. माझे फक्त तर्क चालले होते. अर्थात प्रत्यक्ष घडणाऱ्या गोष्टींपेक्षा मनाचा वेग भलताच असतो. मी मनातून कितीही कल्पना केल्या तरी तिच्याभोवती एक अदृश्य असे वर्तुळ होते. ते छेदणे माझ्यासाठी अवघड होते. त्यामुळे स्वतःला काळाच्या हाती सोपवून मी चाललो होतो. आणि काही करायचं म्हटलं तरी करणार काय? माझ्या एवढ्याशा गफलतीने हे स्वप्न काचेसारखे खळकन फुटून गेले असते. मला तेच नको होते.
          एकदा काही कामामुळे मला पोस्ट अॉफिसमध्ये जावे लागले. पाहिले तर तिथे ही भलीमोठी रांग. असं उगीचच ताटकळताना ती पुढे गर्दीत कुठेतरी आसपास असायला हवी होती. तेवढा वेळ सुसह्य झाला असता. माझे मनाचे खेळ सुरू झाले. ते तर नेहमीचेच झाले होते. अगर तू होती... तो ऐसा होता... तू होती तो वैसा होता... युँ जिंदगी गुजरती तेरे दिदार में... युँ तनहा ना रहते भरे बाज़ार में... अशाच स्वप्नरंजनात साधारण दहा मिनिटांनी मी काऊंटरजवळ पोहचलो.
"येस!"
          त्या छोट्याशा खिडकीतून आत वाकून पाहिले... आणि काय काम आहे, तेच आठवेना. म्हणजे मी पाहतच राहिलो. मग थोडा गडबडलो. शेवटी काही न सुचून बाजूला झालो. पाठीमागे उभ्या असलेल्या काकांना नंबर दिला. त्यांचे झाल्यावर मग मी माझ्या हातातील लिफाफा पुढे केला.
"रजिस्टर ए.डी."
एवढे म्हणतानाही मला माझ्या आवाजात कंप जाणवला. चक्क आतमध्ये ती बसलेली होती. तिथून बाहेर पडलो तरी माझ्या हृदयाची वाढलेली धडधड मलाच ऐकू येत होती. तिने मला पाहिले असेल का? पाहिले तरी ओळखले असेल का? ओळखले असेल तर आजची माझी गडबड पाहून काय विचार केला असेल तिने? मला तिच्याविषयी आकर्षण वाटत असले तरी ते माझ्या मनातल्या मनात. तिला माझ्याबद्दल माहीत असायलाच हवे, असे थोडीच आहे. मी स्वतःची समजूत घालत राहिलो. कुछ भी हो! मंझिल का पता तो चल गया था!
          पावसाळा सुरू झाल्यावर तर बाईकला बर्‍यापैकी विश्रांती दिलेली होती. कधीतरी जोराचा पाऊस यावा आणि आडोशाला नेमके आम्ही दोघेच असावे, अशा कल्पना करून झाल्या होत्या. कधीतरी तिने छत्री आणलेली नसावी... किंवा आपणच छत्री असूनही ती लपवून ठेवावी. असल्या सिनेमात शोभतील अशा रोमँटिक कल्पनाही मनात येत राहिल्या. पण पूर्ण पावसाळा उलटून गेला तरी ती वेळ काही साधली नाही. उलट पाऊस... रेनकोट... छत्री यामुळे दर्शन कमी झाले होते. आता पुढील मोहीम होती घर शोधण्याची. संध्याकाळी अॉफिसवरून आल्यानंतर फ्रेश होऊन बाहेर पडायचे. उगीचच इकडे तिकडे भटकत राहायचे. पण अमूक एका ठिकाणी ती सापडेल याची खात्री नव्हती. समजा मी तिच्या घरापुढे जाऊन जरी उभा राहिलो. त्यावेळी ती नेमकी बाहेर दिसली तर ठीक. अन्यथा ती येथेच राहत असेल हे कळण्याची सूतरामही शक्यता नव्हती. कदाचित तिथून कितीतरी वेळा गेलोही असेन. पण उगीचच ती कुठेतरी अचानक दिसेल असेच वाटत राहायचे. दिवस उलटत होते. पण आमची गाडी तिथेच अडून बसली होती. तसा काही एकमेकांना बोलण्याचा किंवा ओळख होण्याचा प्रसंग येत नव्हता. पोस्टातही महिन्याला एखादा हेलपाटा होत होता. तिने मात्र चेहऱ्यावर कधीच ओळख दाखवली नव्हती. उलट ती एवढी शांतपणे बोलायची की, त्यातही करारीपणा जाणवायचा. आमची विकेट तिथेच उडालेली. फक्त प्रगती एवढीच झालेली. पायी असेल त्या दिवशी अॉफिस सुटले की, पटकन पुढच्या चौकापर्यंत जायचे. तिथेच काहीतरी कारण काढून रेंगाळायचे. ती आली की, तिला थोडे पुढे जाऊ द्यायचे. मग आरामात तिचा पाठलाग सुरू व्हायचा.
           अशाच एका सांजवेळी...
मी थोडासा निवांतच होतो.
सगळं काही आलबेल चाललेलं होतं. कदाचित यामुळेच मी काहीसा बेसावध होतो. अॉफिसमधल्या अप्पा भोसलेने त्याच्या घरी जेवायला बोलावले होते. सिंगल असल्याचा हा फायदा असतो. गाडी बाहेर काढायचा कंटाळा आलेला... त्यात अप्पा घराच्या थोडे पुढे जवळच राहायला होता. म्हणून मग पायीच निघालो. अप्पाच्या घराजवळ पोहचलो असेन नसेन... मस्त असा रातराणीचा सुगंध आला... श्वासात घेता येईल तेवढा सुगंध भरून घेत नकळत मान शेजारच्या कंपाऊंडकडे वळली. भिंतीच्या पलीकडे अंगणात चोरटी नजर गेली खरी... पण नजरबंदीचा खेळ व्हावा, तशी ती नजर तिथंच खिळून राहिली. नुसती नजरच नाही, वाटही पावलात अडखळली.
          तुळशीपुढे दिवा लावत होती ती. काळोखाच्या पार्श्वभूमीवर चेहऱ्यावर पसरलेला हातातल्या दिव्याचा प्रकाश... डोईवर घेतलेला पदर... चेहऱ्यावर शांत भाव. अगदी चित्रकाराने चित्र काढावे, असा तो क्षण फ्रेममध्ये आला होता. एवढं सगळं सुंदर असतानाही नजरेला काहीतरी खटकत होते. पण काय? ते तेवढ्या क्षणार्धात समजलेही नाही. माझी चाहूल तिला लागली असावी. तिने क्षणभरच नजर उचलून पाहिले. नजरानजर होताच मी काहीसा गडबडलो. तिथून पुढे चालू लागलो. तो दोष त्या वेळेचा होता... पाहणाऱ्या नजरेचा होता... कि नजर खिळवून ठेवणार्‍या त्या चेहऱ्याचा होता? सांगणं कठीण आहे. एवढ्या दिवसाच्या तपश्चर्येचे फळ मिळाले होते. सापडली तीही अप्पाच्या कॉलनीत. पहिल्या दिवशी पाहिले तेंव्हा हाच अप्पा भोसले गाडीवरून सोडतो म्हणाला होता. आलो असतो... तर अप्पाच्या घरचा चहाही मिळाला असता आणि गेले काही महिने असेच कोरडे गेले नसते. चलो देर से सही लेकिन दुरुस्त आए थे...
                      * * * * * * *
          जेवायला तो माझ्याकडे आला तेंव्हा स्वारी एका वेगळ्या धुंदीतच होती. आजच्यासाठी मी सगळी तयारी करून ठेवली होती. पण त्याला या बाहेरच्या नशेची गरजच नव्हती. काही खास कारण दिसत होते. मी त्याला छेडलेही. मला म्हणाला, "आपण वर टेरेसवर बसू या का हवेला?"
ते ठीकही होते. जेवण तयार व्हायला तसा वेळच होता. आम्ही मस्त चांदण्यात मैफिल जमवली. दुसरा पेग भरला; तसा त्याने खुलासा केला.
"अप्पाराव, मला वाटतंय, मी प्रेमात पडलोय राव... येस! आय यम इन लव. क्यों आजकल निंद कम ख्वॉब जादा है... लगता है खुदा का कुछ नेक इरादा है... गेले काही महिने जिचा सावलीसारखा पाठलाग करतोय, चक्क! ती सापडावी आणि तीही तुमच्याच उशाला. कुछ ना कुछ तो चक्कर चला दो...!"
त्याने त्याची सगळी कहाणी सांगितल्यावर मी कपाळालाच हात लावला. अरे! दुसरी एखादी गोष्ट असती; तर बात निराळी होती. इकडची दुनिया तिकडे केली असती. पण... इथे तर सगळा लोच्या होऊन बसला होता. आता याची समजूत कशी काढायची, हाच प्रश्न होता. झटक्यात एक पेग टॉप टू बॉटम मारला. चिमूटभर चकणा तोंडात टाकत त्याला म्हणालो,
"भूल जाओ यार उसे... भलतीच स्वप्न पाहू नकोस. ये नही हो सकता..."
"का? का नाही होऊ शकत? काय प्रॉब्लेम आहे?"
"प्रॉब्लेम? अरे सगळीच प्रॉब्लेमची समस्या आहे."
            आता त्याला काय सांगू? ती मूळची साऊथ इंडियन आहे म्हणून सांगू? का तिचे लग्न झालेले आहे म्हणून सांगू? तेही इंटरकास्ट आहे म्हणून सांगू? का हे सांगू की ती एका छोट्या मुलीची आई आहे? काय सांगू? कसं सांगू मी याला... की तिच्या दुर्दैवाने तिने काय सोसलंय? त्याला हेही सांगू का की ती विधवा आहे? तू ज्या गोष्टी मिळवण्यासाठी स्वप्न पाहतोस ती गोष्ट कधीच घडू शकत नाही, हे कसे सांगू? त्याला एवढा मोठा धक्का देणे शक्य नव्हते. त्यामुळे थोडी कळ काढणे आवश्यक होते.
"चला तुमचे विमान आकाशात जायच्या आत आपण जेवून घेऊ. वैसे तुम्हारे दर्दे दिल का मरहम हम जरूर ढुँढेंगे..."
          तो दिवस तर मी टाळला. त्यानंतर तो वारंवार माझ्याकडे येत राहिला. जसजसे दिवस उलटत चालले होते, तसतसा तो तिच्या विचारात अधिकाधिक गुरफटत चालला होता. त्याचे माझ्याकडे येणेजाणे तिच्यापासून लपून राहिले नव्हते. तसे तिचेही आमच्याकडे येणे जाणे असायचे. आम्ही तर निमित्तमात्र होतो. तिलाही आता त्याच्या अस्तित्वाची जाणीव झालेली होती. नजरेला नजरेची ओळख झालेली होती. पण तिने आपल्याभोवती एक अदृश्य अशी लक्ष्मणरेषा ओढलेली होती. त्यामुळे त्यांची ही कहाणी यापुढे जाऊ शकत नव्हती. आम्ही उभयतांनी वेळकाळ पाहत पाहत तिच्याविषयी सगळे त्याच्या कानावर घालण्याचा प्रयत्न केला होता. आम्हांला वाटले होते, तिच्या भूतकाळाबद्दल कळल्यावर तो बदलेल. पण झाले उलटेच. तो तिच्यापासून दुरावण्याऐवजी तिच्याकडे अधिकच ओढला गेला होता. खरं म्हणजे त्याने तिच्यात एवढे गुंतू नये, असेच मला वाटत होते. यातून तो काहीच साध्य करणार नव्हता. तिच्याही आयुष्यात नियतीने काय कमी गोंधळ मांडून ठेवला होता. त्यात अजून भर नको. ते दोघेही अशा ठिकाणी उभे होते. जिथून एका ठिकाणी येणे शक्य नव्हते. रेल्वेच्या रुळाप्रमाणे फक्त समांतर चालू शकतील, पण एक होऊ शकत नाहीत.
            एक दिवस आमच्या 'हि'ने वेगळाच मुद्दा मांडला. तिने आपले संपूर्ण आयुष्य असे एकटीने का काढावे? तिला तिचे आयुष्य नव्याने नाही का सुरू करता येणार? हा मुद्दा विचार करण्यासारखा असला; तरी सहज बोलण्याइतपत ही गोष्ट सोपी नव्हती. सर्व गोष्टींची कल्पना येऊनही तो त्याच्या विचारांवर ठाम होता. पण त्याच्या घरचे हे सगळे स्वीकारणार नाहीत. चांगल्या मोठ्या घरचा त्यातही एकुलता एक. त्याच्याकडून घरच्या लोकांच्या फार मोठ्या अपेक्षा असणार. हे सगळे ऐकल्यावर त्यांची काय रिअॅक्शन येईल, याची कल्पनाच न केलेली बरी. पण मुळात हे सगळे याच्या बाजूने झाले. तिचे काय? शेवटी सगळा एकतर्फी मामला होता.
          एके दिवशी तो बाईकवरून चालला होता. काहीतरी गडबड झाली. कॉर्नरला गाडी स्लीप झाली. तो पडला. अपेक्षेपेक्षा जास्तच मार लागला. मित्र म्हणून मग मीच जवळच्या दवाखान्यात घेऊन गेलो. त्याला आत घेऊन नर्सने मला बाहेर हाकलले. त्यामुळे आतमध्ये काय चाललंय हे मला दिसत नसले तरी एका गोष्टीने मीच हादरलो. आमच्या मागोमाग तीही तिथे आली होती. माझ्याकडे लक्ष जाताच ती थोडी गडबडली. पण तिथेच माझ्या बाजूला उभी राहिली. तो बाहेर येईपर्यंत तिची चाललेली चलबिचल नजरेतून सुटणारी नव्हती. तिच्या चेहऱ्यावर क्षणाक्षणाला बदलणारे भाव मात्र बरेच काही सांगून जात होते. यापुढे माझी काळजी मिटलेली होती. आता मला काही करण्याची गरज राहिली नाही. ही 'श्टोरी' आता तिच्या वळणाने चालणार होती.
         तो बाहेर आला तेंव्हा त्याच्या डोक्याला पट्टी बांधलेली होती. हाताला थोडेसे फ्रॅक्चर असल्यामुळे डॉक्टरांनी हात गळ्यात अडकवलेला होता. जसा तो बाहेर आला, मी काही बोलण्या अगोदरच ती पुढे झेपावली. तिच्या डोळ्यांत काळजी दिसत होती.
     "काय झालं?"
           मी काही बोलण्यासाठी तोंड उघडण्याअगोदरच तो म्हणाला, "नथिंग! गाडी स्लीप... किरकोळ आहे सगळं."
      "हं...बी केअरफूल!"
           संध्याकाळी तिला त्याच्या घरी नेऊन सोडण्याची शेवटची जबाबदारी पार पाडून तिने त्याच्यासाठी आणलेले सफरचंद खात आलटून पालटून मी दोघांकडे पाहतच राहिलो.
                     * * * * * * *
          मी त्याच्याकडे एवढी का ओढली जावे, हे माझ्यासाठीच आश्चर्य होते. रस्त्याने जातायेता तो दिसायचा... तो आवर्जून माझी वाट पाहतो... नकळत मला सोबत करतो, हे मला जाणवले होते. पण मी जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केले होते. तो पोस्टात आला, तेंव्हा तर मुद्दाम निमित्त काढूनच आलाय, याची खात्रीच झाली होती. पण तो समोर आल्यावर मला पाहून इतका गडबडला की, माझे तिथे असणे त्याला अनपेक्षित होते. त्याची ती अवस्था पाहून मलाच हसू आले. त्या दिवशी तर मी तुळशीजवळ दिवा लावत होते. अचानक तो मला दिसला. तो मला शोधत आला असेल, असे वाटत नाही मला. तरीही तो आला होता. पण म्हणून मला त्याच्याबद्दल काहीएक का वाटावे? तो आशाताईंच्या घरी येतो, हे कळल्यावर माझेही त्यांच्याकडे जाणे का वाढावे? त्याच्याबद्दल आकर्षण वाटायला मी काही अल्लड नाही. एका छोट्याशा मुलीची आई आहे मी. मुळात अरविंदच्या अकाली जाण्यामुळे माझ्या आयुष्यात काय कमी उलथापालथ झालीय का? का अरविंदवरचे प्रेम अचानक आटून गेलेय, म्हणून मी अशी याच्याकडे ओढली गेले. मुळात याच्याबद्दल माझ्या मनात एवढा विचारच का यावा? आपण कुठेतरी चुकतोय, हे कळूनही का सावरू शकलो नाही स्वतःला? त्या दिवशी त्याचा अॅक्सिडेंट झाला. चूक आपलीच होती. काही कारण नसताना अचानक मीच रस्त्यावर आडवी आले. त्याने ब्रेक मारला. आपल्याला वाचवण्याच्या नादात तोच पडला. मुळात अपराधी भावनेने त्याला पाहण्यासाठी मागोमाग हॉस्पिटलमध्ये गेले. त्यावेळी किती घाबरून गेले होते. अप्पांना काय वाटले असेल?
           पुढे एकमेकांशी ओळख झाली. येणेजाणे वाढले. आपण खरं तर त्याला वेळीच दूर ठेवायला हवे होते. पण खोटं कशाला सांगू. गुंतत गेले मी त्याच्यात. त्याच्याही नकळत मी त्याच्यामध्ये अरविंदला शोधत राहिले. गार्गीला तर किती लळा लागलाय त्याचा. तो तिच्यासोबत खेळतो. तिला फिरायला बाहेर घेऊन जातो. अरविंद असता तर त्याने जे केले असते, ते सगळे हा करतो. कदाचित त्यामुळेच असेल. माझ्यासाठी नाही. गार्गीसाठी तो माझ्या आयुष्यात आला. फक्त गार्गीसाठी? नाही. मी त्याला एवढे जवळ येऊ द्यायला नको होते. त्याला गुंतवून ठेवायला नको होते. पण त्यानेही कधी गैरफायदा घेतला नाही. किती रिस्पेक्टली वागत राहिला. आजपर्यंत अनेक पुरुष पाहिले. अॉफिसमध्येही. बाहेरही. आसपासही. एकटी म्हणून जवळ यायला पाहणारे... सहानुभूतीच्या नावाखाली ओशट स्पर्श करणारे... विनाकारण मवाळ होणारे... डोळ्यांतून त्यांची लालसा टिपकत राहते. पण याने साधा चुकार स्पर्शही कधी केला नाही. अदबीने वागत राहिला. देता येईल तेवढा आनंदच दिला. साध्या साध्या बोलण्यातून मला हसवण्यासाठी धडपडत राहिला. माझ्या पूर्वायुष्याविषयी चुकूनही बोलला नाही. हे असं आहे. त्याच्याविषयी विचार करायला लागले की, त्याच्यात अजून गुंतून जाते. एका स्त्री आणि पुरुषामध्ये निखळ नातं असू शकत नाही का?
           आज आपण आपल्याच हाताने स्वतःवर ही वेळ आणलीय. एवढे दिवस... एवढे महिने... अगदी वर्ष उलटून गेले. आता त्याला माझ्याकडून उत्तराची अपेक्षा आहे. त्याला वाटतेय, मी त्याच्यासोबत आयुष्य काढावे. त्याचंही चुकतंय असं नाही. उलट मी विधवा आहे... एका मुलीची आई आहे, हे माहीत असूनही मनाचा मोठेपणा दाखवून तो मला लग्नासाठी विचारतोय. पण मला हे शक्य नाही. कसं समजावून सांगू त्याला? मीच माझ्या स्वार्थापोटी विणलेल्या मोहपाशात स्वतःही अडकले आणि त्यालाही अडकवले. मला कळायला हवं होतं... आपण शेवटपर्यंत त्याला साथ करू शकणार नाही. ही कहाणीही अधुरीच राहणार. आपण आपल्या नाही, निदान त्याच्या तरी मनाचा विचार करायला पाहिजे होता. या सगळ्यात त्याचा काय दोष? आपल्या चुकीची शिक्षा त्याने का भोगावी? त्याला किती यातना होतील? पण आता बस्! यापेक्षा जास्त ताणण्यात अर्थ नाही. हे सगळं कुठंतरी थांबायला हवं.
                       * * * * * * *
     "चला. आपण निघूया. गार्गी घरी वाट पाहत असेल. निघायला हवं."
     "एकंदरीत तुम्ही उत्तर द्यायचंच नाही, असं ठरवलेलं दिसतंय. मी यातच तुमचा नकार समजावा का?"
     "हो!" मोठ्या निग्रहाने तिने उत्तर दिले. "तसं समजा. पण यापुढे मला तुमच्यासोबत तुमच्या वाटेने चालणे शक्य नाही. ही माझी एकटीची वाट आहे. मलाच चालायला हवी. तुमच्याकडून मी सोबतीची अपेक्षा ठेवू शकत नाही. हवं तर या तापलेल्या वाटेवर तुम्ही सावलीसारखे भेटलात, असं समजा. माफ करा, पण आता मला पुढे निघायला हवं."
     "हं...!" त्याने एक सुस्कारा सोडला.
     "तुम्ही कधी विचारलं नाही आणि मीही कधी सांगितलं नाही. पण आता मी तुम्हाला अंधारात ठेवू शकत नाही. तसं केलं तर ती माझीच प्रतारणा ठरेल. गार्गीचे बाबा कसे गेले माहितेय?"
     "नाही. पण ते जाणून घेण्याची मला आवश्यकता वाटत नाही."
      "तुम्हाला नाही, पण मला आवश्यकता वाटतेय म्हणून सांगते..." क्षणभर थांबून सगळे अवसान गोळा करत ती म्हणाली, "एडस्!"
      "काय...?" जवळजवळ तो किंचाळलाच.
      "हो!"
           काळ जागेवरच गोठून गेलाय कि काय? असे त्याला झाले. तो तिच्याकडे पाहतच राहिला. त्या एका शब्दाने तो पार गारठून गेला होता. आजपर्यंत त्याने हा शब्द कितीतरी वेळा ऐकला होता... उच्चारला होता. पण हा भयंकर राक्षस आपल्याच उंबरठ्यावर येऊन बसला असेल, याची त्याला पहिल्यांदा जाणीव झाली. अंगावरून कुणी संपूर्ण कातडी ओरबाडून काढली कि काय? असे त्याला वाटू लागले. डोके सुन्न झाले. थोडावेळ अशाच बधीरपणात गेल्यावर नाही नाही ते विचार त्याच्या डोक्यात थैमान घालू लागले. पण तेवढ्यात अंधारातूनही प्रकाशाची तिरीप दिसावी, तसा त्याला आशेचा किरण दिसला. तो काहीसा चाचरत म्हणाला.
      "पण... म्हणून... तु म्हा ला? आपण हवी तर तुमची टेस्ट करून घेऊ."
       "त्याची आवश्यकता नाही. गार्गीचे बाबा गेले. जाताना खूप काही ठेवून गेले. गार्गी आहे... त्यांच्या आठवणी आहेत. कदाचित त्याचा आजारही असेल. मला तो कुणालाही द्यायचा नाही. स्वार्थी समजा हवं तर... पण हे ओझं मलाच पेलावं लागेल."
             तिने हात जोडले... आणि ती उठून चालू लागली. तो तिच्या पाठमोर्‍या शरीराकडे पाहतच राहिला. कुठेतरी एक टिटवी त्याच्या काळजाला घरं पाडत ओरडत गेली. त्याच्या डोळ्यांतून ओघळलेला आसवाचा थेंब गालावर येऊनही तो पुसण्याचेही त्याला भान उरले नव्हते...!

(समाप्त)


-- श्री नंदकिशोर गायकवाड.