Saturday, 23 April 2016

११...


          भल्या पहाटेच आबईने कि माईने... पण कोणीतरी मला उठवले असावे. काहीसा वैतागून डोळे चोळीतच बाहेर आलो. एका हातात कंदील व दुसऱ्या हातात असलेले डमरूसारखाच आवाज करणारे कुडमुडे वाजवत कोणीतरी दारात आला होता.
माई म्हणाली, "पांगूळ आलाय."
मी पाहिले, तर चांगला धडधाकट होता. दोन्हीही पाय व्यवस्थित असूनही हा पांगळा कसा? डोक्यावर गुलाबी रंगाचा फेटा आणि अंगावर कोट घातलेला... कपाळाला भस्माचे पट्टे होते. गळ्यात अनेक प्रकारच्या माळा होत्या. त्या माणसाने आपल्या कमरेला अडकवलेल्या पिशवीतील चिमुटभर भस्म माझ्या कपाळाला लावले.
         दारावर मागायला येणारे अनेकजण पाहिले होते आतापर्यंत. त्यामध्ये मोरपिसांचा टोप घातलेले वासुदेव असायचे. माईने सूपभरून धान्य झोळीत टाकले की, माईच्या आई-वडिलाचे, सासू-सासर्‍याचे नाव विचारून "दान पावलं...!" म्हणून टाळ वाजवून नाचणारे वासुदेव पाहिले होते. त्यांच्या टोपातील एखादा मोरपीस पुस्तकात ठेवायला मिळाला, तर 'किती भारीच मज्जा!' असे वाटायचे. पुस्तकात मोरपंख ठेवला की, त्याचा मोर होतो. त्यावेळी आमची आपली तशी भोळी समजूत होती.
पोलिसांसारखे कपडे घालून येणारे रायरंद तर असे छान भारी काहीतरी बोलायचे. "लग्नाला चला... तुम्ही लग्नाला चला. सखूबाई ठकूबाई लग्नाला चला. लेकरं बांधा खुटीला अन् कोकरं घ्या काखेला...!" असले काहीएक गमतीदार बोलायला लागले की, हसून हसून बेजार व्हायचो. गळ्यात अडकवलेल्या बाजाच्या पेटीवर "चलो मच्छिंदर गोरख आया..." अशी नवनाथाची गाणी म्हणणारे नाथ यायचे. धुपाटणी घेऊन फिरणारे हिरव्या कपड्यातील फकीर यायचे. हलगीच्या ठेक्यावर गाणी म्हणणारे पोतराज यायचे. गुबूगुबू वाजवत नंदीवाले यायचे. आसुडाचे फटकारे अंगावर ओढत मरीआईवालेसुद्धा यायचे. पण सगळे यायचे ते दिवसाचे. असे पहाटे येणारा पांगूळ पहिल्यांदाच पाहिला होता. कुडमुडेवाला होता जणू तो. नंतर मुकूंदमामाने सांगितले की, याला 'पिंगळा' म्हणतात म्हणून. पिंगळा...! कुणाशीही बोलायचे नाही. दारात उभे राहून दान मागायचे नाही. सूर्य उगवण्यापूर्वीच फिरायचे, असा यांचा नियम. यांच्यापैकी कोणीतरी एक जण पहाटेच 'पिंगळा आला' हे गावात कळण्यासाठी गावाबाहेरील झाडावर चढून ओरडायचा. कुणाशीही न बोलणारे हे पिंगळे जे बोलतील; ते मात्र खरे होते, अशी लोकांची भावना होती.
          अलिकडे बदलत्या काळाबरोबर अनेक लोककला व अनेक लोककलावंत नामशेष होऊन गेले आहेत. बहुरूपी व वासुदेव तेवढे तुरळक आढळतात. इथल्या संस्कृतीच्या नावाने कायम खडे फोडणारांना हे तरी माहीत आहे का? की कधीकाळी लोककलेचा एक समृद्ध वारसा आपण उशाशी घेऊन झोपत होतो. आणि आज पिढ्यान् पिढ्या जपलेली ही श्रीमंती काळाच्या प्रवाहात हरवून गेलीय. आज फक्त दंतकथा बनून राहिली आहे. केवळ आपल्या टिचभर पोटाची भूक भागवण्याच्या गरजेपलीकडे जाऊन सृजनवृत्तीचा... प्रतिभेचा अविष्कार होता या कलेत. समोरच्या माणसाच्या मनात शिरून आरसा दाखवण्याचे कौशल्य होते. पिढीजात अभ्यासाचे संचित होते. 
         पुढे अनेक वर्षांनी भिमाशंकरच्या वाटेवर भटकंतीमध्ये अगदी अनपेक्षितपणे असे दोघेजण मला भेटले. आवर्जून गाडी थांबवून त्यांना मीच भेटलो. त्यांनी मग नेहमीच्या ठोकताळ्याप्रमाणे माझे भविष्यही सांगितले. काही पटणारे भूत-वर्तमान आणि आशा लावणारे भविष्य ऐकायला तेही त्यांच्या स्टाईलमध्ये बरे वाटत होते. स्वतः होऊन शंभर रुपये काढून दिले. आणखी मिळतील, या आशेने तेही रंगवून सांगत होते. माझा खरा इंटरेस्ट त्यांच्या भविष्यकथनात नसून त्यांच्या कलेत आहे, हे कळल्यावर पोटभर आशीर्वाद देऊन त्यांनी काढता पाय घेतला.
          "जर भविष्य खरं झालं आन तू शिखर शिंगणापूरच्या म्हाधेवाला कधी आलाच; तर आवरजून भेट!" असे म्हणून थोडा भस्म आमच्या कपाळी लावला. सातारला असताना गावाकडे जाण्याचा तो तर माझा नेहमीचा रस्ता होता. भेटला वेळ कधी, तर नक्कीच भेटू; म्हणून मीही निरोप घेतला होता.
          आता लहानपणी माझ्याकडे फारसा भूतकाळ होताच कुठे? भविष्यकाळाचे मात्र ढिगारे पडले होते. का कोण जाणे! पण या कुडमुडेवाल्याने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि माईला म्हणाला, "आई, पोराला जपा. म्हाधेव हाये त्यो. साधाभोळा हाये, तेवढाच गरम डोक्याचा हाये. बाईच्या जातीपासनं अडचणी हायत्या त्याला. एक दिस लई मोठा कामदार हुईल. पन शेवटी संन्याशीच. जवळचं सगळं उधळून एक दिस मसणात जावून बसंल. देवाची नजर राहील त्याज्यावर. पन त्याज्या नावानं पाच सोमवार धरा."
          असेच बरेच काहीबाही तो बोलत राहिला. माईने सुपभरून दाणे आणि दोन रुपयाची नोट दिल्यावर स्वारी निघून गेली. त्यावेळी त्याच्या बोलण्याचा अर्थ उमगेल असे वय माझे नसले; तरी माईच्या काळजीत भरच पडली असावी. पुढे बरेच दिवस ते जाणवत राहिले. आज त्यातील किती खरे ठरले आणि किती खोटे, हे सांगायचे अवघड आहे. पण ते चुकीचे होते, असे म्हणायला जीभ रेटत नाही. माधवमामा मात्र गालातल्या गालात हसत होता.
          अरे हो! सांगायचे राहिलेच. गुढी पाडवा यावेळी रविवारला जोडून आला होता. त्याचवेळी आणखी दोन दिवसांची सुटी घेऊन माधवमामा घरी आला होता. तो खूप खुशीत होता. कंपनीमधील त्याचे काम पाहून त्याच्या मोठ्या साहेबांनी त्याला आपल्यासोबत गोव्याला न्यायचे ठरवले होते. त्यांच्या कंपनीचे एक फार मोठे काम तिथे चालणार होते. साहेबांना आपला असिस्टंट म्हणून माधवमामा हवा होता. पुढील एक वर्ष ते दोन वर्षे त्याला तिथे राहायला मिळणार होते. साहेब बराच अनुभवी आणि हुशार असल्यामुळे शिकण्यासारख्या बर्‍याच गोष्टी होत्या. सरकारी नोकरीपेक्षा खाजगी नोकरी करून पुढेमागे स्वतःचा व्यवसाय करण्याचा त्याचाही विचार असावा. एकदा गोव्याला गेल्यावर पुन्हा लवकर येता येणार नाही; म्हणूनच जाण्यापूर्वी तो घरी आला होता. तसेही तो शिकायला पुण्यालाच असल्यामुळे घरी खूप कमी असायचा. आता फरक एवढाच होता की, पुण्याऐवजी तो गोव्याला जाणार होता. गोवा म्हणे खूप लांब... तिकडे कोल्हापूरच्याही पुढे होते. इथे अजून कोल्हापूर कुठे आहे, हेच मला माहिती नव्हते. फक्त ऐकले होते. तिकडे म्हणे समुद्र आहे. खूप सारी नारळाची आणि आंब्याची झाडे आहेत. सुपारी, काजू, फणस अशी कधी न पाहिलेली फळे असतात. भेटकार्डावर पाहिलेला समुद्राचा देखावा म्हणजे गोवा. पाण्यावर  आपल्या भल्यामोठ्या पांढऱ्या शिडात हवा भरून तरंगणारी नाव... माडांची किनार लाभलेल्या पदरावरती मावळतीच्या कि उगवतीच्या सूर्याची पसरलेली लाली... यालाच गोवा म्हणतात, अशी माझी धारणा होती. मामासोबत कधी जायला मिळाले; तर किती धमाल होईल ना!
          या चारदोन दिवसांत मागच्या सुट्टीतल्यासारखा मामा माझ्या वाट्याला आलाच नव्हता. एकतर दिवस कमीच होते. त्यात त्याच्यामागे धावपळ जास्त होती. मोठ्यामामांचे आणि त्याचे बरेच काही चालले होते. खरं तर मला त्याला खूप काही सांगायचे होते. पण जमत नव्हते. आमच्या शाळेत शिबिर येऊन गेले होते... माझा हात मोडला होता... मी शिरीषसोबत खूप धमाल करायचो... शिबिर संपल्यावर मला करमत नव्हते. म्हणून शब्बूआपाच्या घराकडून मी चकराही मारल्या होत्या... एकदा तिने मला घरात बोलावून घेऊन खाऊही दिला होता... आणिक सांगायचे तर बर्‍याच गप्पागोष्टी केल्या होत्या... माधवमामा कधी येणार? त्याचे पत्र आले का एवढ्यात एखादे? म्हणून चौकशी केली होती. पण हे सगळे माधवमामाला कसे सांगायचे, हेच कळत नव्हते. माधवमामा आला तसा निघून गेला. काहीच बोलला नाही. मीही काही सांगितले नाही. आता तो लवकर येणार नव्हता; म्हणून मलाच वाईट वाटले. शाळेला सुट्या लागल्यावर तर मला गेल्या उन्हाळासुट्टीची जास्तच आठवण येऊ लागली होती.
          अक्षयतृतीया झाली. एकदोन दिवसांची छोटी यात्राही झाली. मुकूंदमामासोबत यात्रेतून फिरूनही आलो. पण ऊरुसासारखी मजा काही यावेळी आली नाही. या सुट्टीला मी आणि शुभाताई तिच्या मामाच्या गावाला गेलो होतो आठ दिवस. सोबत मोठीमामी होतीच. तिथे बरेचजण मला त्यांचा मुलगाच समजत होते. एकदोघे म्हणालेही.
"कुसूम, पोरगं चांगलंच मोठं झालं की तुझं."
मामीही हसून मला जवळ घ्यायची. माझ्या गालावरून हात फिरवून स्वतःच्या गालावर बोटं मोडायची.
"खाली बघा बया! नजर लागंल लेकराला माझ्या."
मला आबईच्या जोडीने अजून एक आई मिळाल्यासारखे वाटत होते. काय खोटे होते? कृष्णालाही अशीच एक यशोदामैया होतीच की. तशीच मलाही कुसुममामी भेटली होती. मामीच्या घरी शेतात आमराई होती. आठवडाभर दिवसच्या दिवस मी नुसता चरत होतो. किती आंबे खाल्ले, याचे मोजमापच नाही. मामीच्या भावांची चिल्लरपार्टी भरपूर होती. त्यात आमच्या दोघांची भर पडली. दुपारी आमचा बराचसा वेळ आमराईतच जायचा. घरी मला काही गोष्टींची पुस्तके सापडली होती. आमराईत पाडाचे आंबे खात खात बुंध्याशी बसून ती सगळी पुस्तके मी वाचून काढली. एका अद्भूत दुनियेत जाण्याची गुरुकिल्ली मला सापडली होती. यावेळी मला जी त्यांची बाधा झाली ती आयुष्यभर पुरली. मी अक्षरशः पुस्तकांच्या प्रेमात पडलो. झपाटूनच गेलो म्हणा ना! त्या पुस्तकांतून मला अनेक न पाहिलेली माणसं, स्थळं भेटली. मी त्यांच्यात इतका हरवून गेलो की, स्वतःलाही त्यांच्यापैकीच एक समजू लागलो. माझ्याही जीवनात असेच काही अद्भूत घडावे, मला ते जवळून अनुभवता यावे, अशी स्वप्ने मी उघड्या डोळ्यांनीही पाहू लागलो. या वाचलेल्या गोष्टींमुळे माझ्याही कल्पनेला पंख फुटू लागले.
        चौथीचे वर्ष सुरू झाले. परंतु आता आम्हांला सरकारवाड्यातील शाळेत जायची गरज उरली नव्हती. वेशीच्या बाहेर शाळेसाठी एक छान सिमेंटकाँक्रेटची इमारत उभी राहिली होती. शाळेचे स्थलांतर हक्काच्या जागेत झाले. नवी इमारत मिळाली. नव्या वर्गासोबतच नवीन शिक्षकही मिळाले. धोतरवाले, विजारवाले गुरुजी इकडे आलेच नाहीत. नव्या वर्गाला पँट शर्ट घालणारे, केसांचा चांगला भांग पाडणारे व महत्त्वाचे म्हणजे इतिहासातील गोष्टी सांगणारे नवीन गुरुजी मिळाले. आतापर्यंतच्या गुरुजींपेक्षा हे प्रकरण वेगळेच होते. पण भारी होते. त्यांचे नाव सोनारगुरुजी. सतत काहीतरी नवीन चाललेले असे त्यांचे. पहाटे उठून ते आम्हांला व्यायाम करायला सांगत. अगदी ते स्वतः उठून दोन मैलापर्यंत धावायला जात. त्यांना भूतांची अजिबात भीती वाटत नव्हती. अमावस्येच्या रात्री बारा वाजताही ते पैज लावून स्मशानभूमीत जाऊन येत. मोठ्या वर्गातील मुलांना ते इंग्रजी नावाचा भयानक अवघड विषय शिकवायचे. हा अवघड विषय फक्त तेच शिकवू शकतात, यावर मुलांचीच नव्हे; तर इतर गुरुजींही श्रद्धा होती. आमच्या वर्गाला इंग्लिश नव्हते. ते आमचे वर्गशिक्षकही नव्हते. तरीही ते आमच्या वर्गाला शिकवणार होते. नेहमीच्या अभ्यासाशिवाय स्कॉलरशिप नावाचा असाच काहीतरी भयंकर प्रकार असतो, हे शुभाताईमुळे कळलेले होते. अर्थात या स्कॉलरशिपचा शोधही या गुरुजींनीच लावलेला होता. दररोज सकाळी व संध्याकाळी ते शाळेत स्कॉलरशिपचा जादा तास घेणार होते. यावर्षीपासून शाळेची वेळ बदलली होती. अकरा ते पाच. आम्ही मात्र नऊ ते साडेसात असे शाळेत अडकणार होतो. जोडीला सातवीची मुलेही असणार होती.
          या नवीन अभ्यासात खूप गमतीजमती होत्या. उतारा, कविता, संवाद सर्वकाही तिथेच असे. फक्त उत्तरे शोधायचे काम असल्यामुळे पाठांतर करण्याची गरज नव्हती. वेगवेगळ्या प्रकारचे शब्द असतात. समानार्थी, विरुद्धार्थी, वाक्प्रचार, म्हणी, आलंकारिक, शब्दसमूहाबद्दल एक शब्द असे एक एक तोळामासा मोजून घ्यावेत, अशा शब्दांचा खजिनाच हाती लागला होता. एवढ्या सगळ्या प्रकारची गणिते असू शकतात, हा आम्हांला लागलेला ताजाच शोध होता. पण आमचे गुरुजी भलतेच हुशार होते. अगदी आभाळातील चांदण्यांही मोजता येतील, अशा गणिताच्या क्लृप्त्या त्यांच्याकडे असत. खूप सारी कोडी असलेला बुद्धिमापन चाचणी एवढा एकच विषय अभ्यासात असावा, असे म्हणण्याइतपत त्याची गोडी लागली होती. वर्गातील अभ्यासापेक्षा स्कॉलरशिपच्या अभ्यासाची गोडी वाटू लागली होती. पण एक अडचण निर्माण झाली होती. हात मोडल्यापासून लेखन खूप कमी आले होते. लिहायचा खूपच कंटाळा यायचा आणि गुरुजी मात्र डझनवारी कागदांची भलीमोठी वही तयार करून सगळे प्रश्न लिहायला लावायचे. कितीही प्रश्न सोडवले; तरी त्यांचे समाधान काही व्हायचे नाही. त्यामुळे नाइलाजाने या परीक्षेचा नाद सोडायचा, या निर्णयापर्यंत मी येऊन पोहचलो होतो. माझ्यासारखीच बर्‍याच जणांची हीच अवस्था होती. माझी जरा जास्तच गोची झाली होती. एकतर हा नवीन अभ्यास मला खूप आवडला होता. पण लेखनाला वैतागून टाटा बायबाय करायची वेळ आली होती. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय, अशी अवस्था झाली होती. काय करावे तेच समजत नव्हते.
          निर्णय घेण्याची वेळ मात्र आलीच नाही. गुरुजींनी अगोदरच मोठ्यामामांना भेटून "पोरगं हुशार आहे. स्कॉलरशिपला बसवा. पास झालं तर दरवर्षी स्कॉलरशिप मिळेल." म्हणून सांगितले होते. आता माघार घेण्याचा प्रश्न उरलाच नव्हता. बरं लेखनाचे कारण सांगू शकत नव्हतो. हे कारण ऐकून गुरुजीच काय पण मामांनीही मला धुतले असते. शेवटी जमेल तसे लिहीत गेलो. वहीच आणली नाही... घरीच विसरली... गैरहजर मित्राने वही नेलीय... अशा बहाण्यावर दिवाळीपर्यंत वेळ मारून नेत होतो. वर्गातील अभ्यासातली गती पाहून गुरुजींनाही ते खरेच वाटत राहिले. निळीच्या भांड्यात पडलेला कोल्हा किती दिवस निळा दिसणार? पाऊस कधीतरी पडणारच. काहीजण यामुळे दुःखी होते. त्यांना लिहावे लागते, या त्रासापेक्षा मी यातून सुटलोय, याचेच दुःख जास्त होते. त्यांनी गुरुजींकडे कागाळी केली. तेंव्हा दोन दिवस बसून एकसारखे लिहूनही वही काही पूर्ण होण्याचे नाव घेईना. मग मोडलेला हात कसा दुखतोय, याचे नाटक रंगवले. त्यापेक्षा आपल्याला ते स्कॉलरशिपच नको, हे माईच्या गळी चांगलेच उतरवले.
"गुरुजी, पोरगं आजून बारकं हाय वं. एवढा अभ्यास एकदम कसा झेपंल त्याला. त्यात त्याजा हात मोडल्याला हाय. जरा कलानं घ्या. नाहीतर ती परीक्षा कसली हाय ती नकू त्याला. हाय तीच अभ्यास बास झाला."
          एवढी मात्रा लागू पडली. मी परीक्षा द्यायलाच हवी, हा गुरुजींचा आग्रह होता. त्यामुळे मग लेखनात सवलत मिळाली. पण रोजच्या रोज नियमित उदाहरणे सोडवायची व पाठांतर करायचे या अटीवर. वर्षाच्या शेवटी परीक्षा झाली. पेपरही चांगले गेले आणि यथावकाश निकालही लागला. दोघेचौघेच पास झाले होते. त्यात मीही चांगल्या मार्कांनी पास झालो. पण गुणवत्ता यादीपर्यंत पोहचण्यासाठी थोड्या टाचा वर करायला पाहिजे होत्या. ते विसरलो. त्यामुळे ती गुणवत्ता यादी का काय ते काही दिसली नाही. तरीही आपल्यामध्ये थोडीफार गुणवत्ता असल्याचा साक्षात्कार मला झाला होता. वर्गातील पोरांना ते नाही पटले; तरी शाळेतल्या गुरुजींचाही त्यावर विश्वास बसला होता.

(क्रमशः)

Tuesday, 12 April 2016

१०...

          कोणी आजोबा वगैरे आपल्या नातवाच्या नावाने काही ठरावीक रक्कम 'फिक्स डिपॉझिट' करून ठेवतात. अनेक वर्षांनी सगळेच विसरून गेलेले असतात. नेमके मुद्दल किती? त्याची मुदत किती? व्याजदर काय? कशाचा कशाला काही म्हणता काही पत्ता नसतो. आयुष्याचे तरी यापेक्षा काय वेगळे असते हो! तो वर आभाळात बसलेला 'म्हातारा' तुमच्या नावाने काही 'फिक्स डिपॉझिट' करून तुम्हांला पाठवून देतो. तुमच्या जन्मापासून हे खाते सुरू होते. तेवढेच काय ते आपले ज्ञान... बाकी अज्ञान. बरं याचे व्याजदर तरी कुठे सरळव्याजाचे असतात! शेअर मार्केटप्रमाणे कायम चढउतार चाललेले असतात. या डिपॉझिटचा हिशोब आपल्याला कधीच लागत नाही. रक्कम खर्ची पडत राहते आणि शिलकीचा मेळ कधीही जुळत नाही.
           दिवाळी झाल्यावर माधवमामा पुण्याला परत गेला होता. कुठल्यातरी मोठमोठी बांधकामे करणाऱ्या कंपनीत काही दिवस तो नोकरी करणार होता. मुकूंदमामालाही त्याच्या कामात बर्‍यापैकी पैसा मिळू लागला होता. तशी माझीही प्रगती चांगलीच झाली होती. कोणाच्याही मदतीशिवाय उडी मारून पारावर चढता येऊ लागले होते. शाळेच्या कोपऱ्यातल्या उंबराच्या झाडावर मुंगळ्यांना चुकवून चढायला शिकलो होतो. उंबरे नसली तरी मुंगळे भरपूर होते. एकदा तर अंधार्‍या जिन्यातून जाण्याचे भलतेच धाडस करून शुभाताईबरोबर वरच्या मजल्यावर असलेल्या वर्गातून चक्कर मारून आलो होतो. लेखन आणि वाचनामध्येही चांगलीच प्रगती झालेली होती. संक्रांतीच्या वेळी मोठ्या मुलांच्या जोडीने पतंग उडवण्यातील प्राथमिक धडे गिरवले होते. विटीदांडू खेळताना जमिनीवर ठेवलेली विटी दांडूने वर उडवून फटके मारायला जमू लागले होते. फक्त एकाच गोष्टीचे वैषम्य होते. मनातून जुन्याच भितीने पुन्हा डोके वर काढले होते. अर्थात ही भीती वाढण्यामागे कारणही तसेच घडले होते.
          दिवाळीच्या सुट्टीतलीच घटना. मी शुभाताईसोबत अंगणात खेळत होतो. नेमके घरी दुसरे कोणीच नव्हते. फक्त एकटी आबई काय ती घरात काहीसे काम करत बसली होती. तेवढ्यात कोणीतरी एकजण दारात सायकल लावून आमच्याकडे आला. मळकट कपडे, वाढलेली दाढी, तांबारलेले डोळे आणि दारू पिणार्‍या माणसाचा येणारा पिकल्या बोरासारखा आंबूस वास. चालतानाही तोल जात होता. मात्र हातातील प्लास्टिकच्या पिशवीत काहीतरी खाऊ दिसत होता. माई आणि शाळेतील मुलेही सांगायची, धरणारवाले म्हणजे मुलं पळवून नेणारी माणसं लहान पोरांना असंच काहीतरी खायला देतात आणि पळवून नेतात. त्यात गुंगीचे औषध असते. एकंदरीत त्या माणसाचा अवतारच असा होता की, त्या भितीने मी जागेवरच अर्धा गार झालो होतो. त्यात धरणारवाल्याच्या कल्पनेने उरले सुरले अवसानही गळून गेले. ओरडण्यासाठी तोंडातून आवाजही फुटेना. आबईला हाक मारण्यासाठी उघडलेले तोंड उघडेच राहिले. माझी ती अवस्था पाहून आणि त्या माणसाला पाहून शुभाताई मात्र ओरडत घराकडे पळाली. मी एकटा पडलो होतो. आबई बाहेर येईपर्यंत काही क्षणच लागले असतील. परंतु एकेक सेकंद माझ्यासाठी युगायुगांचा झाला होता. आबईला पाहताच ती व्यक्ती मागे सरकली. तेवढी संधी साधून मी तिच्या कमरेला मिठी मारली. तिच्या पदरात तोंड लपवून भितीने थरथरत मी तिला आणखीन बिलगलो. आबईच्या येण्याने मला धड श्वास घेता आला आणि तोंडातून आवाज फुटला.
          माझी ती अवस्था पाहून आणि समोर त्या माणसाला पाहून आबई चवताळली. संकटाच्यावेळी कुठल्याही मातृप्राण्यामध्ये आढळून येणारी ही स्वाभाविक प्रतिक्रिया होती.
"मागं सरका पहिलं...!"
"मालते, अगं! मी काय नाय केलं शेखरला. त्याला फक्त ही आणलेली मिठाई देत होतो."
           खरं म्हणजे एकूणच या प्रसंगाने तो माणूसही गोंधळून गेला होता.
"काय पोराचा जीव घेता का? घाबरून काय अवस्था झालीय बघा तुमच्या डोळ्यांनीच."
"अगं! पण...?"
या गोंधळाने शेजारची चारदोन माणसं गोळा झाली होती. तेवढ्यानेही आबईला आधार मिळाला. आबई फडाफडा बोलत राहिली. शेवटी तो माणूस गुपचूप सायकल घेऊन निघून गेला.
"तुला घाबरायला काय झालं एवढं? बाप होता तुझा. इथून पुढं एक लक्षात ठेव. तो एकवेळ माझा जीव घेईल. पण तुला काहीच करणार नाही. त्यामुळं असं घाबरायचं नाही."
           बस्स! बापाचे कळत्या वयातील ते पहिले दर्शन तरीही मला घाबरून टाकण्यासाठी पुरेसे होते. इतके दिवस ज्या 'बाप' शब्दाची भीती वाटायची; ती भीती आणि तो बाप पहिल्यांदाच इतक्या जवळून अनुभवला होता. त्यामुळे पुढील काही दिवस मी घरापासून दूर जायचे कटाक्षाने टाळले. अर्थात थोडाबहुत बाहेरच्या जगात गेलो की, माई पाठोपाठ आलेली असायचीच. एवढे असूनही मोकळ्या हवेत म्हणावा असा श्वास काही घेता येत नव्हता. मनातून काही केल्या भीती जात नव्हती. अजूनही कुठूनतरी आपला 'बाप' येईल की काय याची धाकधूक असायचीच.
          संक्रांत झाली. शाळेत डी.एड.चे पाक्षिक शिबीर आले होते. चांगले पाच-पंचवीस सर आणि मॅडम पंधरा दिवस शाळेत तळ ठोकून होते. या दिवसांत शाळेची वेळ बदलून अकरा ते पाच अशी केलेली होती. आमचे नेहमीचे गुरुजी निवांत अॉफिसमध्ये बसून असायचे. ते कधीच वर्गात शिकवायला आले नाहीत. पण हे नवीन सर आणि मॅडम लई भारी शिकवायचे. एकाचवेळी दोघे, तिघे; तर कधी चौघेही वर्गात यायचे. खेळाचे तास मारुतीच्या मंदिरापुढे पटांगणात व्हायचे. कधीच न खेळलेले अनेक नवीन खेळ यावेळी त्यांनी आम्हांला शिकवले. काही खेळ माहीत होते; पण चुन्याची फक्की टाकून व्यवस्थित आखलेले मैदान आणि विशेषतः खेळाला नियम असतात, हे आम्हांला नवीन होते. खोखो, कबड्डी, हॉलीबॉल, लांब उडी, उंच उडी, रस्सीखेच, इत्यादी इत्यादी. एवढे मोठे बॉल पहिल्यांदाच हातात आले होते. अनेक गाणी, डान्स अशा बर्‍याच भारी भारी कार्यक्रमाची तयारीही चाललेली होती. आमच्या नेहमीच्या गुरुजींसारखी ही मंडळी कडक नव्हती. आम्हांला मारणे तर दूरच. साधं रागवायची पण नाहीत. उलट आमच्यासोबत हसून बोलायचे, खेळायचे, गाणी म्हणायचे. भारी गंमत करायचे. खूप मजा यायची. वर्षभर अशीच शाळा असावी. हे शिबीर कधी संपूच नये, असे वाटत होते. यांना पाहिल्यावर मला नेहमी माधवमामाची आठवण यायची. या शिबिरात आमच्या गावातलीच एकदोघे मोठी पोरंपोरीसुद्धा होती. त्यात मुसलमानाची शब्बूआपा होती. तिचे नाव तसे शबनम होते. पण सगळे तिला शब्बू म्हणायचे. ही शब्बूआपा तर माझे फार लाड करायची. बाकीचे काहीकाही सर आणि मॅडम आपापसात काहीतरी बोलत बसायचे. मोठ्या वर्गातील पोरं त्यांना हळूच हसायची. एकदा मी स्वतः ऐकले. "कायतरी जांगडगुत्ता हाय लेका!" म्हणून खूसफूस करत होती. पण मला त्यांच्या बोलण्यातील काहीच कळले नव्हते. तरीही मला या पोरांचाच राग आला. शब्बूआपा त्यात नसायची, हे एक बरं होतं. शब्बूअप्पा आणि तिच्या त्या मैत्रिणी खूप चांगल्या होत्या.
          उन्हाळ्यात मी आणि माधवमामा खूप भटकायचो. शिकारीवर जायचो. मग पुढे तळ्याच्या रस्त्याने आमच्या शेतातही जायचो. त्या बाजूला मुसलमानांची शेती होती. तिथेच शब्बूआपाचे पण शेत होते. आम्ही एकदोनवेळा त्यांच्या शेतातून गेलो होतो. शब्बूआपा तेंव्हा शेतातच होती. आमच्याशी बोलली पण होती. ईदच्या वेळी मोठ्या मामांबरोबर मी त्यांच्या घरी शिरकुंबा आणि गुलगुलं खायला पण गेलो होतो. भारीच होते. पोट फुटेपर्यंत खाल्ले होते. अजून सांगायचे तर... माधवमामाच्या सायकलवरून चक्कर मारायला जायचो; तेंव्हा गंमतच झाली. शब्बूआपा पाणी भरत होती. आणि माधवमामाकडून तिला सायकलची धडक लागली. म्हणजे मोठी नाही काही. हळूच धक्का लागला होता. तिची कमरेवरची घागरच पडली आणि पाणी सांडले. मला तर वाटले होते, आता ती भांडणार आम्हांला. पण शब्बूआपा चांगली होती. ती भांडली नाहीच. उलट हसून बोलली होती. मग माधवमामाने तिला विहिरीतून घागर भरून दिली. पण माधवमामाने सांगितल्याप्रमाणे मी या गोष्टी कधीच कोणालाही सांगितल्या नाहीत. माईला आणि शुभाताईला पण नाहीत. फक्त वेणूला एकदाच सांगितल्या होत्या.
            एकदा मधल्या सुट्टीत शब्बूआपा आणि तिच्या मैत्रिणी एका वर्गात बसल्या होत्या. गप्पा मारत काहीतरी खायचे चालले होते. शब्बूआपामुळे मी त्या सर्वांचाच लाडका झालो होतो. मी खिडकीशी दिसताच त्यांनी मला आत बोलावले. एका छोट्या डब्यातून एका मॅडमनी गुलाबजामून आणले होते. मलाही 'खा' म्हटल्या. खरंतर जामून मला खूप आवडायचे. पण कोणी 'घे' म्हणाले म्हणून लगेचच हावरटपणा करायचा नाही, अशी घरातूनच शिकवण असल्यामुळे मी 'नको' म्हणून सांगितले.
शेवटी शब्बूआपाच म्हणाली, "आम्ही खाल्लेत सर्वांनी. तुलाच ठेवलेत. खा."
मग मी घेतले. सगळ्या मॅडमनी मलाही त्यांच्या गप्पात घेतले. असेच काहीतरी बोलताना एका मॅडमनी घरी कोण कोण असते, म्हणून विचारले. मी सांगितले.
"मग घरी बोलावणार आहेस कि नाही आम्हांला चहाला?" असे विचारल्यावर तर मला फार आनंद झाला. मी सर्वांनाच घरी बोलावले.
"आज नको. आज घरी विचारून ठेव. मग येतो आम्ही." चष्मेवाल्या मॅडमनी सांगितले.
          शाळा सुटल्यावर घरी जाताना मी शुभाताईला सर्व सांगितले. म्हणजे मी गुलाबजामून खाल्ल्याचे... मॅडमसोबत गप्पा मारल्याचे... शेवटी शुभाताईलाच म्हणालो मग, 'आपण मॅडमला चहाला घरी बोलावू' म्हणून. संध्याकाळी शुभाताईने घरची परवानगी मिळवली. दुसऱ्या दिवशी या सगळ्याजणी शब्बूआपाच्या घरी आल्यावर मी त्यांना आमच्याही घरी घेऊन गेलो. सगळ्या मॅडमनी माझे फारच कौतुक केले. शुभाताईचाही केले. पण माझे जरा जास्तच. त्यामुळे मी हवेतच होतो. आमची बैठकीची खोली पाहून तर त्या खूप खूश झाल्या.
मीही मग त्यांना रूबाबात सांगितले, "ही खोली माझी आणि माधवमामाची आहे!"
पूर्ण शिबिर संपेपर्यंत मी मग सारखे त्यांच्यासोबत राहू लागलो. त्या चष्मेवाल्या मॅडम तर नेहमी माझे गालगुच्चे घ्यायच्या, नाक ओढायच्या, केस विस्कटायच्या. मलाही लई भारी वाटायचे. 
          शिबिराच्या शेवटच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले होते. आम्ही मुलेच काय पण सगळे सर आणि मॅडम पण आज चांगले तयार होऊन आले होते. काहीतरी विशेष होते; परंतु शेवटपर्यंत मला एक गोष्ट समजली नव्हती. या शिबिरामध्ये शुभाताईने एका डान्समध्ये भाग घेतला होता. शब्बूआपाने तिला भारीच नटवले होते. आमचेही एक नाटक बसवले होते. आमच्या बालभारतीच्या पुस्तकात शेवटी 'भटक्या' नावाचे एक नाटुकले होते. भटक्या, अवडंबरशास्त्री व राजा अशी पात्रे होती त्यात. पात्र वाटप करताना अस्मादिकांची इच्छा राजा होण्याची होती. भारीच की! तो चमचमणारा मुकूट... ते लाकडी खूर्चीला कागद चिकटवून केलेले सिंहासन... ती कमरेची तलवार... काय रूबाब! वा! वा! वा! पण छे! सरांनी आमच्या स्वप्नावर पाणी टाकले. असे कुठे? सर्व स्वप्नेच पाण्यात बुडवून टाकली. मला पात्र मिळाले ते भटक्याचे. चित्रविचित्र पोशाख... काठीला अडकवलेले गाठोडे घेऊन वेड्यासारखे फिरणारा भटक्या! छे! आणि काय ते त्याचे संवाद... एखादा अवलिया फकीर बरा. पहिल्या प्रवेशापासून ते शेवटापर्यंत त्याचे बोलणे ऐकूनच लोक हसायचे. राजा कसा मध्ये मध्ये यायचा. काय त्याचा डौल होता. त्याचा जयजयकार करायचे लोक. हे सगळे भटक्याला कसे मिळणार? झाले नाटक संपले. शिबीरही संपले.
          आज मला जाणवतेय. तेच माझे प्राक्तन होते. आज खरोखरच मी भटक्या आहे... राजा नाही. पण आज मात्र या कुठल्याही गोष्टीचा विषाद माझ्या मनात नाही. उलट माझ्या आयुष्यातली खरी भूमिका तीच राहिली आहे. तेंव्हा माझ्यामध्ये शिरलेला भटक्या आजही तसाच आहे. त्यावेळी खर्च झालेल्या क्षणांचा हिशोब आज लागतोय एवढंच. हा प्रवास आता लवकरच संपेल तो माझ्या मृत्यूने. मृत्यूच्या नावाने का कोण जाणे उगीचच भीती वाटते माणसाला. पण त्यात भिण्यासारखे काय आहे?
मृत्यू तर एक अटळ सत्य आहे. तो कधी ना कधी येणारच.
फक्त कधी?
ते सांगणेच अवघड असते.
मृत्यू म्हणजे अंत नव्हे...
तो तर आरंभ...
पुन्हा नव्या प्रवासाचा...!
मरणाची भीती नाही वाटत मला. फक्त या आयुष्याचा लोभ जडला होता. पण या प्रवासातील अजून काही हिशोब अपुरे असावेत. ते पूर्ण करायलाच हवेत. त्याशिवाय जाता येणार नाही. पुढच्या प्रवासात ही 'सगळी' असतील का? का मागील प्रवासातील काही देणी आहेत? ज्यांची परतफेड या प्रवासात करतो आहे... कदाचित पुढील प्रवासातही करावी लागेल. तरीही ती संपेल कि नाही, हे तो आभाळतला 'म्हातारा'च जाणे...!
          कार्यक्रम संपल्यावर सर्वांनीच खूप खूप फोटो काढले. शब्बूआपाने माझ्या आणि शुभाताईसोबत एक फोटो काढला. तेंव्हा अचानक माझ्या डोक्यात ट्यूबलाईट पेटली. शुभाताईच्या हातात बांगड्या होत्या; तशाच आज शब्बूआपाच्या हातात घातलेल्या बांगड्यासुद्धा खूप सुंदर दिसत आहेत आणि तिने मेंहदीपण लावलीय. मला आठवले. अजून एक आमची गमाडीजंमत होती ती. दिवाळी झाल्यावर आमच्या गावचा उरुस असतो. मी, शुभाताई आणि माधवमामा... उरूसाच्यावेळी खूप धमाल केली होती. उरूसात फिरताना आम्ही पाळण्यात बसण्यासाठी हट्ट करत होतो. माधवमामा मात्र तयार होत नव्हता. तो सारखं कोणालातरी शोधत होता. बहुतेक त्याचे मित्र येणार असावेत. आम्ही मात्र मनातून त्याचे मित्र लवकर येऊ नयेत, यासाठी प्रार्थना करत होतो. कारण मित्र आले की, माधवमामा आम्हांला घरी पोहचवणार आणि तो मित्रांसोबत निघून जाणार, हे नक्की होते.
तेवढ्यात माधवमामा शुभाताईला म्हणाला, "चल नकटे, आपण तुला बांगड्या घेऊ."
बांगड्या म्हटल्यावर शुभाताई खूश झाली. आम्ही बांगड्या घेताना नेमकी तिथे शब्बूआपा होती. मग तिने आणि शुभाताईनेच बांगड्या पसंत केल्या. मला आणि मामाला त्यातले काय कळणार?
निघताना मामा मला म्हणालाही, "गब्बरसिंग, पाळण्यात बसायचे ना बेट्या तुला? चला मग!"
मग मामा आम्हांला पाळण्यात बसायला घेऊन गेला. जमाडीगंमत म्हणजे शब्बूआपापण आली. ती एवढी मोठी असून तिला पाळण्यात बसायची भीती वाटत होती. म्हणून तिने तिच्याबरोबर आलेल्या तिच्या चाचाच्या मुलालाच फक्त आमच्याबरोबर पाळण्यात बसवले.
"नही बाबा! मैं नही बैठनेवाली।"
"घाबरतेस काय! मी आहे ना!" माधवमामा.
मग घाबरत घाबरत कशी तरी शब्बूआपा बसली पाळण्यात. पण हे पाळणे भलतेच मोठे होते. वरून खाली येताना पोटात कसंसच व्हायचं. आम्ही कोणीच घाबरलो नसलो तरी शब्बूआपा मात्र डोळे मिटून माधवमामाला घट्ट पकडून बसली होती. आम्ही तिला खूप हसलो. माधवमामाने घरी येताना लगेच बजावले. "पाळण्यात बसलेलं घरी सांगायचं नाही. नाहीतर घरचे चिडतील. परत उरुसात पाठवणार नाहीत."
छे! आम्ही कशाला सांगतोय कोणाला! माधवमामाची आणि आमची गमाडीजंमत आहे ती...
          शिबिर संपल्यावर उगीचच काहीतरी हरवल्यासारखे वाटत राहिले. जत्रा उठून गेल्यावर मागे जी शिल्लक राहते; तशीच काहीशी अवस्था आता शाळेत जाणवत होती. एक पोकळी जाणवत राहिली. आता शाळेत जायला नकोच वाटत होते. अशाच रिकाम्या मानसिकतेत असताना मी शाळेच्या कोपऱ्यातल्या उंबराच्या झाडावर चढून बसलो. मुंगळ्यांना माझे तिथे बसणे रुचले नसावे. त्या गडबडीत मी घसरलो. पुढे महिनाभर हात गळ्यात अडकवून फिरत राहिलो. बरेच दिवस शाळेला दांडी मारता आली. हे एका अर्थाने बरे झाले. नाहीतरी शिरीषला घेऊन सुनितामामी घरी आल्या होत्या. त्याच्यासोबत खेळण्यामध्ये दिवस कसे पंख लावून उडून चालले होते. पण काही दिवसांतच कंटाळा आला. शुभाताई, वेणू सगळेच शाळेत जायचे. एकटा घरी किती दिवस काढणार. मग एका हाताने शाळा सुरू राहिली. लिहिणे शक्य नव्हतेच. फक्त वाचनच. पडल्यापासून मी उपद्वापी असण्यावर शिक्कामोर्तब झालेले. त्यामुळे माई माझी जास्तच काळजी घेऊ लागली होती. मी मात्र माधवमामाची वाट पाहणार होतो. सुट्टीला तो आला की, त्याला बर्‍याच गमतीजमती सांगायच्या होत्या. फक्त त्यालाच...! शब्बूआपाने तसे सांगूनच ठेवले होते.

(क्रमशः)

Monday, 4 April 2016

९...

          पाटी-पेन्सिल हीच एकमेव संपत्ती असण्याच्या त्याकाळात पहिली किंवा दुसरीच्या वर्गामध्ये वही-पेन वापरणारे कोणीही नसायचे. परंतु माधवमामाने त्याच्याकडील एक वही मला देऊन आमचा सन्मान आणि वर्गातील मुलांमध्ये आमचे वजन भलतेच वाढवले होते. सकाळी प्रार्थनेसाठी मात्र वरच्या वर्गातील सर्व मुलांकडे एखादी छोटीशी डायरी असायची. त्यात राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, वंदे मातरम्, प्रार्थना, पसायदान, इत्यादी इत्यादी वगैरे वगैरे असे बरेच काही भारी भारी लिहिलेले असायचे. माझ्यासाठीही एका संक्रांतीच्या भेटकार्डामध्ये काही कोरे कागद घालून मुकूंदमामाने एक छानसी डायरी शिवून दिली होती. एवढेच नाही; तर त्यांनी स्वतःच्या वळणदार हस्ताक्षरात सर्वकाही लिहून दिले होते. अधूनमधून जुन्या कॅलेंडरमधील काही चित्रेही चिकटवलेली होती. रेडीमेड डायर्‍यांपेक्षा ही हाताने बनवलेली सुंदर डायरी शाळेत फारच लोकप्रिय झाली होती. मलाही मुकूंदमामामुळे अभ्यासाच्या जोडीला सतत काहीतरी नवीन करण्याचा नाद लागला होता. चित्रे काढायची... माईच्या गोष्टी ऐकायच्या आणि त्यात मनाची भर घालून त्या वर्गात सांगायची कला मला जमू लागली होती. सरकारवाड्यात लपायला भरपूर जागा होती. कमीजास्तीला शेजारचे मारुतीचे मंदिर होतेच. मंदिरापुढे खेळायला बरेच मोकळे पटांगण असल्यामुळे घरी जे फारसे खेळायला मिळत नव्हते; त्याची कसर आता शाळेतील वेळात निघू लागली. अनेक संवगडी गोळा होऊ लागले. परिघाचा व्यास वाढतच चालला होता.
          पहिलीची परीक्षा ती काय असणार? गुरुजी पाटीवरच काहीबाही लिहायला सांगायचे आणि झाली परीक्षा. गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत परीक्षा संपूनही गेली.
          अशातच घरातल्या वातावरणात आनंद पसरला होता. सुनितामामीमध्ये बदल दिसू लागला होता. एकदा तर चुलीजवळ बसून लहान पोरांसारखं चुलीची माती खातानाही मी तिला पाहिले होते. पण एक झाले, तिच्यामुळे मलाही कैर्‍या, चिंचा खायला मिळू लागल्या होत्या. आताशी मामी दुपारी एकटी बसली की, मनाशीच हसायची. मला जवळ घ्यायची आणि माझे लाड करायची. मला जवळ घेऊन हळूच विचारायची,
"काय हो! नवरी पाहिजे ना तुम्हाला? का खेळायला दोस्त पाहिजे?"
          खरं म्हणजे मला माझी नवरी मिळाली होती. आता काही त्याची गरज नव्हती. मात्र खेळायला दोस्त मिळाला, तर बरेच होते. पण मी आपला काही न बोलता वेड्यासारखा नुसताच पाहतच राहायचो. मग मामी हसून हळूच माझी पापी घ्यायची. मलाही तिच्याकडून असे लाड करून घ्यायला आवडायचे. असे असले तरी तिच्या नजरेत तरंगणार्‍या स्वप्नांचा अर्थ त्यावेळी मला काही लागत नव्हता. माईनेही मला दम भरला होता.
"आता जास्त आगावपणा करायचा न्हाई. मामीसंगट जास्त धिंगाणा घालायचा न्हाई. आन तू आता मोठा झालाईस. शहाण्यासारखं वागावं."
          मुकूंदमामाला विचारले की, तो फक्त हसायचा. सांगायचा काहीच नाही. शेवटी उन्हाळ्याच्या सुट्टीत माधवमामा आल्यावर मी त्याचा पिच्छाच पुरवला. तेंव्हा त्याने मला हळूच गमाडीजंमत सांगितली. आमच्या घरात लवकरच एक बाळ येणार होते. लवकर म्हणजे अगदी लगेचच नाही काही. ही सुट्टी संपून मी दुसरीत गेल्यावर जेंव्हा गणपती येऊन जातील... मग दसरा येऊन तो संपेपर्यंत मात्र मला वाट पहावी लागणार होती. ही जमाडीगंमत कळल्यावर तर मी एकेका दिवसाने वाटच पाहू लागलो.
          या सुट्टीत माधवमामा आलेला असल्यामुळे खूप धमाल करायला मिळाली. माधवमामाच्या सायकलवर बसून तो मला कुठेकुठे फिरायला घेऊन जायचा. संध्याकाळी तो मला व्यायामालाही घेऊन जायचा. अट एवढीच होती की, सगळ्याच गोष्टी घरी सांगायच्या नाहीत. मीही त्या कोणालाच अगदी माईलाही सांगणार नव्हतो. आम्ही शेतात निघालो की, नेहमीच्या वाटेने न जाता तळ्याच्या वाटेने जायचो. तिथे पाणकोंबड्या भरपूर असायच्या. माधवमामा जवळच्या गुलेरने गोटीएवढ्या खड्याने त्यांना टिपायचा. प्रत्येकवेळी शिकार मिळायचीच असे नाही. पण पाणकोंबडी नाही मिळाली; तर तित्तर वगैरे सापडायचे. एकदा तर मामाने भरावाच्या दगडांमध्ये एक मोठी काळी पालच पकडली. मला तिची खूपच भिती वाटली होती. पण त्यानेच सांगितले की, ही घोरपड आहे म्हणून. शेतातील झोपडीत काही सामान ठेवलेले असायचे. तिथेच आमची पार्टी व्हायची. भाजलेले पदार्थ एवढे रुचकर असतात, हे तेंव्हाच मला कळले होते. आता माधवमामाची शेवटची परीक्षा झाल्यामुळे तो जास्त दिवस राहणार होता. तो आल्यापासून आमचा मुक्काम पोस्ट बैठकीच्या खोलीत होता. त्याने एक मोठा रेडिओ आणला होता पुण्याहून. खूप छान छान गाणी ऐकायला मिळायची. एकंदरीत काय सुट्टी एकदम धमाल गेली.
          माझी दुसरीची शाळा सुरू झाली. शुभाताईपण सातवीत गेली होती आणि विशेष म्हणजे वेणू आता पहिलीच्या वर्गात बसू लागली होती. तिला काहीच येत नव्हते आणि मी हुशार होतो. त्यामुळे वेणूला मी बर्‍याच गोष्टी शिकवायचो. ओठांचा चंबू करून ती नवलाईने माझ्याकडे पाहत राहायची. माधवमामाकडूनही मला अनेक नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या होत्याच.
          मामीचे पोट आता चांगलेच मोठे दिसू लागले होते. एकदा मी माईला विचारलेही होते. "मीपण असाच आबईच्या पोटात होतो?"
यावर आबईच म्हणाली, "नाही बाबा! तुला तर भिकारणीकडनं भाकरी देऊन इकत घेतलंय. काय लेकरू हाय...! आसलं कडकडं लेकरू पोटात कसं ठरलं आसल देव जाणं!!!"
          कधीकधी मी सुनितामामीच्या पोटाला कान लावायचो. बाळ माझ्याशी काहीतरी बोलेल, असे मला वाटायचे. मग सगळेजण मलाच विचारायचे,
"सांग बरं! पोरगं हुईल का पोरगी?"
घरात शुभाताई मुलगी होतीच ना! त्यामुळे आता मुलगा व्हावा, असेच सगळ्यांना वाटत होते. मलाही खेळायला जोडीदार हवा होता. म्हणून मग मी लबाडपणाने बारकाईने ऐकायचो आणि "मुलगा!" म्हणून सांगायचो. पण तरीही सगळे मला चिडवायचे.
"हा हा! पोरगीच होणार. आमाला माहितीय तुला बायकू पाहिजेल ते. म्हणून तर लाडीगोडी चाललीय. कळतंय की आमाला बी साखरपेरणी कशासाठी चाललीय ते."
मग सगळेजण माझी गंमत करून मोठमोठ्याने हसायचे. मी मात्र चिडायचो... फुगायचो. पण तेवढ्यापुरतेच.
           तसा तर मुलगा अथवा मुलगी असा काही आग्रह नव्हता कुणाचाच. त्यात मोठ्या मामीच्या बाबतीत घडलेल्या प्रसंगाने सर्वांनाच काळजी लागून राहिलेली होती. माई तर म्हणायची, "दगड, धोंडा काय बी हूदे. पण सगळं यवस्थित हूदे."
           शाळेत गुरुजींनी आता बेरीज वजाबाकीची गणिते, जोडाक्षरांचे शब्द असे काहीबाही शिकवायला सुरुवात केली होती. मंदिरातील घंटा वाजवण्यासाठी पळतपळत येऊन उडी मारायची. हात पोहचायचा नाही. मग दुसऱ्याच्या खांद्यावर तिसर्‍याचा आधार घेऊन चढायचे. चिरघोडी खेळायची. अशा उपक्रमात मी तयार होत होतो. दुपारी अचानक देवदर्शनाच्या निमित्ताने माईची चक्कर व्हायचीच. पण त्यामागील शुद्ध हेतू माझ्यावर लक्ष ठेवण्याचाच असायचा. श्रावण महिण्यापासून पुढे अनेक कारणांनी मंदिरापुढे भंडारा व्हायचा. गावातून फिरून गहू तांदूळ गोळा करायचे... पेठेतून फिरून गूळ जमा व्हायचा. कोणी ना कोणी नारळ द्यायचे. मंदिरापुढे खड्डा खोदून चुलवण केलेले असायचे. हळद शिजवायच्या भल्या मोठ्या काहिलीतून खीर शिजवली जायची. शाळा सुटल्यावर पटकन घर गाठायचे आणि ताट घेऊन भंडार्‍याचा प्रसाद खाण्यासाठी पळायचे. काहिलीपासून जवळ जागा सापडली की, ताटातली खीर संपल्यावर लगेच डबल खीर मिळायची. ती घेऊन घरी यायचे. नवरात्र संपेपर्यंत कोणाचा ना कोणाचा भंडारा असे. खिरीत नारळाचा तुकडा सापडला की, जो आनंद होई, त्याला तोड नाही. गरमागरम खीर बोटाने चाटूनपुसून संपवली जाई.
           नवरात्र सुरू झाले की, आमचा पोराठोरांचा उत्साह ओसंडून वाहत असे. गावाच्या चारही बाजूला देवीचे एकेक ठाणे होते. सरकारवाड्यातील येमाईपुढे आरास केलेली असे. मोर्‍याचा साहेबानाना जोगत्याचे कपडे घालायचा. गळ्यात कवड्याच्या माळा अन् हातात पोत पेटवलेला असे. आम्ही त्याच्या पाया पडलो की, कमरेला अडकवलेल्या पिशवीतले कुंकू कपाळाला लावायचा. पाचपन्नास आराधी आणि तेवढयाच परड्या घेऊन पाचव्या माळेपासून एकेका ठाण्याला भेट दिली जाई. पाचव्या माळेला गावाच्या पूर्वेला असलेल्या राणूबाईला जायचे. सहाव्या माळेला दक्षिणेकडे असलेल्या तुकाई बरडावर... आठव्या माळेला पश्चिमेस असलेल्या पिंपळेश्वराशेजारची सटवाई; तर नवव्या माळेदिवशी उत्तर वाटेच्या लखाईला जाऊन यायचे. दिवस मावळून अंधार पडेपर्यंत आराध्यांचा मेळा चालायचा. अंधारात तर पेटलेले पोत फारच भारी दिसायचे. झांजा वाजवणारे जोशमध्ये यायचे. ढोलकीवरचे पेटून उठायचे. पोत खेळणारे तर असे रिंगण धरायचे की, बघतच राहावे. एक म्हणता दहाबारा बायांच्या अंगात आल्यामुळे त्या झुलत असायच्या. कुंकवाचा मळवट भरल्याने कपाळ भरून गेलेले... केस मोकळे सुटलेले... पेटण्यासाठी टलेला कापूर, लिंबू असे काहीबाही त्यांच्या हातावर दिले म्हणजे त्या खाऊन टाकायच्या; तेंव्हा कुठे शांत व्हायच्या.
          नवरात्रात दुपारची शाळा नावालाच असे. आम्ही जुन्या टायरामध्ये काठ्या घालून किंवा लोखंडी रिंगेची चकारी करून त्या दिवसांत भरगच्च असणाऱ्या तर्वटाच्या पिवळ्या झुपकेदार फुलांनी, सूर्यफुलांनी त्या सजवायचो. मोठी मुले सायकल घेऊन यायची. नदीवर सायकल धुवून तिलाही सजवले जायचे. अशा शंभरेक 'गाड्या' रस्त्याने दिसायच्या. लहानमोठ्या मुली आपल्या डोक्यावर लहानमोठी मडकी घेऊन यायच्या. तांबड्या काऊने आणि पांढऱ्या चुन्याची बोटे ओढून मडकी सजवली जायची. चुंबळ करून ही मडकी डोक्यावर ठेवलेली असायची. शुभाताई डोक्यावर मडके घेऊन आणि माई हातात परडी घेऊन आलेली असायची. या मडक्यातील आंबील हा जिव्हाळ्याचा विषय असायचा. ताक, कुरड्या आणि भाजलेल्या मिसळीच्या पिठापासून आंबिल केलेली असायची. आपल्या ओळखीच्या मुलींजवळ जाऊन मडक्यावरच्या बशीसारख्या खापराच्या येळणीतून आंबील प्यायला मिळायची. थोडीथोडी म्हणता पोट गच्च भरायचे.
           दरवर्षी नवव्या माळेला रात्री गावातील तरुण पोरांपासून ते पोक्त माणसांपर्यंत शे-पाचशे लोक सिमोल्लंघनासाठी तुळजापूरला जातात. तिथले सिमोल्लंघन उरकून विजयादशमीचे 'शिलंगण' खेळण्यासाठी सगळेजण सकाळी गावात पोहचत; तेंव्हा कुंकवाने लालबुंद झालेले असायचे. यावेळी माधवमामा गावीच असल्यामुळे मोहनमामासोबत तोही गेला होता. खूप गर्दी असते; म्हणून त्यांनी मला काही नेले नाही. मी हट्ट केल्यावर पुढच्या वर्षी तुझा अन् मुकूंदमामाचा नंबर म्हणून माझी समजूत घातली माईने. पुढच्या वर्षी तर पुढच्या वर्षी. तुळजापूरमध्ये दसर्‍याची भवानीमातेची पालखी निघते. वर्षभर सेवा करूनही पालखीला खांदा द्यायचा मान भोप्यांना नाही. हा मान नगरच्या तेल्याच्या घराण्याकडे वंशपरंपरेने आलेला आहे. देवीसाठी पलंग बनवून तो तिला पोहचवण्याचे काम त्यांच्याकडे आहे. नवरात्रात महिषासुराबरोबर चाललेले युद्ध विजयादशमीला संपते. सिमोल्लंघनानंतर थकलेली देवी झोपून जाते, ती कोजागिरी पौर्णिमेपर्यंत. तिला झोपण्यासाठी हा पलंग असतो. तो उचलून खांद्यावरून तुळजापूरपर्यंत पोहचवला जातो. त्यांच्या जाण्याचा मार्ग पिंपळेश्वरातून आहे. खूप वर्षांपूर्वी नदीला पूर आल्यामुळे पलीकडे जाणे अवघड होऊन बसले होते. पलंग तर वेळेत पोहचणे आवश्यक होते. शेवटी तालमीतल्या पोरांनी वेडे धाडस केले. नदीतून एकमेकांचे हात पकडून दुहेरी साखळी तयार केली. त्या आधाराने पलंग पैलतीरावर पोहच झाला. या प्रसंगी तर तारून नेले. पण पुढच्या काळजीने तेल्याने पोरांना तुळजापूरपर्यंत येण्याची गळ घातली. त्याच्या विनंतीवरून पोरं पलंग सुखरूप तुळजापूरमध्ये पोहचवून आली. एवढेच नाही; तर पालखीला खांदा देऊन सिमोल्लंघनाचे सोने लुटून परत आली. बस् तेंव्हापासून तो मान मिळाला तो मिळालाच.
        नवरात्र संपून आता दिवाळीचे वेध लागले होते. सुनितामामी पहिलेच बाळंतपण असल्यामुळे माहेरी गेलेली होती. एके दिवशी त्यांच्या माहेरचा एक माणूस साखरपान घेऊन आला. सर्वांचेच चेहरे उजळलेले होते. कोणी काही कोणी काही बोलत होते. मी माधवमामाला गाठले. माधवमामा जाम खुशीत होता. त्याने मला उचलले आणि खांद्यावर टाकले.
"चल बेट्या! तुला पेढा खाऊ घालतो."
आणि खरेच बापूच्या हॉटेलात नेऊन पेढे घेऊनच घरी आलो. मुकूंदमामा 'बाप' झाला होता. याचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. मला मात्र थोडासाच आनंद झाला होता. कारण फार साधे होते. ज्या बाळाची मी एवढ्या आतुरतेने वाट पाहत होतो; त्या बाळाचा जन्म होऊनही ते पाहायला मिळत नव्हते. बाळाला पाहण्यासाठी मी अधीर झालो होतो.
"मामा, आपण बाळाला बघायला कधी जायचं रं?"
"जाऊ... जाऊ! पण एवढ्यात नसतंय जायचं. कळ काढ थोडी. मग जाऊ."
ती कळ काढणेच अवघड झाले होते. बारशापर्यंत घरचे काय जायचं नाव घेत नव्हते. यात कसेबसे दोनचार दिवस गेले. शेवटी माधवमामालाच गटवला.
"घरच्यांना कळू न देता आपण किती गमाडीजंमत करतो. आताही गुपचूप सायकलवर जाऊन येऊ."
माधवमामाच्या डोक्यातही असेच काही चालले असावे. पण माईला कळले तर माई ओरडेल. म्हणून तो गप्प होता. मी उचल घेतल्यानंतर त्यालाही स्फुरण चढले. माईला त्याने सांगितले की, आपलं साखरपान घेऊन कोणाला पाठवण्यापेक्षा मीच जातो म्हणून. हो नाही करत शेवटी माई तयार झाली.
            इवलासा पांढरा गुलाबी कापसाचा गोळा मामीच्या कुशीत झोपलेला होता. डोळे मिटलेलेच होते. पण ओठ मात्र अगदी एवढेसेच रेषेएवढे होते. त्याची बोटे तर माझ्या पेन्सिलसारखीच होती. त्याला सोडून परत यायला पायच निघत नव्हता.
"चल बेट्या! पोरगं हाय ते. पोरगी असती तर दिली असती तुला."
सगळे हसू लागले. मला उगीचच लाजल्यासारखे झाले. मामींनी माझा गालगुच्चा घेतला आणि हळूच म्हणाल्या,
"तुमच्या मामाबरोबर पुन्हा या बरं का!"
मी होय म्हणून मान हलवली. निघताना माधवमामा तिला हळूच म्हणाला,
"सांगतो भाऊला. येईल तो."
"आता आगाऊपणा करताय, पण कळेल थोड्याच दिवसांत."
ते दोघेही का हसताहेत ते मला कळले नसले; तरी त्यांच्या सुरात सूर मिसळून मीही खुशीत हसत राहिलो. माझ्या आनंदाचे कारणही तसेच होते. आता घरात मला आणखी एक जोडीदार आला होता. घरी गेलो की, माईला, शुभाताईला आणि महत्त्वाचे म्हणजे वेणूला कधी एकदा सांगतोय, असे मला झाले होते.

(क्रमशः)