Sunday, 12 June 2016

१७...

          आपल्याला पडलेल्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे आपल्याला कुठे माहीत असतात? सातवीत असताना स्कॉलरशिप परीक्षेमधील गणिते सोडवण्याची एक नवीनच पद्धत गुरुजींनी आम्हांला शिकवली होती. माहीत नसलेल्या उत्तरासाठी 'एक्स' मानायचा. जी पदे माहीत आहेत; त्यांची योग्य क्रमाने मांडणी करून तिरकस गुणाकार केला की, हवे असलेले उत्तर सापडते. या अमानवी शक्तींसाठी 'एक्स' मानून उत्तर सापडेल कि नाही, कोणास ठाऊक! तुमचा जर देवावर विश्वास असेल; तर भूताखेतांना तुम्ही कोणत्या तोंडाने नाकारणार? खरं म्हणजे मी आस्तिक आहे का नास्तिक ते मलाच माहीत नाही; पण मी सृष्टीनियंत्याला मानतो. एक अमूर्त अशी शक्ती या विश्वाच्या पाठीमागे असल्याशिवाय हे सर्व इतके व्यवस्थित चाललेय तरी कसे? तुम्ही त्याला परमेश्वर म्हणा... अल्ला म्हणा... गॉड म्हणा... याने काय फरक पडतो? तुम्ही त्याला काय म्हणताय? तुमच्यालेखी तो कसा आहे? तुम्ही त्याला कोणत्या स्वरूपात गृहीत धरलेय? याने तरी काय फरक पडतो? पण अशी एखादी शक्ती तर असायलाच हवी.
          आपल्या बापजाद्यांनी पिढीजात जतन करून ठेवलेल्या ज्ञानामध्ये पंचमहाभूते सांगितली आहेत. आमच्या आधुनिक विज्ञानालाही ते मान्य आहे. पहा ना! किती गंमत आहे! पदार्थाच्या अवस्थांपैकी स्थायू, द्रव, वायू हीच अनुक्रमे भू, जल, वायू अशी महाभूते मानली आहेत. हे विश्व या घटकांनीच तर बनलेले आहे. याशिवाय असणारे तेज म्हणजे प्रकाश मानला आहे. तरीही शेवटी सांगितलेले पाचवे तत्त्व काय आहे? आकाश ही तर अमूर्त कल्पना आहे. पण या अथांग आकाशामध्ये अनेक प्रकारच्या लहरी, तरंग आहेत. आपण ज्याची कल्पनाही करू शकणार नाही अशा विभिन्न ऊर्जेने संपूर्ण विश्व भरलेले आहे. या ऊर्जेमुळेच या विश्वात चैतन्य भरलेले आहे. हे चैतन्य जसे ब्रह्मांडी आहे, तसेच ते पिंडी आहे. शरीरात मन कुठे आहे, हे सांगता येत नाही... आत्मा दाखवता येत नाही. तरीही शरीरातील चैतन्य संपले की, शरीर अचेतन होते. निघून जाणारी ही ऊर्जा म्हणजेच जर आत्मा असेल; तर परमात्मा म्हणजेसुद्धा हेच ते विश्वातील चैतन्य असावे.
          तुमच्या भावभावना, विचारांच्याही काही लहरी, तरंग किंवा तत्सम रूपातील काहीएक स्वरूप असेलच ना! तुमचे मूर्त शरीर आणि अमूर्त भावना यांच्यात काही ताळमेळ असेलच ना! मूर्त शरीराला आरंभ आणि अंत आहे. पण त्या अमूर्त ऊर्जेचे काय? ती कुठे जात असेल? भूतकाळातील घटना आठवणींच्या रूपात वर्तमानात डोकावत राहतात. पण काळाचे हे अवशेष केवळ आठवणींपुरतेच असतील, असे कसे म्हणता येईल? ही ऊर्जा धनात्मक असते; तशी ऋणात्मकही असते. भूतकाळात घडून गेलेल्या आहेत म्हणूनच कदाचित त्याला भूत म्हटले असावे. आपण मात्र आपल्या कल्पनेने त्याला वेगवेगळी रूपे दिली. शेवटी हे सारे मनाचेच खेळ. मी भूताखेतांचे स्पष्टीकरण देतोय, अशातला भाग नाही. पण त्याशिवायही अशा कितीतरी गोष्टी आहेत; ज्या आपल्याला नेणीवेतून नाही, तर जाणिवेतून कळतात. आपल्या मनाच्या पटलावर कुठल्यातरी अनामिक प्रोजेक्टरमधून काही प्रकाशित होत राहते. अशाच काही प्रकाश सावल्यांमधून आपण हवा तसा चित्रपट पाहतो. अर्थात असे मला आपले वाटते. असेच असेल असेही नाही. शेवटी हाही तर्कच... अंदाज पंचे दागवदर्शे.

"माई, तुम्ही कधी भूत पाहिलेय का हो?"
        मला माहीत होते की, हा प्रश्न ऐकून माई माझ्याकडे असे काही पाहतील की, जणू त्या खरंच भूत पाहत आहेत.
"हो...!"
आता विस्मयाने पाहण्याची पाळी माझी होती. अशा काही उत्तराची मलाच अपेक्षा नव्हती. त्यामुळे भूत पाहिल्यासारखा मीच माईकडे पाहू लागलो.
"काय म्हणालात?"
"तेच, जे तुम्ही ऐकलेत."
"यू मीन... म्हणजे तुम्ही खरंच भूत पाहिलंत? माय गॉड... विश्वास नाही बसत. खरंच सांगताय ना? केंव्हा? कुठे?"
माई शांतपणे माझ्याकडे पाहत राहिल्या.
"हे काय माझ्या समोर आहे. मला तरी वाटते की, यापेक्षा वेगळे भूत या जगात असूच शकत नाही."
"ओहो! हे होय? मग ठीक आहे. मला वाटलं..."
"काय वाटलं? आणि हा काय भलताच प्रश्न?"
"तो असाच. गंमत वाटली म्हणून सहजच विचारले. जाऊ द्या. सोडून द्या तो विषय."
माई हसल्या.

          या उन्हाळा सुट्टीत शब्बूआपाचे लग्न झाले. ती तिच्या सासरी गेली. मी मोठ्या मामासोबत गेलो होतो तिच्या लग्नाला. मला आपले उगीचच काहीतरी हरवल्यासारखे वाटत राहिले. जे वाटत राहिले; त्यासाठी 'एक्स' मानून त्याचे उत्तर सापडेल का?
         सातवीमध्ये गेलो आणि सोनारगुरुजींची बदली झाली. ते जाणार याचे दुःख असले; तरी ते आता नवीन शाळेत मुख्याध्यापक म्हणून जाणार होते. त्यांना निरोप देताना प्रत्येक विद्यार्थी भावनाविवश झाला होता. डोळ्यांतून आसवांचे महापूर वाहत होते. विद्यार्थीच काय पण जाताना गुरुजींनाही त्यांच्या भावनांना बांध घालणे जमले नाही. त्यांचेही डोळे डबडबले होते. विभागावरील स्पर्धेसाठी आम्हांला पुण्याला जायचे होते; पण सोनारगुरुजी गेल्यावर हौसेने ही जबाबदारी घ्यायला कोणतेच शिक्षक तयार नव्हते. शेवटी पुणे दौरा ढेपाळला. आमच्या नाटकाचा हा अंक संपला होता. नवीन अंक येथूनच सुरू होणार होता.
          सोनारगुरुजी गेले आणि पवारगुरुजी आले. चौथीत स्कॉलरशिप परीक्षेमुळे या अभ्यासाची गोडी लागली होतीच. यशाची झलकही दुरून का होईना पाहिली होती. सातवीत पुन्हा नव्याने स्कॉलरशिपची तयारी सुरू झाली. यावेळी अभ्यास खूप अवघड होता. पण एक चांगले झाले होते. नवीन आलेल्या पवारगुरुजींमुळे अंकगणित व भौमितिक रचनांची मला गंमत वाटू लागली. त्रिकोण, चौकोन, वर्तुळ, क्षेत्रफळ, घनफळ असले एकेक नवीनच प्रकार होते. लसावि, मसावि, काळ काम वेग, संख्यारेषा असल्या अंकगणितातल्या भन्नाट गमती आणि त्यातही गुरुजी उत्तर काढण्यासाठी 'एक्स' मानून तिरकस गुणाकार करायचे त्याची गंमत वाटू लागली. मी माझ्या अनेक प्रश्नांसाठी असा 'एक्स' मानू लागलो. माझ्या परीने उत्तरे मिळविण्यासाठी धडपडू लागलो. हा वेडेपणा असेलही. पण त्यातही मजा होती. जगण्यासाठी मला कायम वेगवेगळे खाद्य हवे असायचे... ते या वेडेपणातून मिळायचे. जुने प्रश्न सुटो अथवा न सुटो. मी नव्या प्रश्नांच्या शोधात भटकू लागलो.
          स्कॉलरशिप परीक्षेच्या अभ्यासात मन रमण्याचे हेही कारण असावे. पवार गुरुजींनी एक चांगले केले होते, लेखनापेक्षा प्रश्न सोडवण्यावर भर दिला होता. तुम्ही जेवढ्या जास्त शंका घेऊन विचारण्यासाठी याल, तेवढा तुमचा अभ्यास जास्त झाला, असे सूत्रच मांडले होते. लिखाणाची नाहीतरी मला नावडच होती. मी हुरूपाने अभ्यासाला लागलो. यावर्षी मी स्पर्धांमधून जास्त सहभाग घेतलाच नाही. तरीही एक संधी मिळालीच. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने त्यांचा एक कार्यकर्ता शाळेत आला होता. त्यांनी आम्हांला जादूचे प्रयोग करून दाखवले. हा केवळ करमणुकीचा कार्यक्रम नव्हता. प्रत्येकवेळी त्यामागील शास्त्रीय कारण व हातचलाखी कशी केले जाते, हे समजावून सांगितले. त्या आलेल्या पाहुण्यांना हाताखाली मदतीसाठी एक विद्यार्थी हवा होता. मुख्याध्यापक गुरुजींनी थेट वर्गातून मलाच बोलावून घेतले. त्यामुळे जवळून हे सगळे पाहता व अनुभवता आले. अंगात येणे हे ढोंग आहे, असे त्यांनी सांगितले. ज्याच्या अंगात आलेय, त्याला टाचणी टोचवा. अंगातील देव पळून जाईल. अशीही गंमत करायला सांगितले होते. यामुळे तर मी आणखीन नवनवीन प्रश्नांच्या शोधात गुरफटू लागलो.
          पाहता पाहता दिवाळी आली. माधवमामा गोव्यातील काम संपवून परत आला होता. यानंतर तो आता पुण्यात राहणार होता. पण सध्यातरी चांगले पंधरा दिवस गावी राहण्याच्या तयारीनेच तो आला होता.
          या ऊरुसाच्यावेळी शब्बूआपा आणि तिचा नवराही आले होते. शब्बूआपा आवर्जून सगळ्यांना भेटायला घरी आली होती. ती चक्क काळ्या रंगाचा बुरखा नेसून आली होती. आता तिच्यात बदल झाला होता. ती आता चांगलीच गोरीगोमटी आणि गरगरीत दिसू लागली होती. मोठीमामी तिला म्हणालीही,
"लगीन चांगलंच मानवल्यावनी दिसतंय, शब्बू."
शब्बूआपा फक्त हसली. नेमका त्याचवेळी माधवमामा घरी आला होता. आपा त्याच्याशीही अगदी हसून बोलली. मामाकडे पाहून मामीला म्हणालीही,
"यांच्या शादीची काय तयारी झाली का नाही? का हमारे उधर पाहायची एखादी?"
मामा उगीचच कावराबावरा झाला. सगळे हसून बोलत होते. मला मात्र सगळ्यांचा विनाकारण राग येत होता. जाताना ती मला तिच्या घरी चल म्हणाली. मी मनातून धूसफुसतच होतो. तरीही ती मला हाताला धरून तिच्या घरी घेऊन गेलीच. खरं म्हणजे मला शब्बूआपाच्या नवर्‍याला पाहायचे होते. तोही चांगला गोरागोमटा होता. सिनेमातल्या हिरोसारखा त्याने मधून भांग पाडलेला होता. मानेवर केस वाढवलेले होते. तो माझ्याशी हसून बोलला; तरीही तो मला आवडला नाही. मी लगेचच घरी निघून आलो.
          पहिली सहामाही होईपर्यंत मी अभ्यासात चांगलीच गती घेतली होती. तरीही वर्गातील पाच-सहाजण कायम स्पर्धेत होते. यामध्ये मुलीही होत्या. काही झाले तरी मुलींना आपल्या पुढे जाऊ द्यायचे नाही, हा मुलांचा हट्ट होता. तरीही मुलांच्या पुढे जाण्यासाठी मुली जिद्दीने धडपडत होत्या. वर्गातील अभ्यासाकडे कोणाचेही लक्ष नव्हते. सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त स्कॉलरशिपचाच अभ्यास चालला होता. शाळा सुटल्यावरही पटकन घरी जाऊन यायचे. रात्री साडेआठ वाजेपर्यंत पुन्हा शाळेतच अभ्यासाला थांबायचे. पवार गुरुजींची अचानक चक्कर असायची. अभ्यास सोडून टिवल्याबावल्या चाललेल्या दिसल्या की, 'का रे फोकणीच्या!' अशी हाक आणि जोडीला पाठीवरून शाबासकीची थाप पडायची. अभ्यासिकेला थांबलेच पाहिजे असे बंधन नसे. त्यामुळे ज्याला अभ्यासच करायचाय, अशीच मुले थांबत. काही जुने विद्यार्थीही अभ्यासाला यायचे. एकूणच मग इमानदारीत अभ्यास चालायचा.
            फेब्रुवारी महिना उजाडला. अशाच एका रविवारी परीक्षेसाठी आम्ही तालुक्याच्या गावी बार्शीला गेलो. आतापर्यंत स्पर्धांच्या निमित्ताने अनेकदा बार्शीला येणेजाणे झाले असल्यामुळे बार्शी नवीन राहिले नव्हते. परीक्षाकेंद्रावर पोहचल्यावर आम्ही अगोदर जाऊन आपापले बैठक क्रमांक कोणत्या वर्गात आले आहेत? त्यातही कोणत्या ओळीत? मागे कि पुढे? बाक व्यवस्थित आहेत का? खिडकीजवळ आहे का? आपल्या खोलीत मित्रांपैकी कोण कोण आलेय? अशी काळजीपूर्वक तपासणी केली. मग समाधानाने सामुहिक भोजनाचा कार्यक्रम पार पाडला. दिवसभरात तीन पेपर होते. पहिला मराठीचा असल्यामुळे सर्वांनाच सोपा गेला. त्यामुळे सगळेच खुशीत. मधल्या ब्रेकमध्ये बाहेरच्या गाडीवर नुसती झुंबड उडाली. परंतु दुसरा नेमका गणिताचा पेपर होता. पेपर देऊन बाहेर येताना प्रत्येकाचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. यावेळी मात्र सगळेच गुपचूप झाडाखाली बसून राहिले. प्रत्येकालाच पेपर अवघड गेला होता. मला तर वेळच पुरला नाही. तरी बरे सगळे सोपे प्रश्न अगोदरच सोडवले होते.
           तिसरा बुद्धिमत्ता चाचणीचा पेपर होता. माझा सगळ्यात आवडता विषय. पण पेपर सुरू होण्याची वेळ झाली आणि कोणीतरी एकजण पालक किंवा शिक्षक असावेत, ते आमच्या पर्यवेक्षकांना भेटून काहीतरी कानाफूसी करून गेले. जाताना कोपऱ्यातल्या एका मुलाकडे बोट दाखवून गेले. काहीतरी पाणी मुरत होते. पेपर सुरू झाला तरी माझे सगळे लक्ष पर्यवेक्षकाकडेच. शासनाने पर्यवेक्षण करण्यासाठी त्यांना नेमले होते आणि मी बिनपगारी फूल अधिकारी बनून त्यांच्यावरच लक्ष ठेवून बसलो होतो. ते मात्र शांतपणे आपले काम करत बसले होते. जवळजवळ वीस मिनिटांनी त्यांचे काम उरकल्यावर ते वर्गात फिरत फिरत त्या कोपऱ्यातल्या बाकाजवळ गेले. मी सावध झालो. माझा पेपर सोडवायचे राहिले बाजूला. आता काय घडतेय, इकडे माझे लक्ष लागले. माझा संशय खरा ठरला. एक कागदाचा तुकडा ज्यावर त्यांनी उत्तरे काढलेली होती, त्यांनी त्या मुलाच्या पेपरवर ठेवला आणि जसे काही घडलेच नाही, अशा अविर्भावात पुढे सरकले. मी मोठ्याने ओरडलो.
"ओ सर, तो कागद उचला अगोदर. नाहीतर आमच्या गुरुजींनाच बोलीवतो."
          मला काय झाले होते कोण जाणे! मी खूप मोठे धाडस केले होते. आजपर्यंत शिक्षक विद्यार्थ्यांवर ओरडायचे. पहिल्यांदाच विद्यार्थी शिक्षकावर ओरडत होता. त्या सरांनाही हे अनपेक्षित असावे. तेही गडबडले. पटकन मागे जाऊन त्यांनी कागद उचलला आणि खिडकीतून बाहेर फेकून दिला. माझ्याकडे डोळे मोठे करून पाहत होते. मी मोठा शहाणपणा केलेला होता. आता राहिलेल्या वेळात मला माझाही पेपर पूर्ण करायचा होता. त्यामुळे त्यांच्या मोठ्या डोळ्यांकडे कशाला पाहत बसतोय. भरभर प्रश्न सोडवत राहिलो. अर्थात आवडीचा विषय असल्यामुळे पेपर पूर्ण झालाही. आता काय प्रकाश पडणार ते निकाल लागल्यावरच कळणार होते. पेपर झाल्यावर मी गुरुजींना भेटून घडलेला प्रसंग सांगितला. त्यांनाही माझ्या या उद्योगाचे कौतुक वाटण्याऐवजी गंमतच वाटली असेल.
          स्कॉलरशिपची परीक्षा झाल्यावर आता वर्गातील अभ्यासाकडे लक्ष द्यायला हवे होते. मार्च महिन्यात सकाळची शाळा आणि दुपारी सुट्टी असे. मी माझ्यापुरते नियोजन बनवून टाकले होते. शाळेतून आले की, जेवण करायचे आणि एक छोटी सतरंजी आणि अभ्यासाचे साहित्य घेऊन बाहेर पडायचे. पिंपळेश्वराचे मंदिर संगमावर होते. तिथे जवळच नदीवर एक छोटासा बंधारा बांधलेला होता. नदीला लागूनच करंज्याची झाडे होती. एक भले मोठे चिंचेचे झाड होते. तिथल्या गर्द सावलीत आमचा तळ पडे. अभ्यासासाठी चांगली निवांत जागा होती. दुपारच्या ऊन्हाच्या वेळीही चांगली सावली पडायची. कधीकधी तिथेही झोपायला म्हातारी माणसे यायची. ऊन्हे उतरली की, मग मी बंधार्‍याच्या सावलीत खडकावर पाण्यात पाय सोडून बसायचो. खूप गंमत वाटायची अभ्यास करताना. छोट्याशा चिंगळ्या पायाला गुदगुल्या करायच्या. त्यांना काहीतरी खायला मिळेल या आशेने पायाला चिकटायच्या. कधी इथे तर कधी तिथे असा अभ्यास चाललेला होता.
          माझे वेळापत्रक चांगले चालले होते. परीक्षेपूर्वी ताजा ताजा अभ्यास होत होता. पण कधीकधी बाकीचे गडीही अभ्यासाला यायचे. मग अभ्यास सोडून बाकीचेच उद्योग चालू व्हायचे. दिवसभर नुसता हैदोस होत राहायचा. मग मला दुसरी जागा शोधणे गरजेचे बनले. नदीच्या वरच्या अंगाला बामणाचा मळा होता. तिथेच बामणाची मोसंबीची लिंबोणीची बाग होती. राखणीची कुत्री फार तिखट होती. तिकडे कोणालाही फिरकू द्यायची नाहीत. बामणही फार फाटक्या तोंडाचा होता. पोरं जाम टरकून असायची. एके दिवशी असाच बंधार्‍यावर अभ्यास करत बसलो असताना बामणाचा गणू आला. वयाने वाढूनही भोळसट राहिलेला बामणाचा हा पोरगा माझ्यापेक्षा वयाने खूप मोठा होता. वसतीला तो मळ्यातच असायचा. लग्नाचा विषय काढला की, गणोबा भलतेच खूश होत. तशी तर बर्‍याच वेळा जातायेता आमची भेट व्हायची. मला चांगली संधी मिळाली. मी गणासोबतच बोलतबोलत मळ्यात गेलो. लिंबोणीच्या बागेत झाडाच्या पोटाशी गर्द सावलीत गपगार वाटू लागले. मी शांतपणे पडून वाचत राहिलो.
          जरा वेळाने बामण आल्यावर त्यांनी विचारले,
"कोण आहे रे तिथे?"
पण माझ्याअगोदरच गणोबाने माझी बाजू सावरून नेली.
"कोणी नाही, दादा. मीच चल म्हटले त्याला बागेत अभ्यासाला. मला वसतीवर तेवढीच सोबत."
नाहीतरी बंधार्‍यावर अभ्यास करताना अनेकदा त्यांनीही मला पाहिलेले होतेच. बसतोय ना शांतपणे अभ्यास करत, मग बसू द्या. उलट पोरालाही वसतीवर सोबतच होते. म्हणून मग तेही दुर्लक्ष करू लागले. अभ्यासाला जागाच अशी भारी सापडली होती की, बस्! पुढे अनेक वर्षे मी याच ठिकाणी अभ्यासाला येत राहिलो. गणोबा त्याचे काम करत राहायचा. मी काही झाडाच्या पोटातून बाहेर पडायचे नाव घेत नसे. सायंकाळी ऊन्हे पिवळी तांबडी होऊ लागली की, बागेतून बाहेर पडायचो. विहिरीवर पांढऱ्या चाफ्याचे झाड होते, त्याला टेकून धावेवरच्या दगडी कठड्यावर बसायचो. मावळतीचे पिवळे ऊन, विहिरीचा दगडी कठडा आणि पाने कमीच पण पांढऱ्या फुलांनी भरून गेलेले चाफ्याचे ते वेडेवाकडे झाड... असे ते चित्र आजही मी विसरू शकत नाही. परीक्षा संपल्यानंतरही मी मळ्यात जात राहिलो. गोष्टींची पुस्तके वाचली. दुपारची छान झोप काढली. पण ऊन्हाचे ते दिवस आणि बामणाचा मळा यांचे एक अतूट नाते तयार झाले होते. उन्हाळा सुरू झाला की, आजही मला बामणाचा मळाच डोळ्यासमोर दिसतो.

(क्रमशः)

Wednesday, 1 June 2016

१६...

          काचेच्या लोलकातून प्रकाशाचा एक कवडसा जातो खरा; परंतु बाहेर पडताना मात्र सप्तरंगाच्या छटा घेऊनच बाहेर पडतो. या छटा लोलक त्याला देत नाही. त्या त्याच्याच अंतरंगात सामावलेल्या असतात. लोलक फक्त त्याला त्याच्या आत लपलेले जे आहे, त्याचा साक्षात्कार घडवतो. मी तरी काय आहे? एक साधा प्रकाशाचा कवडसाच. राममंदिराच्या प्रकरणामुळे मला पहिल्यांदाच धर्माची जाणीव झाली... तर भूकंपाने निसर्गाच्या प्रलयंकारी शक्तीचे दर्शन घडवले... शब्बूआपा असो कि सुजितची मम्मी, कुठेतरी त्यांनी मला अंतर्मुख व्हायला भाग पाडून माझे अंतरंग ढवळून काढले... बालनाट्य स्पर्धेमुळे माझ्यातील असलेला कलेचा एक अंकुर तरारून वर आला... माई, वेणू, माधवमामा, गुरुजी, बल्लू, ओमी, सुजित प्रत्येकजण लोलक बनून माझ्यासारख्या एका कवडशाला त्याच्यातील सप्तरंगांची जाणीव करून देत राहिले. या काळात माझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती... घडणारी प्रत्येक घटना माझ्यासाठी लोलकाचीच भूमिका वठवत होते. मी माझ्याही नकळत आधिकाधिक अंतर्मुख होत होतो. माझी भूक खादाड बनली होती. येईल तो अनुभव मी पचवत होतो. स्वतःभोवती एकेक धागा विणत होतो. कोशात शिरण्यापूर्वी जे जे घडायला हवे, ते सारे घडत होते. नियतीच ते सारे घडवून आणत होती. या बाबतीतही मी भाग्यवान होतो.
          तुमचा अमानवी गोष्टींवर विश्वास आहे का? उत्तर देण्याऐवजी उलटून हाच प्रश्न तुम्ही मला विचारू शकत नाही. कारण याचे उत्तर मलाच नीट माहीत नाही. सांगायचा प्रयत्न केला; तरी ते तर्कसंगत असेलच, असेही नाही. आपण समजतो तशा भूत, पिशाच्च, भटकते आत्मे, अघोरी शक्ती, इत्यादी वगैरे गोष्टी मला फक्त सुरस कथांमधूनच ऐकायला चांगल्या वाटतात. पण वास्तवामध्ये तार्किक बुद्धी यावर विश्वास ठेवायला तयार होत नाही. बरं विश्वास का ठेवावा? यामागे पटण्यासारखे काही लॉजिक तर हवे ना! पण एक गोष्ट आहे... भीती. तो सिग्मंड फ्रॉईड का कोण तो, त्याच्याही मते मानवाच्या सर्व भावनांच्या मुळाशी भीती असते म्हणे. लहानपणी तसे सगळेच कशाला ना कशाला भीत असतात. पण मोठ्या माणसांनाही कसली ना कसली भीती असतेच जणू. युगानुयुगे माणूस घाबरत आला आहे म्हणजे त्याला भीती वाटावी असे काही असेलच ना? भले आपण समजतो तशा गोष्टी नसतीलही. काही गोष्टींमागे वेगवेगळी नैसर्गिक, शास्त्रीय कारणे असतीलही. तरीही कुठेतरी असे वाटत राहते की, असेही काहीतरी नक्कीच असायला हवे; जे आपल्या आकलनाच्या पलीकडे आहे. दृष्टी, ध्वनी, रस, गंध, स्पर्श याच्याही पुढे जाऊन जाणीव नावाचा काही प्रकार असावा. म्हणालो ना, तुम्हांला पटणार नाही कदाचित.
          माधवमामाने मला पिराच्या विहिरीत पोहायला शिकवले होते. पण मामा नसताना मी विहिरीवर कधीच गेलो नाही. त्याऐवजी मी बाकीच्या पोरांसोबत डोहावर पोहायला जाऊ लागलो. त्याच डोहावर वरच्या बाजूला खडकावर काही ठिकाणी शेंदूर थापलेला होता. या आसरा होत्या म्हणे. सगळे या डोहाला साती आसरांचा डोह म्हणत. एक म्हसोबाही त्यांच्यामध्ये होता. वर्षानुवर्षे ते सगळे तिथेच होते. म्हातारी माणसं यांच्याविषयी बरेच काहीबाही सांगत. आसरा म्हणजे पाण्यातल्या अप्सराच. पण जेवढ्या देखण्या; तितक्याच भयानक. दुपारच्या निर्मनुष्य वेळी सूर्य ऐन माथ्यावर आला की, यांची जलक्रीडा सुरू होते. अशावेळी जर कोणी त्यांच्या तावडीत सापडला; तर त्या त्याला आपल्या मेळात घेतात. त्याला पाण्याखाली आपल्या राज्यात घेऊन जातात. जोपर्यंत तो त्यांच्या अंकित राहतो; तोपर्यंत तो स्वर्गीय सुखात राहतो. पण तो त्यांच्या हाताला लागत नसेल; तर तो कामातून गेलाच म्हणून समजा. अशा काही विलक्षण दंतकथा ऐकायला मिळत. त्यामुळे एकप्रकारची भीती मनात जागी होत असली; तरीही वेगळेच कुतूहलही मनात तयार होत होते.
          सकाळी स्वच्छ नितळ दिसणारे डोहाचे पाणी ऊन्हे कलू लागली की, गोठलेल्या मधासारखे दिसायला लागे. सकाळच्या उन्हात तळाचा तांबडा खडकसुद्धा दिसायचा. याच्या उलट सायंकाळी हा डोह एखाद्या कृष्णविवरासारखा दिसायचा. असे वाटायचे की, याच्यातून आत जाणारा पलीकडे कुठेतरी दुसऱ्याच विश्वात निघत असावा. मला कधीतरी एकदा त्या डोहाच्या गर्दकाळोख्या पाण्याखालील अद्भूत जगात जायचे होते. आतापर्यंत चंपक, चांदोबासारख्या कॉमिक्स पुस्तकातून पर्‍या, राक्षस, चेटकिनी, चमत्कार वाचलेले होते. त्यामुळे वाटायचे की, आपणही सिंदबाद, हातिमताई यांच्यासारखे वेडे धाडस करायला हवे. त्याशिवाय हे अद्भूत जग पाहायला कसे मिळणार? पण अडचण एकच होती, मला तेवढे चांगले पोहता येत नव्हते आणि एकट्याने जाण्यापेक्षा एखादा सोबती मिळायला हवा होता. बल्लूला ही कल्पना सांगितल्यावर तो माझ्याकडे असा काही पाहत राहिला की, पुन्हा त्याला विचारण्याचे माझेच धाडस झाले नाही. आणि... तसेही एकट्याने जाणे मलाही शक्य नव्हते. 
          रामोशाचा एक तरणाबांड पोरगा होता. अंबादास. तो तालीम करायचा. तो असाच कुणाच्याही सांगण्याला न जुमानता भर दुपारचा पाण्यात उतरला. चांगला तासभर पोहत होता. एकटाच. खडकावर चढून मोठ्याने किलकारी मारायचा अन् पाण्यात उड्या मारायचा. अंग घुसळून पाणी ढवळून काढत होता. काही गुराखी दुरून कुरणातून त्याची मजा बघत होते. पोहायचे झाल्यावर चांगला तासभर पाण्यात बसून राहिला. त्याला काहीच झाले नाही. जसा आला; तसा निघूनही गेला. पुढे दररोज भर दुपारच्या वेळी तो पोहायला येऊ लागला. तासन् तास उघड्या अंगाने खडकावर बसून खूळ लागल्यासारखा नुसता पाण्याकडे पाहत राहायचा. तरीही काहीच झाले नाही. पण त्याने तालीम सोडली. व्यायाम सोडला. अगोदर कुस्त्याच्या निमित्ताने तो सार्‍या मुलखात फिरायचा, तेही बंद झाले. पुढील सहा महिण्यात तर तो पार खंगून गेला होता. शेवटी शेवटी तर चालताना पाऊल टाकणेही त्याच्या जिवावर येई. धाप लागू लागली... कण्हू लागला... विव्हळू लागला. चरकातून काढलेल्या चिपाडासारखा तो वाळून गेला होता. शेवटी त्याच डोहात त्याने शेवटचा श्वास घेतला. त्याचे हे असे गायब झालेले कोणालाच कळले नाही. तो पाण्यात बुडाला आहे हे माहीत नसल्यामुळे सर्वत्र त्याचा शोध घेतला. कुठेच सापडला नाही. तिसर्‍याच दिवशी तो फुगून वर आल्यावर लोकांना कळले. मग मात्र बरेच दिवस कोणीही डोहाकडे फिरकले नाही. विशेषतः अमावस्या-पौर्णिमेला भर दुपारच्या ऊन्हात कोणीच डोहात उतरायचे नाही. अगदी जनावरे राखणारे गुराखीही पलीकडे कुरणातच थांबत. माणसं सोडा, पण म्हशीही कधी यावेळी डोहात उतरलेल्या मी पाहिल्या नाहीत. 
          अधूनमधून कधीतरी कोणी ना कोणी तिथे पूजा करताना आढळून येई. अमावस्या-पौर्णिमेला नारळ फोडले जात. पण कधी कधी कोंबडेही असायचे. सटी सहामाहीला पाण्यात परडी सोडण्याचा विधीही असायचा. नव्या टोपलीत सात पोळ्यांचे नैवेद्य, सात चोळीखण, सात चुडे, सात वेण्या, सात आरसे, फण्या, कुंकवाचे करंडे, सर्व प्रकारची सात सात खेळणी असे भरगच्च टोपली भरून पाण्यात सोडले जाई. सात सवाष्णी जेवू घातल्या जात. म्हसोबाला कोंबडा असे. गंमत म्हणजे या सर्व नैवेद्याचा मान कोणा ब्राह्मणाला नसे. महारमांग येथे मानकरी असायचे. अशाच कोणाच्या तरी कार्यक्रमाला सवाष्ण म्हणून आबईला बोलावले होते. तिथे बसल्या जागीच ती झुलू लागली. आबई आता झाड बनली होती. माणूस आणि अमानवी शक्तींमध्ये संवादासाठी माध्यमाची गरज असते. अशा माध्यमाला खेड्यातील भाषेत 'झाड' म्हणतात. होय! पुढे या आसरा तिच्या अंगात येऊन संवाद साधणार होत्या.
          आबईने अनेक दुःखे... अनेक भावना मनातच खोलवर दडपून टाकलेल्या होत्या. तिच्या या मानसिक तणावाचा परिणाम तिच्या आरोग्यावर दिसत होता. ती मोठ्यामामीसोबत शेतात जायची. घरातलीही बरीचशी कामे ओढवून घ्यायची. सतत कुठल्या ना कुठल्यातरी कामात स्वतःला गुरफटून घ्यायची. तरीही उरलेल्या वेळात ती कायम आजारी असायची. आता आपण परत कधीच सासरी जाऊ शकणार नाही, हे तिने फार मनाला लावून घेतले होते. याविषयी कोणी काही बोलतेय कि काय? याच धसक्याने ती कुणाशी काही बोलायचीही नाही. शंखात अंग चोरून घेणारी गोगलगाय बनून तिने आपल्या आणि जगाच्या मध्ये एक कवचाची न दिसणारी भिंत बनवलेली होती. पण तरीही या कवचात तिची घुसमट होत असावी. याचा परिणाम तिच्या अंगात येण्यामध्ये दिसून येऊ लागला. अशा अंगात येणाऱ्या अनेक बायका खेड्यातून आढळतील. नवरात्रात तर अशा अनेक झाडांना झुलताना आम्ही पाहायचो. आपल्या मागण्या मागून झाल्या की, ही झाडे हात पुढे करत. मग हातावर हळदीकुंकू, लिंबू, पेटलेला कापूर ठेवावा लागे. ते खाऊन झाले की, मग झाड शांत होई. अशा अनेक देवीदेवतांनी पिढ्यान् पिढ्या खेड्यापाड्यातून माणसांवर अधिराज्य गाजवलेले आहे.
          अंगात येण्याच्या प्रकारामुळे आबईचा एक फायदा मात्र झाला. बायकांमध्ये आबईला आदर मिळू लागला. गावातल्या जुन्या बायकांपैकी एक कलामावशी होती. ती या आसरांची भक्त. गावात आसरांची कुणाचीही पूजा असली; तरी तिथे कलामावशीशिवाय पानही हलत नसे. ती आता आबईची स्वयंघोषित गुरूबहीण झाली. दर अमावस्या-पौर्णिमेला आसरांची पूजा होऊन त्यांना नैवेद्य पोहचू लागला. मला या सगळ्या गोष्टींचे हसू यायचे. पण मोठी माणसं कमालीची श्रद्धाळू होती या बाबतीत. वर्षातून एकदा कुणाची ना कुणाची मोठी पूजा असायचीच. अशावेळी तिघीचौघींच्या तरी अंगात यायचेच. कुणी केस मोकळे सोडून नुसत्याच घुमायच्या. कुणी आळोखेपिळोखे देऊन नुसत्या दातओठ खायच्या. कुणीतरी बोलायच्या; पण भानावर नसायच्या. अशा झाडामध्ये येऊन देव काय हवे नको ते सांगायचे. काय कमीजास्त असेल ते मागायचे आणि प्रापंचिक अडचणी सोडवण्याचे आश्वासन देऊन शांत व्हायचे. केस मोकळे सुटलेले, कपाळावर मळवट भरलेला, ग्लानीमध्ये जाऊन घुमल्यासारखे बोलणे, दातओठ खाणे हा प्रकार फार असुरी वाटायचा. त्यामुळे अशा देवीदैवतांपासून मी चार हात लांबच राहिलो.
          मला एका गोष्टीची गंमतच वाटते, या देवीदेवतांच्या इच्छा मात्र सगळ्या मानवी होत्या. टाटाबिर्लाने शेजार्‍याला चुना मागावा, अशातला प्रकार झाला. एकदा कलामावशीच्या अंगात आल्यावर तिने सगळ्या गोष्टी ऐकणाराला पटतील अशा सांगितल्या. फक्त 'देवा काही इच्छा राहिलीय का?' असे विचारल्यावर 'डिंकलाडू खावासा वाटतो' असे उत्तर दिले. हे फारच अगम्य कोडे होते माझ्यासाठी.
          लहानपणी ऐकलेल्या सुरस कथांपैकी आणखी एक कथा म्हणजे वेताळ. विक्रमवेताळाच्या गोष्टीतील वेताळ मला फार असहाय्य वाटायचा. त्यामानाने सुताराच्या मेटापलीकडे बाभळीच्या सावलीत पारावर बसलेला वेताळ फार जबरा होता. शेजारीच मरीआईचे देऊळही होते. आषाढ महिण्यातच काय ती यांची आणि आमची गाठ पडे. मंगळवार वा शुक्रवार गाठून यांच्या पूजा होत. तांब्यात पाणी आणि कडूलिंबाची डहाळी घेऊन घरच्यांसोबत आम्ही जायचो. याही देवाला अधूनमधून अंडे, कोंबडा किंवा क्वचित बकरेही मिळायचे. इतरवेळी मात्र आम्ही या वेताळाकडे फिरकायचोही नाही. बैलगाडीच्या चाकापेक्षाही मोठ्या आकाराच्या शेंदूर फासलेल्या वेताळाचा उगीचच धाक वाटे. याने कुणाचे काही नुकसान कधीच केलेले नव्हते. तरीही याचा दरारा वाटायचा. वेताळ म्हणजे सर्व भूतांचा राजाच. गावाच्या चहूबाजूला असणाऱ्या सगळ्या भूतांवर याचा अंमल चालायचा.
          गावाच्या दक्षिणेस मेंढशिंग माळ पसरलेला आहे. या माळावर कुठेही उभे रहा. सलग असा भलामोठा परिसर नजरेच्या टप्प्यात येतो. माळाची सुरुवात फाटकीच्या तळ्यापासून होते आणि शेवट पंधरकीत. कमीतकमी चार मैलाचा टापू आहे हा सगळा. अमावस्येला याच माळावरून फाटकीच्या तळ्यापासून वेताळाची पालखी निघे. सगळी भूते यावेळी एकत्र जमतात म्हणे. दिवटीच्या उजेडात आपल्या या राजाची पालखी खांद्यावर घेऊन कुठेही न थांबता पंधरकीपर्यंत जातात. तिथून परत फाटकीपर्यंत आल्यापावली पळतच निघायचे. मग जेवणाच्या पंगती बसतात. माणसांना काय मिळेल, असे भारी भारी एकेक पदार्थ असतात यावेळी. गावातील काही अचाटवीर आपण या पंगतीत जेवून आल्याचे सांगतात. भूतांना कळणार नाही अशा बेताने गर्दीत मिसळून जायचे. हवे तर डोक्यावर घोंगड्याची खोळ घेतली की, चेहरा झाकून जातो. जेवायला बसल्यावर बोलायचे नाही. वाढणारालाही 'पुरे' म्हणायचे नाही. वाढणारे वाढतच राहतात. आपल्याला हवे तेवढे खायचे. ताटाला मध्यभागी भोक असते. नको असलेले ताटातून खाली टाकायचे. त्याची माती होऊन जाते. भूतांनी जर अशा आगंतुकाला ओळखले; तर मात्र घोळसून मारतात. पण जर तुम्ही धाडसी असलात आणि वेळ मारून नेलीत; तर तुम्हाला वेताळाशेजारीही रुबाबात बसता येते. अशा चविष्ट गप्पांची मैफिल शेकोटीभोवती, कट्ट्यावर बसले की, हमखास रंगायची. मला एकदातरी ही मिरवणूक पाहायची इच्छा होती. कधी रात्री अचानक जाग आली आणि त्यातही ती अमावस्येची रात्र असेल; तर माळाकडे पाहायचो. किमान माळावरून धावणारी पालखी नाही, निदान दिवट्यांचे उजेड तरी दिसतील, अशी आशा असायची. पण ती कधीही पूर्ण झाली नाही, हा भाग अलहिदा.
          सुताराचा नान्या मात्र गांज्याची तार चढली की, एखाद्या दोस्ताला बोलावे, तसा पारावर बसून वेताळाशी गप्पा मारत राही. वेताळाशी एकेरीवर बोलणारा नान्या म्हणजे काय? रामकटीसारखा उंचच उंच, छातीच्या बरगड्या तर एक ना एक मोजून घ्याव्यात. जरा काम केले की, छातीचा भाता सुरू व्हायचा. काय विशेष असेल कोणास ठाऊक. असा हा नान्या तांबारलेले डोळे वटारून हातवारे करत दातओठ खाऊनच वेताळाशी बोलायचा. त्याच तारेत बैलगाडीचे चाकसुद्धा सहज उचलायचा. पण हाच नान्या नशेत नसल्यावर मात्र चोरट्या नजरेने भिजलेल्या मांजरासारखा त्याच वेताळाकडे पाहायचा. कधीकाळी वेताळाच्या पंगतीला तो बसून आलाय, असे सगळे म्हणायचे.
          भूताखेताच्या गोष्टींना तर ऊत आलेला होता. कोणी भूताबरोबर कुस्ती केलेली होती. कोणाला भूताने तंबाखूच मागितली होती. कोणी हिरव्या साडीतली केस मोकळे सोडलेली हडळ बघितली होती. बहुतेक या असामींना माझ्यासारख्या यत्किंचित जिवामध्ये स्वारस्य वाटले नसावे. त्यामुळे माझ्या वाटेला ती कधीच आली नाहीत. मला स्वतःला मात्र याबाबतीत कसलाही वेगळा अनुभव आलेला नव्हता. भूतबाधा म्हणाल तर तशी एकदा झाली होती. एकदा शेतातून घरी येताना वाटेत एक काळे कुत्रे माझ्यामागे आले होते. आजपर्यंत त्याला मी कधीच पाहिलेले नव्हते. ते ओळखीचेही वाटत नव्हते. मी एकटाच असल्यामुळे नदीपर्यंत त्याने मला सोबत केली होती. काही ठरावीक अंतर ठेवून ते मागेपुढे चालत होते इतकेच. नदीपासून ते कुठे दिसेनासे झाले, ते मलाही कळले नाही. बस् त्या रात्री मला थंडी वाजून आली. अंगात ताप भरला. माईने चुलीतील राख अंगारा म्हणून लावली. मागच्या गल्लीत आंधळी सरूआत्या राहायची. ती सुपात धान्य घेऊन कुठली बाधा आहे, हे सांगायची. त्याप्रमाणे माईने काहीतरी 'देणे' भागवून शेताकडील वाटेवर नेऊन टाकले. सकाळी मी खडखडीत बरा. आता तो कुत्रा थोडा मोठा असल्यामुळे मी थोडासा घाबरलो होतो, हे खरे असले तरी यात भूताचा संबंध कुठे येतो? हे काही मला कळले नाही.
          यापेक्षा कधी काही विचित्र अनुभवाबद्दल म्हणाल, तर रात्री अचानक कधीतरी सगळे शांत असले की, सूर काढून कुत्री ओरडायला लागत. तेंव्हा कोणीतरी किंचाळल्याचा आवाज मी काहीवेळा ऐकलेला आहे. चालताना कधीतरी आपल्या पाठीमागून कोणीतरी येत आहे, असेही बर्‍याच वेळा वाटलेले आहे. काहीवेळा खूप दुरून आल्यासारखे येणारे भजनाचे आवाजही मी ऐकलेले आहेत. गंमत म्हणजे माईला विचारले की, तिला मात्र यातले काहीच माहीत नसायचे. एकदा तर दुपार टळून गेल्यावर तीनचार वाजता मी आणि बल्लू दोघेच डोहाच्या खालच्या बाजूला पोहत होतो. अगदी निवांत वातावरण होते. पोहून झाल्यावर डोहाच्या वरच्या बाजूने दगडी चौपाळीकडून घरी येण्यासाठी मार्ग पकडला. तिथे तेल्याचे म्हातारे सावलीत बसलेले होते. आम्हांला बघून त्याने आम्हांला विचारले,
"लईच गोंधूळ चालला व्हता रं..! दोघंच आलाय. बाकीची संमदी कुटं हायती."
"कोण बाकीचे? आम्ही दोघंच होतो."
"लईच लबाड हाय रं तुम्ही. चांगला सातआठदहा जणांचा कालवा हितवर ऐकू येत व्हता की."
काय बोलावे हे न कळल्यामुळे एकमेकांच्या तोंडाकडे बघत आम्ही तिथून निघून आलो होतो.


(क्रमशः)