Tuesday, 24 May 2016

१५...

          मनाला कुरतडणारे अनेक प्रश्न ठेवून सुजित गेला होता. प्रश्न केवळ एकट्या सुजितचा नव्हता. अशाप्रकारचे अनेक प्रश्न कधी प्रत्यक्ष... तर कधी अप्रत्यक्षपणे आयुष्याने माझ्यासमोर वारंवार उभे केले. काहींची उत्तरे मिळाली... काहींची उत्तरे मिळण्यासाठी मात्र काही काळ जावा लागला. कधी काळाबरोबर प्रश्न बदलत राहिले... तर कधी प्रश्न उभे करणारेही बदलत राहिले... काहीवेळा तर प्रश्नांची उत्तरेही बदलत राहिली. यामुळेच आयुष्याच्या दिशाही बदलत राहिल्या.
          माझ्या जीवनातील या पर्वात खूप काही घडून गेलेले आहे. आतापर्यंतचे पहिले दशक मी फार बाळबोध जीवन जगत आलो होतो. मी आणि माझा परिवार यापलीकडे असणाऱ्या भल्याबुर्‍या जगाची जाणीव मला आता कुठे होऊ लागली होती. दुनियादारीचे एकेक नवीन कंगोरे मला आता दिसू लागले होते. पाचवीत असतानाचीच गोष्ट आहे. या काही दिवसांत तोंड रंगवून राम, लक्ष्मण, सिता आणि मारुती बनून गाणी म्हणणारे चारदोन वेळा गावात येऊन गेले होते. सर्कसची मोठा पोंगा लावलेली, सजवलेली गाडी असते; तशी गाडीही येऊन गेली होती. रामाचे भलेमोठे चित्र त्या गाडीवर लावलेले होते. तिकडे दूर कोठेतरी दिल्लीकडे रामाचे अयोध्या नावाचे गाव आहे, हे मी ऐकलेले होते. असेच पूर्वी कधीतरी बाबर नावाच्या कुठल्यातरी माणसाने म्हणे, तेथील रामाचे मंदिर पाडून तिथे एक मशिद बांधलेली होती. कोण तो बाबर काळा कि गोरा पाहिलाही नव्हता. त्यावेळी तर माझा आपला असा समज झाला होता की, हा बाबर म्हणजे कोणीतरी रावणाचा वंशजच असावा. आपल्या पूर्वजांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठीच त्याने रामाच्या अयोध्येवर आक्रमण करून रामाचे मंदिर पाडले असावे.
          आता तर म्हणे, काही लोक ती मशिद पाडून पुन्हा त्या जागेवर मंदिर बांधणार होते. त्यासाठी गावोगाव फिरून हे लोक इतर सर्व लोकांना 'चलो अयोध्या!' म्हणून आवाहन करत होते. आम्हांला काही एवढ्या दूर जाणे शक्य नव्हते. म्हणून मग आम्ही त्या गाडीच्याच मागे गावभर पळत 'मंदिर वहीं बनायेंगे' असे ओरडत फिरत आपली हौस भागवून घेतली होती. पण तसे तर मला आपले मनातून कुठेतरी असे वाटायचे की, एवढ्या लांब ते मंदिर बांधायला जाण्यापेक्षा येथेच गावात कुठेही मंदिर बांधले; तर बरे होईल की. निदान आम्हांला सगळ्यांना पाहायला तरी मिळेल. पण आमचे लहान पोरांचे कोण ऐकणार? मग शेवटी मीच आपला माझ्यापुरता निर्णय घेऊन टाकला.
          दिवाळीच्या सुट्या लागल्यापासून माझ्या सुपीक डोक्यातून एकेक कल्पना उगवू लागल्या होत्या. परसात मोकळी जागा बरीच होती. बल्लू मदतीला होताच. सुट्टीही भरपूर होती. दरवर्षी दिवाळीत आम्ही जिथे किल्ला बनवायचो; तिथेच आमचा हा नवीन उद्योग सुरू झाला. काडीपेटीएवढ्या आकाराच्या चिखलाच्या विटा बनवून लहान लहान चपटे दगड फोडून मंदिर बांधणीचे काम सुरू झाले. वेणूही मदतीला आली होती. पुरे दोन दिवस खपून मंदिर उभे राहिले. शेजारी छोटा तलाव व बगिचाही बनवून झाला. पोत्याचे तुकडे चिखलाने माखून त्यावर आळीव टाकून बाग बनवली होती. दररोज पूजा, चुरमुरे-फुटाण्याचा प्रसाद असा कार्यक्रम ठरलेला होता. गल्लीतील व वर्गातील बरेचजण यानिमित्ताने खेळायला येत होते. दिवाळीचा सण संपला आणि ऊरुस सुरू झाला. आजही मला आश्चर्य वाटते, तिकडे बाबरी मशिद व राममंदिरावरून वातावरण तापायला सुरुवात झाली असली, तरी गावात मात्र काहीही फरक पडलेला नव्हता. कोणीतरी एकाने दर्ग्यापुढच्या कडूनिंबाच्या झाडावर एक हिरव्या रंगाचा झेंडा लावलेला होता. त्यावर चंद्राची कोर व चांदणी होती. तर वेशीच्या भिंतीवर हातात धनुष्य घेतलेला राम आणि त्याखाली 'मंदिर वही बनायेंगे!' या लिहिलेल्या ओळी असलेला कटआऊट असूनही यावर्षीचा ऊरुस सालाबादप्रमाणेच व्यवस्थित पार पडला.
          आम्ही बर्‍याचजणांनी लवचिक काठ्यांचा वापर करून धनुष्ये व चिपाडाच्या सरकाळ्यांचे बाण बनवले होते. रंगीबेरंगी बेगडाचे कागद चिकटवून त्यांची सजावट केलेली. ऊरुसातूनही एकदोघांनी धनुष्यबाण विकत घेतलेले होतेच. खेळता खेळता रामलीलेची तयारी सुरू झाली. वह्यांच्या पुठ्याचे टोप बनवून चमकी कागद चिकटवून सजावट करण्यात आली. प्लास्टिकच्या मोठ्या चेंडूत काठी खुपसून मारुतीची गदा बनवण्यात आली होती. त्यालाही चमकी कागद चिकटवून सजवण्यात आले. ऊरसातूनही खेळणी घेताना आमच्या डोक्यात रामलीलाच होती. कोणी तांबड्या रंगाचे मारुतीचे मुखवटे घेतले होते. काहींनी फुग्याच्या गदा घेतल्या होत्या. तयारी जंगी झाली होती. आता एकच अडचण उरली होती... रावण. रावणाच्या दहा तोंडाचे काय करायचे? सुध्या याबाबतीत फार तयारीचा. त्याने कुठूनतरी लग्नात नवरदेवाला बांधतात ते बाशिंगच आणले. रंगीत कागदाचे दहा गोल कापून एका पट्टीवर चिकटवले आणि पट्टी बाशिंगाला. झाला रावण तयार.
          पोरांचा काहीतरी खेळ चाललाय, म्हणूनच सगळी मोठी माणसं आमच्याकडे सुरुवातीला पाहत होती. पण एकेक दिवस जाईल; तसतशी आमची तयारी बघून मग मात्र मोठ्यांचाही हुरूप वाढला होता. सगळे कौतुकाने पाहत होते. काही मदत हवी का? म्हणून आडून आडून विचारतही होते. पण मला हा खेळ आमचाच व्हायला हवा होता. म्हणून तयारीही आमची आम्हीच केली. सुट्टीच्या शेवटच्या दिवशी तर जंगी कार्यक्रमच आखलेला होता. गल्लीतच मिरवणूक काढायचे ठरलेले असतानाही शेजारच्या दोन तीन गल्ल्या फिरून आलो. शब्बूआपाच्या दारातून जाताना तर तिने दोन बोटांचा गोल करून 'छान जमलंय!' असे म्हणून कौतुकाने हसलीही होती. अर्थातच राम मी झालो होतो, बल्लू हनुमान बनला होता, वेणूशिवाय सिता दुसरे कोण बनणार? सुजित लक्ष्मण झाला होता आणि रावण सुध्या. मला भेटलेला हा 'रावण' पुढे माझा जिवाभावाचा दोस्त बनला. 
          या राममंदिराइतकाच आणखी एक कळीचा मुद्दा माझ्यासमोर उभा राहिला होता. साधारण दिवाळी सुट्टीनंतर माधवमामाला मी पत्र लिहिले होते. पहिल्यांदाच मी असे कोणाला तरी पत्र लिहित होतो. गुरुजींनी पत्रलेखन शिकवले; तेंव्हा गुरुजी म्हणाले होते, तुमच्या परगावी असणाऱ्या एखाद्या नातेवाईकाला आता असे पत्र तुम्ही लिहू शकता. परंतु हे पत्र लिहिण्यामागे केवळ एवढे एकच कारण नव्हते. खरं तर माधवमामाला मला काहीतरी वेगळेच सांगायचे होते. पण पत्रात ते सारे लिहिण्याचे माझे धाडस झाले नाही. तरीही तो दिवाळीत घरी आला होता तेंव्हा मी त्याला ते सांगण्याचा प्रयत्न केला होता.
"मामा, मी शब्बूआपाच्या घरी गेलो होतो."
"बरं मग?"
"ती सांगत होती."
"काय?"
"तिला पाहायला पाहुणे आले होते ऊरुसाच्यावेळी."
"हं...!"
"तिच्या घरचे आता तिचे लग्न करणार आहेत. आपल्या घरचे पण तुझे लग्न करायचे म्हणाले, तर तू नाही म्हणू नकोस."
तो फक्त हसला. मला म्हणाला, "गब्बरसिंग, वेडा आहेस काय तू? मला बोललास ते ठीक आहे. घरात कोणाला असे काही बोलू नकोस."
"मी कशाला कोणाला काय बोलतोय?" 
          माधवमामा आला होता; तेंव्हाच घरात त्याच्या लग्नाची तयारी चालली होती. परंतु माधवमामा मात्र 'आताच लग्न करायला नको' म्हणत होता. अजून काही महिने तरी त्याला गोव्यात राहावे लागणार होते. तिकडून आल्यावर पाहू, असे म्हणून तो लग्नाचे पुढे ढकलत होता. मला आपले उगीचच वाटत होते, माधवमामाने पटकन लग्न करावे... आणि शब्बूआपाच मामी बनून घरी यावी. मामाची सुट्टी संपल्यानंतर मामा निघून गेला. माझीही शाळा सुरू झाली. ध्यानीमनी नसतानाही अचानक एके दिवशी मोठेमामा माईला सांगत असताना मी ऐकले. शब्बूआपाचे लग्न ठरले होते. माझे स्वप्न संपले होते. म्हणूनच मी मोठ्या निराश मनाने माधवमामाला पत्र लिहिले. पत्रात बरंच काही लिहायचे होते. ते धाडस झाले नसले; तरी शब्बूआपाचे लग्न ठरले. एवढे एक वाक्य लिहिलेच. माझे पत्र पाहून मामा खूप खूष झाला होता. एवढ्या लहान वयात मी चांगले लिहिलेय, याचेच त्याला कौतुक होते. अॉफिसमध्येही त्याने त्याच्या साहेबांना पत्र दाखवले होते. मी फक्त पाचवीत शिकतोय, हे कळल्यावर साहेबांनाही कौतुक वाटले म्हणे.
           आम्ही राममंदिर बांधले, मिरवणूक काढली. खूप धमाल केली. पण राममंदिराचा प्रश्न एवढा भयाण असेल, असे कधीच वाटले नव्हते. महिनाभरातच रेडिओवरून, वर्तमानपत्रातून एका मागोमाग एक बातम्या येऊन धडकू लागल्या. अयोध्येतील बाबरी मशिद पाडण्यात आली होती. सगळीकडे गोंधळ उडाला होता. कालपर्यंत एकमेकांच्या गळ्यात गळे घालून फिरणारे लोक एकमेकांकडे संशयाने पाहू लागले. राम आणि रावणाच्या युद्धानेसुद्धा वातावरण ताणले नसेल; इतका हिंदू आणि मुस्लीम यांच्यात तणाव दिसू लागला. कायम कुठे ना कुठे दंगे झाल्याच्या चर्चा ऐकायला मिळत होत्या. अशातच मुंबईला बॉम्बस्फोट झाले आणि खूप मोठ्या प्रमाणात दंगली सुरू झाल्या. रोजच काही ना काही ऐकायला येऊ लागले. त्यातले काही कळत नसले; तरी कानावर पडणाऱ्या चर्चेला उधाण आले होते. कुठेही चार लोक बसलेले असले की, हमखास एवढा एकच विषय कानावर येत होता. आजपर्यंत गावात कधीच तणाव निर्माण झालेला नव्हता. तरीही गावातील मुसलमानांची माणसं धास्तावलेली दिसत होती. असुरक्षिततेच्या भावनेतून त्यांच्यात कमालीची एकी दिसू लागली. मुसलमानांची पोरं फक्त ईद, ऊरुसाच्या वेळी टोप्या घालायची, ती आता सर्रास टोप्या घालून फिरू लागली. दररोज मशिदीत जाऊ लागली. हिरवे साफे डोक्याला गुंडाळलेले व कोरीव दाढ्या ठेवलेली काही बाहेरची माणसंही बर्‍याचवेळा दर्ग्यात येऊन गेली. त्यांचे पाहून गावातील पोरांनीही दाढ्या ठेवायला सुरुवात केली. हे पाहून बिथरलेल्या काही हिंदू पोरांनी घराघरांवर, चौकाचौकांतल्या झाडांवर भगवे झेंडे लावले. या बदललेल्या वातावरणात माझे शब्बूआपाच्या घराकडे चक्कर मारण्याचेही धाडस झाले नाही. सगळे एकदम अनोळखी वाटू लागले.
          राममंदिरावरून झालेल्या गदारोळापेक्षा रामायण परवडले. रावण दुष्ट असेल, क्रूर असेल, अहंकारी असेल; पण त्याच्याकडे नीतिमत्ता होती. रावण बनने तरी कुठे सोपे आहे? रावणासारखा धार्मिक विद्वान पंडीत त्यावेळी दुसरा कुठे होता? पित्याच्या वचनासाठी वनवासाला जाणारा राम पुरुषोत्तम होता. बंधुप्रेमापोटी हसत हसत वनवास स्वीकारणारा लक्ष्मण आणि पतीच्या मागे सावलीसारखी जाणारी पतीपरायण सीता आपापल्या कर्तव्याचे पालन करण्यात पुरुषोत्तमच ठरले. पण रावण? आज स्वतःच्या घरातही सुरक्षित राहील याचीही खात्री देता येणार नाही, अशी स्त्री रावणासारख्या असुराच्या नगरात सुरक्षित होती. रावणाला मारून सीतेची सुटका हा रामाचा पराक्रम असेलही. पण ती सीता सुखरुप मिळाली, यातच रावणाचे मोठेपण होते. रावणामध्ये अहंकार होता; तसा पश्चात्तापही होता. सीतेला पळवून आणूनही तिच्या संमतीशिवाय जबरदस्तीने आपलेसे न करण्यात त्याचा संयम होता. रामा, तुझ्या काळातील रावण फार चांगला होता. आज दुर्योधन, दुःशासनालाही लाजवतील असे लोक पावलोपावली आढळतील. कित्येक द्रौपदींचे खुलेआम वस्त्रहरण होतेय. धर्म या शब्दाचा अर्थही न कळणारे धर्माच्या नावावर एकमेकांच्या रक्ताचे तहानलेले आहेत. मनाला सात्त्विक बनवणारी प्रार्थनास्थळे आज बाजार बनली आहेत. भक्तीचा बाजार मांडून स्वतःच्या पोटापाण्याचा व्यवसाय बनवणारे दलाल धर्मवेत्ते बनले आहेत. आज राम-रावणाच्या नावाने भांडणारे त्यांच्या पासंगालाही पुरणार नाहीत.
          हे सगळे वातावरण थंड होईपर्यंत गणपती आले. गणपतीच्या सोबत यावेळी पाऊसही होता. दहा दिवस गुलालाच्या जोडीने पावसाचीही उधळण चालली होती. गणरायाला निरोप देऊन मिरवणूकीत नाचून थकलेली माणसं घरी जाऊन पडली होतीच. झोपेने जरा कुठे स्वप्नांचे मोरपीस डोळ्यांवरून फिरवले होतेच. तेवढ्यात जमीन शहारली. घरावरील छत थरथरू लागले. फळीवरची भांडी गडबली. कोणीतरी हलवून जागे करावे तसे माणसं जागी झाली. काहीतरी घडतेय, हे कळेपर्यंत काहीजण बाहेर धावली, तर बाकीचे काय गोंधळ आहे, हे पाहायला बाहेर आले. मी माईजवळ झोपलो होतो. हा प्रकार सुरू झाल्यावर माई मला आपल्या कुशीत घट्ट धरून राहिली. लाईट गेल्यामुळे सगळीकडे अंधार पसरलेला होता. आबई चाचपडत जवळ आली. घरात भांडी पडल्याचा आवाज येत होता. मोठ्यामामाने हाका मारून सर्वांना बाहेर बोलावले. बाहेर येऊन पाहतो, तर सगळी गल्लीच बाहेर रस्त्यावर आलेली होती. घोळक्याने उभे राहून लोक आपापसात बोलत होते. मला एवढेच कळले, हा भूकंप होता. आतापर्यंत हा शब्दही कधी ऐकलेला नव्हता. दंगल असो कि भूकंप... सगळ्या भयानक गोष्टी कशा जुळून आल्यासारख्या घडत होत्या.
           सकाळपर्यंत पुन्हा कोणी झोपलेच नाही. त्यानंतरही दोनतीनवेळा जमीन थरथरत राहिली. सकाळच्या रेडिओवरील बातम्यातून कळले की, लातूरजवळील किल्लारी येथे या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. संपूर्ण गावच मातीच्या ढिगार्‍याखाली गाडले गेले होते. जवळपासच्या गावांचीही दुरावस्था यापेक्षा वेगळी नव्हती. यापूर्वी कोयनेलाही भूकंप झाला होता म्हणे; परंतु त्यावेळी एवढे नुकसान झालेले नव्हते. काळाने आपले खरे विकट रूप दाखवले होते. 
पहिल्यांदाच ऐकलेल्या 'भूकंप' या शब्दावर पुढील पंधरा दिवसांत पूर्ण ग्रंथ भरेल एवढे लोकांच्या चर्चेतून ऐकायला मिळत होते. लोकांना चर्चेला आता नवीन विषय मिळाला होता. लोकांची स्मरणशक्ती फार अल्पकालीन असते. भूकंपाचा विषय मिळाल्यावर मंदिर, मशिद, दंगल हे शब्द असे गायब झाले की, जसे कधी ते ऐकलेच नाहीत. दिवसभर गावगप्पांना ऊत आला होता; तर रात्री घरात झोपायला कोणीच तयार नसल्यामुळे अंगणातील चर्चांना उधाण आले होते.
          माई सांगत होती, ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर टेकलेली आहे. पापाचे ओझे वाढलेय. मधल्या झालेल्या दंगलीमुळे तर तो शेषनाग शहारला नसेल? किल्लारीसारखा सधन गाव एका क्षणात स्मशानभूमी बनला. कित्येकांना संजीवन समाधी मिळाली. लहानथोर असा भेदभाव मरणानेही केलाच नाही. बाळाच्या तोंडात पान्हा ठेवून आई गेलेली होती. आयुष्याच्या मावळतीला म्हातारीबी मेली होती. फार मोठा घाला नशिबाने घातलेला होता. पापणी लवेपर्यंत होत्याचे नव्हते करण्याचे सामर्थ्य फक्त निसर्गाकडेच. माणूस त्यापुढे फार क्षुद्र आहे. तरीही आपल्या क्षुद्रपणाचा कळस माणसातील हैवानांनी गाठला. मदतकार्याच्या निमित्ताने गेलेल्या काहीजणांनी मातीच्या ढिगार्‍याखाली अडकलेल्यांना वाचवण्याऐवजी कुठे पैसा दागिने सापडतोय का? याचा शोध सुरू केला. प्रेताच्या मांसासाठी उतरलेली गिधाडे आणि प्रेताच्या अंगावरच्या ऐवजासाठी टपलेली माणसं एकाच पातळीवर आले होते. पाषाणालाही पिळवटून टाकेल अशा हृदयद्रावक प्रसंगी पत्थरदिल माणसं पाहायला मिळत होती. परदेशातूनही मदतीचा ओघ चालूच होता. पण चाळणीच्या नियमाप्रमाणे सगळी मदत तिथपर्यंत पोहचलीच नाही. पुढील महिनाभर निर्वासित झालेली माणसं गावोगाव फिरून आसरा शोधत होती. त्यांच्या तोंडून आपबिती ऐकताना अंगावर काटा फुलत होता.
          दिवाळी आली; तरी माणसं अजून सावरलेली नव्हती. लावायचे म्हणून चार दिवे दारात जळत होते नि पोरासोरांसाठी म्हणून चारदोन गोडधोडाचे पदार्थ केलेले होते. ही दिवाळी काही गोड झाली नाही. गेल्यावेळी रामलीला होती. यावर्षी काही करावेसे वाटलेच नाही.

(क्रमशः)

Saturday, 14 May 2016

१४...

          पाचवीची नवीन पुस्तके हातात आली. नवीन एवढ्यासाठीच म्हणायचे, कारण ती पुढच्या वर्गातील होती. प्रत्यक्षात ती जुनीच होती. चौथीपर्यंत नवी करकरीत पुस्तके मिळाली होती. चौथीचा निकाल आणायला शाळेत गेलो; तेंव्हा पुढच्या वर्गातील एका मुलाने विचारले, "शेखर, पुस्तके घेतलीस का पाचवीची."
" आताच कशाला? शाळा सुरू झाल्यावर आणायची."
"माझी हायती बघ. पाहिजी आसतील तर चल घरी बघायला."
मी त्याच्या घरी जाऊन पुस्तके पाहिली. वर्षभर वापरूनही ही पुस्तके जुनी आहेत, असे वाटतच नव्हते. खूप चांगली ठेवली होती त्याने. नाहीतर आमच्या पुस्तकांच्या वर्ष संपेपर्यंत चिंध्या झालेल्या असायच्या. याने मात्र पहिले पान सोडले; तर कुठेही नावसुद्धा टाकलेले नव्हते. कुठे बाईला मिशा काढ. कुठे पुरुषाला कुंकू लाव. असली चित्रकारी तर लांबच. मला पुस्तके आवडली.
"पुस्तके घेऊन आमच्या घरी चल. घरचे 'घे' म्हणाले, तर घेतो."
तो माझ्यासोबतच घरी आला. नेमके मोठेमामा घरीच होते. त्यांना पुस्तके दाखवली.
"तुला चालत आसली, तर घिऊन टाक. पुस्तकं जुनी का नवी, हे महत्त्वाचं नाही. त्यानं ठेवल्यात कशी ते शिक. पैसं किती द्यायचं रं पोरा?"
सर्रास मुले अर्ध्या किमतीत पुस्तके विकायची. पण ही पुस्तके चांगली असल्यामुळे तो पाऊण किमतीत देणार होता. मी पुस्तके घेतलीही. वाचलेल्या पैशातून मला कंपासपेटी घेऊन द्यायचे मामांनी कबूल केले होते. रात्री मुकूंदमामांनी सर्व पुस्तकांना छान कव्हर घालून नावे टाकून दिली होती. नवीन पुस्तकांना येणारा वेगळाच वास असतो. या पुस्तकांना तो वास नसला; तरी उदबत्ती, साबणाचा वास येत होता. कारण त्यावेळी उदबत्तीच्या पुड्याचे कागद, सुगंधी साबणावरचे कागद पुस्तकात, कंपासपेटीत ठेवण्याची पद्धत त्यावेळी मुलांमध्ये खूप चालायची.
          पुस्तके घेतली, तेंव्हाच बालभारती आणि इतिहासाचे पुस्तक वाचून काढले. वर्षभर अभ्यास करायला नको वाटत असले; तरी वर्षाच्या सुरुवातीला ही दोन पुस्तके वाचण्याचा उत्साह काही औरच असतो. यावर्षी आणखीन दोन पुस्तके नवीनच होती. एक हिंदीचे पुस्तक; जे वाचता येत होते; परंतु पचायला जड होते. दुसरे इंग्रजीचे पुस्तक म्हणजे फक्त चित्र पाहण्यापुरतेच समजत होते. नेमके तेच पुस्तक हातात घेऊन बसलो होतो. छान वास येत होता. शोभाताईने कधीकाळी सीएटी कॅट, कॅट म्हणजे मांजर व डीओजी डॉग, डॉग म्हणजे कुत्रा असे चारदोन शब्द म्हटलेले आठवत होते. पण नेमके इंग्रजीअअमधील कोणतेही अक्षर लागत नव्हते. कोणत्या अक्षराला काय म्हणायचे? हे कुठे माहीत होते! तेवढ्यात आबईने हातात पुस्तक पाहिले. आबईने पाहिले म्हणजे आम्हीच खाजवून गजकर्ण काढले. कौतुकाने आबईला इंग्रजीचे पुस्तक दाखवायाला गेलो. वेणूही नेमकी त्यावेळी तिथेच होती.
आबई म्हणाली, "वाच."
आता अजून शाळाही सुरु झालेली नव्हती. जे शिकलोच नाही; ते कसे वाचून दाखवणार? पण वेणूसमोर वाचता येत नाही, असे कसे सांगायचे? मग काय दे धक्का! चित्र पाहून जगात कुठल्याही भाषेत सापडणार नाहीत असे शब्द मनानेच वाचायला सुरुवात केली. दोघीही माझ्याकडे कौतुकाने पाहत असताना नेमकी शोभाताई मोठ्याने हसतच तिथे आली.
"अगं आत्या, तो काहीही वाचतोय अन् तू खुशाल मान हलवती होय."
झाले. सगळे मुसळ केरात. असा राग आला होता ना! चोरी पकडली गेली होती. तरीही तणतण करण्यापलीकडे हातात काहीच नव्हते.
          प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यावर चाररेघी वही आणि पेन्सिलने त्यावर ए बी सी डी अशी अक्षरे लिहायला सुरुवात केली. आपण खूप काहीतरी वेगळेच शिकतोय, असे वाटू लागले. पहिले सहा महिने तर इंग्रजी हा विषय नसता; तर बरे झाले असते, असे म्हणण्याची वेळ आली. लिहिता वाचता येऊ लागले; पण प्रत्येकवेळी शब्दांनी वाट अडवायला सुरुवात केली. पहिल्या चाचणीने तर जीव खाल्ला माझा. पंचवीस मार्काची चाचणी. पास होण्यासाठी दहा मार्काची अट सोनारगुरुजींनी ठेवली होती. विशेष म्हणजे गुरुजींनी फळ्यावर लिहिलेल्या उत्तराप्रमाणे स्वतःचे पेपर स्वतःच तपासायचे होते. मीच माझा पेपर तपासूनही अवघे नऊ मार्क्स मिळाले. मग मात्र वाटले, पेपर गुरुजींनीच तपासायला हवे होते. किमान दहा तरी दिले असते त्यांनी. नापास झाल्यामुळे रडायला येत होते मला. मी एवढेसे तोंड करून गुरुजींकडे गेलो.
"का रे? तोंड का बारीक केलंय असं?"
"गुरुजी, माझा पेपर तुम्हीच तपासा."
          गुरुजींनी संपूर्ण पेपर उलटसुलट पाहिला आणि पेपरवर पंचवीस पैकी पंचवीस लिहिले. मग तर मी रडायलाच सुरुवात केली. माझ्या पाठीवर हात ठेवून गुरुजी म्हणाले, "तुझे मार्क्स मी कोणालाही सांगणार नाही. पण पुढच्या चाचणीत असे मार्क्स पाडणार असशील तर...!"
मी मुकाटपणे मान हलवली आणि जागेवर येऊन बसलो. मनाशी ईर्ष्या घेऊनच. पंचवीस पैकी पंचवीस. गुरुजी इंग्रजी शब्दांच्या भेंड्या लावत. मुले विरुद्ध मुली. मग काय? इज्जत का सवाल झाल्यावर शब्दांचे पाठांतर जोरात सुरू झाले. ईर्ष्या पूर्ण करेपर्यंत जिवाला चैन कुठली पडायला. बाकीचे विषय बाजूलाच. फक्त आणि फक्त इंग्रजी.
          यावर्षी आमच्या शाळेत एक नवीनच मुलगा आला होता. वर्गातील इतर मुलांमध्ये त्याचे वेगळेपण दिसून यायला कारण म्हणजे तो शहरातील शाळेत शिकून आलेला होता. अगदी गोरागोमटा, केस वाढवलेला आणि शर्ट पँटमध्ये खोचून दररोज इन करणारा. आम्ही कधी नवीन कपडे घातले किंवा बाहेरगावी जायचे असेल; तरच इनशर्ट करायचो. बाकी पंधरा अॉगस्ट व सव्वीस जानेवारी सोडले; तर इन नावाचा प्रकार आमच्याकडे नसायचाच. अगदी चोरपोलीस खेळतानाही पोलीस झालेल्या मुलांचा इन म्हणजे इंटरनॅशनल प्रकार असे. पुढून शर्ट खोचायचा; पण पाठीमागे मात्र तसाच मोकळा सोडलेला असे. वर्गातील अर्ध्याहून आधिक मुलांच्या चड्यांना ठिगळ लावलेले असायचे. गावातील टेलरही त्याहून इंटरनॅशनल असे. खाकी चड्डी आणि पांढरा शर्ट एवढेच रंग कायम अंगावर मिरवणार्‍या मुलांच्या जीवनात रंग भरण्याची जबाबदारी आपल्याच खांद्यावर दिली आहे, याची जाणीव ठेवून खाकी रंगाच्या चड्डीला ठिगळ लावताना सहजासहजी उठून दिसेल, अशा कापडाचे ठिगळ लावी. मग स्वतःच्याच गरिबीचे प्रदर्शन करायला कोण कशाला इनशर्ट करेल? खेळताना केलाच... तर पुढून इन आणि मागे आऊट, असा काहीसा प्रकार असे. हे जसे कपड्यांचे झाले, तसेच केसांचेही होते. सगळी खेड्यातील मुले. केस ठेवून त्यांची निगा राखणे, तेल लावणे हे खर्चिक प्रकार सगळ्यांनाच परवडणारे नव्हते. बहुतांशी मुलांच्या कटींगचा प्रकार एकसारखा असे. हातात येणार नाहीत, इतपत केस बारीक ठेवलेले असत. त्याचे सगळ्यांपेक्षा वेगळेपण दिसण्याची ही काही कारणे तर होतीच. याशिवाय तो मूळ अकोला, जळगावकडचा असल्यामुळे त्याच्या बोलण्यातही वेगळेपण जाणवायचे.
          सुजित राठोड त्याचे नाव. त्याचे वडील शेतकी अधिकारी होते. आमची ओळख झाली आणि तो बसायला माझ्याजवळच आला. पुढे आम्ही चांगले दोस्त बनलो. अगदी सातवी होईपर्यंत आम्ही एकत्र राहिलो. मला कायम नवनव्या गोष्टींचे आकर्षण वाटत राहिले आहे. नवी ठिकाणे, नवीन माणसं, नवीन नाती. त्यामुळे असेल कदाचित. मी कायम नवे मित्र बनवत गेलो. जुने होतेच; पण त्यामध्ये नव्यांची कायम भर पडत राहिली. एखादी गोष्ट आपली मानली की, फार लवकर मी त्याच्यात गुंतत राहिलो. गुंते सोडवतानाही हलक्या हाताने स्वतःला मुक्त करत राहिलो. पण त्या आठवणी काळजापर्यंत रुजलेल्या आहेत. त्या अशा इतक्या सहज पुसणार्‍या नाहीत. ओमीच्या भोवती काही मुलांचा ग्रुप गोळा होत होता. तोही त्याच्या ग्रुपमध्ये गुंतत गेला. मग माझ्या आयुष्यात त्याची जागा सुजितने घेतली. आमच्या बर्‍याच आवडीनिवडी जुळत राहिल्या. सुजितचे अक्षर आणि इंग्रजी दोन्ही चांगले होते. त्यामुळे माझाही फायदा झाला. इंग्रजीतील अभ्यासात प्रगती करणे सोईचे झाले.
            सुजितच्या घरीही माझे जाणेयेणे असे. त्याची आई फार प्रेमळ होती. सुजितप्रमाणेच त्यांचेही वेगळेपण जाणवत राही. खेड्यातील बायका कायम साडीत दिसतील. पण सुजितची आई घरी असली की, सलवार कमीज वापरत असे. त्यांना पाहिले की, शब्बूआपाची हमखास आठवण येत राही. सुजितला एक छोटी बहीणही होती. सुप्रिया तिचे नाव. पाहिले की, हुबेहूब बाहुलीच वाटायची. त्याचे बाबाही फार चांगले होते. पण लवकरच एक गोष्ट लक्षात आली. सुजितचे बाबाही दारूच्या आहारी गेलेले होते. सुरूवातीला त्यांचे पिणे कमी होते. तोपर्यंत ठीक होते. मग मात्र माझे येणेजाणे थोडे मर्यादितच राहिले. शक्यतो ते नसतील अशावेळी मी जात असे. ते आले की, आमच्या मिटींग बरखास्त होत. नशेत असताना ते कोणाला नीट ओळखायचेही नाहीत. ते प्यायलेले नसले की, मग मात्र आवर्जून आमच्याशी बोलायचे. अभ्यासाची चौकशी करायचे. मला कायम सुजितपेक्षा जास्त मार्क्स मिळत; म्हणून कौतुकही करायचे. 'घरी येत जा', म्हणून सांगायचे. नशेत असताना आम्ही भेटल्याचे त्यांना साधे आठवायचेही नाही.
           आम्हाला इतिहासातील महाराणा प्रताप यांचे प्रकरण गुरुजींनी शिकवले. तेंव्हा सुजितने मला सांगितले की, तेही मूळचे राजस्थानचे राजपूतच आहेत. महाराणा प्रताप यांनी अरवलीच्या जंगलात राहून मुघलांशी लढा दिला. तेंव्हा जे बंजारा लोक राणाजीसोबत होते; ते परत नगरात गेलेच नाहीत. पुढे भटकंती करत त्यातील काही महाराष्ट्रात आले. व्यापारी तांड्यासोबत जंगलातून मालाची वाहतूक करण्याचा व्यवसाय ते करू लागले. शेवटी बरीचशी मंडळी महाराष्ट्रातच स्थायिक झाली. एकदा सुजितच्या घरी फोटोंचा अल्बम पाहताना त्याच्या मम्मीचा एक फोटो मी पाहिला होता. त्यामध्ये राजस्थानी बायकांप्रमाणे कोपरापर्यंत पांढऱ्या बांगड्या, आरसे बसवलेली ओढणी डोक्यावरून घेतलेला फोटो होता. कधीकधी सुजित घरात बोलताना तो वेगळ्याच भाषेत बोलायचा. भाकरीला बाटी म्हणायचा. तो राजस्थानला कधीच गेला नव्हता. पण त्यांच्या गावाकडे म्हणे त्यांचे भरपूर नातेवाईक होते. तेथील बहुतांशी बायका आजही पारंपरिक पोशाखच करतात. जे शिकले; ते बाहेर पडले, सुधारले. बाकी परिस्थिती 'जैसे थे'च. त्याचे मम्मी-पप्पा शिकलेले होते. नोकरीच्या निमित्ताने कायम बाहेरच राहिले. कधीतरी गावी जायला मिळे. वडिलांच्या सततच्या बदल्यांमुळे तो अनेक ठिकाणी फिरून आलेला होता. त्यामुळे सांगण्यासाठी त्याच्याकडे खूप काही असे. कधीही न पाहिलेल्या... ऐकलेल्या... कल्पनाही केली नसती; अशा अद्भूत गोष्टींचा त्याच्याकडे खजिनाच होता. मला माझ्या मर्यादित जगाच्या बाहेर असलेल्या या अज्ञात जगाची ओढ वाटू लागली. परिघाबाहेरचे जग पाहण्यासाठी मी उत्सुक झालो होतो.
          पाचवीतून आम्ही सहावीत गेलो, तेंव्हाची गोष्ट आहे. एके दिवशी गुरुजींनी नाटकाची आवड असणारे विद्यार्थी निवडून त्यांना अॉफिसमध्ये बोलावले. बालनाट्य स्पर्धेसाठी यावर्षी शाळेतून नाटक बसवण्याचे ठरले होते. यावेळी सुजित आणि मी दोघेही उत्साहाने पुढे झालो. 'बनवाबनवी' नावाच्या या नाटकात तीन ठग असतात. तिघांची भेट झाल्यावर ते तिघे साधूचा वेश पालटून तीर्थयात्रेला जायला निघतात. एका धर्मशाळेत उतरल्यावर त्यांना एक व्यापारी भेटतो. ते तिघे मिळून त्या व्यापाऱ्याला फसवून जिलेबीने भरलेले चांदीचे ताट मिळवतात. त्यातही एकमेकांवर कुरघोडी करून ते ताट स्वतःलाच मिळवण्यासाठी त्यांची धडपड चाललेली असते. या तीन ठगांपैकी दोन भूमिकांसाठी गुरुजींनी आम्हा दोघांना निवडले होते. नाटकाचे संवाद लिहून घेण्यापासून पाठांतर, ड्रेपरीची तयारी आम्ही मिळूनच केली. बाकीचे चारजण होते आमच्याबरोबर. ओमीला अशा गोष्टींची फारशी आवड नव्हतीच. आपोआपच सुजित आणि माझ्यात जवळीकता वाढायला हे नाटक पुरेसे होते. पाठांतर करण्यात मला काही अडचण नव्हती. पण सुज्याचे संवाद पाठ करून घेताघेता माझेच संवाद पाठ कधी झाले, कळलेच नाही. त्याची मम्मी तशी शिकलेली होती. त्यांनीही आमचे संवाद आवाजातील चढउतारासह व्यवस्थित म्हणवून घ्यायला मदत केली. सुरुवातीच्या प्रवेशात तिघेही ग्रामीण पोशाखात असतात. म्हणून फेटा, धोतर, नेहरू शर्ट असा पेहराव होता. मुकूंदमामानी इंटरेस्ट घेऊन वेशभूषेसाठी आम्हाला खूप मदत केली. साधूच्या वेशांतरासाठी आमच्या मुख्याध्यापक गुरुजींनी त्यांच्या जुन्या धोतराचे लुंगीसारख्या आकाराचे तीन तुकडे दिले. त्यांना काऊच्या पाण्यात बुडवून आम्ही भगवी वस्त्रे तयार केली. रुद्राक्षाच्या माळांसाठी आम्ही लहान कच्ची उंबरे गोळा करून त्याच्या माळा केल्या. उंबरे सुकल्यावर त्यांना रंग दिला. अशाच काही काही शक्कल लढवून खर्च न करता वेशभूषा तयार झाली.
          पंधरा दिवसाच्या पाठांतरानंतर प्रॅक्टिस सुरू झाली. याकाळात अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होते. पण नाटकाचा नादच वेगळा. आपण वेगवेगळ्या भूमिका करतो; तेंव्हा आपले स्वतःचे अस्तित्व विसरून वेगळेच आयुष्य जगायला लागतो. तोंडाला रंग लागण्याची ही आयुष्यातील दुसरी वेळ होती. महिनाभरातच आम्ही स्पर्धेला गेलो आणि तालुक्याचे पहिले बक्षिस मारूनही आलो. थोड्याच दिवसांत जिल्ह्याची स्पर्धाही गाजवली. तिथेही पहिले बक्षिस आमचीच वाट पाहत होते कि काय, कोण जाणे! आता विभागावरील स्पर्धेसाठी पुण्याला जायचे होते. पुढे दूरदर्शनवरील बालचित्रवाणीमध्येही आपण दिसणार; म्हणून आम्ही उत्साहात होतो. सहावीच्या वर्षात अभ्यास कमी आणि नाटकंच जास्त झाली होती. त्यात सुजित जोडीला असल्यामुळे आयुष्यात एकेक नवीन रंग भरले जात होते.
          आम्ही सातवीत जाईपर्यंत इकडे सुजितच्या घरची परिस्थिती ढासळत चालली होती. त्याच्या बाबांचे पिणे वाढतच गेले होते. दिवसरात्रीचेही त्यांना भान उरले नाही. चोवीस तास ते नशेत राहू लागले. त्यातच त्यांच्या हातून काहीतरी आगळीक घडली होती. त्यांनी म्हणे पैशाच्या व्यवहारात काही गडबड केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यातच त्यांच्या साहेबांशी त्यांचे कशावरून तरी बिनसले. नशेतच त्यांनी साहेबांच्या अंगावर फाईल फेकल्या. त्यामुळे त्यांच्या साहेबांना अनायासे निमित्तच मिळाले व कामावरून त्यांना निलंबित करण्यात आले. कामावरच नाही गेले; तर पगार तरी कसा मिळेल? दुकानदारांची उधारी वाढतच चालली होती. याच्या... त्याच्याकडून केलेली उसनवारी कमी नव्हतीच. अशोक पवार, बप्पा जाधव यांच्यासारखी मंडळी सावकारी करायचे. त्यांच्याकडूनही अव्वाच्या सव्वा व्याजाने पैसे घेतलेले होते. ती माणसं आता घरापर्यंत येऊ लागली होती. दाराशी कोणी आला की, त्याची मनधरणी करण्यात घरातील एकेक वस्तू कमी होऊ लागली. कितीतरी किमती वस्तू कवडीच्या मोलाने विकून टाकाव्या लागत होत्या. परिस्थिती चिघळतच चालली होती. एकेकाळी सगळ्यांपेक्षा रंगीबेरंगी दिसणारे हे फुलपाखरू आता सगळ्यांसारखेच कळाहिन झाले होते. सुजितला उघड्या डोळ्यांनी जे दिसायचे; ते पाहून त्याला खूप वाईट वाटत होते. त्या वयातही त्याला न कळणारी तरीही सहज जाणवणारी वेदना तो मला सांगण्याचा प्रयत्न करे. मात्र या परिस्थितीत तो काय किंवा मी काय? काय करणार होतो? नव्हे नव्हे; तर काही करण्याएवढे आमच्या हातात तरी कुठे काय होते?
          उघड्या डोळ्यांनी न दिसणाऱ्या व दिसल्या तरी त्या समजण्याएवढे वय नसल्यामुळे न कळणार्‍याही काही गोष्टी घडू लागल्या होत्या. त्यावेळी न कळलेल्या काही गोष्टींचे अर्थ आज जेंव्हा लागताहेत; तेंव्हा माणसाच्या माणूसपणाविषयीही शंका येऊ लागते. एखाद्याच्या अगतिकतेचा फायदाच नाही; तर गैरफायदा घेण्याची प्रवृत्ती पाहिली की, चीड येऊ लागते. या घटनाही अशा होत्या की, चीड हा शब्दही फार फिका वाटावा. अगदी या पाशवी मानसिकतेची शिसारी येते... किळस वाटते. सुज्याचा बाप असा दारूत बुडालेला... घरात दोनवेळच्या अन्नाची भ्रांत पडलेली... बाहेरून आलेल्या, आधारासाठी जवळचे म्हणावे असे कोणी नसलेल्या निराधार कुटुंबाची परवड चाललेली असताना हळहळ वाटण्याऐवजी एखाद्याच्या जळत्या चितेवर स्वतःची पोळी भाजणारे कमी नसतात या जगात. राठोडसाहेबांच्या संसाराची राखरांगोळी ज्या दारूमुळे होत होती; त्या व्यसनापासून त्यांना परावृत्त करण्याऐवजी पदरच्या पैशाने त्यांना थोडी जास्तच पाजून घरापर्यंत सोडायला येणारांची संख्या लक्षणीय होती. एखाद्या तरूण त्यातही सुंदर स्त्रीचा संसार उघडा पडला असेल; तर 'सहानुभूती'चे अनेक विकृत हात पाठीवर फिरण्यासाठी शिवशिवत असतात.
          आपल्या आयुष्यात एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडत असेल; तर सुरुवातीला आपल्याला त्याची चीड येते. पुढेही तसेच घडले; तर त्याचा तिरस्कार वाटतो. हे असेच वारंवार चालू राहिले; तर त्याविषयी घृणा वाटते. पुढे अगदी त्याची शिसारी येते. आणि तरीही तीच तीच गोष्ट मनाविरुद्ध पुन्हा पुन्हा घडत राहिली तर...? तर त्याची सवय होते. सुजितच्या आईच्या बाबतीत असेच काहीसे घडले असावे. जेंव्हा सगळे मार्ग बंद झाले... काही देण्याच्या मोबदल्याशिवाय कुठूनच काही मिळण्याची सुतरामही शक्यता उरली नाही... वखवखलेल्या नजरा आशाळभूतपणे कायम लाळ गाळत राहिल्या. सहानुभूतीच्या आडून असहाय्यतेचा फायदा उठवत राहिल्या... देण्यासारखे काहीच उरले नाही... देणेकर्‍यांना चुकवण्यासाठी गाव सोडून तोंड लपवून निघून जाण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. तेंव्हा वरिष्ठांच्या पुढे जाऊन काहीतरी तडजोड करावी लागणार होती. वरिष्ठ आपला हेका सोडायला तयार नव्हते. त्यातूनही काही तोडपाणी होणार असेल, हात ओले करण्याची तयारी असेल; तर झालेला अपमान विसरण्याएवढे मन मोठे करायला मोठे साहेब तयार होते.
         'ज्याला भ्यावं, तेच आडवं यावं', असे म्हणायची वेळ आली. देण्याघेण्याची परिस्थिती राहिली नव्हती. दातावर हाणायला पदरात दमडी नव्हती. सुजितच्या मम्मीने नाइलाजाने आपला पदर पसरला. पसरलेल्या पदराकडे पाहून साहेबांना आपल्या चुकीची जाणीव झाली. सगळे व्यवहार पैशात थोडीच होतात! आपण उगीचच पैशाला महत्त्व देतोय. पैशापेक्षाही मौल्यवान काही गोष्टी असतात. पदराच्या पलीकडेही देण्याघेण्यासाठी काही असतेच ना! आणि केवळ एका परत'फेडी'च्या बदल्यात चुटकीसरशी हा माणूस सगळ्या अपमानावर पाणी सोडून मार्ग काढायला तयार झाला... तेंव्हा त्या कुठल्यातरी गाफिल क्षणी ती आपला निर्धार हरवून बसली. यावर फार काय बोलू? जनावरं मारून मांस खाणार्‍या माणसातही एक जनावर लपलेले असते. त्यालाही कधीकधी गरम रक्ताची ओढ असते. मृत शरीरापेक्षाही जिवंत शरीराला या वासनेने बरबटलेल्या बाजारात फार चांगली किंमत मिळते. तीच किंमत अदा करून तिने नवर्‍याची नोकरी वाचवली व बदलीचीही तजवीज केली. गुपचूप झालेल्या या व्यवहाराची गावात कुणकूण लागलीच.
'आजपर्यंत तर फार सतीसावित्रीचा आव आणत होती. एकदा वहिवाट पडल्यावर आता काय कोणीही यावे जावे. कोण आडकाठी करणार?' अशी भाषा बोलली जाऊ लागली.
          एकदा कलंकित होऊन उजळ माथ्याने फिरणे अवघड झाले; रक्ताला चटावलेल्या गिधाडांकडून शरीराचे लचके तोडून घेऊन पुढील काही महिने तिने आपला प्रपंच कसाबसा चालवला. अखेरीस नोकरीवर परत घेतल्याचा व सोलापूरच्या पलीकडे अक्कलकोटकडे बदली झाल्याचा आदेश हातात आला. आपल्या अब्रूची किंमत देऊन सुजितच्या मम्मीने अनेकांची देणी चुकती केली आणि गाव सोडला. एक दिवस जसा अचानक सुजित आला; तसाच अचानक गाव सोडून निघूनही गेला. पुन्हा तो मला कधीच भेटला नाही. पण अनेक प्रश्नांची उत्तरे कायम अनुत्तरीत राहिली. सुजितच्या मम्मीने आपल्या प्रपंचासाठी एवढी जबर किंमत मोजूनही सुजितच्या पप्पांचे म्हणजे राठोडसाहेबांचे व्यसन संपले का? का त्या माऊलीलाच बदफैली ठरवून ते व्यसनाच्या आणखी आहारी गेले आणि त्यासोबत तेही संपले का? गाव बदलल्याने माणसं बदलली, पण प्रवृत्ती बदलली का? आणि त्याच्या आईची निर्भत्सना एवढ्यावरच थांबली का? का प्रपंचाची लक्तरे सावरण्यासाठी तिच्या स्वतःच्या वस्त्राची ठिगळे पुन्हा पुन्हा जोडावी लागली?

(क्रमशः)

Saturday, 7 May 2016

१३...

         वाह! काय भारी दिवस होते तेंव्हाचे...! भारीच! रेडिओचे अप्रूप असण्याच्या त्या काळात टि.व्ही. नावाचा पेटारा आला होता. अलिबाबाच्या गुहेतील पेटार्‍यात नसेल असा खजिना या पेटार्‍यात होता. रविवारी सकाळी रंगोलीच्या हिंदी जुन्या गाण्यांसोबत आमची सकाळ सुरू व्हायची. साडेआठ वाजता 'चड्डी पहनके फूल खिला है'... म्हणत धावणारा मोगली म्हणजे आमचा एक संवगडीच बनला होता. तो, भालू, बघिरा जाम जावडायचे. शेरखानचा मात्र दरारा वाटायचा. आजही नाना पाटेकरचा आवाज ऐकला की, शेरखानच आठवतो. एकात एक वर्तुळे फिरता फिरता दूरदर्शनचा लोगो तयार व्हायचा. त्यानंतर सुरू व्हायचे महाभारत. श्रीकृष्ण शंख वाजवू लागला की, आम्ही संजयची दिव्यदृष्टी घेऊन कुरुक्षेत्रावर पोहचायचो. संस्कृत कशाशी खातात? हेसुद्धा माहीत नव्हते, त्या काळात 'यदा यदा ही धर्मस्य...' हा श्लोक तर ऐकूनच पाठ झाला होता. काय ते भीष्म पितामह... तो बलदंड भीम... आणि तसाच दणकेबाज दुर्योधन... शकुनीचा तर असा राग यायचा ना! बस्! कृष्णाचे गालातल्या गालात हसणे असो कि कर्णाची तडफड... खरे महाभारत यापेक्षा वेगळे असूच शकत नाही, यावर आमची गाढ श्रद्धा होती. 'मिले सूर मेरा तुम्हारा...' या गाण्यातील वेगवेगळ्या भाषा कळत नसल्या; तरी भारताच्या विविधतेतील एकतेची ओळख तेंव्हाच झाली होती. 'निन्ने स्वरगूम, होमार शूर तोमार शूर...' असले भारी काहीतरी आम्ही म्हणत राहायचो. सायंकाळी मराठी सिनेमा पाहिला की, रविवारचा दिवस सत्कारणी लागला असे वाटे. पुन्हा सुरू व्हायचे आठवडाभर पुढच्या रविवारची वाट पाहणे.
          टि.व्ही.वर मुंग्या येऊ लागला किंवा चित्र वरवर पळू लागले की, नऊ काड्यांच्या भल्या उंच अँटेनावर कावळा बसलाय, असले अंदाज परफेक्ट जुळायचे. रेडिओवर लागणारी आपली आवड आणि बिनाका गीतमाला ऐकता ऐकता बालपण उमलत होते. मोठ्या भसाड्या आवाजात आम्हीही गाण्याच्या भेंड्या खेळायचो, तेंव्हा हीच तर गाणी तोंडात असायची. शब्दांची पार वाट लावून टाकलेली असायची. 'कुण्या गावाचं आलं पाखरू' म्हणताना ते पाखरू डौलात बसण्याऐवजी देवळात बसे. सून साहिबा सून म्हणताना कोणत्या साहेबाची सून आहे, हे कधीच कळायचे नाही. परदेसियाँचे आम्ही 'पडदे शिवा' करून टाकले होते. दिवाळीत ऊरसाच्या वेळी गावातील तरुण मंडळाची पोरं नाटक बसवायची. मोठ्या पडद्यावर एखादा सिनेमा दाखवला जायचा. ग्रामपंचायतीच्या, तलाठी अॉफिसच्या, पोलीस स्टेशनच्या फळ्यावर लिहिलेल्या नाटक सिनेमाच्या जाहिराती पाठ होऊन जायच्या. गावभर गाडी गाडी खेळत मोठमोठ्याने ओरडत आम्ही फिरून यायचो. याल तर हसाल, न याल तर फसाल. दुसऱ्या दिवशी शेजार्‍यांना पुसाल... अशी जाहिरात करून टाकायचो. आमच्या लेखी सगळेच नाटक सिनेमे हे तीन अंकी तुफान विनोदी, कौटुंबिक आणि सामाजिक असत.
           तालुक्याच्या गावी म्हणजे बार्शीत आलेल्या सर्कसची जाहिरात करण्यासाठी सर्कसवाल्यांची मोठा स्पीकर लावलेली गाडी यायची. गाडीच्या मागे पळून पाच-पंचवीस रंगीत जाहिराती गोळा करेपर्यंत जिवाला चैन नसे. एकदा शाळेत अशीच काहीतरी चूक घडली होती माझ्याकडून. पोरं गुरुजींना नाव सांगतो म्हणू लागली. मग पोरांना याच रंगीबेरंगी जाहिराती देऊन त्यांची तोंडे बंद केली होती. सगळ्या जाहिराती वाटून संपल्यानंतर एकजण उरलाच. त्याला दुसरे काही देण्याची तयारी दाखवली. त्याला मात्र जाहिरातीच हव्या होत्या. शेवटी काही पर्याय उरलाच नाही. तो तक्रार घेऊन गेला. पण इतरांनी मात्र माझ्याच बाजूने साक्ष दिली. तो खरे सांगत असूनही खोटा पडला आणि मी दोषी असूनही निर्दोष ठरलो. नकळत्या वयातील या साध्या घटनेने खूप काही शिकवले. प्रत्येकाला भूक असते आणि पोटही असते. काहीतरी खाऊ घालायला लागते. कोणी खात नसेल; तर वेगवेगळ्या पद्धतींनी त्याचे तोंडही बंद करता येते.
          काही अडचणी मात्र भलत्याच खोड्यात अडकवतात. एका मित्राकडे शेतात हुरडापार्टीचे नियोजन होते. वर्गातले दोघेतिघे जाणार होते. त्याने मलाही बोलावले होते. अर्थातच माझीही जायची खूप इच्छा होती. परंतु एक अडचण होती. नेमकी त्या दिवशी शाळा होती. घरच्या मंडळीनी शाळा बुडवून मला पाठवणे शक्यच नव्हते. घरून परवानगी मिळणे दुरापास्त आहे, याची खात्री होती. जावे तरी कसे? हा प्रश्न सुटणारा नव्हता. एक मन मागे ओढत होते, तरीही दुसऱ्या मनाची जायची  इच्छा सुटत नव्हती. मित्र मधल्या सुट्टीत जायला निघाल्यावर तर फारच उलाघाल होऊ लागली. 'भित्री भागूबाई' म्हणून मित्र हुलीवर घालत होते. एकाने शक्कल चालवली. शाळा सुटेपर्यंत परत येऊ. कोणाला कळणारही नाही. हा पर्याय त्यातल्या त्यात बरा होता. शाळा सुटेपर्यंत परत यायच्या बोलीवर मी चक्क दांडी मारली. आम्ही चारपाचजण ओढ्यातून बोरे खात हुरडापार्टी जिथे होणार होती, तिथे पोहचलो. आमच्या दुप्पट उंचीच्या वाढलेल्या ज्वारीतून बांधावरून जाताना फारच टेरिफिक वाटत होते. कोणीतरी विचारलेही.
"काय रे पोरांनो! मास्तरांना अन् घरच्यानला सांगून आलाय ना रं?"
तिथे कोणीतरी मोहळ झाडलेले होते. तो मध खायच्या आशेने त्याच्यावरची नजरही न हटवता आम्ही खोटीच मान हलवली. खूप धम्माल आली. हुरड्यासोबत खायला काय एकएक पदार्थ होते. शेंगदाण्याची, लसणाची चटणी, गूळ, शेवचिवडा, खोबर्‍याच्या वड्या. वेळेचे भानही राहिले नाही. ऊन संपून सूर्य कलू लागला; तेंव्हा आपण घरी जायला हवे, याची आठवण झाली. एवढी रंगलेली मैफिल सोडून उठायला एकही जोडीदार तयार नव्हता. आलेल्या वाटेने उभ्या ज्वारीतून तेही एकट्याने जाणे माझ्या ताकदी बाहेरचे काम होते. शाळा सुटल्यावर सगळी मुले घरी जातील; तेंव्हा काहीतरी रामायण उभे राहील, याची जाणीव होऊ लागली होती. पण तरीही नाइलाज झाला होता.
          इकडे मी शाळेतून घरी आलो नाही म्हटल्यावर माई मला पाहायला शाळेत गेली. आता तिथे कोण असणार होते? वाटेने दिसेल त्या पोराकडे चौकशी सुरू झाली. कोणालाच काही माहीत नव्हते. शाळेला दांडी मारायची म्हणून एकतर गुपचूप आम्ही सटकलो होतो. त्यात वर्गातील एकाने मी मधल्या सुटीपासून शाळेतच नव्हतो; म्हटल्यावर घरच्या सगळ्यांचे धाबे दणाणले. सरकारवाडा, पिंपळाचा पार, मंदिर जिथे मी सापडू शकेल; अशा सर्व जागा शोधून झाल्या. घरातील सगळेच जण कामाला लागले. शेजारचीही काही उत्साही मंडळी शोध मोहिमेवर बाहेर पडली. एकटी सुनितामामी शिरीषला घेऊन घरी होती. बाकीचे सारेच वेगवेगळ्या ठिकाणी माझा शोध घेत होते. जसजसा वेळ जाऊ लागला; तशा नाना शंकाही बळावू लागल्या. त्यात भेटणारा माणूस काही वेगळेच सुचवायचा. मग तर घरचे आणखीनच हवालदिल झाले. नदी, डोह, आसपासच्या विहिरीसुद्धा पाहून झाल्या. काही दिवसांपूर्वी माझ्या वर्गातलाच एकजण पोहायला म्हणून गेला; तो बुडून फुगूनच वर आला होता. हा प्रसंग ताजा असल्यामुळे तर घरच्यांच्या तोंडचे पाणीच पळाले. थोड्या थोड्यावेळाने प्रत्येकजण घरी येऊन मी आलोय का याची खात्री करत होता. 'नाही' म्हटल्यावर तोंड बारीक करून पुन्हा शोधायला बाहेर पडत होता. मोठेमामा वेगळीच शंका आल्यामुळे बार्शीच्या एस. टी. स्टँडपर्यंत पाहायला गेले. माईला तर खात्रीच झाली होती, मला माझ्या बापाने पळवले म्हणून. घरात रडारड सुरू झाली. मुकूंदमामाला कोणीतरी सांगितले की, माझ्या वर्गातील दोघेचौघे हुरडा खायला जाणार होते. कदाचित मी तिथेच सापडेल, या आशेने मुकूंदमामा तिकडे यायला निघाले. तोपर्यंत अंधार पडू लागला होता.
          आज खूप मज्जा केली, यावर मित्रांच्या हसून गप्पा चालल्या असल्या; तरी फक्त शरीराने मी त्यांच्यासोबत होतो. मनाने तर मी केंव्हाच घरी पोहचलो होतो. आता घरी गेल्यावर कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावे लागेल, याची आतून कुठेतरी जाणीव होत होतीच. फक्त आता सांगायचे काय आणि कसे? याचीच मनाशी जुळवाजुळव चालली होती. यापुढे असला नसता उद्योग पुन्हा कधी करायचा नाही, हेही मनाला वारंवार बजावून झाले होते. अर्ध्या वाटेतच नेमके मुकूंदमामाला समोरून येताना बघून थोडेसे हायसे वाटले. मोठेमामा असते; तर काही बोलायची गरजच पडली नसती. अगोदर एक कानाखाली बसली असती. मग चौकशी.
          जवळ आल्यावर माझे दप्तर आपल्या हातात घेऊन मामाने मला पुढे ओढले. मी आपले उगीचच काहीतरी स्पष्टीकरण द्यायचे म्हणून तोंड उघडले खरे! पण तोंडातून काही आवाज निघायच्या आतच खाडकन् गालावर फटाका फुटला. कानातून 'गुङ्गsss!' एवढाच आवाज येत राहिला. मला उचलून खांद्यावर घेऊन काही न बोलता मामा घरी आले. घरातले वातावरण पाहून खूप मोठे वादळ येऊन गेल्याच्या खुणा दिसत होत्या. कधी न रागावणार्‍या मुकूंदमामाने ते मारले; आता मोठेमामा कच्चा खाऊन टाकणार, हे उघड होते. पण नशिबाने मोठेमामा घरी नव्हते. माझ्या थोडासा जिवात जीव आला खरा. आबईने मला पाहायचा काय तो अवकाश होता. मुकूंदमामा कोणालातरी सांगत होते. 'हुरडा खायला चावरात गेला होता.' आबईने तेवढेच ऐकले. तरातरा बाहेर जाऊन परसातील सिताफळाची फांदी तोडली. 'ओल्या फोकाचे पडणे' म्हणजे काय? हे तेंव्हाच समजले. कोणी मला सोडवायला लवकर मध्ये पडले नाही. कुसूममामी येईपर्यंत अंगावर कुठे कुठे फटके बसत होते, हेही समजले नाही. मामीने मला सोडवून पाठीशी घातले. तरीही मामीच्या हातून ओढून घेऊन आबईने मला पकडले आणि जवळ पडलेल्या दाव्याने हातपाय बांधून भिंतीवरच्या खुंटीला अडकवले. आबईचा अवतार बघून मला सोडवण्यासाठी सगळे लांबूनच तिला समजावत होते. मोठेमामा येईपर्यंत अधूनमधून मला फटके पडतच होते. खुंटीला टांगल्यामुळे हातपाय सांध्यातून उपसून निघतील कि काय? असे वाटत होते.
"माई, पुन्हा नाही असं करणार. आता एवढ्या वेळ सोड."
अशी विनवणी केल्यावर मोठ्यामामाने मला सोडले. नशीब त्यांनीही मारले नाही. सुटका तर झाली; परंतु कोणाकडेही पाहायचे धाडस होईना. खूपच लाजिरवाणे वाटत होते. असे वाटायचे सगळे माझ्याकडेच पाहत आहेत. त्यानंतर कितीतरी वेळ माईच्या कुशीत तोंड लपवून मी रडत राहिलो.
          मी शाळा बुडवायला नको होती. घरच्यांना न सांगता परस्पर असे कुठे जायला नको होते. हे सगळे पटतेय मला. पण घरचे इतके चिडतील, असे वाटले नव्हते मला. यापुढे अशी वेळ पुन्हा येऊ नये म्हणून धसकाच घेतला मी. नदीचे दोन तीर पाण्याच्या प्रवाहाचे नियंत्रण करत असतात. एकीकडे जागी होणारी ईर्ष्या आणि दुसऱ्या बाजूने घरातील शिस्त माझ्या प्रवाहाला वळण देत राहिले.
          आबई मला मारत असताना अनेकांनी पाहिले होते. त्यामध्ये वेणूही होती. वेणूने मी मार खाताना मला पाहायला नको होते. तिच्यासमोर माझ्या इज्जतीचा फार कचरा झाला होता. पुढचे दोनतीन दिवस मी तिला टाळतच होतो. नाहीतरी तसेही मोठे होईल तसे आमचे एकत्र खेळणे कमी होत चालले होते. मुलींसोबत खेळताना दिसले; तर बाकीची मुलं चिडवायची हा भाग होताच. मलाही बल्लू, ओमीसारखे माझे नवीन संवगडी मिळत चालले होते. त्यामुळे वेणूच्या सोबतीची तेवढी गरज उरलेली नव्हती. पण वेणूला मात्र मी कायम हवा असायचो. एक तर मी खूप हुशार असल्याचा तिलाच फार अभिमान होता. अभ्यासात तिला कायम माझी मदत हवी असायची. माझ्यामुळेच तर तिचा अभ्यास पूर्ण होई. त्यासाठी मी सांगेल ते काम करायला ती तयार असे. घरातून काही खाऊ मिळाला की, मला पोहचवण्यासाठी तिची धडपड असे. खरं सांगू का? अलीकडे वेणूची सलगी मला नको झाली होती. हुरडा खायला जाताना आम्ही किती धमाल केली, हे तिला सांगायचे होते. ओढ्याला बोरे किती खाल्ली, वाढलेल्या ज्वारीतून कसे न घाबरता गेलो, मोहळाचा मध खाल्ला... हे सगळे तिला सांगावेसे वाटत होते. पण आबईने मारलेले आठवायचे आणि ती आठवण पुन्हा नको म्हणून बोलणेच नको. तेवढ्यासाठी तर आणलेली बोरेही तिला दिली नाहीत. दुसऱ्या दिवशी शुभाताईलाच बोराचा वास आल्यावर तिने काढून घेतली. वेणूला टाळण्यासाठी आणखी एक कारण सापडले. माधवमामाने मागे एकदा आमच्या दोघांचा एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढला होता. तो फोटो पाहून तर अनेक दोस्तांनी मला चिडवले होते. म्हणूनच मीही फक्त घरी असतानाच तिच्याशी बोलायचो. आता तर तिच्यासमोरच मला मार खावा लागला होता.
          नेमके थोड्याच दिवसांत मी भाषणाची स्पर्धा गाजवली. सगळेच मागचा झाला प्रकार विसरून गेले होते. यावेळी झालेल्या कौतुकाने माझी गेलेली इज्जत पुन्हा मिळाली होती. ज्या ज्या मुलांचे नंबर आले होते; त्या सर्वांची प्रमाणपत्रे व बक्षिसाची पाकिटे देऊन प्रार्थनेच्यावेळी गुरुजींनी अभिनंदन केले होते. स्पर्धेनंतर मी आजारी पडल्यामुळे दोन दिवस शाळेत गेलो नव्हतो. शुभाताईही आता हायस्कूलला जात होती. त्यामुळे मी नसताना माझे बक्षीस वेणूनेच जाऊन स्वीकारले. एवढेच नाही तर घरी आल्यावर सगळा कौतुकसोहळा अथःपासून इतिःपर्यंत रंगवून सांगितला होता. बक्षीस तर माझेच होते; पण स्वीकारण्याची संधी वेणूला मिळाली होती. याचाही तिला स्वतःलाच बक्षीस मिळाल्याइतका आनंद झाला होता.
           माझा स्कॉलरशिपचा निकाल आला, तेंव्हा कौतुकात भरच पडली. भले गुणवत्ता यादीत नंबर नसेल आला; पण तिथपर्यंत पोहचून पास तर झालो होतो. एकूणच काय चुका करून शिक्षा भोगायची आणि स्वतःचा अपमान करून घ्यायचा. यापेक्षा चांगले काही करून कौतुक करून घेण्यातच मजा असते, याची जाणीव झाली होती. यापुढे चुका होणारच नव्हत्या, अशातला भाग नव्हता. पण काही घडलेच; तरी त्या सावरून कशा न्यायच्या, याचेही तारतम्य येऊ लागले.
          बरोबर वर्षभरानंतर अक्षयतृतीयेच्या वेळी पंधरा दिवसाची सुटी घेऊन माधवमामा आला होता. भाषण स्पर्धेचा व स्कॉलरशिपचा निकाल ऐकून त्यानेही कौतुक केले. पण मी मार खाल्ला होता, हे शुभाताईकडून त्याला कळले असावे. तो आबईला रागावला. मलाही रागावला.
"लेका, जायचं तर सांगून जायचं. हुरडा खाऊन वरून मारबी खाल्लास!"
         परसात एक भोपळ्याचा वेल होता. एक बियासाठी राखलेला भोपळा वाळून कोळ झाला होता. माधवमामाने काथ्याने भोपळा विणून त्याचा बिंडा वनवला. मला म्हणाला, "गब्बरसिंग, बिंडा तर बनिवला, पण विहिरीला पाणी आहे का? उद्या मळ्यात जाऊ. तुला पोहायला शिकवतो."
          गल्लीतली आम्ही चारपाच पोरं माधवमामासोबत पोहायला जाऊ लागलो. आमच्या विहिरीपेक्षा पिराच्या विहिरीत पाणी बरे होते. मग आम्ही रोजच पिराच्या विहिरीवर जात राहिलो. पोहायला शिकायला सुरुवात केली त्याच्या दुसऱ्या का तिसर्‍याच दिवशी संध्याकाळी त्याने मला शब्बूआपाच्या घरी काहीतरी निमित्त काढून पाठवले. शब्बूआपाच्या शेताजवळच पिराची विहीर असल्यामुळे मीही आम्ही पोहायला तिथे जात असतो, हे बोलताना सांगून टाकले. त्यानंतर माधवमामाची सुट्टी संपेपर्यंत आम्ही पोहण्यात तरबेज झालो. शब्बूआपा पण त्यानंतर रोजच विहिरीवर येत होती. माझ्या पोहण्याचे तिला कौतुक वाटायचे. म्हणून मीही तिला दाखवण्यासाठी पहिल्या दुसऱ्या करत करत पाचव्या पायरीवरून उड्या मारू लागलो. माधवमामा थोडावेळ पोहून तिथेच विहिरीत पायर्‍यावर शब्बूआपाबरोबर गप्पा मारत बसायचा. आम्हांलाही पोहायला तेवढाच जास्त वेळ मिळायचा. माधवमामा, शब्बूआपा व आम्ही सगळेच काहीतरी जोक करून खूप हसायचो. आपा आधीच गोरी होती. उन्हातून आल्यावर लालबूंद झालेली असायची. हसताना तिच्या नाकाचा शेंडा अजून लालबूंद व्हायचा. माधवमामा आम्हाला हळूच खुणवायचा. मग आम्ही "लाल मिरची...!" म्हणून मोठ्याने ओरडून पाण्यात उड्या मारायचो.
          पाहता पाहता मामाची सुट्टी संपली. फक्त मला हे कळले नव्हते की, माधवमामा जायच्या आदल्या दिवशी आम्ही कितीही जोक करून आपा हसली नव्हती. त्यादिवशी तिचे नाक तर लाल झाले होतेच, पण डोळेही लालबूंद झाले होते. तिला कोण हसवतेय? म्हणून मामाने पैज लावली; तर ती उठून वर निघून गेली. मला उगीचच असे वाटले की, आम्ही चिडवल्याचा तिला राग आला असावा. जाताना तिच्या गालावर थेंब चमकल्यासारखे वाटले. माधवमामालाही बहुतेक तसेच वाटले असावे. तोही मग तिची समजूत काढण्यासाठी तिच्या मागोमाग गेला.
          बर्‍याच वेळाने तो परत आल्यावर आपा घरी गेली म्हणून सांगितले. आमचे सगळ्यांचे पोहायचे झाले होते. आम्हीही आता घरी जायला निघणारच होतो. नाहीतरी आज पोहताना काही मजा आली नव्हती. तरीही माधवमामा मात्र एकटाच थोडावेळ पोहत राहिला. पोहून त्याचेही डोळे लाल झाले होते.

(क्रमशः)

Tuesday, 3 May 2016

१२...

          या दुनियेत एवढी सारी माणसं आहेत. पण प्रत्येकाची तर्‍हा वेगळी. सगळ्यांचेच आयुष्य सारखे कुठे आहे? प्रत्येकजण आपल्या आयुष्याची एक 'ब्ल्यू प्रिंट' घेऊन येत असतो. पोपट घेऊन रस्त्याच्या कडेला बसलेल्या जोश्यापासून ते प्रस्थापित प्राच्यविद्याविशारद ज्योतिर्भास्करापर्यंत कित्येकजण त्याची उकल करण्याची खटपट करतात. कोणाला त्यातले कितपत कळते कोणास ठाऊक! जो तो आपापल्या परीने त्याचा अर्थ लावत असतो. पण जरा बारकाईने विचार केला की, एक गोष्ट हमखास लक्षात येते. कोणतीही गोष्ट सहजासहजी घडत नाही. विनाकारण तर नाहीच नाही.
          असंख्य ठिपके असलेल्या एखाद्या रांगोळीप्रमाणे एकेक ठिपका आपण जोडत चाललेले असतो. एखादे डिझाईन डोक्यात ठेवून तुम्ही काढलेल्या रांगोळीत फारसे नावीन्य नसते. फक्त कार्यसफलतेचा आनंद असतो. रूळलेल्या वाटांनी जगण्यामध्ये तरी यापेक्षा काय वेगळे असते. या मळलेल्या वाटा तुम्हांला उद्दिष्टांपर्यंत पोहचवतात. यामध्ये सफळ संपूर्णपणे जीवन कडेला लागले, याचाच आनंद. पण नवनवीन वाटा शोधून नवी शिखरे पादाक्रांत केल्याचा आनंद तुम्हाला कसा मिळावा? खरं म्हणजे तुम्ही ज्या बिंदूवर असता; त्याच्या आठही बाजूंपैकी कोणत्याही एका दिशेने जाण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला असते. परंतु तुम्ही निवडलेली प्रत्येक दिशा तुमच्या संपूर्ण रांगोळीचा आकारच बदलून टाकते. तुमच्याही नकळत तुम्ही ठिपके जोडत जाता. जास्तीत जास्त सुंदर रचना करण्याकडे तुमचा कल असतो. पण जसजसा आकार येत राहतो; तेंव्हा तुम्हीही अचंबित झालेले असता. तुमच्या कल्पनेच्याही पलीकडे तुम्ही जगलेला असता. प्रवास पूर्ण झाल्याचा आनंद मिळेल ना मिळेल. पण नवनिर्मितीचा... सृजनाचा आनंद तुम्हाला मिळालेला असतोच असतो. सगळ्याच गोष्टींचा अंदाज तुम्ही लावू शकत नाही. पाहिलेले सगळे काही कळतेच, असे थोडीच आहे. कळण्याएवढी जागृत बुद्धी आणि पाहण्यासाठी 'ती' नजरही असावी लागते. सगळीच देवस्थाने स्वयंभू थोडीच असतात. काही काही दगडावर कोणाच्यातरी नकळत शेंदराची बोटे पुसली जाऊन देवस्थानं झालेली असतात. पण म्हणून सगळ्याच दगडाची देवस्थानंही होत नाहीत. प्रत्येकाचे प्राक्तन वेगळे. त्यात्यावेळी आयुष्याचा अर्थ लागेलच असे नाही. चालताना घेतलेली सगळीच वळणे कळतीलच असेही नाही. पण विशिष्ट उंची गाठल्यानंतर सगळा प्रवास स्पष्ट होतो. साध्या साध्या वाटणाऱ्या गोष्टींचेही अर्थ लागतात. म्हणूनच माझे स्पष्ट मत आहे की, कोणतीही गोष्ट सहजासहजी घडत नाही... आणि विनाकारण? तर नाहीच नाही.
          चौथीच्या वर्षात केवळ स्कॉलरशिप परीक्षा एवढाच भाग नव्हता. ही तर सुरुवात होती. या काळात अशा अनेक साध्या साध्या वाटणाऱ्या गोष्टी घडत गेल्या. पण पुढे घडणाऱ्या पर्वाची ती नांदी होती. एकदा का तुम्हांला एखाद्या गोष्टीचा चस्का लागला की, जगातील कोणतीही नशा त्याच्यापुढे झक मारते. व.पु. म्हणतात तसे माणसाला काही न काही छंद हवा, स्वप्न हवीत; पुरी होणारी किंवा कायम अपुरी राहणारी. त्यातून तो स्वतःला
जिंकायला व जगायला शिकतो...!
          आपल्यामध्ये काही प्रवृत्ती उपजतच असतात. त्या कुठेतरी आतमध्ये अगदी खोलवर गाडल्या गेलेल्या असतात. टिकून राहण्यासाठी त्यांना थोडीसीही ओल पुरते. पेरलेले दाणे उगवून येण्यासाठी वाफसा व्हावाच लागतो. त्यामुळे योग्य परिस्थितीची वाट पाहत त्या तग धरून राहिलेल्या असतात. आपल्या आसपासच्या वातावरणाचीही त्यात भर पडत राहते. तुमच्याही नकळतपणे तुमच्या आयुष्याची जडणघडण चाललेली असते. अंकुर फुटतो आणि समजा वेळकाळाप्रमाणे त्याला खतपाणी मिळालेच; तर मग विचारायलाच नको. जीवनरूपी वृक्ष फोफावत राहतो. तुम्ही गुण म्हणा अगर अवगुण; पण या काळातच माझ्यामधील ईर्ष्या जागी होऊ लागली होती. यश, कौतुक वाट्याला आले पाहिजे, ही प्रत्येकाचीच इच्छा असते. तशीच ती माझीही होती. पण ते दुसऱ्या कोणाच्या वाट्याला आले की, माझ्यातील ईर्ष्या मला आतून जाळून काढू लागली. मला त्या समोरच्याविषयी काहीच देणेघेणे नसे. मला स्वतःचाच राग येई. त्याच्याकडे असे काय आहे; जे माझ्याकडे नाही. तो करू शकतो; मग मी का नाही?
          "मी का नाही?" या प्रश्नाने मी बेचैन राहू लागलो. त्यासाठी माझे डोके वेगाने काम करू लागले. नवनवीन कल्पना सुचू लागल्या. फक्त समाधानाची गोष्ट एवढीच होती की, ही ईर्ष्या निर्मळ होती. कोणताही उपद्रव अथवा विनाशकारी नव्हती. ती स्वतःपुरतीच होती. एखाद्याकडे कोणती चीजवस्तू असल्याचे दुःख मला नव्हते. पण तशीच वस्तू मलाही मिळायला हवी आणि मग ती मिळविण्यासाठी माझे प्रयत्न सुरू होत. कोणी एखाद्याने काही केले आणि त्याचे कौतुक झाले की, माझा ईर्ष्याळू स्वभाव जागा होई. त्याच्याहूनही सरस असे काही करून कौतुक मिळवेपर्यंत मला स्वस्थता कसली ती मिळायची नाही. कायम उंची गाठण्यासाठी आणि ती टिकवण्यासाठी धडपड सुरू व्हायची. हे तारुण्याच्या आणि कर्तृत्वाच्या काळातही असेच चालू राहिले. त्यामुळेच तर मी एकेक पायरी चढतच राहिलो.
          मागे जाऊन मूळ शोधायचा प्रयत्न केला; तर इथपर्यंत नक्कीच मागे येता येईल. त्यावेळी आमच्या शाळेत एक खूप चांगली प्रथा होती. वर्षभरातून वेगवेगळ्या महापुरुषांची जयंती-पुण्यतिथी साजरी व्हायची. पण संपूर्ण नियोजन विद्यार्थ्यांनी करायचे. अगदी कार्यक्रमात अध्यक्षस्थानीही विद्यार्थीच. मुख्याध्यापक गुरुजींच्या शेजारी खूर्चीत बसायला मिळणे, हा किती मोठा सन्मान! चौथीत असताना हा ईर्षेचा किडा मला चावला आणि गांधीजयंतीला भाषणाची तयारी करूनच गेलो. गुरुजी कसे बोलतात... हातवारे कसे करतात... याचे निरीक्षण केलेले होतेच. पाठ केलेले भाषण नुसती पोपटपंची करून धडाधड बोलायचे नव्हतेच. त्या वयाला शोभेल असा अॅटिट्यूड दाखवत फार पोक्तपणाचा आव आणून मी तेंव्हा बोललो. त्याचा फायदा एकच झाला. दिवाळीनंतर होणाऱ्या स्पर्धेसाठी सोनारगुरुजींच्या डोक्यात मी अगदी फिट्ट बसलो.
           त्याकाळात निबंध, कथाकथन, भाषणाच्या तालुकावार स्पर्धा होत. आजपर्यंत या स्पर्धांमध्ये आमच्या शाळेचा लौकिक होता. हमखास बक्षिसे मिळायचीच. यावर्षीही साधारणपणे दिवाळीनंतर डिसेंबर कि जानेवारी महिन्यात आम्हा दहाबारा मुलांना गुरुजी तालुक्याच्या गावी नेणार होते. आतापर्यंत घरच्यांसोबत बाहेर जाण्याचा योग आला होता; पण हे असे एकट्याने जाण्याची ही पहिलीच वेळ होती. मनात धाकधूक तर होतीच. माई गुरुजींना भेटायला आली होती. तिने बरेच काहीबाही सांगितले त्यांना. "आबईच्या सासरची कोणी मंडळी आली; तर पोराला सोडायचं न्हाई. त्याचा बाप जरी आला; तरी पोराला सोडू नका. आमच्यापासून घेऊन जाताय. संध्याकाळी त्याला आमच्या ताब्यात पोचवायला जमत आसंल; तर पोराला घेवून जा." आजी हे सगळं सांगताना माझी अवस्था मात्र फारच विचित्र झाली होती. आजीने असे काही गुरुजींना बोलू नये, असे वाटत होते. तशी गुरुजींना आमच्या कुटूंबाची बर्‍यापैकी माहिती होतीच. मोठ्यामामाचे व गुरुजींचे संबंधही चांगले होते. गुरुजींनी पुन्हा पुन्हा माईला शब्द दिला. पोराची जबाबदारी माझी. पोराचे बोट सोडून कुठेच जाणार नाही म्हणून. अर्थातच तरीही माईचे समाधान होण्यासारखी परिस्थिती नव्हती; म्हणून तिने पाठीमागून मुकूंदमामाला पाठवून दिले.
          शहरातील हा अनुभव माझ्यासाठी नवाच होता. घरच्यासोबत गावाला जाण्यापेक्षा सर्व मुले मिळून एकत्र प्रवासाची मजा काही औरच होती. एकट्याने प्रवास करण्याएवढे आपण आता मोठे झालो आहोत, असे वाटू लागले. अगोदर गुरुजी आम्हा सर्वांनाच घेऊन त्यांच्या घरी गेले. ते माडीवर राहायचे. गॅलरीतच स्वागताला पोपटाचा पिंजरा लटकवलेला होता. एका खोलीत तर कपाटभरून पुस्तकेच पुस्तके होती. टेबलखूर्ची होती. गुरुजींची ती अभ्यासाची खोली होती म्हणे. टेबलावर एक वाकड्या पाईपचा दिवा होता. भारीच दिसत होता तो. फक्त टेबलावरच उजेड पडायचा. मी तर तेंव्हाच ठरवून टाकले. आपल्याला पण अभ्यासाची अशीच जागा असायला पाहिजे. गुरुजींच्या बाईपण चांगल्या होत्या. त्यापण गुरुजीसारखाच चष्मा लावायच्या. आम्ही डबे नेले होते, तरी पण त्यांनी आमच्या सगळ्यांसाठी गरमागरम पोहे बनवले. वरून सगळ्यांना चहापण दिला. ओमीने गडबड केलीच. त्याच्या हातातून पाण्याचा मगच निसटला. सार्‍या घरभर पाणी झाले. तरीही बाई रागावल्या नाहीत. तिथून मग आम्हांला घेऊन गुरुजी स्पर्धा होणार होत्या; त्या शाळेत आले. तिथे पोहचल्यावर आम्हांला भाषणाचे विषय मिळाले. तसे त्यांनी अगोदरच ते शाळेला पाठवले होते म्हणे; पण मिळाले नाहीत, यात त्यांचा काय दोष? आमच्याकडे मात्र आता तयारीसाठी तासा दोन तासाचीच काय ती सवड होती. तोपर्यंत मुकूंदमामाही येऊन पोहचले होते. मला आणखीन बरे वाटले.
          गुरुजींनी फळ्यावर लिहिलेले पाचही विषय वाचून यायला सांगितले. बाकीचे असेच काहीएक विषय होते; पण मला 'माझे स्वप्न' या विषयावर बोलायचे होते. त्या विषयावर काय बोलायचे याचा त्यांनी अंदाज घेतला. मग थोडक्यात एक गोष्ट सांगितली. स्वप्न म्हटले की, रात्री झोपल्यावर पाहतो ते स्वप्न एवढेच मला माहीत होते. गुरुजी म्हणाले, आपल्याला मोठे झाल्यावर काय बनायचे आहे, हेही स्वप्नच असते. समज तू मोठेपणी वैमानिक झाला आहेस. तुला तसेच स्वप्न पडले. तुला जी मजा येईल, ते सांग. मग तुला कळते की, विमानात बाँब आहे. तू सगळ्यांना सुखरूप बाहेर काढतो आणि विमानाचा स्फोट होतो. तुझ्या धाडसासाठी तुला पंतप्रधानाच्या हस्ते बक्षीस मिळते. तू आनंदाने ओरडतच झोपेतून जागा होतो. ही गोष्ट त्यांनी सांगितली तशी मला भाषणात सांगावी लागणार होती. माझ्यापेक्षा मुकूंदमामाच बारकाईने ते ऐकत होते. नेमके भाषण काय करायचे आहे, हे त्यांच्या लक्षात आले. तिथून मग तासभर पुन्हा पुन्हा त्यांनी ते माझ्याकडून घोटवून घेतले. मधूनमधून मला ते दुरुस्ती सांगायचे. रंगवून गोष्टी सांगण्यात तसा मी पटाईत होतोच. प्रत्यक्ष भाषण करायला उठेपर्यंत मी निवांत होतो. मात्र माईकपुढे उभे राहिल्यावर पाय थोडे लटपटले. घसा कोरडा पडला. समोर बसलेले विद्यार्थी आणि शिक्षक नवीन होते. त्यामुळे मग मी गुरुजींकडे आणि मुकूंदमामाकडे पाहिले. ते हळूच हसले. मलाही हसू आले. मी आलटून पालटून त्यांच्याकडे बघून बोलायला सुरुवात केली आणि हळूहळू भीती पळून गेली. सगळे शांतपणे ऐकताहेत. त्यात मोठे साहेबपण होते. हे पाहून मला जोर चढला. आयुष्यातील पहिली लढाई सुरू झाली आणि संपलीही. पहिले बक्षीस... तेही घसघशीत एकावन्न रुपयांचे. कौतुक झाले ते वेगळेच. रात्री घरी आल्यावर माईने मीठमिरच्या ओवाळून टाकल्या. गंमत म्हणजे तरीही मला कोणाची तरी नजर लागली असावी. मी चक्क पुढील दोन दिवस अंथरुणातच काढले.
          आपण कायम फोकसमध्ये असायला हवे. हिरोलाच सगळे विचारतात; तेंव्हा आपण हिरोच व्हायला हवे. पण एखादा असिस्टंट हिरो असेल; तर हिरोचा भाव आणखीनच वाढतो. सपोर्टला कोणी असेल; तर कॉन्फिडन्स वाढतो. हे लक्षात आले होते. कुठेतरी ऐकलेला एक डायलॉग आहे. अपनी किमत उतनीही रखिए, जो अदा हो सके| अगर अनमोल हो गए, तो तनहा हो जाओगे| ते खरेच तर होते. वर्गातील बर्‍याचजणांचे ग्रुप झाले होते. पण हिरोगीरीच्या नादात मी एकटा पडलो होतो. ही कसर काढण्यासाठी कि काय? माझ्या या सिनेमात बल्लूची एन्ट्री झाली.
         बल्लू हा काय माझ्या वर्गात नव्हता किंवा तो माझ्या वयाचाही नव्हता. उलट माझ्यापेक्षा तीनएक वर्षांनी लहानच होता. आमच्या घराच्या खालच्या बाजूला काही मळे होते. त्यात एक त्यांचाही होता. तिथेच जनावरांसाठी गोठा होता. कोंबड्यांचे खुराडे होते. दररोज सायंकाळी कोंबड्या खुरड्यात डालण्यासाठी तो मळ्यात यायचा. सुट्टीदिवशी तर दिवसभर त्याला मळ्यांतच थांबावे लागे. त्याच्या येण्याजाण्याची वाट आमच्या घरापुढूनच असल्यामुळे कधीकधी माझ्याकडे तो थांबायचा. त्याला आकर्षण वाटण्यासाठी आणखी एक निमित्त मिळाले होते. मुकूंदमामाने बाहेरच्या परसात दोन मजबूत मेढी उभ्या करून मोठ्या लाकडी पाटाचा झोपाळा टांगलेला होता. मी तिथे खेळताना दिसलो की, तो आवर्जून यायचा. हळूहळू दोघांनाही एकमेकांची एवढी सवय झाली की, शिक्षण संपून मी नोकरीच्या निमित्ताने घर सोडेपर्यंत तो सावलीसारखा सोबत राहिला. पुढेही भेटीगाठी कमी झाल्या; तरी ऋणानुबंध कसे संपतील?
            बल्लूप्रमाणेच ओमी आणि मी याच दिवसात काहीसे एकत्र आलो. ओमी म्हणजे ओंकार. एकाच वर्गात होतो आणि स्कॉलरशिप पास होणारांमध्ये तोही होता. पेठेत त्यांचे घर होते. त्यावेळी गावात अवघ्या चारजणांकडे टि.व्ही. आलेले होते. भला मोठा ब्लॅक अँड व्हाईट टि.व्ही. सरकती लाकडी दारे असलेला. त्याकाळात बी.आर. चोप्राच्या महाभारत मालिकेने लोकांना वेडे केले होते. विशेषतः आम्ही चिल्लरपार्टी तर डोळ्याची पापणीही न हलवता एकटकपणे त्यात हरवून गेलेलो असायचो. 'वर्गमित्र' एवढ्याशा वशिल्यावर दर रविवारी मी टि.व्ही. पाहण्यासाठी त्याच्या घरी जात असे. आता दोघांच्या समान आवडीचा एक दुवा जुळला होता. गोष्टींची पुस्तके. ओमीच्या घरी भलेमोठे किराणा मालाचे दुकान होते. दुकानाच्या मागील खोलीत माल ठेवलेला असे. तिथेच रद्दीचे गठ्ठेही ठेवलेले होते. कोळशाच्या खाणीतच हिरा सापडतो. तसे या रद्दीतून काही चांगली पुस्तके मिळत. मासिके असत. रविवारच्या रंगीत पुरवण्या असत. महाभारत संपले तरी रविवारी दुपारपर्यंत तहानभूक हरपून त्या ढिगार्‍यात बसून राहायचो. लहानपणीची ही दोस्ती खर्‍या अर्थाने पक्की अगदी घट्ट होईपर्यंत आमचे पाखिफुटे वय आले होते. वेडे होऊन बेभान जगण्याच्या काळात आम्ही पुन्हा एकत्र आलो. वेडेपणा काय असतो तो शब्दशः आणि अर्थशः आम्ही जगलो.

(क्रमशः)