मनाला कुरतडणारे अनेक प्रश्न ठेवून सुजित गेला होता. प्रश्न केवळ एकट्या सुजितचा नव्हता. अशाप्रकारचे अनेक प्रश्न कधी प्रत्यक्ष... तर कधी अप्रत्यक्षपणे आयुष्याने माझ्यासमोर वारंवार उभे केले. काहींची उत्तरे मिळाली... काहींची उत्तरे मिळण्यासाठी मात्र काही काळ जावा लागला. कधी काळाबरोबर प्रश्न बदलत राहिले... तर कधी प्रश्न उभे करणारेही बदलत राहिले... काहीवेळा तर प्रश्नांची उत्तरेही बदलत राहिली. यामुळेच आयुष्याच्या दिशाही बदलत राहिल्या.
माझ्या जीवनातील या पर्वात खूप काही घडून गेलेले आहे. आतापर्यंतचे पहिले दशक मी फार बाळबोध जीवन जगत आलो होतो. मी आणि माझा परिवार यापलीकडे असणाऱ्या भल्याबुर्या जगाची जाणीव मला आता कुठे होऊ लागली होती. दुनियादारीचे एकेक नवीन कंगोरे मला आता दिसू लागले होते. पाचवीत असतानाचीच गोष्ट आहे. या काही दिवसांत तोंड रंगवून राम, लक्ष्मण, सिता आणि मारुती बनून गाणी म्हणणारे चारदोन वेळा गावात येऊन गेले होते. सर्कसची मोठा पोंगा लावलेली, सजवलेली गाडी असते; तशी गाडीही येऊन गेली होती. रामाचे भलेमोठे चित्र त्या गाडीवर लावलेले होते. तिकडे दूर कोठेतरी दिल्लीकडे रामाचे अयोध्या नावाचे गाव आहे, हे मी ऐकलेले होते. असेच पूर्वी कधीतरी बाबर नावाच्या कुठल्यातरी माणसाने म्हणे, तेथील रामाचे मंदिर पाडून तिथे एक मशिद बांधलेली होती. कोण तो बाबर काळा कि गोरा पाहिलाही नव्हता. त्यावेळी तर माझा आपला असा समज झाला होता की, हा बाबर म्हणजे कोणीतरी रावणाचा वंशजच असावा. आपल्या पूर्वजांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठीच त्याने रामाच्या अयोध्येवर आक्रमण करून रामाचे मंदिर पाडले असावे.
आता तर म्हणे, काही लोक ती मशिद पाडून पुन्हा त्या जागेवर मंदिर बांधणार होते. त्यासाठी गावोगाव फिरून हे लोक इतर सर्व लोकांना 'चलो अयोध्या!' म्हणून आवाहन करत होते. आम्हांला काही एवढ्या दूर जाणे शक्य नव्हते. म्हणून मग आम्ही त्या गाडीच्याच मागे गावभर पळत 'मंदिर वहीं बनायेंगे' असे ओरडत फिरत आपली हौस भागवून घेतली होती. पण तसे तर मला आपले मनातून कुठेतरी असे वाटायचे की, एवढ्या लांब ते मंदिर बांधायला जाण्यापेक्षा येथेच गावात कुठेही मंदिर बांधले; तर बरे होईल की. निदान आम्हांला सगळ्यांना पाहायला तरी मिळेल. पण आमचे लहान पोरांचे कोण ऐकणार? मग शेवटी मीच आपला माझ्यापुरता निर्णय घेऊन टाकला.
दिवाळीच्या सुट्या लागल्यापासून माझ्या सुपीक डोक्यातून एकेक कल्पना उगवू लागल्या होत्या. परसात मोकळी जागा बरीच होती. बल्लू मदतीला होताच. सुट्टीही भरपूर होती. दरवर्षी दिवाळीत आम्ही जिथे किल्ला बनवायचो; तिथेच आमचा हा नवीन उद्योग सुरू झाला. काडीपेटीएवढ्या आकाराच्या चिखलाच्या विटा बनवून लहान लहान चपटे दगड फोडून मंदिर बांधणीचे काम सुरू झाले. वेणूही मदतीला आली होती. पुरे दोन दिवस खपून मंदिर उभे राहिले. शेजारी छोटा तलाव व बगिचाही बनवून झाला. पोत्याचे तुकडे चिखलाने माखून त्यावर आळीव टाकून बाग बनवली होती. दररोज पूजा, चुरमुरे-फुटाण्याचा प्रसाद असा कार्यक्रम ठरलेला होता. गल्लीतील व वर्गातील बरेचजण यानिमित्ताने खेळायला येत होते. दिवाळीचा सण संपला आणि ऊरुस सुरू झाला. आजही मला आश्चर्य वाटते, तिकडे बाबरी मशिद व राममंदिरावरून वातावरण तापायला सुरुवात झाली असली, तरी गावात मात्र काहीही फरक पडलेला नव्हता. कोणीतरी एकाने दर्ग्यापुढच्या कडूनिंबाच्या झाडावर एक हिरव्या रंगाचा झेंडा लावलेला होता. त्यावर चंद्राची कोर व चांदणी होती. तर वेशीच्या भिंतीवर हातात धनुष्य घेतलेला राम आणि त्याखाली 'मंदिर वही बनायेंगे!' या लिहिलेल्या ओळी असलेला कटआऊट असूनही यावर्षीचा ऊरुस सालाबादप्रमाणेच व्यवस्थित पार पडला.
आम्ही बर्याचजणांनी लवचिक काठ्यांचा वापर करून धनुष्ये व चिपाडाच्या सरकाळ्यांचे बाण बनवले होते. रंगीबेरंगी बेगडाचे कागद चिकटवून त्यांची सजावट केलेली. ऊरुसातूनही एकदोघांनी धनुष्यबाण विकत घेतलेले होतेच. खेळता खेळता रामलीलेची तयारी सुरू झाली. वह्यांच्या पुठ्याचे टोप बनवून चमकी कागद चिकटवून सजावट करण्यात आली. प्लास्टिकच्या मोठ्या चेंडूत काठी खुपसून मारुतीची गदा बनवण्यात आली होती. त्यालाही चमकी कागद चिकटवून सजवण्यात आले. ऊरसातूनही खेळणी घेताना आमच्या डोक्यात रामलीलाच होती. कोणी तांबड्या रंगाचे मारुतीचे मुखवटे घेतले होते. काहींनी फुग्याच्या गदा घेतल्या होत्या. तयारी जंगी झाली होती. आता एकच अडचण उरली होती... रावण. रावणाच्या दहा तोंडाचे काय करायचे? सुध्या याबाबतीत फार तयारीचा. त्याने कुठूनतरी लग्नात नवरदेवाला बांधतात ते बाशिंगच आणले. रंगीत कागदाचे दहा गोल कापून एका पट्टीवर चिकटवले आणि पट्टी बाशिंगाला. झाला रावण तयार.
पोरांचा काहीतरी खेळ चाललाय, म्हणूनच सगळी मोठी माणसं आमच्याकडे सुरुवातीला पाहत होती. पण एकेक दिवस जाईल; तसतशी आमची तयारी बघून मग मात्र मोठ्यांचाही हुरूप वाढला होता. सगळे कौतुकाने पाहत होते. काही मदत हवी का? म्हणून आडून आडून विचारतही होते. पण मला हा खेळ आमचाच व्हायला हवा होता. म्हणून तयारीही आमची आम्हीच केली. सुट्टीच्या शेवटच्या दिवशी तर जंगी कार्यक्रमच आखलेला होता. गल्लीतच मिरवणूक काढायचे ठरलेले असतानाही शेजारच्या दोन तीन गल्ल्या फिरून आलो. शब्बूआपाच्या दारातून जाताना तर तिने दोन बोटांचा गोल करून 'छान जमलंय!' असे म्हणून कौतुकाने हसलीही होती. अर्थातच राम मी झालो होतो, बल्लू हनुमान बनला होता, वेणूशिवाय सिता दुसरे कोण बनणार? सुजित लक्ष्मण झाला होता आणि रावण सुध्या. मला भेटलेला हा 'रावण' पुढे माझा जिवाभावाचा दोस्त बनला.
या राममंदिराइतकाच आणखी एक कळीचा मुद्दा माझ्यासमोर उभा राहिला होता. साधारण दिवाळी सुट्टीनंतर माधवमामाला मी पत्र लिहिले होते. पहिल्यांदाच मी असे कोणाला तरी पत्र लिहित होतो. गुरुजींनी पत्रलेखन शिकवले; तेंव्हा गुरुजी म्हणाले होते, तुमच्या परगावी असणाऱ्या एखाद्या नातेवाईकाला आता असे पत्र तुम्ही लिहू शकता. परंतु हे पत्र लिहिण्यामागे केवळ एवढे एकच कारण नव्हते. खरं तर माधवमामाला मला काहीतरी वेगळेच सांगायचे होते. पण पत्रात ते सारे लिहिण्याचे माझे धाडस झाले नाही. तरीही तो दिवाळीत घरी आला होता तेंव्हा मी त्याला ते सांगण्याचा प्रयत्न केला होता.
"मामा, मी शब्बूआपाच्या घरी गेलो होतो."
"बरं मग?"
"ती सांगत होती."
"काय?"
"तिला पाहायला पाहुणे आले होते ऊरुसाच्यावेळी."
"हं...!"
"तिच्या घरचे आता तिचे लग्न करणार आहेत. आपल्या घरचे पण तुझे लग्न करायचे म्हणाले, तर तू नाही म्हणू नकोस."
तो फक्त हसला. मला म्हणाला, "गब्बरसिंग, वेडा आहेस काय तू? मला बोललास ते ठीक आहे. घरात कोणाला असे काही बोलू नकोस."
"मी कशाला कोणाला काय बोलतोय?"
माधवमामा आला होता; तेंव्हाच घरात त्याच्या लग्नाची तयारी चालली होती. परंतु माधवमामा मात्र 'आताच लग्न करायला नको' म्हणत होता. अजून काही महिने तरी त्याला गोव्यात राहावे लागणार होते. तिकडून आल्यावर पाहू, असे म्हणून तो लग्नाचे पुढे ढकलत होता. मला आपले उगीचच वाटत होते, माधवमामाने पटकन लग्न करावे... आणि शब्बूआपाच मामी बनून घरी यावी. मामाची सुट्टी संपल्यानंतर मामा निघून गेला. माझीही शाळा सुरू झाली. ध्यानीमनी नसतानाही अचानक एके दिवशी मोठेमामा माईला सांगत असताना मी ऐकले. शब्बूआपाचे लग्न ठरले होते. माझे स्वप्न संपले होते. म्हणूनच मी मोठ्या निराश मनाने माधवमामाला पत्र लिहिले. पत्रात बरंच काही लिहायचे होते. ते धाडस झाले नसले; तरी शब्बूआपाचे लग्न ठरले. एवढे एक वाक्य लिहिलेच. माझे पत्र पाहून मामा खूप खूष झाला होता. एवढ्या लहान वयात मी चांगले लिहिलेय, याचेच त्याला कौतुक होते. अॉफिसमध्येही त्याने त्याच्या साहेबांना पत्र दाखवले होते. मी फक्त पाचवीत शिकतोय, हे कळल्यावर साहेबांनाही कौतुक वाटले म्हणे.
आम्ही राममंदिर बांधले, मिरवणूक काढली. खूप धमाल केली. पण राममंदिराचा प्रश्न एवढा भयाण असेल, असे कधीच वाटले नव्हते. महिनाभरातच रेडिओवरून, वर्तमानपत्रातून एका मागोमाग एक बातम्या येऊन धडकू लागल्या. अयोध्येतील बाबरी मशिद पाडण्यात आली होती. सगळीकडे गोंधळ उडाला होता. कालपर्यंत एकमेकांच्या गळ्यात गळे घालून फिरणारे लोक एकमेकांकडे संशयाने पाहू लागले. राम आणि रावणाच्या युद्धानेसुद्धा वातावरण ताणले नसेल; इतका हिंदू आणि मुस्लीम यांच्यात तणाव दिसू लागला. कायम कुठे ना कुठे दंगे झाल्याच्या चर्चा ऐकायला मिळत होत्या. अशातच मुंबईला बॉम्बस्फोट झाले आणि खूप मोठ्या प्रमाणात दंगली सुरू झाल्या. रोजच काही ना काही ऐकायला येऊ लागले. त्यातले काही कळत नसले; तरी कानावर पडणाऱ्या चर्चेला उधाण आले होते. कुठेही चार लोक बसलेले असले की, हमखास एवढा एकच विषय कानावर येत होता. आजपर्यंत गावात कधीच तणाव निर्माण झालेला नव्हता. तरीही गावातील मुसलमानांची माणसं धास्तावलेली दिसत होती. असुरक्षिततेच्या भावनेतून त्यांच्यात कमालीची एकी दिसू लागली. मुसलमानांची पोरं फक्त ईद, ऊरुसाच्या वेळी टोप्या घालायची, ती आता सर्रास टोप्या घालून फिरू लागली. दररोज मशिदीत जाऊ लागली. हिरवे साफे डोक्याला गुंडाळलेले व कोरीव दाढ्या ठेवलेली काही बाहेरची माणसंही बर्याचवेळा दर्ग्यात येऊन गेली. त्यांचे पाहून गावातील पोरांनीही दाढ्या ठेवायला सुरुवात केली. हे पाहून बिथरलेल्या काही हिंदू पोरांनी घराघरांवर, चौकाचौकांतल्या झाडांवर भगवे झेंडे लावले. या बदललेल्या वातावरणात माझे शब्बूआपाच्या घराकडे चक्कर मारण्याचेही धाडस झाले नाही. सगळे एकदम अनोळखी वाटू लागले.
राममंदिरावरून झालेल्या गदारोळापेक्षा रामायण परवडले. रावण दुष्ट असेल, क्रूर असेल, अहंकारी असेल; पण त्याच्याकडे नीतिमत्ता होती. रावण बनने तरी कुठे सोपे आहे? रावणासारखा धार्मिक विद्वान पंडीत त्यावेळी दुसरा कुठे होता? पित्याच्या वचनासाठी वनवासाला जाणारा राम पुरुषोत्तम होता. बंधुप्रेमापोटी हसत हसत वनवास स्वीकारणारा लक्ष्मण आणि पतीच्या मागे सावलीसारखी जाणारी पतीपरायण सीता आपापल्या कर्तव्याचे पालन करण्यात पुरुषोत्तमच ठरले. पण रावण? आज स्वतःच्या घरातही सुरक्षित राहील याचीही खात्री देता येणार नाही, अशी स्त्री रावणासारख्या असुराच्या नगरात सुरक्षित होती. रावणाला मारून सीतेची सुटका हा रामाचा पराक्रम असेलही. पण ती सीता सुखरुप मिळाली, यातच रावणाचे मोठेपण होते. रावणामध्ये अहंकार होता; तसा पश्चात्तापही होता. सीतेला पळवून आणूनही तिच्या संमतीशिवाय जबरदस्तीने आपलेसे न करण्यात त्याचा संयम होता. रामा, तुझ्या काळातील रावण फार चांगला होता. आज दुर्योधन, दुःशासनालाही लाजवतील असे लोक पावलोपावली आढळतील. कित्येक द्रौपदींचे खुलेआम वस्त्रहरण होतेय. धर्म या शब्दाचा अर्थही न कळणारे धर्माच्या नावावर एकमेकांच्या रक्ताचे तहानलेले आहेत. मनाला सात्त्विक बनवणारी प्रार्थनास्थळे आज बाजार बनली आहेत. भक्तीचा बाजार मांडून स्वतःच्या पोटापाण्याचा व्यवसाय बनवणारे दलाल धर्मवेत्ते बनले आहेत. आज राम-रावणाच्या नावाने भांडणारे त्यांच्या पासंगालाही पुरणार नाहीत.
हे सगळे वातावरण थंड होईपर्यंत गणपती आले. गणपतीच्या सोबत यावेळी पाऊसही होता. दहा दिवस गुलालाच्या जोडीने पावसाचीही उधळण चालली होती. गणरायाला निरोप देऊन मिरवणूकीत नाचून थकलेली माणसं घरी जाऊन पडली होतीच. झोपेने जरा कुठे स्वप्नांचे मोरपीस डोळ्यांवरून फिरवले होतेच. तेवढ्यात जमीन शहारली. घरावरील छत थरथरू लागले. फळीवरची भांडी गडबली. कोणीतरी हलवून जागे करावे तसे माणसं जागी झाली. काहीतरी घडतेय, हे कळेपर्यंत काहीजण बाहेर धावली, तर बाकीचे काय गोंधळ आहे, हे पाहायला बाहेर आले. मी माईजवळ झोपलो होतो. हा प्रकार सुरू झाल्यावर माई मला आपल्या कुशीत घट्ट धरून राहिली. लाईट गेल्यामुळे सगळीकडे अंधार पसरलेला होता. आबई चाचपडत जवळ आली. घरात भांडी पडल्याचा आवाज येत होता. मोठ्यामामाने हाका मारून सर्वांना बाहेर बोलावले. बाहेर येऊन पाहतो, तर सगळी गल्लीच बाहेर रस्त्यावर आलेली होती. घोळक्याने उभे राहून लोक आपापसात बोलत होते. मला एवढेच कळले, हा भूकंप होता. आतापर्यंत हा शब्दही कधी ऐकलेला नव्हता. दंगल असो कि भूकंप... सगळ्या भयानक गोष्टी कशा जुळून आल्यासारख्या घडत होत्या.
सकाळपर्यंत पुन्हा कोणी झोपलेच नाही. त्यानंतरही दोनतीनवेळा जमीन थरथरत राहिली. सकाळच्या रेडिओवरील बातम्यातून कळले की, लातूरजवळील किल्लारी येथे या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. संपूर्ण गावच मातीच्या ढिगार्याखाली गाडले गेले होते. जवळपासच्या गावांचीही दुरावस्था यापेक्षा वेगळी नव्हती. यापूर्वी कोयनेलाही भूकंप झाला होता म्हणे; परंतु त्यावेळी एवढे नुकसान झालेले नव्हते. काळाने आपले खरे विकट रूप दाखवले होते.
पहिल्यांदाच ऐकलेल्या 'भूकंप' या शब्दावर पुढील पंधरा दिवसांत पूर्ण ग्रंथ भरेल एवढे लोकांच्या चर्चेतून ऐकायला मिळत होते. लोकांना चर्चेला आता नवीन विषय मिळाला होता. लोकांची स्मरणशक्ती फार अल्पकालीन असते. भूकंपाचा विषय मिळाल्यावर मंदिर, मशिद, दंगल हे शब्द असे गायब झाले की, जसे कधी ते ऐकलेच नाहीत. दिवसभर गावगप्पांना ऊत आला होता; तर रात्री घरात झोपायला कोणीच तयार नसल्यामुळे अंगणातील चर्चांना उधाण आले होते.
माई सांगत होती, ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर टेकलेली आहे. पापाचे ओझे वाढलेय. मधल्या झालेल्या दंगलीमुळे तर तो शेषनाग शहारला नसेल? किल्लारीसारखा सधन गाव एका क्षणात स्मशानभूमी बनला. कित्येकांना संजीवन समाधी मिळाली. लहानथोर असा भेदभाव मरणानेही केलाच नाही. बाळाच्या तोंडात पान्हा ठेवून आई गेलेली होती. आयुष्याच्या मावळतीला म्हातारीबी मेली होती. फार मोठा घाला नशिबाने घातलेला होता. पापणी लवेपर्यंत होत्याचे नव्हते करण्याचे सामर्थ्य फक्त निसर्गाकडेच. माणूस त्यापुढे फार क्षुद्र आहे. तरीही आपल्या क्षुद्रपणाचा कळस माणसातील हैवानांनी गाठला. मदतकार्याच्या निमित्ताने गेलेल्या काहीजणांनी मातीच्या ढिगार्याखाली अडकलेल्यांना वाचवण्याऐवजी कुठे पैसा दागिने सापडतोय का? याचा शोध सुरू केला. प्रेताच्या मांसासाठी उतरलेली गिधाडे आणि प्रेताच्या अंगावरच्या ऐवजासाठी टपलेली माणसं एकाच पातळीवर आले होते. पाषाणालाही पिळवटून टाकेल अशा हृदयद्रावक प्रसंगी पत्थरदिल माणसं पाहायला मिळत होती. परदेशातूनही मदतीचा ओघ चालूच होता. पण चाळणीच्या नियमाप्रमाणे सगळी मदत तिथपर्यंत पोहचलीच नाही. पुढील महिनाभर निर्वासित झालेली माणसं गावोगाव फिरून आसरा शोधत होती. त्यांच्या तोंडून आपबिती ऐकताना अंगावर काटा फुलत होता.
दिवाळी आली; तरी माणसं अजून सावरलेली नव्हती. लावायचे म्हणून चार दिवे दारात जळत होते नि पोरासोरांसाठी म्हणून चारदोन गोडधोडाचे पदार्थ केलेले होते. ही दिवाळी काही गोड झाली नाही. गेल्यावेळी रामलीला होती. यावर्षी काही करावेसे वाटलेच नाही.
(क्रमशः)



