Saturday, 7 May 2016

१३...

         वाह! काय भारी दिवस होते तेंव्हाचे...! भारीच! रेडिओचे अप्रूप असण्याच्या त्या काळात टि.व्ही. नावाचा पेटारा आला होता. अलिबाबाच्या गुहेतील पेटार्‍यात नसेल असा खजिना या पेटार्‍यात होता. रविवारी सकाळी रंगोलीच्या हिंदी जुन्या गाण्यांसोबत आमची सकाळ सुरू व्हायची. साडेआठ वाजता 'चड्डी पहनके फूल खिला है'... म्हणत धावणारा मोगली म्हणजे आमचा एक संवगडीच बनला होता. तो, भालू, बघिरा जाम जावडायचे. शेरखानचा मात्र दरारा वाटायचा. आजही नाना पाटेकरचा आवाज ऐकला की, शेरखानच आठवतो. एकात एक वर्तुळे फिरता फिरता दूरदर्शनचा लोगो तयार व्हायचा. त्यानंतर सुरू व्हायचे महाभारत. श्रीकृष्ण शंख वाजवू लागला की, आम्ही संजयची दिव्यदृष्टी घेऊन कुरुक्षेत्रावर पोहचायचो. संस्कृत कशाशी खातात? हेसुद्धा माहीत नव्हते, त्या काळात 'यदा यदा ही धर्मस्य...' हा श्लोक तर ऐकूनच पाठ झाला होता. काय ते भीष्म पितामह... तो बलदंड भीम... आणि तसाच दणकेबाज दुर्योधन... शकुनीचा तर असा राग यायचा ना! बस्! कृष्णाचे गालातल्या गालात हसणे असो कि कर्णाची तडफड... खरे महाभारत यापेक्षा वेगळे असूच शकत नाही, यावर आमची गाढ श्रद्धा होती. 'मिले सूर मेरा तुम्हारा...' या गाण्यातील वेगवेगळ्या भाषा कळत नसल्या; तरी भारताच्या विविधतेतील एकतेची ओळख तेंव्हाच झाली होती. 'निन्ने स्वरगूम, होमार शूर तोमार शूर...' असले भारी काहीतरी आम्ही म्हणत राहायचो. सायंकाळी मराठी सिनेमा पाहिला की, रविवारचा दिवस सत्कारणी लागला असे वाटे. पुन्हा सुरू व्हायचे आठवडाभर पुढच्या रविवारची वाट पाहणे.
          टि.व्ही.वर मुंग्या येऊ लागला किंवा चित्र वरवर पळू लागले की, नऊ काड्यांच्या भल्या उंच अँटेनावर कावळा बसलाय, असले अंदाज परफेक्ट जुळायचे. रेडिओवर लागणारी आपली आवड आणि बिनाका गीतमाला ऐकता ऐकता बालपण उमलत होते. मोठ्या भसाड्या आवाजात आम्हीही गाण्याच्या भेंड्या खेळायचो, तेंव्हा हीच तर गाणी तोंडात असायची. शब्दांची पार वाट लावून टाकलेली असायची. 'कुण्या गावाचं आलं पाखरू' म्हणताना ते पाखरू डौलात बसण्याऐवजी देवळात बसे. सून साहिबा सून म्हणताना कोणत्या साहेबाची सून आहे, हे कधीच कळायचे नाही. परदेसियाँचे आम्ही 'पडदे शिवा' करून टाकले होते. दिवाळीत ऊरसाच्या वेळी गावातील तरुण मंडळाची पोरं नाटक बसवायची. मोठ्या पडद्यावर एखादा सिनेमा दाखवला जायचा. ग्रामपंचायतीच्या, तलाठी अॉफिसच्या, पोलीस स्टेशनच्या फळ्यावर लिहिलेल्या नाटक सिनेमाच्या जाहिराती पाठ होऊन जायच्या. गावभर गाडी गाडी खेळत मोठमोठ्याने ओरडत आम्ही फिरून यायचो. याल तर हसाल, न याल तर फसाल. दुसऱ्या दिवशी शेजार्‍यांना पुसाल... अशी जाहिरात करून टाकायचो. आमच्या लेखी सगळेच नाटक सिनेमे हे तीन अंकी तुफान विनोदी, कौटुंबिक आणि सामाजिक असत.
           तालुक्याच्या गावी म्हणजे बार्शीत आलेल्या सर्कसची जाहिरात करण्यासाठी सर्कसवाल्यांची मोठा स्पीकर लावलेली गाडी यायची. गाडीच्या मागे पळून पाच-पंचवीस रंगीत जाहिराती गोळा करेपर्यंत जिवाला चैन नसे. एकदा शाळेत अशीच काहीतरी चूक घडली होती माझ्याकडून. पोरं गुरुजींना नाव सांगतो म्हणू लागली. मग पोरांना याच रंगीबेरंगी जाहिराती देऊन त्यांची तोंडे बंद केली होती. सगळ्या जाहिराती वाटून संपल्यानंतर एकजण उरलाच. त्याला दुसरे काही देण्याची तयारी दाखवली. त्याला मात्र जाहिरातीच हव्या होत्या. शेवटी काही पर्याय उरलाच नाही. तो तक्रार घेऊन गेला. पण इतरांनी मात्र माझ्याच बाजूने साक्ष दिली. तो खरे सांगत असूनही खोटा पडला आणि मी दोषी असूनही निर्दोष ठरलो. नकळत्या वयातील या साध्या घटनेने खूप काही शिकवले. प्रत्येकाला भूक असते आणि पोटही असते. काहीतरी खाऊ घालायला लागते. कोणी खात नसेल; तर वेगवेगळ्या पद्धतींनी त्याचे तोंडही बंद करता येते.
          काही अडचणी मात्र भलत्याच खोड्यात अडकवतात. एका मित्राकडे शेतात हुरडापार्टीचे नियोजन होते. वर्गातले दोघेतिघे जाणार होते. त्याने मलाही बोलावले होते. अर्थातच माझीही जायची खूप इच्छा होती. परंतु एक अडचण होती. नेमकी त्या दिवशी शाळा होती. घरच्या मंडळीनी शाळा बुडवून मला पाठवणे शक्यच नव्हते. घरून परवानगी मिळणे दुरापास्त आहे, याची खात्री होती. जावे तरी कसे? हा प्रश्न सुटणारा नव्हता. एक मन मागे ओढत होते, तरीही दुसऱ्या मनाची जायची  इच्छा सुटत नव्हती. मित्र मधल्या सुट्टीत जायला निघाल्यावर तर फारच उलाघाल होऊ लागली. 'भित्री भागूबाई' म्हणून मित्र हुलीवर घालत होते. एकाने शक्कल चालवली. शाळा सुटेपर्यंत परत येऊ. कोणाला कळणारही नाही. हा पर्याय त्यातल्या त्यात बरा होता. शाळा सुटेपर्यंत परत यायच्या बोलीवर मी चक्क दांडी मारली. आम्ही चारपाचजण ओढ्यातून बोरे खात हुरडापार्टी जिथे होणार होती, तिथे पोहचलो. आमच्या दुप्पट उंचीच्या वाढलेल्या ज्वारीतून बांधावरून जाताना फारच टेरिफिक वाटत होते. कोणीतरी विचारलेही.
"काय रे पोरांनो! मास्तरांना अन् घरच्यानला सांगून आलाय ना रं?"
तिथे कोणीतरी मोहळ झाडलेले होते. तो मध खायच्या आशेने त्याच्यावरची नजरही न हटवता आम्ही खोटीच मान हलवली. खूप धम्माल आली. हुरड्यासोबत खायला काय एकएक पदार्थ होते. शेंगदाण्याची, लसणाची चटणी, गूळ, शेवचिवडा, खोबर्‍याच्या वड्या. वेळेचे भानही राहिले नाही. ऊन संपून सूर्य कलू लागला; तेंव्हा आपण घरी जायला हवे, याची आठवण झाली. एवढी रंगलेली मैफिल सोडून उठायला एकही जोडीदार तयार नव्हता. आलेल्या वाटेने उभ्या ज्वारीतून तेही एकट्याने जाणे माझ्या ताकदी बाहेरचे काम होते. शाळा सुटल्यावर सगळी मुले घरी जातील; तेंव्हा काहीतरी रामायण उभे राहील, याची जाणीव होऊ लागली होती. पण तरीही नाइलाज झाला होता.
          इकडे मी शाळेतून घरी आलो नाही म्हटल्यावर माई मला पाहायला शाळेत गेली. आता तिथे कोण असणार होते? वाटेने दिसेल त्या पोराकडे चौकशी सुरू झाली. कोणालाच काही माहीत नव्हते. शाळेला दांडी मारायची म्हणून एकतर गुपचूप आम्ही सटकलो होतो. त्यात वर्गातील एकाने मी मधल्या सुटीपासून शाळेतच नव्हतो; म्हटल्यावर घरच्या सगळ्यांचे धाबे दणाणले. सरकारवाडा, पिंपळाचा पार, मंदिर जिथे मी सापडू शकेल; अशा सर्व जागा शोधून झाल्या. घरातील सगळेच जण कामाला लागले. शेजारचीही काही उत्साही मंडळी शोध मोहिमेवर बाहेर पडली. एकटी सुनितामामी शिरीषला घेऊन घरी होती. बाकीचे सारेच वेगवेगळ्या ठिकाणी माझा शोध घेत होते. जसजसा वेळ जाऊ लागला; तशा नाना शंकाही बळावू लागल्या. त्यात भेटणारा माणूस काही वेगळेच सुचवायचा. मग तर घरचे आणखीनच हवालदिल झाले. नदी, डोह, आसपासच्या विहिरीसुद्धा पाहून झाल्या. काही दिवसांपूर्वी माझ्या वर्गातलाच एकजण पोहायला म्हणून गेला; तो बुडून फुगूनच वर आला होता. हा प्रसंग ताजा असल्यामुळे तर घरच्यांच्या तोंडचे पाणीच पळाले. थोड्या थोड्यावेळाने प्रत्येकजण घरी येऊन मी आलोय का याची खात्री करत होता. 'नाही' म्हटल्यावर तोंड बारीक करून पुन्हा शोधायला बाहेर पडत होता. मोठेमामा वेगळीच शंका आल्यामुळे बार्शीच्या एस. टी. स्टँडपर्यंत पाहायला गेले. माईला तर खात्रीच झाली होती, मला माझ्या बापाने पळवले म्हणून. घरात रडारड सुरू झाली. मुकूंदमामाला कोणीतरी सांगितले की, माझ्या वर्गातील दोघेचौघे हुरडा खायला जाणार होते. कदाचित मी तिथेच सापडेल, या आशेने मुकूंदमामा तिकडे यायला निघाले. तोपर्यंत अंधार पडू लागला होता.
          आज खूप मज्जा केली, यावर मित्रांच्या हसून गप्पा चालल्या असल्या; तरी फक्त शरीराने मी त्यांच्यासोबत होतो. मनाने तर मी केंव्हाच घरी पोहचलो होतो. आता घरी गेल्यावर कोणत्या परिस्थितीला तोंड द्यावे लागेल, याची आतून कुठेतरी जाणीव होत होतीच. फक्त आता सांगायचे काय आणि कसे? याचीच मनाशी जुळवाजुळव चालली होती. यापुढे असला नसता उद्योग पुन्हा कधी करायचा नाही, हेही मनाला वारंवार बजावून झाले होते. अर्ध्या वाटेतच नेमके मुकूंदमामाला समोरून येताना बघून थोडेसे हायसे वाटले. मोठेमामा असते; तर काही बोलायची गरजच पडली नसती. अगोदर एक कानाखाली बसली असती. मग चौकशी.
          जवळ आल्यावर माझे दप्तर आपल्या हातात घेऊन मामाने मला पुढे ओढले. मी आपले उगीचच काहीतरी स्पष्टीकरण द्यायचे म्हणून तोंड उघडले खरे! पण तोंडातून काही आवाज निघायच्या आतच खाडकन् गालावर फटाका फुटला. कानातून 'गुङ्गsss!' एवढाच आवाज येत राहिला. मला उचलून खांद्यावर घेऊन काही न बोलता मामा घरी आले. घरातले वातावरण पाहून खूप मोठे वादळ येऊन गेल्याच्या खुणा दिसत होत्या. कधी न रागावणार्‍या मुकूंदमामाने ते मारले; आता मोठेमामा कच्चा खाऊन टाकणार, हे उघड होते. पण नशिबाने मोठेमामा घरी नव्हते. माझ्या थोडासा जिवात जीव आला खरा. आबईने मला पाहायचा काय तो अवकाश होता. मुकूंदमामा कोणालातरी सांगत होते. 'हुरडा खायला चावरात गेला होता.' आबईने तेवढेच ऐकले. तरातरा बाहेर जाऊन परसातील सिताफळाची फांदी तोडली. 'ओल्या फोकाचे पडणे' म्हणजे काय? हे तेंव्हाच समजले. कोणी मला सोडवायला लवकर मध्ये पडले नाही. कुसूममामी येईपर्यंत अंगावर कुठे कुठे फटके बसत होते, हेही समजले नाही. मामीने मला सोडवून पाठीशी घातले. तरीही मामीच्या हातून ओढून घेऊन आबईने मला पकडले आणि जवळ पडलेल्या दाव्याने हातपाय बांधून भिंतीवरच्या खुंटीला अडकवले. आबईचा अवतार बघून मला सोडवण्यासाठी सगळे लांबूनच तिला समजावत होते. मोठेमामा येईपर्यंत अधूनमधून मला फटके पडतच होते. खुंटीला टांगल्यामुळे हातपाय सांध्यातून उपसून निघतील कि काय? असे वाटत होते.
"माई, पुन्हा नाही असं करणार. आता एवढ्या वेळ सोड."
अशी विनवणी केल्यावर मोठ्यामामाने मला सोडले. नशीब त्यांनीही मारले नाही. सुटका तर झाली; परंतु कोणाकडेही पाहायचे धाडस होईना. खूपच लाजिरवाणे वाटत होते. असे वाटायचे सगळे माझ्याकडेच पाहत आहेत. त्यानंतर कितीतरी वेळ माईच्या कुशीत तोंड लपवून मी रडत राहिलो.
          मी शाळा बुडवायला नको होती. घरच्यांना न सांगता परस्पर असे कुठे जायला नको होते. हे सगळे पटतेय मला. पण घरचे इतके चिडतील, असे वाटले नव्हते मला. यापुढे अशी वेळ पुन्हा येऊ नये म्हणून धसकाच घेतला मी. नदीचे दोन तीर पाण्याच्या प्रवाहाचे नियंत्रण करत असतात. एकीकडे जागी होणारी ईर्ष्या आणि दुसऱ्या बाजूने घरातील शिस्त माझ्या प्रवाहाला वळण देत राहिले.
          आबई मला मारत असताना अनेकांनी पाहिले होते. त्यामध्ये वेणूही होती. वेणूने मी मार खाताना मला पाहायला नको होते. तिच्यासमोर माझ्या इज्जतीचा फार कचरा झाला होता. पुढचे दोनतीन दिवस मी तिला टाळतच होतो. नाहीतरी तसेही मोठे होईल तसे आमचे एकत्र खेळणे कमी होत चालले होते. मुलींसोबत खेळताना दिसले; तर बाकीची मुलं चिडवायची हा भाग होताच. मलाही बल्लू, ओमीसारखे माझे नवीन संवगडी मिळत चालले होते. त्यामुळे वेणूच्या सोबतीची तेवढी गरज उरलेली नव्हती. पण वेणूला मात्र मी कायम हवा असायचो. एक तर मी खूप हुशार असल्याचा तिलाच फार अभिमान होता. अभ्यासात तिला कायम माझी मदत हवी असायची. माझ्यामुळेच तर तिचा अभ्यास पूर्ण होई. त्यासाठी मी सांगेल ते काम करायला ती तयार असे. घरातून काही खाऊ मिळाला की, मला पोहचवण्यासाठी तिची धडपड असे. खरं सांगू का? अलीकडे वेणूची सलगी मला नको झाली होती. हुरडा खायला जाताना आम्ही किती धमाल केली, हे तिला सांगायचे होते. ओढ्याला बोरे किती खाल्ली, वाढलेल्या ज्वारीतून कसे न घाबरता गेलो, मोहळाचा मध खाल्ला... हे सगळे तिला सांगावेसे वाटत होते. पण आबईने मारलेले आठवायचे आणि ती आठवण पुन्हा नको म्हणून बोलणेच नको. तेवढ्यासाठी तर आणलेली बोरेही तिला दिली नाहीत. दुसऱ्या दिवशी शुभाताईलाच बोराचा वास आल्यावर तिने काढून घेतली. वेणूला टाळण्यासाठी आणखी एक कारण सापडले. माधवमामाने मागे एकदा आमच्या दोघांचा एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढला होता. तो फोटो पाहून तर अनेक दोस्तांनी मला चिडवले होते. म्हणूनच मीही फक्त घरी असतानाच तिच्याशी बोलायचो. आता तर तिच्यासमोरच मला मार खावा लागला होता.
          नेमके थोड्याच दिवसांत मी भाषणाची स्पर्धा गाजवली. सगळेच मागचा झाला प्रकार विसरून गेले होते. यावेळी झालेल्या कौतुकाने माझी गेलेली इज्जत पुन्हा मिळाली होती. ज्या ज्या मुलांचे नंबर आले होते; त्या सर्वांची प्रमाणपत्रे व बक्षिसाची पाकिटे देऊन प्रार्थनेच्यावेळी गुरुजींनी अभिनंदन केले होते. स्पर्धेनंतर मी आजारी पडल्यामुळे दोन दिवस शाळेत गेलो नव्हतो. शुभाताईही आता हायस्कूलला जात होती. त्यामुळे मी नसताना माझे बक्षीस वेणूनेच जाऊन स्वीकारले. एवढेच नाही तर घरी आल्यावर सगळा कौतुकसोहळा अथःपासून इतिःपर्यंत रंगवून सांगितला होता. बक्षीस तर माझेच होते; पण स्वीकारण्याची संधी वेणूला मिळाली होती. याचाही तिला स्वतःलाच बक्षीस मिळाल्याइतका आनंद झाला होता.
           माझा स्कॉलरशिपचा निकाल आला, तेंव्हा कौतुकात भरच पडली. भले गुणवत्ता यादीत नंबर नसेल आला; पण तिथपर्यंत पोहचून पास तर झालो होतो. एकूणच काय चुका करून शिक्षा भोगायची आणि स्वतःचा अपमान करून घ्यायचा. यापेक्षा चांगले काही करून कौतुक करून घेण्यातच मजा असते, याची जाणीव झाली होती. यापुढे चुका होणारच नव्हत्या, अशातला भाग नव्हता. पण काही घडलेच; तरी त्या सावरून कशा न्यायच्या, याचेही तारतम्य येऊ लागले.
          बरोबर वर्षभरानंतर अक्षयतृतीयेच्या वेळी पंधरा दिवसाची सुटी घेऊन माधवमामा आला होता. भाषण स्पर्धेचा व स्कॉलरशिपचा निकाल ऐकून त्यानेही कौतुक केले. पण मी मार खाल्ला होता, हे शुभाताईकडून त्याला कळले असावे. तो आबईला रागावला. मलाही रागावला.
"लेका, जायचं तर सांगून जायचं. हुरडा खाऊन वरून मारबी खाल्लास!"
         परसात एक भोपळ्याचा वेल होता. एक बियासाठी राखलेला भोपळा वाळून कोळ झाला होता. माधवमामाने काथ्याने भोपळा विणून त्याचा बिंडा वनवला. मला म्हणाला, "गब्बरसिंग, बिंडा तर बनिवला, पण विहिरीला पाणी आहे का? उद्या मळ्यात जाऊ. तुला पोहायला शिकवतो."
          गल्लीतली आम्ही चारपाच पोरं माधवमामासोबत पोहायला जाऊ लागलो. आमच्या विहिरीपेक्षा पिराच्या विहिरीत पाणी बरे होते. मग आम्ही रोजच पिराच्या विहिरीवर जात राहिलो. पोहायला शिकायला सुरुवात केली त्याच्या दुसऱ्या का तिसर्‍याच दिवशी संध्याकाळी त्याने मला शब्बूआपाच्या घरी काहीतरी निमित्त काढून पाठवले. शब्बूआपाच्या शेताजवळच पिराची विहीर असल्यामुळे मीही आम्ही पोहायला तिथे जात असतो, हे बोलताना सांगून टाकले. त्यानंतर माधवमामाची सुट्टी संपेपर्यंत आम्ही पोहण्यात तरबेज झालो. शब्बूआपा पण त्यानंतर रोजच विहिरीवर येत होती. माझ्या पोहण्याचे तिला कौतुक वाटायचे. म्हणून मीही तिला दाखवण्यासाठी पहिल्या दुसऱ्या करत करत पाचव्या पायरीवरून उड्या मारू लागलो. माधवमामा थोडावेळ पोहून तिथेच विहिरीत पायर्‍यावर शब्बूआपाबरोबर गप्पा मारत बसायचा. आम्हांलाही पोहायला तेवढाच जास्त वेळ मिळायचा. माधवमामा, शब्बूआपा व आम्ही सगळेच काहीतरी जोक करून खूप हसायचो. आपा आधीच गोरी होती. उन्हातून आल्यावर लालबूंद झालेली असायची. हसताना तिच्या नाकाचा शेंडा अजून लालबूंद व्हायचा. माधवमामा आम्हाला हळूच खुणवायचा. मग आम्ही "लाल मिरची...!" म्हणून मोठ्याने ओरडून पाण्यात उड्या मारायचो.
          पाहता पाहता मामाची सुट्टी संपली. फक्त मला हे कळले नव्हते की, माधवमामा जायच्या आदल्या दिवशी आम्ही कितीही जोक करून आपा हसली नव्हती. त्यादिवशी तिचे नाक तर लाल झाले होतेच, पण डोळेही लालबूंद झाले होते. तिला कोण हसवतेय? म्हणून मामाने पैज लावली; तर ती उठून वर निघून गेली. मला उगीचच असे वाटले की, आम्ही चिडवल्याचा तिला राग आला असावा. जाताना तिच्या गालावर थेंब चमकल्यासारखे वाटले. माधवमामालाही बहुतेक तसेच वाटले असावे. तोही मग तिची समजूत काढण्यासाठी तिच्या मागोमाग गेला.
          बर्‍याच वेळाने तो परत आल्यावर आपा घरी गेली म्हणून सांगितले. आमचे सगळ्यांचे पोहायचे झाले होते. आम्हीही आता घरी जायला निघणारच होतो. नाहीतरी आज पोहताना काही मजा आली नव्हती. तरीही माधवमामा मात्र एकटाच थोडावेळ पोहत राहिला. पोहून त्याचेही डोळे लाल झाले होते.

(क्रमशः)

No comments:

Post a Comment