Wednesday, 1 June 2016

१६...

          काचेच्या लोलकातून प्रकाशाचा एक कवडसा जातो खरा; परंतु बाहेर पडताना मात्र सप्तरंगाच्या छटा घेऊनच बाहेर पडतो. या छटा लोलक त्याला देत नाही. त्या त्याच्याच अंतरंगात सामावलेल्या असतात. लोलक फक्त त्याला त्याच्या आत लपलेले जे आहे, त्याचा साक्षात्कार घडवतो. मी तरी काय आहे? एक साधा प्रकाशाचा कवडसाच. राममंदिराच्या प्रकरणामुळे मला पहिल्यांदाच धर्माची जाणीव झाली... तर भूकंपाने निसर्गाच्या प्रलयंकारी शक्तीचे दर्शन घडवले... शब्बूआपा असो कि सुजितची मम्मी, कुठेतरी त्यांनी मला अंतर्मुख व्हायला भाग पाडून माझे अंतरंग ढवळून काढले... बालनाट्य स्पर्धेमुळे माझ्यातील असलेला कलेचा एक अंकुर तरारून वर आला... माई, वेणू, माधवमामा, गुरुजी, बल्लू, ओमी, सुजित प्रत्येकजण लोलक बनून माझ्यासारख्या एका कवडशाला त्याच्यातील सप्तरंगांची जाणीव करून देत राहिले. या काळात माझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती... घडणारी प्रत्येक घटना माझ्यासाठी लोलकाचीच भूमिका वठवत होते. मी माझ्याही नकळत आधिकाधिक अंतर्मुख होत होतो. माझी भूक खादाड बनली होती. येईल तो अनुभव मी पचवत होतो. स्वतःभोवती एकेक धागा विणत होतो. कोशात शिरण्यापूर्वी जे जे घडायला हवे, ते सारे घडत होते. नियतीच ते सारे घडवून आणत होती. या बाबतीतही मी भाग्यवान होतो.
          तुमचा अमानवी गोष्टींवर विश्वास आहे का? उत्तर देण्याऐवजी उलटून हाच प्रश्न तुम्ही मला विचारू शकत नाही. कारण याचे उत्तर मलाच नीट माहीत नाही. सांगायचा प्रयत्न केला; तरी ते तर्कसंगत असेलच, असेही नाही. आपण समजतो तशा भूत, पिशाच्च, भटकते आत्मे, अघोरी शक्ती, इत्यादी वगैरे गोष्टी मला फक्त सुरस कथांमधूनच ऐकायला चांगल्या वाटतात. पण वास्तवामध्ये तार्किक बुद्धी यावर विश्वास ठेवायला तयार होत नाही. बरं विश्वास का ठेवावा? यामागे पटण्यासारखे काही लॉजिक तर हवे ना! पण एक गोष्ट आहे... भीती. तो सिग्मंड फ्रॉईड का कोण तो, त्याच्याही मते मानवाच्या सर्व भावनांच्या मुळाशी भीती असते म्हणे. लहानपणी तसे सगळेच कशाला ना कशाला भीत असतात. पण मोठ्या माणसांनाही कसली ना कसली भीती असतेच जणू. युगानुयुगे माणूस घाबरत आला आहे म्हणजे त्याला भीती वाटावी असे काही असेलच ना? भले आपण समजतो तशा गोष्टी नसतीलही. काही गोष्टींमागे वेगवेगळी नैसर्गिक, शास्त्रीय कारणे असतीलही. तरीही कुठेतरी असे वाटत राहते की, असेही काहीतरी नक्कीच असायला हवे; जे आपल्या आकलनाच्या पलीकडे आहे. दृष्टी, ध्वनी, रस, गंध, स्पर्श याच्याही पुढे जाऊन जाणीव नावाचा काही प्रकार असावा. म्हणालो ना, तुम्हांला पटणार नाही कदाचित.
          माधवमामाने मला पिराच्या विहिरीत पोहायला शिकवले होते. पण मामा नसताना मी विहिरीवर कधीच गेलो नाही. त्याऐवजी मी बाकीच्या पोरांसोबत डोहावर पोहायला जाऊ लागलो. त्याच डोहावर वरच्या बाजूला खडकावर काही ठिकाणी शेंदूर थापलेला होता. या आसरा होत्या म्हणे. सगळे या डोहाला साती आसरांचा डोह म्हणत. एक म्हसोबाही त्यांच्यामध्ये होता. वर्षानुवर्षे ते सगळे तिथेच होते. म्हातारी माणसं यांच्याविषयी बरेच काहीबाही सांगत. आसरा म्हणजे पाण्यातल्या अप्सराच. पण जेवढ्या देखण्या; तितक्याच भयानक. दुपारच्या निर्मनुष्य वेळी सूर्य ऐन माथ्यावर आला की, यांची जलक्रीडा सुरू होते. अशावेळी जर कोणी त्यांच्या तावडीत सापडला; तर त्या त्याला आपल्या मेळात घेतात. त्याला पाण्याखाली आपल्या राज्यात घेऊन जातात. जोपर्यंत तो त्यांच्या अंकित राहतो; तोपर्यंत तो स्वर्गीय सुखात राहतो. पण तो त्यांच्या हाताला लागत नसेल; तर तो कामातून गेलाच म्हणून समजा. अशा काही विलक्षण दंतकथा ऐकायला मिळत. त्यामुळे एकप्रकारची भीती मनात जागी होत असली; तरीही वेगळेच कुतूहलही मनात तयार होत होते.
          सकाळी स्वच्छ नितळ दिसणारे डोहाचे पाणी ऊन्हे कलू लागली की, गोठलेल्या मधासारखे दिसायला लागे. सकाळच्या उन्हात तळाचा तांबडा खडकसुद्धा दिसायचा. याच्या उलट सायंकाळी हा डोह एखाद्या कृष्णविवरासारखा दिसायचा. असे वाटायचे की, याच्यातून आत जाणारा पलीकडे कुठेतरी दुसऱ्याच विश्वात निघत असावा. मला कधीतरी एकदा त्या डोहाच्या गर्दकाळोख्या पाण्याखालील अद्भूत जगात जायचे होते. आतापर्यंत चंपक, चांदोबासारख्या कॉमिक्स पुस्तकातून पर्‍या, राक्षस, चेटकिनी, चमत्कार वाचलेले होते. त्यामुळे वाटायचे की, आपणही सिंदबाद, हातिमताई यांच्यासारखे वेडे धाडस करायला हवे. त्याशिवाय हे अद्भूत जग पाहायला कसे मिळणार? पण अडचण एकच होती, मला तेवढे चांगले पोहता येत नव्हते आणि एकट्याने जाण्यापेक्षा एखादा सोबती मिळायला हवा होता. बल्लूला ही कल्पना सांगितल्यावर तो माझ्याकडे असा काही पाहत राहिला की, पुन्हा त्याला विचारण्याचे माझेच धाडस झाले नाही. आणि... तसेही एकट्याने जाणे मलाही शक्य नव्हते. 
          रामोशाचा एक तरणाबांड पोरगा होता. अंबादास. तो तालीम करायचा. तो असाच कुणाच्याही सांगण्याला न जुमानता भर दुपारचा पाण्यात उतरला. चांगला तासभर पोहत होता. एकटाच. खडकावर चढून मोठ्याने किलकारी मारायचा अन् पाण्यात उड्या मारायचा. अंग घुसळून पाणी ढवळून काढत होता. काही गुराखी दुरून कुरणातून त्याची मजा बघत होते. पोहायचे झाल्यावर चांगला तासभर पाण्यात बसून राहिला. त्याला काहीच झाले नाही. जसा आला; तसा निघूनही गेला. पुढे दररोज भर दुपारच्या वेळी तो पोहायला येऊ लागला. तासन् तास उघड्या अंगाने खडकावर बसून खूळ लागल्यासारखा नुसता पाण्याकडे पाहत राहायचा. तरीही काहीच झाले नाही. पण त्याने तालीम सोडली. व्यायाम सोडला. अगोदर कुस्त्याच्या निमित्ताने तो सार्‍या मुलखात फिरायचा, तेही बंद झाले. पुढील सहा महिण्यात तर तो पार खंगून गेला होता. शेवटी शेवटी तर चालताना पाऊल टाकणेही त्याच्या जिवावर येई. धाप लागू लागली... कण्हू लागला... विव्हळू लागला. चरकातून काढलेल्या चिपाडासारखा तो वाळून गेला होता. शेवटी त्याच डोहात त्याने शेवटचा श्वास घेतला. त्याचे हे असे गायब झालेले कोणालाच कळले नाही. तो पाण्यात बुडाला आहे हे माहीत नसल्यामुळे सर्वत्र त्याचा शोध घेतला. कुठेच सापडला नाही. तिसर्‍याच दिवशी तो फुगून वर आल्यावर लोकांना कळले. मग मात्र बरेच दिवस कोणीही डोहाकडे फिरकले नाही. विशेषतः अमावस्या-पौर्णिमेला भर दुपारच्या ऊन्हात कोणीच डोहात उतरायचे नाही. अगदी जनावरे राखणारे गुराखीही पलीकडे कुरणातच थांबत. माणसं सोडा, पण म्हशीही कधी यावेळी डोहात उतरलेल्या मी पाहिल्या नाहीत. 
          अधूनमधून कधीतरी कोणी ना कोणी तिथे पूजा करताना आढळून येई. अमावस्या-पौर्णिमेला नारळ फोडले जात. पण कधी कधी कोंबडेही असायचे. सटी सहामाहीला पाण्यात परडी सोडण्याचा विधीही असायचा. नव्या टोपलीत सात पोळ्यांचे नैवेद्य, सात चोळीखण, सात चुडे, सात वेण्या, सात आरसे, फण्या, कुंकवाचे करंडे, सर्व प्रकारची सात सात खेळणी असे भरगच्च टोपली भरून पाण्यात सोडले जाई. सात सवाष्णी जेवू घातल्या जात. म्हसोबाला कोंबडा असे. गंमत म्हणजे या सर्व नैवेद्याचा मान कोणा ब्राह्मणाला नसे. महारमांग येथे मानकरी असायचे. अशाच कोणाच्या तरी कार्यक्रमाला सवाष्ण म्हणून आबईला बोलावले होते. तिथे बसल्या जागीच ती झुलू लागली. आबई आता झाड बनली होती. माणूस आणि अमानवी शक्तींमध्ये संवादासाठी माध्यमाची गरज असते. अशा माध्यमाला खेड्यातील भाषेत 'झाड' म्हणतात. होय! पुढे या आसरा तिच्या अंगात येऊन संवाद साधणार होत्या.
          आबईने अनेक दुःखे... अनेक भावना मनातच खोलवर दडपून टाकलेल्या होत्या. तिच्या या मानसिक तणावाचा परिणाम तिच्या आरोग्यावर दिसत होता. ती मोठ्यामामीसोबत शेतात जायची. घरातलीही बरीचशी कामे ओढवून घ्यायची. सतत कुठल्या ना कुठल्यातरी कामात स्वतःला गुरफटून घ्यायची. तरीही उरलेल्या वेळात ती कायम आजारी असायची. आता आपण परत कधीच सासरी जाऊ शकणार नाही, हे तिने फार मनाला लावून घेतले होते. याविषयी कोणी काही बोलतेय कि काय? याच धसक्याने ती कुणाशी काही बोलायचीही नाही. शंखात अंग चोरून घेणारी गोगलगाय बनून तिने आपल्या आणि जगाच्या मध्ये एक कवचाची न दिसणारी भिंत बनवलेली होती. पण तरीही या कवचात तिची घुसमट होत असावी. याचा परिणाम तिच्या अंगात येण्यामध्ये दिसून येऊ लागला. अशा अंगात येणाऱ्या अनेक बायका खेड्यातून आढळतील. नवरात्रात तर अशा अनेक झाडांना झुलताना आम्ही पाहायचो. आपल्या मागण्या मागून झाल्या की, ही झाडे हात पुढे करत. मग हातावर हळदीकुंकू, लिंबू, पेटलेला कापूर ठेवावा लागे. ते खाऊन झाले की, मग झाड शांत होई. अशा अनेक देवीदेवतांनी पिढ्यान् पिढ्या खेड्यापाड्यातून माणसांवर अधिराज्य गाजवलेले आहे.
          अंगात येण्याच्या प्रकारामुळे आबईचा एक फायदा मात्र झाला. बायकांमध्ये आबईला आदर मिळू लागला. गावातल्या जुन्या बायकांपैकी एक कलामावशी होती. ती या आसरांची भक्त. गावात आसरांची कुणाचीही पूजा असली; तरी तिथे कलामावशीशिवाय पानही हलत नसे. ती आता आबईची स्वयंघोषित गुरूबहीण झाली. दर अमावस्या-पौर्णिमेला आसरांची पूजा होऊन त्यांना नैवेद्य पोहचू लागला. मला या सगळ्या गोष्टींचे हसू यायचे. पण मोठी माणसं कमालीची श्रद्धाळू होती या बाबतीत. वर्षातून एकदा कुणाची ना कुणाची मोठी पूजा असायचीच. अशावेळी तिघीचौघींच्या तरी अंगात यायचेच. कुणी केस मोकळे सोडून नुसत्याच घुमायच्या. कुणी आळोखेपिळोखे देऊन नुसत्या दातओठ खायच्या. कुणीतरी बोलायच्या; पण भानावर नसायच्या. अशा झाडामध्ये येऊन देव काय हवे नको ते सांगायचे. काय कमीजास्त असेल ते मागायचे आणि प्रापंचिक अडचणी सोडवण्याचे आश्वासन देऊन शांत व्हायचे. केस मोकळे सुटलेले, कपाळावर मळवट भरलेला, ग्लानीमध्ये जाऊन घुमल्यासारखे बोलणे, दातओठ खाणे हा प्रकार फार असुरी वाटायचा. त्यामुळे अशा देवीदैवतांपासून मी चार हात लांबच राहिलो.
          मला एका गोष्टीची गंमतच वाटते, या देवीदेवतांच्या इच्छा मात्र सगळ्या मानवी होत्या. टाटाबिर्लाने शेजार्‍याला चुना मागावा, अशातला प्रकार झाला. एकदा कलामावशीच्या अंगात आल्यावर तिने सगळ्या गोष्टी ऐकणाराला पटतील अशा सांगितल्या. फक्त 'देवा काही इच्छा राहिलीय का?' असे विचारल्यावर 'डिंकलाडू खावासा वाटतो' असे उत्तर दिले. हे फारच अगम्य कोडे होते माझ्यासाठी.
          लहानपणी ऐकलेल्या सुरस कथांपैकी आणखी एक कथा म्हणजे वेताळ. विक्रमवेताळाच्या गोष्टीतील वेताळ मला फार असहाय्य वाटायचा. त्यामानाने सुताराच्या मेटापलीकडे बाभळीच्या सावलीत पारावर बसलेला वेताळ फार जबरा होता. शेजारीच मरीआईचे देऊळही होते. आषाढ महिण्यातच काय ती यांची आणि आमची गाठ पडे. मंगळवार वा शुक्रवार गाठून यांच्या पूजा होत. तांब्यात पाणी आणि कडूलिंबाची डहाळी घेऊन घरच्यांसोबत आम्ही जायचो. याही देवाला अधूनमधून अंडे, कोंबडा किंवा क्वचित बकरेही मिळायचे. इतरवेळी मात्र आम्ही या वेताळाकडे फिरकायचोही नाही. बैलगाडीच्या चाकापेक्षाही मोठ्या आकाराच्या शेंदूर फासलेल्या वेताळाचा उगीचच धाक वाटे. याने कुणाचे काही नुकसान कधीच केलेले नव्हते. तरीही याचा दरारा वाटायचा. वेताळ म्हणजे सर्व भूतांचा राजाच. गावाच्या चहूबाजूला असणाऱ्या सगळ्या भूतांवर याचा अंमल चालायचा.
          गावाच्या दक्षिणेस मेंढशिंग माळ पसरलेला आहे. या माळावर कुठेही उभे रहा. सलग असा भलामोठा परिसर नजरेच्या टप्प्यात येतो. माळाची सुरुवात फाटकीच्या तळ्यापासून होते आणि शेवट पंधरकीत. कमीतकमी चार मैलाचा टापू आहे हा सगळा. अमावस्येला याच माळावरून फाटकीच्या तळ्यापासून वेताळाची पालखी निघे. सगळी भूते यावेळी एकत्र जमतात म्हणे. दिवटीच्या उजेडात आपल्या या राजाची पालखी खांद्यावर घेऊन कुठेही न थांबता पंधरकीपर्यंत जातात. तिथून परत फाटकीपर्यंत आल्यापावली पळतच निघायचे. मग जेवणाच्या पंगती बसतात. माणसांना काय मिळेल, असे भारी भारी एकेक पदार्थ असतात यावेळी. गावातील काही अचाटवीर आपण या पंगतीत जेवून आल्याचे सांगतात. भूतांना कळणार नाही अशा बेताने गर्दीत मिसळून जायचे. हवे तर डोक्यावर घोंगड्याची खोळ घेतली की, चेहरा झाकून जातो. जेवायला बसल्यावर बोलायचे नाही. वाढणारालाही 'पुरे' म्हणायचे नाही. वाढणारे वाढतच राहतात. आपल्याला हवे तेवढे खायचे. ताटाला मध्यभागी भोक असते. नको असलेले ताटातून खाली टाकायचे. त्याची माती होऊन जाते. भूतांनी जर अशा आगंतुकाला ओळखले; तर मात्र घोळसून मारतात. पण जर तुम्ही धाडसी असलात आणि वेळ मारून नेलीत; तर तुम्हाला वेताळाशेजारीही रुबाबात बसता येते. अशा चविष्ट गप्पांची मैफिल शेकोटीभोवती, कट्ट्यावर बसले की, हमखास रंगायची. मला एकदातरी ही मिरवणूक पाहायची इच्छा होती. कधी रात्री अचानक जाग आली आणि त्यातही ती अमावस्येची रात्र असेल; तर माळाकडे पाहायचो. किमान माळावरून धावणारी पालखी नाही, निदान दिवट्यांचे उजेड तरी दिसतील, अशी आशा असायची. पण ती कधीही पूर्ण झाली नाही, हा भाग अलहिदा.
          सुताराचा नान्या मात्र गांज्याची तार चढली की, एखाद्या दोस्ताला बोलावे, तसा पारावर बसून वेताळाशी गप्पा मारत राही. वेताळाशी एकेरीवर बोलणारा नान्या म्हणजे काय? रामकटीसारखा उंचच उंच, छातीच्या बरगड्या तर एक ना एक मोजून घ्याव्यात. जरा काम केले की, छातीचा भाता सुरू व्हायचा. काय विशेष असेल कोणास ठाऊक. असा हा नान्या तांबारलेले डोळे वटारून हातवारे करत दातओठ खाऊनच वेताळाशी बोलायचा. त्याच तारेत बैलगाडीचे चाकसुद्धा सहज उचलायचा. पण हाच नान्या नशेत नसल्यावर मात्र चोरट्या नजरेने भिजलेल्या मांजरासारखा त्याच वेताळाकडे पाहायचा. कधीकाळी वेताळाच्या पंगतीला तो बसून आलाय, असे सगळे म्हणायचे.
          भूताखेताच्या गोष्टींना तर ऊत आलेला होता. कोणी भूताबरोबर कुस्ती केलेली होती. कोणाला भूताने तंबाखूच मागितली होती. कोणी हिरव्या साडीतली केस मोकळे सोडलेली हडळ बघितली होती. बहुतेक या असामींना माझ्यासारख्या यत्किंचित जिवामध्ये स्वारस्य वाटले नसावे. त्यामुळे माझ्या वाटेला ती कधीच आली नाहीत. मला स्वतःला मात्र याबाबतीत कसलाही वेगळा अनुभव आलेला नव्हता. भूतबाधा म्हणाल तर तशी एकदा झाली होती. एकदा शेतातून घरी येताना वाटेत एक काळे कुत्रे माझ्यामागे आले होते. आजपर्यंत त्याला मी कधीच पाहिलेले नव्हते. ते ओळखीचेही वाटत नव्हते. मी एकटाच असल्यामुळे नदीपर्यंत त्याने मला सोबत केली होती. काही ठरावीक अंतर ठेवून ते मागेपुढे चालत होते इतकेच. नदीपासून ते कुठे दिसेनासे झाले, ते मलाही कळले नाही. बस् त्या रात्री मला थंडी वाजून आली. अंगात ताप भरला. माईने चुलीतील राख अंगारा म्हणून लावली. मागच्या गल्लीत आंधळी सरूआत्या राहायची. ती सुपात धान्य घेऊन कुठली बाधा आहे, हे सांगायची. त्याप्रमाणे माईने काहीतरी 'देणे' भागवून शेताकडील वाटेवर नेऊन टाकले. सकाळी मी खडखडीत बरा. आता तो कुत्रा थोडा मोठा असल्यामुळे मी थोडासा घाबरलो होतो, हे खरे असले तरी यात भूताचा संबंध कुठे येतो? हे काही मला कळले नाही.
          यापेक्षा कधी काही विचित्र अनुभवाबद्दल म्हणाल, तर रात्री अचानक कधीतरी सगळे शांत असले की, सूर काढून कुत्री ओरडायला लागत. तेंव्हा कोणीतरी किंचाळल्याचा आवाज मी काहीवेळा ऐकलेला आहे. चालताना कधीतरी आपल्या पाठीमागून कोणीतरी येत आहे, असेही बर्‍याच वेळा वाटलेले आहे. काहीवेळा खूप दुरून आल्यासारखे येणारे भजनाचे आवाजही मी ऐकलेले आहेत. गंमत म्हणजे माईला विचारले की, तिला मात्र यातले काहीच माहीत नसायचे. एकदा तर दुपार टळून गेल्यावर तीनचार वाजता मी आणि बल्लू दोघेच डोहाच्या खालच्या बाजूला पोहत होतो. अगदी निवांत वातावरण होते. पोहून झाल्यावर डोहाच्या वरच्या बाजूने दगडी चौपाळीकडून घरी येण्यासाठी मार्ग पकडला. तिथे तेल्याचे म्हातारे सावलीत बसलेले होते. आम्हांला बघून त्याने आम्हांला विचारले,
"लईच गोंधूळ चालला व्हता रं..! दोघंच आलाय. बाकीची संमदी कुटं हायती."
"कोण बाकीचे? आम्ही दोघंच होतो."
"लईच लबाड हाय रं तुम्ही. चांगला सातआठदहा जणांचा कालवा हितवर ऐकू येत व्हता की."
काय बोलावे हे न कळल्यामुळे एकमेकांच्या तोंडाकडे बघत आम्ही तिथून निघून आलो होतो.


(क्रमशः)

No comments:

Post a Comment