Friday, 19 February 2016

३...


मी...
मी ?
मी कोण ?
कोण आहे मी??
खरंच कोण आहे मी???
          कधीतरी असा भारी प्रश्न पडतो ना!
प्रश्न साधेच असतात. म्हणजे वरवर तरी वाटतात साधेच; परंतु डोक्यात मधमाश्यांचे पोळे उठवून टाकतात. आता हा काय प्रश्न आहे का? मी कोण?
          गेल्या काही वर्षांमध्ये नाव सांगण्याची वेळ कधी आलीच नाही. सर्वकाही मागे सोडून आलो होतो. अगदी नावसुद्धा. मुळात माझे काय होते? मला माझे आयुष्य जगताना ते फक्त माझ्यासाठी जगायचे होते. ते जगताना नावाची अथवा कसल्या लेबलची आवश्यकता नव्हती. कोणालाच मी माझे साधे नावही सांगितले नाही. मी कोण आहे? काय आहे? याच्याशी कोणाला काही देणेघेणे नसावे. ज्यांना उगीचच जिथेतिथे नाक खुपसायची सवय असते; अशा अतिउत्साही प्राण्यांना मी दूरच ठेवतो. मला कोणी शोधत यावे, अशी काही गरज राहिली नाही. कोणी आलेच नाही. मीही कोणाला बोलावले नाही. मुळात यायला आहेच कोण? कोणीच आले नाही. आला होता ना! गेल्या पंधरा दिवसापूर्वी तो आला होता. काल त्याचे पार्सलही आले.
          पार्सलची आठवण होताच मी उठून घरात आलो. टेबलावर पार्सल तसेच पडलेले होते. मी ते उचलून उलटेसुलटे करून पाहिले. पत्ता... हो पत्ता काय लिहिलाय याची मला उत्सुकता होती. पत्ता लिहिणे अवघड नव्हते. तो सोपा होता. पण नावाचे काय? ते काय लिहिलेय, हे महत्त्वाचे होते. बरं! पार्सल अचूक माझ्यापर्यंत आलेय म्हणजे काय? घेऊन येणाराला काय स्वप्न पडले काय माझेच म्हणून. नाव तर असायलाच हवे. त्याशिवाय का ते अचूक पोहचले. पण मी तर त्याला नाव सांगितल्याचे मला काही आठवत नाही. पत्ता पाहिला आणि हसू आले. झटक्यात माझ्या सर्व शंका दूर झाल्या. पत्ता बरोबर होता. फक्त पत्त्यामध्ये माझ्या नावाच्या जागेवर लिहिले होते...
"टेकडीवरचा म्हातारा...!"
हां. हां.. हां...!
काय खोटे होते त्यात. या छोट्याशा खेड्यातील टेकडीवरील एकमेव घरात राहणारा मी...
पोस्टमनला फार विचार करावा लागला नसेल. उलट तोही हसला असेल. असा गमतीदार पत्ता पाहून. सगळ्यांच्या माहितीप्रमाणे मी म्हणजे टेकडीवरील घरात राहणारा विक्षिप्त म्हातारा. माई त्यांच्या दृष्टीने त्यांच्यातलीच. मी कोणी परग्रहावरून आलेला. माझे नाव त्या बिचाऱ्याला तरी कसे माहीत असणार...
चंद्रशेखर.
अरेच्या! खरंच की... मी तर चंद्रशेखर! आज पुन्हा नाव आठवले.
त्यानेही मला हा प्रश्न विचारला होता. तुम्ही कोण?
मी म्हणालो होतो, तुझ्यासारखाच हाडामासाचा माणूस.
आता नावाचा विषय आला.
मी चंद्रशेखर.
परंतु हे तर माझे नाव झाले. ही काही माझी ओळख होऊ शकत नाही. फार फार तर हेसुद्धा माझ्यातील 'मी'ला चिकटलेले एक भारीपैकी लेबल आहे. ब्रँडनेम म्हणायला काही हरकत नाही.
          कोणीतरी एखादा शापित यक्ष... गंधर्व... किन्नर या अनंत अंतरिक्षातून धूमकेतू बनून भटकत होता. चौर्‍याऐंशी लक्ष योनीतून पुन्हा पुन्हा जन्म घेऊनही त्याची सुटका होत नव्हती. त्याला उःशाप हवा होता. कधीकाळी केलेल्या काही चुकांचे परिमार्जन झाल्याशिवाय मुक्ती मिळणार नाही. त्यासाठी हवा मानवजन्म. आकाशगंगेतील पृथ्वी नामक एका ग्रहाजवळून हा धूमकेतू जात असताना तो वारंवार त्या सृष्टीनियंत्याला साकडे घालत होता. फक्त एकदा मानवजन्म मिळू दे... मला मोक्ष नको... मुक्ती नको... मानवजन्म दे. त्याची प्रार्थना फळाला आली. परमेश्वराने आपला हात उचलला...
"तथास्तु!!!"
अशाच कोण्या अनामिक क्षणी माझ्या आस्तित्वाचे एक बीज... मेघाने भूमीला दान द्यावे... तसे आईच्या गर्भामध्ये पोहचले... तिथेच ते रूजले... भिजले... अंकुरले...! दोन दोन इवलीशी हातापायाची पाने फुटून आली. आणि एक दिवस बियावरचे कवच फोडून या नव्या जगात प्रवेश झाला... पूर्वेला उषेची लाली पसरायला सुरुवात झाली. कोंबड्याने बांग देताच पाखरांची किलबिल सुरू झाली. अशाच शिशिरातील एका पहाटे धुक्याची ऊबदार दुलई पांघरून उषेच्या रक्तिमेत माखलेला एक जीव रूदनभूपाळी आळवत या जगात अाला. थोडावेळ कसलाच आवाज आला नाही; म्हणून सर्वांच्या चेहऱ्यावर काळजीचे सावट पसरले होते. एवढ्या मोठ्या प्रवासाने थकल्यानंतर आईच्या उदरामध्ये नऊ महिने नऊ दिवसांची भलीमोठी विश्रांती मिळाली होतीच. आता हा कोश फोडून बाहेर यायला हवे. असा विचार करून पहिला श्वास घेतला... आणि माझ्या रडण्याने सर्वांचेच चेहरे पुन्हा उजळले. नव्या जगातील नवा प्रवास पुन्हा सुरू झाला... जगण्याचे एक वेड... एक ओढ घेऊन...! असेच सुरू झाले... वाहायला लागले एक जीवन!!! त्याला भीती एकच... साचून राहिले की, डबके होते. कित्येक श्वासांचा हा प्रवास... युगानुयुगे चालू आहे... दिगंताच्या दिशेने!!!
           भटजीबुवांनी पंचांग धुंडाळले. पत्रिका बनवली. पुढे अनेक वर्षांनी अशाच एका प्रवासात सुब्रमण्यम स्वामींकडे भृगूसंहिता मिळाली. पहिल्या वहिल्या भेटीतच हात हातात घेऊन मला म्हणाले, "इतके दिवस कुठे लपून बसला होता? कुछ पुराना है... हमें तो कब का मिलना था|"
          आर्यमातेच्या पोटी असूरकुळातील क्षत्रिय वर्णाचा मंगळाची तामसीवृत्ती... शुक्राचे तेज... रविची प्रतिभा... घेऊन; सद्गुण-दुर्गुण... नीति-अनीति... पाप-पुण्य... जे काही गाठीला बांधून आणता येईल, ते सर्व घेऊन महारुद्राप्रमाणे हलाहल पचवण्यासाठी सिद्ध झाल्यानंतर... मी जन्माला आलो आणि बाराव्या दिवशी... अगदी बारावाच असेल असेही नाही. तेरावा, चौदावा; कदाचित पंधरावाही दिवस असेल, काय फरक पडतो... पण घरच्यांनी भारीपैकी बारसे घातले. आत्याबाईंनी आपल्या नाकातील नथ झोकात हलवून मुरका मारत माझ्या कानाजवळ आपले तोंड आणले आणि माझ्या कानात माझेच नाव सांगितले... चंद्रशेखर.
            त्यानंतर एवढ्या मोठ्याने कुर्र$$$ केले की, मी दचकून रडायलाच लागलो. एकामागून एक आणखी इतरही नावे सांगून पुन्हा पुन्हा कुर्र कुर्र केली. पण उडालेल्या त्या सगळ्या गोंधळात त्यांनी सांगितलेली ना नावे कळली ना त्यातील गंमत. तरी एक बरे झाले... आमच्या या आत्याबाईंच्या पाठीवर बाकीच्या बायकांनी चांगलेच धोपटले. असेच पाहिजे. आम्हाला रडवणाराची अशीच खोड मोडायला हवी. तेंव्हापासून ती आत्याही आवडली नाही आणि तिने ठेवलेले नावही. अगदी हायस्कूलमध्ये जाईपर्यंत हे नाव काही आवडले नाही.
चंद्रशेखर!
छ्या! हे काय नाव झाले? माझ्या बिकीच्या मित्रांची नावे कशी छोटीछोटी छान छान होती... शाम, रवी, राजू, अजय, सुहास... माझे नाव मात्र रेल्वेच्या डब्यासारखे लांबलचक. मी आजीला नेहमी म्हणायचो, "माई, आपण ना माझं पुन्हा बारसं घालूया. दुसरं कायतरी चांगलं नाव ठेवू."
आजी हसायची अन् म्हणायची, "आता तू एवढा मोठा झालास. पाळणा तुला पुरणार नाही. नवा मोठा पाळणा बनिवला की, तुझं नाव ठेवू."
पुन्हा पाळण्यात बसल्यावर मित्र मला चिडवणार. म्हणून मग माझा बेत बारगळत राही. तरीसुद्धा आपण मोठे झालो की, नाव बदलून टाकू. हा निर्णय कायम होता. तरी बरं. लहान होतो तोपर्यंत कोणी कोणत्याही नावाने हाक मारायचे. पण शाळेत जायला लागलो आणि हजेरीपत्रकावर नाव चिकटले ते चिकटलेच. शाळेतल्या मित्रांनी मात्र माझा प्रश्न थोडक्यात सोडवला. त्यांनाही एवढ्या लांबलचक नावाने हाक मारताना अवघड जाई. मग ते शेखर म्हणू लागले आणि मग पुढे सर्वांसाठी मी 'शेखर' झालो. हेही नसे थोडके.
            मराठी शाळेतून आठवीला हायस्कूलमध्ये गेलो. पहिलाच दिवस. मराठी शाळेत खाली फरशीवर अंथरलेल्या पट्टीवर मांडी घालून बसावे लागे. हायस्कूलमध्ये बसायला बाके होती. मोठ्या उत्साहाने आम्ही बसलो होतो. तेवढयात मॅडम आल्या. आम्हांला वर्गशिक्षिका म्हणून जोशी मॅडम होत्या. आल्यावर त्यांनीच त्यांचे नाव सांगितले. उंचीने तशा बेताच्याच. अगदी मी शेजारी उभारलो असतो ना! तर माझ्या एवढ्या होत्या. म्हणजे त्या छोट्या होत्या कि मी मोठा झालो होतो? बहुधा मीच मोठा झालो होतो. बरोबर आहे ना! मराठी शाळेत आम्ही हाफ चड्डी वापरायचो. आता एकदम इन वगैरे करून फुलपँट होती. तर काय! मॅडम अशा छान होत्या. गोर्‍या होत्या. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एकदम गोल गरगरीत चेहरा होता. मला तर एकदम असे वाटले की, घरी गौरी उभ्या करतात ना! त्यातलीच एक गौराई अशी जिवंत होऊन मॅडम बनून आमच्या वर्गात आलीय. आवाज तर एकदम देवघरातील पूजेची घंटी वाजवल्यासारखाच वाटत होता. थोडंसं नाकात बोलल्यासारखं वाटायचं. पण भारीच. मी आपला वेड्यासारखा बघतच बसलो होतो. डोक्यात हे असे काहीतरी विचार चाललेले.  मॅडमनी असेच छान छान बोलत राहावे असे वाटत होते. कानाला गोड वाटत होतं.
            पहिलाच दिवस असल्याने हजेरीपत्रक वगैरे काही नव्हते. मॅडमच म्हणाल्या, आपापली नावे सांगा म्हणून. बस् आमची गाडी तिथेच पंक्चर. मला खात्रीच होती, आपले हे नाव काही त्यांना आवडणार नाही. माझ्यासाठी ही चांगली संधी होती नाव बदलण्यासाठी. हजेरीपत्रक अजून तयार नव्हतेच. आपण सांगणार ते नाव इथून पुढे सुरू होणार. म्हणून मग कुठले नाव सांगावे, याचा विचार सुरू झाला. काय सांगावे हे पक्के होईपर्यंत माझा नंबर आला. मी गोंधळून उभा राहिलो. काहीच सुचेना. आम्ही शांतच. मॅडमनी आपल्या भुवया उंचवून गळ्यातल्या गळ्यात "अं?" असे काहीसे केले. मी वेड्यासारखा आपला तोंडाकडे पाहतोय.
"नाव..."
आता "अं?" असे करण्याची पाळी माझी होती. तेवढ्यात शेजारच्या केशवने मला डिवचले. मी आपला कसाबसा "शेखर" एवढेच पुटपुटलो.
"काय? ऐकायला नाही आले. पूर्ण नाव सांग पाहू."
मी कसबसे जड अंतःकरणाने पूर्ण नाव सांगितले. अरे या नावाचा वर्गातच काय पण अख्ख्या गावात कोणी सापडणार नाही. हे काय नाव झाले? मी पटकन खाली बसलो.
           तोंडात लेमनगोळी ठेवून बोलावे तसे मॅडमनी नाव उच्चारले, "चंद्रशेखर. भारीच!"
माझा माझ्याच कानावर विश्वास बसला नाही. मॅडम आपल्या नावाला 'भारीच!' म्हणाल्या. चेहऱ्यावर अगदी मोरपंख फिरवल्यासारखे वाटत राहिले. पुढे सुट्टी झाल्यावर पुन्हा पुन्हा केशवला विचारले. मॅडम खरेच 'भारीच!' म्हणाल्या कि माझा समज झाला तसा. पण केशवकडून पुन्हा पुन्हा खात्री करून घेतल्यानंतर माझीही खात्री झाली. आपल्या मॅडम भारीच आहेत. 'भारीच!' हा शब्दही तेवढाच भारीच आहे. आणि राहिले माझे नाव... मॅडम म्हणताहेत म्हटल्यावर तेही भारीच असणार...! आत्याबाईंच्या कुर्रने नावावर साठलेली धूळ मॅडमच्या एका शब्दाने झटकली गेली. पूर्ण दिवस मी असा रूबाबात फिरत होतो. इतर पोरांकडे अशा काही नजरेने पाहत होतो की, "हाय कंबख्तो! तुम्हारे पास भारीच नावपण नाय." खोटं सांगत नाही. तेंव्हापासून माझे नाव मला भलतेच आवडायला लागले. भारीच...!
          आठवणींची गणितं काही वेगळीच असतात नाही! कितीही दूर पळालं; तरी त्या सावलीसारखी पाठराखण करतात. याच जनसेवा हायस्कूलने मला माझ्या नावाची तर नव्याने ओळख करून दिलीच. वर माझ्यातील "मी" मला नव्याने समजू लागला. काय काय भेटले मला या दिवसांत. भारीच...!!!

(क्रमशः)

8 comments:

  1. Sir Khar Tar Ajunahi Nahi Mala Milale uttar Majhya Prashnache Chandrashekhar.......... Ki Nandkishor........
    pn utsukata vadhaliye ata .......... janun ghenyachi ki nakki kon ahe ha Chandrashekhar.......

    ReplyDelete
  2. या कादंबरीमधील सर्व पात्रे, प्रसंग काल्पनिक आहेत.
    असे मी म्हणणार नाही. पण यातील अनेकजण मला कुठे ना कुठे भेटले आहेत. त्या प्रसंगात ते अगदी योग्य वाटले. ती भूमिका त्यांना देऊन टाकली. 100% काल्पनिक असे काहीच नसते. फक्त त्याची तुलना वास्तवाशी करू नये. हा चंद्रशेखर आहे की नंदकिशोर? काय फरक पडतो. असाच एक मुसाफिर तर आपल्यामध्ये प्रत्येकाच्या मनात लपलेला असतो. शोधू या.

    ReplyDelete
    Replies
    1. nakkich sir...........
      ani he vachalyavar malahi chandrashekhar vhayala avdel.... ase jagayla avdel ase vatate........
      aplya jivanacha aswad ghet jagayla konalahi avdel konachehi interference naslele jivan fakt swatahvar prem karat jagayla mala tari nakkich avdel...........

      Delete
  3. सर एकदम मस्त

    ReplyDelete